चमचमीत कोल्हापुरी (सुभाष देसाई)
- सुभाष देसाई
गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यापासून ते प्रसिद्ध क्रिकेटियरपर्यंत कोल्हापूर भेटीच्या आकर्षणाच्या तीने गोष्टी असतात. करवीरची अंबाबाई, कोल्हापुरी चपला आणि कोल्हापूरचा तांबडा रस्सा, पांढरा रस्सा नि कोल्हापुरी मटण याशिवाय कोल्हापुरी झणझणीत, चमचमीत मिसळ. गेली साठ-सत्तर वर्षे ही ख्याती वाढत गेली. 1964 च्या दरम्यान गंगावेस या कोल्हापूरच्या पश्चिम भागात धारोष्ण दुधाचे कट्टे होते. ग्राहकांसमोर दूध पिळून भल्या मोठ्या पितळी पेल्यातून दूध मिळायचे नि वर्षानुवर्षे दररोज दूध पिणारे ग्राहकही होते. त्याच्यासमोरच वास्कर पैलवानांची हनुमान खानावळ वरच्या मजल्यावर होती. गंगावेसहून पश्चिम भागाकडे गारगोटी, राधानगरी भागाकडे जाणाऱ्या एसटीच्या नि खासगी हाऊटोन गाड्या सुटत, त्यामुळे येणा-जाणाऱ्या प्रवाशांमुळे हनुमान खानावळीस गर्दी होती. वास्कर पैलवानाप्रमाणे गंगावेस तालमीचे बाहेरगावचे पैलवानही तेथे गर्दी करीत. पैलवान गडी दिलदार, मनाने मोकळा; पण धंदा कसा चालवायचा हे कळायचे नाही. खानावळ काढल्यावर बोर्ड लावला होता "पोटभर जेवण मिळेल.' पहिल्या काही महिन्यांतच वास्कर पैलवानाला कळले, की भरपेट व्यायाम करून जेवायला येणाऱ्या पैलवानांना मटणाची थाळी देणे फायद्यापेक्षा तोट्याचे काम आहे.
आजची परिस्थिती वेगळी आहे. कोळेकर तिकटी ते पाण्याचा खजिना या शहरातील दक्षिण भागात गारगोटी रोडवर मटणाच्या खानावळी पावलोपावली आहेत. हॉटेल नि खानावळी यात परंपरेचा फरक आहे. या खानावळीतल्या जेवणाची चव औरच असते. वारंवार येणाऱ्या ग्राहकांमुळे मालकाशी अरे-तुरेचे, जवळचे नाते निर्माण झालेले असते. त्यामुळे मटणरश्श्यात तेलाचा तवंग, कट कमी पाहिजे की जादा याची फर्माईश मालक ऐकतो. अर्थात आर्थिकरीत्या या मटणाच्या खानावळी अल्पसंतुष्ट बनल्या आहेत. या धंद्यात थोडेफार पैसे मिळतात, पण घरच्या कुटुंबीयांच्या जेवणाचाही प्रश्न मिटतो. त्यामुळे मार्केटिंग, शाखा काढाव्यात याचे गणित कोणी मांडत नाही. खानावळ, धाबे, हॉटेल हे प्रकार थोडा वेळ विसरा, पण शहरातली असंख्य रस्सामंडळे तुम्ही नाही सांगितलीत तर विपरीत; पण प्रेमळ शिवी हासडल्याशिवाय कोणी राहणार नाही. रस्सा मंडळाची खासियत अमावस्या, पौर्णिमेला बघायची ती पंचगंगेच्या काठावर. चपाती, भाकरी, भात प्रत्येकाने आपापल्या घरातून आणायचा. मटण-रस्सा साऱ्यांनी पंचगंगा घाटावर नाहीतर कात्यायनीच्या डोंगरावर करायचा. करवीर हे संस्थान, त्यामुळे शिकारीचा छंद जोपासलेला होता. त्यामुळे रानडुकरे, ससे, हरण, भेकर, पक्ष्यांचे, बकऱ्याचे मटण चवीने खाणारी माणसे येथेच भेटतील. चार-पाच माणसे असली तर मटण आणून दिल्यावर सारे जेवण तयार करून देणारा कुटीर उद्योगही कोल्हापुरात चालतो.
बरं मंडळी! तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. शाकाहारी का मांसाहारी? प्रथम मांसाहारीकडे वळू. सर्वात जुने नाव पद्मा गेस्ट हाऊस. चार-पाच सिनेमा टॉकीजच्या मधोमध. मटण, पांढरा-तांबडा रस्सा चवदार मिळेल. मटण लोणचे हा प्रकार भारतात कोठेही मिळायचा नाही, पण तो संस्थानकाळापासून या ठिकाणी मिळेल. आता उचगाव फाटा, किलबिल कळंबा, हिमाणी राधानगरी रोड येथे स्वस्त नि मस्त मांसाहारी जेवण मिळेल. गवत मंडईत जाल तर छोट्याच जागेत गर्दी दिसली तर समजा तिथे अण्णाची बिर्याणी मिळते. बिंदू चौकापासून याल तर बडा मस्जिदजवळ खिमा सामोसा न चुकता खा. नाष्ट्याला जर काय खायचे म्हणाल तर सकाळच्या पहिल्या नमाजानंतर स्टेशन रोडच्या मलबार कॉर्नरला जा. तेथेच फक्त खिमा पोठा, खिमा पाव मिळणार. जुन्या पुणे-बंगळूर रोडवर ओपल हॉटेललाही तुम्हाला पांढरा-तांबडा रस्सा मिळेल, हां! जाता जाता सांगतो. वडा-कोंबडा, चिकन फ्राय, बीन-रोटीसाठी रंकाळा गाठा.
कोणी ना कोणी आपला सुवर्णमहोत्सव साजरा करतो, पण शाहुपुरीतील रेल्वे स्टेशनमागचे वामन गेस्ट हाऊस हे वर्ष साजरे करीत आहे. वामन धोंडू बागलकर, विजय बागलकर नि आता तिसरी पिढी अजित उत्कृष्ट मालवणी जेवण ग्राहकांना देतात. 1927 ला वामन भोजनालय फणसवाडी गिरगाव, 1951 ला खोतांची चाळ बंदर रोज मालवण, भरड मालवण नि 1963 पासून कोल्हापुरात हे खास कोकणी जेवणाकरिता प्रसिद्ध गेस्ट हाऊस. बांगडा ताट, सुरमई ताट, बोंबील फ्राय हवी तर येथेच जायला हवे. राजारामपुरीतील श्रीनिवास आसबे यांचे हॉटेल सायबा हेही उत्कृष्ट मत्स्य भोजनाचे हॉटेल. शिवाय देवगड फ्रेश, मालवणी इत्यादी हॉटेलही आहेतच.
आता वळू या शाकाहारी जेवणाकडे. झोरबा, राजपुरुष, गोकूळ, वेळवण येथे जायला हवे. मिलन हॉटेलच्या भज्यांची चव न्यारी. जुन्या कॉलेजकुमारांना विचारा. कोल्हापुरी मोठ्या वड्याची गंमतही काही औरच. हे वडे बाहेर दुर्मिळच.
संध्याकाळी 5 ते 8 मालवणी भजी, कमी पीठ, करपलेला कांदा टाकून केलेल्या खेकडा भजीसाठी व्हीनस कॉर्नर व शाहुपुरीत जा. याहीपेक्षा खाताना डोळ्यांतून पाणी काढणारी झणझणीत कोल्हापुरी मिसळ कधी खाल्लीत का? शहरात टोपमार्गे बावड्यात याल तर बावड्याची मिसळ न चुकता खा! तेथे बघाल तर मोठेमोठे सिनेअभिनेते येथे येऊन गेल्याचे फोटो दिसतील. उद्यमनगर भागात असाल तर दुपारी 12 पर्यंत फडतरेची मिसळ चाखा. थोडे वर आलात तर बाळाप्पाची फाळके गेस्ट हाऊस समोरची मिसळ लई भारी! खासबागची मिसळ, बिंदू चौकातली दत्तची मिसळ ही वर्षानुवर्षे प्रसिद्ध. हॉटेल श्रावण, त्रिवेणी, शाईबा, झोरबा यांसारख्या अनेक हॉटेलांतून शाकाहारी सात्त्विक भोजनाचा आस्वाद घेता येतो.
फास्टफूडचा जमाना आलाय. पुण्यात नाही पण कोल्हापुरात नॅशनल हायवेवर सरनोबतवाडीजवळ मॅकडोनाल्ड आणि कॉफी कॅफे तरुणाईला भुरळ पाडतो. शिवाजी विद्यापीठ, सायबरमधली पोर-पोरी तास चुकवून शोधायची तर तिथं जा. राजारामपुरीच्या 9 व्या गल्लीत मिस्टर इडलीत जा. इडलीचे 35 प्रकार पाहून दक्षिण भारतात आहोत असे वाटेल. कोल्हापुरात डोमिनोज पिझ्झाही मिळेल. गोली वडापाव, सॉस, बर्गर राजारामपुरीत भेटतो.
आणि या साऱ्यात शेवटी आइस्क्रीम राजारामपुरीत खाऊन थेट गंगावेस गाठा नि श्रीकृष्ण मठीजवळच्या हॉटेलमध्ये गझल ऐकत आकडी दुधाचा मस्त चहाचा घोट घेत स्वर्गसुख अनुभवा. घरी जाता जाता हिंदुस्थान बेकरी, भारत बेकरी नाहीतर खेमराज बेकरीतील खारी, टोस्ट वा केक घरच्यांना घेऊन जायला विसरू नका.
दावणगिरी दोसा
गांधी मैदानाजवळ शिवाजी अर्ध पुतळ्याजवळ (निवृत्ती चौक) रहदारी वाढली आहे असे दिसले की, नक्की समजावे की दावणगिरी दोसा खाण्यासाठी आबालवृद्धांची गर्दी केली आहे. अर्थात हे सारे सायंकाळी दिसणारे दृष्य. हा दोसा केवळ लोण्यामध्ये रोटी, पराठ्यासारखा बनवितात. खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची चवदार भाजी यात असते. कोल्हापुरात जैन दोसा जनता बझार, राजारामपुरी, येथे मिळतो. त्या चटणीत कांदा- लसूण नसतो. याशिवाय चायनीज डोसा जवळच आहे. पेपर डोश्यावर ढबूमिरची, कांदा- लसूण, सॉस, सोया सॉस, व्हिनीगर असल्याने तुम्ही पुन्हा- पुन्हा तिकडे वळाल. कर्नाटकातल्या दावणगिरी गावानंतर गुंटूर गाव प्रसिद्ध बनले ते गुंटूर इडलीमुळे. ती राजारामपुरीत मिळते.
वडापाव
कोल्हापुरात मंगळवार पेठेत कोळेकर तिकटी येथील शिंगोशी मार्केटमध्ये "आपली आवड' बोर्ड वाचून थांबा, तेथे वडापाव मस्त आणि स्वस्त. मोठा वडा केवळ 12 रुपयात गरमागरम. पावसाळा, हिवाळा नव्हे तर उन्हाळ्यातही आवडेल तो. सोबत तळलेली हिरवी मिरची तुमची चव वाढवेल. शाहू बॅंकेजवळच्या स्टॉलवर घरी जाता-जाता वडा-पाव पार्सल घेऊन जाणारे अनेक टू व्हिलर, फोर व्हीलरवाले थांबतात व ट्राफिकची एकच ओरड होते. राजाराम कॉलेज सागर माळावर "शामवडा' 1980 पासून प्रसिद्ध आहे. याशिवाय खाराळा बंगला, सत्यवादी ऑफिससमोर, दीपक वडा सेंटरला भेट द्यायला विसरू नका. भवानी मंडपातले "आप्पे' शेतकरी बझारसमोर हेही आता कोल्हापुरी खाद्यसंस्कृतीचे वैशिट्य बनले आहे.
No comments:
Post a Comment