Sunday, September 13, 2020

शबरी। वृषाली प्रभावळकर

सीतेच्या अपहरणानंतर रामलक्ष्मण दंडकारण्यात सीतेच्या शोधासाठी दक्षिण दिशेने पुढे निघतात. कालांतराने सरळ रस्ता सोडून प्रभू रामचंद्र रस्त्यातील एका वळणाच्या दिशेने चालायला लागतात तेव्हा लक्ष्मणाला या रस्ताबदलाचे कारण काही कळत नाही पण प्रभू वर्षानुवर्षे आपली प्रतिक्षा करणा-या एका भाग्यसंपन्न जीवासाठी  पंपा सरोवराजवळील मतंग ऋषींच्या आश्रमाच्या दिशेने चालू लागतात. कोणासाठी? तर  आयुष्यभर आपली प्रतिक्षा करणा-या भगवती शबरीला दर्शन देण्यासाठी. कोण आहे ही शबरी? आपण लहानपणापासून शबरीबद्दल ऐकले आहे. काही पौराणिक कथांमधून तिचे सुंदर चरित्र उपलब्ध आहे. दंडकारण्यातील भिल्ल वस्तीप्रमुखाची कन्या असलेली ही शबरी मतंग मुनींच्या आश्रमात कशी त्याची कहाणी गोड तितकीच ह्रदयस्पर्शी आहे.
 
ही शबरी आठ – दहा वर्षाची अल्लड बालिका आहे. त्या काळी लग्न लवकर होत हे आपण जाणतो. तसे शबरी आठ – दहा वर्षाची असतानाच तिचे लग्र ठरले. घरात लग्नाची तयारी सुरू झाली. त्या तयारीचा एक भाग म्हणून तिच्या वडिलांनी काही बोकडांची पिल्लं आणून ठेवली. शबरी त्या बछड्यांबरोबर खेळत राहायची. लग्न म्हणजे काय हे देखील तिला कळत नव्हते. त्या पिलांशी खेळताना शबरीला जेवायचीसुध्दा शुध्द राहात नसे. आई सारखी जेवणासाठी हाक मारायची आणि ती सारखी पिलांमागे धावायची. एक दिवस आई खेकसली – ‘खेळून घे, खेळून घे, किती दिवस खेळशील? सगळे मरून जातील मग कोणाशी खेळशील? ‘ शबरीने आईला विचारले – ‘पण ही पिले का मरतील?’ तेव्हा आईने तिला सांगितले – ‘अग मग ती पिले आणलीत कशासाठी? ती पिले जर कापली नाहीत तर तुझ्या लग्नात सगळ्यांना मेजवानी कशाची देणार?’  त्यावर शबरीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला की, आपल्या लग्नामध्ये ही पिले कापून त्याचे पदार्थ करणार. तिला खूप वाईट वाटले. ती आईला म्हणाली – ‘आई, नको गं यांना मारू. ही किती छान आहेत आणि हे सारे माझे मित्र आहेत.’  पहिल्यांदा आईने दुर्लक्ष केले पण शबरी पुन्हापुन्हा आईच्या मागे लागली की तू मला सांग मी या पिलांना मारणार नाही. शेवटी वैतागून आई म्हणाली, ‘जे काही सांगायचे ते तुझ्या वडिलांना सांग’  पण शबरीत हे धाडस नव्हते. एके दिवशी तिच्या आईनेच आपल्या पतीजवळ हा विषय काढला. तेव्हा शबरीचे वडील म्हणाले – ‘आली मोठी शहाणी मला शिकविणारी. इतके दिवस मोठमोठ्या लोकांच्या घरी जाऊन मेजवान्या खाल्ल्या. आता सगळ्या लोकांना मला खायला बोलवायला नको का? ’  आपल्या बापाने असे दरडावल्यावर बिचारी शबरी काय बोलणार.  तिच्या एक गोष्ट लक्षात आली की या लहान लहान बोकडांचं मरण काही टळत नाही. हे कापले जाणार. ह्या पिलांना कापायचे त्यांना खाऊन टाकायचे ही कल्पनाच तिला असह्य झाली. लग्नाचा दिवस जवळ येत चालला तसे तिने निश्चय केला की ही पिले मरता कामा नयेत. पण हे जमायचे कसे तर आपण एक गोष्ट करू शकतो. या पिलांची हत्या आपल्या लग्नाच्या निमित्ताने होणार तर मी जर लग्नच नाही केले तर ..ही हत्या टळेल. पण माझे वडील हात धरून मला बोहल्यावर उभे करतील. या घरात राहायचे तर लग्न करावेच लागेल. घरातून पळून जाण्याचा विचार शबरी करू लागली. मध्यरात्रीची वेळ. सारेजण शांत झोपलेले. छोटी शबरी घरातून बाहेर पडली. रात्रभर ती धावत होती. तशी थोडी भिती तिच्या मनात होती. पण ती भिल्लाची मुलगी. रानावनांची तिला सवय होती. तिला हेही ठाऊक होते की सकाळी घरी कळले की शोधाशोध सुरू होणार. म्हणून उजाडताच ती झाडावर चढून लपून बसली. शोध करणारी माणसे झाडाखालून आली आणि गेली. शबरीने एक नियमच केला की दिवसभर एखाद्या झाडावर लपून बसावं, झाडावरची फळं खावी आणि रात्री खाली उतरून पुढे पुढे जात राहावं. कुणीकडे जायचे तिला माहीत नव्हते. ते बोकड मारले जाऊ नयेत  म्हणून  आपण लग्न करायचे नाही या एका आकांक्षेने ती घरापासून दूर चालली होती. परंतु सद्भावना अंतःकरणात घेऊन जो अंधकारातही चालत राहतो त्याला योग्य ठिकाणी पोहोचविण्याची व्यवस्था परमेश्वराला करावी लागते. शबरीच्या बाबतीत हेच घडले.
 
एके दिवशी शबरी रात्रभर चालून पहाटेच्या वेळी एका झाडावर चढून बसली. उजाडल्यानंतर तिला समोर एक आश्रम दिसू लागला. तेथील तपस्वी, ऋषीमुनी, त्यांची ती बालकं, त्यांचे सात्विक चेहरे पाहून तिला खूप बरे वाटले. तिला ते लोक आवडले. तिने विचार केला की या लोकांची काहीतरी सेवा करावी. त्यानुसार शबरी पहाटे रोज लवकर उठायची. खराटा घेऊन संपूर्ण आश्रम झाडून स्वच्छ करायचा आणि मग पुन्हा झाडावर जाऊन बसायचे असा तिचा दिनक्रम सुरू झाला. रोज आपला आश्रम इतक्या लवकर स्वच्छ होतो आहे हे पाहून मतंग ऋषीना वाटले की आपले चेले सुधारले. आश्रमाच्या वातावरणातील हा फरक शिष्यांच्याही लक्षात आला. मतंग ऋषीना कळले की शिष्यांपैकी कोणीही हा आश्रम झाडत नाही.  मग ही सगळी सेवा कोण करते? एके रात्री मतंग ऋषी जागत बसले. पहाटे शबरी नित्याप्रमाणे आली. हातात खराटा घेऊन ती आश्रम झाडू लागली. मतंग ऋषीनी आपल्या कुटीराचे दार उघडले. शबरी चपापली. मतंग ऋषीनी विचारले, ‘तू कोण आहेस?’ तिच्या अंगाला कापरं भरलं. शबरी जवळ आली आणि त्यांच्या चरणावर कोसळली.  मतंग ऋषीनी पुन्हा  विचारले, ‘तू कोण आहेस?’ इथे का आलीस?’ शबरीने त्याना आपली सर्व कथा ऐकविली. मतंग ऋषीना ती ऐकताना आश्चर्य आणि कुतुहूलही वाटत होते. त्यांच्या लक्षात आले की अत्यंत श्रेष्ठ सत्वगुणी असलेला हा जीव कोणत्यातरी कर्माने या घरात जन्माला आला आहे. मतंग  ऋषी तिला म्हणाले, ‘बाळ, तू या आश्रमातच का राहात नाहीस? कोप-यात एक खोपटं बांधून घे आणि तिथेच राहा.’ शबरीला हेच हवे होते. ती भिल्लकन्या असल्याने स्वतःकरीता एक खोपटं तिने भराभर बांधले आणि तेथे ती आनंदाने राहू लागली.
 
आता शबरीचे जीवन सेवामय झाले. आश्रमाच्या स्वच्छते बरोबर तिने चांगले उद्यानही फुलवले. जे जे करता येईल ते ते काम ती करू लागली. थोड्या दिवसानंतर मतंग ऋषीना भगवंताचा संकेत प्राप्त झाला की समाधीची वेळ आली आहे. हिमालयाच्या अमुक स्थळी आपण जावे. ऋषींनी सर्वाना सांगीतले की दोन दिवसानी मी निघणार आहे. ज्याला कुणाला मला भेटायचे, काही विचारायचे त्यानी परवा संध्याकाळपर्यंत मला भेटावे. हे लोकांना कळताच त्यांच्यावर श्रध्दा असलेले अनेक लोक दर्शनासाठी येऊ लागले, साधनेद्वारा उध्दार कसा होईल या बद्दल नाना प्रश्न विचारू लागले. मतंग मुनी शांतपणे त्यांना मार्गदर्शन करीत असायचे. शबरी हे सर्व कुतुहलाने ऐकत राहायची. दोन दिवस भरकन निघून गेले. आता मतंग मुनी निघणार, आपले गुरूदेव आपल्याला सोडून जाणार. शबरीच्या नेत्रातू अश्रुधारा वाहू लागल्या. इतके प्रेम मुनीनी त्या छोट्याश्या भिल्लकन्येला दिले होते. तिने आपल्या सद्गुरूना विचारले, ‘गुरूदेव, इतके लोक आपणाकडे येत होते. साधन काय करावे?,माझा उध्दार कसा होईल? असे विचारत होते. गुरूदेव, उध्दार होतो म्हणजे काय होते? त्यासाठी साधन कसे करायचे असते? मी काय करू ते मला सांगा.’
 
शबरीच्या मस्तकावर हात ठेवून मतंगमुनी म्हणाले, ‘शबरी बेटी, त्याची काळजी तू नको करूस. अग तुझा उध्दार आपोआप होईल.’ शबरी विचारते ‘आपोआप कसा होईल?’  गुरूदेव म्हणाले, ‘अगं, तुझा उध्दार करण्याकरिता भगवान श्रीराम स्वतः या ठिकाणी येतील.’ छोटी शबरी हे ऐकून आनंदाने उड्या मारू लागली. गुरूदेवांनी सर्वांचा निरोप घेतला. ते निघून गेल्यावर आश्रमसुध्दा रिकामा झाला. शबरी मात्र तेथेच रडत बसली. रात्रीची वेळ झाली. आता निजायचे. शबरीच्या मनात विचार आला. मी काय वेडी आहे. श्रीराम कधी येतील हे मी गुरूदेवांना विचारलेच नाही. आता जर मी रात्री निजून गेले आणि रात्री श्रीराम आले तर ते काही मला उठवणार नाहीत आणि ते जर रात्रीच निघून गेले तर आले होते हे देखील मला कळणार नाही. या कल्पनेने शबरीला झोपच येईना. ती रात्रभर बसूनच राहिली. तिला वाटले, राम दिवसा आले तर बरे होईल. आपल्याला काही तयारी करता येईल. आता त्या आश्रमात कोणीही नव्हते. शबरीने हातात खराटा घेतला. तिने एक मार्ग स्वच्छ केला. तिला असे वाटले की, राम या बाजूने येतील असा विचार करून मी पूर्वेकडचा रस्ता स्वच्छ केला, पण राम पश्चिमेकडून आले तर मी एवढात रस्ता स्वच्छ करून काय उपयोग. त्यांच्या पायाला इकडच्या रस्त्याचे खडे आणि काटे बोचणारच.म्हणून शबरीने आश्रमाकडे येणारा दुसरा तिसरा असे करत सगळे रस्ते स्वच्छ केले.आता तिला स्नान करायचे होते. भिल्लाची अल्लड पोर ती. पूर्वी ती झ-यावर कितीतरी वेळ खेळत बसायची. पण आता तिला खेळताही येईना. झ-यावर स्नानासाठी गेली तरी तिचे लक्ष आपल्या झोपडीकडे होते. कुठे मी स्नानात अडकले आणि तेवढ्यात प्रभू रामचंद्र येऊन गेले तर! आज ती स्नान करून पटकन आली. आता रामांना आल्यावर काय काय लागेल याचा ती विचार करू लागली. एका शिळेवर त्यांना बसण्यासाठी तिने आसन तयार केले. रामाना पाय धुवायला पाण्याचा घडा भरून ठेवला. इकडून तिकडून फळे गोळा केली. रंगीबेरंगी सुवासिक फुले आणून त्यांचे हार, गजरे ती गुंफत बसली. सर्व तयारीनिशी रामांची ती वाट पाहात बसली. अशी सर्व तयारी करून वाट पाहायची हा तिचा नित्यनेम झाला. झोप अशी तिला राहिलीच नाही. श्रीराम येणार हा एकच ध्यास. ती सतत रामांच्या विचारात गढलेली असायची. रामांचा रंग रूप कसे असेल याबद्दलच्या कल्पना करीत तिची तंद्री लागे. त्या तंद्रीत तिला कधी त्या त्या रूपाचे दर्शनसुध्दा होऊ लागले. शबरीला ध्यान म्हणजे काय ते ठाऊक नव्हते. पण तिला ध्यास लागलेला होता. ज्याला ध्यास लागतो त्याला ध्यान करण्याची आवश्यकता उरत नाही. रात्रंदिवस ध्यास लागलेल्या शबरीचं बाल्य गेलं, यौवन गेलं, प्रौढत्व आलं पण शबरीच्या या ध्यासमय दैनंदिन जीवनात कधीच खंड पडला नाही. रोज रस्ते स्वच्छ करणे, आसन टाकणे, पाणी भरणे, हार गुंफणे, फळं तोडणे. तिच्या मनाला विश्वास होता की राम येणार. ती तेथील लतावेलींना सांगत राहायची, ‘ अगं आज आले नाही म्हणून काय झाले? केव्हा न केव्हा ते नक्की येतील.’ भक्तीशास्त्राचा एक नियम आहे. जो रोज रोज दार ठोठावतो त्याच्याकरिता दार नक्की उघडलं जातं. तुम्ही रोज भगवंताचे दार ठोठावत राहा. रोज रोज दर्शन मागत राहा. एक दिवस नक्की मिळेल असं संत सांगतात. शबरी वृध्द झाली. शरीर जराजर्जर झाली. पण शबरीच्या अंतःकरणातला विश्वास कमी झाला नाही. भगवंताच्या स्वागताची तयारी करून शबरी रोज प्रतीक्षा करीत जीवन व्यतीत करीत होती.
 
यावरून मला मनात एक विचार आला. आपण कधी देवाची शबरीसारखी वाट पाहिली का? आपल्या जवळच्या माणसांची वा मित्र, नातेवाईक, कामानिमित्त वा इतर कोणत्याही कारणासाठी कोणा कोणाची किती वेळ किती दिवस वाट पाहातो. ते येणार म्हणून काय काय तयारी करतो. पण आपल्या लाडक्या देवाची वाट पाहातो का?  कधीतरी शबरीसारखे आसनावरती बसून स्वागताची तयारी करून प्रभूची वाट बघून पाहा. रोज रोज वाट पाहा असे मी स्वतःच्या मनालाच बजावले.  
 
शबरीचे गुरूदेव पक्के होते. श्रीराम कधी येणार, कुणीकडून येणार हे त्यानी तिला मुद्दामच सांगीतले नसावे. समजा गुरूदेवानी शबरीला श्रीराम दहा वर्षानी येणार असे सांगीतले असते तर तिने नऊ वर्षे कदाचित् तुम्हा आम्हा सारख्या झोपा काढल्या असत्या. परंतु सद्गुरूनी तिला अनिश्चित स्थितीत ठेवले. तीव्र इच्छा आणि वेळ ठरलेली नाही अशा वेळी प्रत्येक क्षणी त्याचे स्मरण राहाते कारण कधीही आणि कुठूनही कोणत्याही रूपात प्रभू येऊ शकतात.
 
शबरीचे संपूर्ण जीवन म्हणजे केवळ प्रतीक्षा. ती एकटी बसून राही. येणारे जाणारे वाटसरू तिला वेडी भिल्लीण समजत. त्यांना असे वाटे की, ज्या रामाला कधी कोणी पाहिले नाही तो हिच्याकडे कुठून येणार? पण शबरीला रामाबद्दल अशी शंका कधीच आली नाही कारण तिचा आपल्या सद्गुरूंच्या वचनावर पूर्ण विश्वास होता. विश्वासो गुरूवाक्येषु स्वस्मिन् दीनत्वभावना। शरणागतीची जी सूत्र आहेत, त्यात एक अत्यंत महत्वाचे सूत्र सद्गुरूंच्या वचनावर विश्वास. आपल्या जीवनात सगळी गडबड हा विश्वास नसल्यामुळे होते. संशयात्मा विनश्यति असे भगवंतानी गीतेत अर्जुनाला सांगितले आहे. भगवंताच्या नामस्मरणाचे महत्व सर्वाना माहित असते. पण रोज निदान एक माळ जप करताना तितक्या भक्तीभावाने, नाममहात्म्याच्या स्मरणाने, प्रेमाने उचंबळून जाऊन आपल्याकडून एक माळ तरी जप होतो का? प्रामाणिकपणे विचार करायला हवा.  
 
भगवंताचे नाम एकदा मुखात आल्यावर सारा भवसागर आटतो असं संत म्हणतात. भगवंताचे नाम एकदा जिभेवर येण्याकरता हजारो जन्मांचे पुण्य असावे लागते. आपण भाग्यवान आहोत की, एवढे महत्वाचे भगवन्नाम आपल्या जीभेवरती नृत्य करते. कधीतरी आपल्याला आपल्या या भाग्याची जाणीव झाली कां? आपण जप करीत नाही असे नाही, पूजा करीत नाही असेही नाही. पण प्रतिकूल परिस्थितीत एखाद्या क्षणी तरी वैतागून संशयामुळे वा निराशेमुळे आपल्या सगळ्या साधनेवर पाणी पडते म्हणून  संशयात्मा विनश्यति असे भगवंत अर्जुनाला सांगतात.
 
मीरा फार शिकलेली नव्हती, पंडीत विद्वान नव्हती. पण एका साधूने श्रीकृष्णाची छोटीशी प्रतिमा तिला दिली आणि तिला ते म्हणाले, ‘मीरा हे तुझे ठाकूर.’ मीरेने विचारले,’ यांचे नाव काय?’ त्या साधूने सांगितले,’यांचे नाव गिरिधर.’ तितकेच शब्द मीराबाईनी धरून ठेवले. पण त्या क्षणापासून मीरेला एक क्षणभरही असे नाही वाटले की, ही केवळ पाषाणाची प्रतिमा आहे. लग्नाचे वेळी सुध्दा मीराबाई गिरिधराला सोबत घेऊन लग्न करते. या एका आत्यंतिक विश्वासाने मीरेच्या जीवनात क्रांती घडवली. लोकांना कित्येक जन्म साधना करून जे प्राप्त करून घेता येत नाही ते मीरेला एका जन्मात प्राप्त झाले. याचे कारण तिचा सरल निःसंशय भक्तीभाव.    
दक्षिणेश्वरची कालीमाता. व्यावहारिक भाषेत सांगायचे तर रामकृष्ण परमहंस त्या मंदिरातील पगारी पुजारी होते. मोठ्या भावाने फक्त सांगितले,’गदाधरा, ही आपली आई बरं.’ गदाधराने मातेच्या भूमिकेतून त्या प्रतिमेकडे पाहिले आणि गदाधराला असे कधीच वाटले नाही की ही केवळ पाषाणप्रतिमा आहे. त्यांना ती प्रतिमा चिन्मयीच दिसायची. आई आई असे म्हणत ते तिच्याशी बोलत बसत. काही दिवस आपण असे भगवंताशी बोलत बसलो म्हणजे भगवंतसुध्दा आपल्याशी बोलू लागतो. 
 
प्रतिमा केवळ बोलतच नाहीत, तर हसतात आणि रडतात देखील. संतांची जीवनं पाहिल्यावर हे लक्षात येते. त्यांच्या भक्तीभावाने त्या प्रतिमेतही प्राण निर्माण व्हायचा. गोंदवलेकर महाराजांच्या चरीत्रामध्ये एक सुंदर प्रसंग आहे. महाराज ब-याच दिवसांसाठी गोंदवले सोडून कदाचित कायमचेच यात्रेला जाणार होते. कुणीतरी वाटेवर येऊन महाराजाना सांगितले,’महाराज, रामरायाच्या नेत्रातून अखंड अश्रूपात चालू आहे.’ महाराज धावत मंदिरात गेले. पाहिले तर रामराया रडत होते. महाराजानी रामरायाचे डोळे पुसले आणि ते रामरायाला म्हणाले, ‘रामराया, तू रडू नकोस, तुला सोडून मी कुठेही जाणार नाही. मी तुझ्याजवळच सेवेला राहीन.’ ते ऐकून रामरायाच्या नेत्रातील अश्रुपात थांबला. आपला जसा भाव असेल तसा प्रतिसाद भगवंताकडून प्राप्त होतो. प्रत्येकाची आपल्या साधनेवर आत्यंतिक श्रध्दा हवी. पतंजली म्हणतात – सत्कारासेवितो दृढभूमिः। संशयाने साधनेचे खंडण होते. कोणतीही साधना केली अगदी थोडी केली तरी चालेल ती मनापासून करा आणि लक्षात ठेवा की हा सगळा प्रांत अनुभवाचा आहे  असे संत सांगतात.  
 
शबरीच्या मनात संदेह नव्हता. गुरूदेवानी सांगितले म्हणजे रामचंद्र येणारच. तिचे शरीर खंगत चालले होते. तपस्येने ती कृश झाली होती पण तिचा भाव काही बदलला वा किंचितही कमी झाला नाही उलट त्यातील उत्कटता वाढतच राहिली. आयुष्यभर डोळ्यात प्राण आणून शबरी रामाची वाट पाहात राहिली. ज्या दिवशी प्रभू रामचंद्र आले तो दिवस शबरीच्या जीवनातला अखेरचा भाग्याचा दिवस होता.
रोजच्याप्रमाणे शबरीने रामांच्या स्वागताची तयारी करून ठेवली आणि नित्यनेमानुसार ती रामांची वाट पाहात बसली. तिने पाहिले की समोरून दोन आकृती येत आहेत. अशा प्रकारची भगवंताची आकृती तिने ध्यानामध्ये किती तरी वेळा अनुभवली होती. ते राम आहेत हे तिला सांगावे लागले नाही. अत्यंत सुंदर श्यामल शरीर, मस्तकांवर जटासंभार, उत्फुल्ल कमलाप्रमाणे असलेले नेत्र, गळ्यामध्ये सुंदर पुष्पमाला, शबरीच्या अंतःकरणात जसे प्रभूंचे स्वरूप साकारले होते तशाच रूपात तिला त्यांचे दर्शन झाले.
 
देव कसा आहे हा प्रश्नच विचारूच नये. आपल्याला देव कसा हवा त्या रुपात तो दर्शन देतो. आपण केवळ त्याला समर्पित व्हावे. त्याच्या रूपावरती प्राणापलिकडे प्रेम करावे. लोकांना चिकित्सा करावीशी वाटते. पण समर्पण करावेसे वाटत नाही. त्यांचे म्हणणे असते की भगवंत कसा आहे ते आम्हाला आधी पटवून द्यावे. श्रीमत् भागवतामध्ये एक अद्भूत श्लोक आहे –
 
त्वं भावयोगपरिभावितह्रत्सरोजे
आस्से श्रुतेक्षितगुणो ननु नाथ पुंसाम्।
यद् यद् धिया तमुरूगाय विभावयन्ति
तद् तद् वपुः प्रणयसे सदनुग्रहाय।।
 
भगवंताची भावना कोणत्याही रूपात करा. कुठलेही रूप आणि नाम चालेल. ज्या रूपावर आपली श्रध्दा आहे ते भगवंताचे सर्वश्रेष्ठ रूप. भगवंताचे रूप असे नाही तसे नाही हे म्हणण्याचा अधिकार यःकश्चित माणसाला कदापि नाही. शिवमहिम्न स्तोत्रात पुष्पदन्त म्हणतात –
रूचीनां वैचित्र्यात् ऋजुकुटिल नाना पथजुषाम् 
नृणामेको गम्यः त्वमसि पयसामर्णव इव। 
भगवंताच्या कोणत्याही रूपावर प्रेम करावे. प्रेम महत्वाचे आहे. नाथांकडे एकदा एक व्यापारी आला. तो म्हणाला – ‘ तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी देवाचे ध्यान करायला बसतो, पण मला देव आठवतच नाही. माझे सगळ्यात जास्त प्रेम माझ्या म्हशीवरती आहे. तीच मला आठवते.’ नाथ म्हणाले, ‘ती म्हैस सुध्दा ब्रह्म आहे. तू तिचेच ध्यान कर. पण तिचे ब्रह्मभावनेचे ध्यान कर.’ ब्रह्मसूत्रात ‘ब्रह्मदृष्टिः उत्कर्षात।‘ असे एक सूत्र आहे. भगवंताचे ध्यान मानवी जीव म्हणून करणे चूक आहे. पण कोणत्याही वस्तूचे ध्यान ब्रह्मरूपात करणे श्रेष्ठ आहे. ध्रुवाच्या मनोमय कोषात, अंतःकरणात भगवंताच्या ज्या दिव्य रूपाचे प्रकटीकरण झाले होते तेच रूप धारण करून भगवान् बाहेर उभे होते. हे साधनेचे विज्ञान आहे. म्हणून प्रभू रामचंद्र येताच शबरीने त्याना ओळखले. प्रभूनाही सांगावे लागले नाही की ही शबरी आहे. जीव कितीही दूर असले तरी अंतःकरणातून ते जोडले गेले असतील तर पहिल्या भेटीतच ओळख पटते. पहिल्या भेटीतच रामकृष्ण विवेकानंदाना म्हणाले, ‘अरे किती दिवस मी तुझी वाट पाहात होतो. तु कुठे गेला होतास.’
 
‘तुम्ही आलात तुम्ही आलात’, असे म्हणत शबरी प्रभूंकडे धावते. त्यांचे दिव्य रूप पाहिल्यावर आयुष्यभर प्रभूंशी कितीतरी वेळ बोलत राहणारी शबरी प्रभूंचे साक्षात दर्शन झाल्यावर मात्र काहीही बोलू शकत नाही. प्रभूंच्या चरणावर शबरी कोसळली आणि प्रभूचरणांना आलिंगन दिले. तिच्या नेत्रातून अश्रूंचा अभिषेक सुरू झाला. लक्ष्मण तिला सांगू पाहात होते,’जरा दुरून.’ लक्ष्मणाने प्रभूंच्याकडे पाहिले. प्रभू भावविभोर होऊन त्या भिल्लिणीकडे पाहात होते. शबरी पुनःपुन्हा भगवंताच्या मुखाकडे पाहते आणि भक्तिभावाने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवते. तिचे शब्द विसर्जित झाले होते.
 
आपली अवस्था भगवत् प्रेमाने कधी अशी होते का? ज्याला देव कुठे आहे असा प्रश्न पडतो त्याला तो कुठेच दिसत नाही. आजकाल एक धार्मिक आध्यात्मिक खोडसाळपणा वाढला आहे. हातचे साधन सोडायचे आणि काहीतरी गूढ दिसले की त्याच्याकडे धावायचे. कुठलेही साधन प्रामाणिकपणे केले तरी सिध्दी प्राप्त होते. पुढे काय करावे हे सांगणारा कोणाच्यातरी रूपात गुरू भेटतो आणि आयुष्यात कोणीच भेटले नाहीतरी अंतःकरणातला राम आपल्याला पुढचा कर्ममार्ग दाखवितो. भगवान् पतञ्जलींचे एक सूत्र आहे. सः एष पूर्वेषामपि गुरूः कालेनानवच्छेदात्।
 
म्हणून प्रामाणिकपणे मनापासून आजच साधन सुरू केले पाहिजे. आपण देवपूजा करतो, पण देवांमध्ये आपल्याला चांदी दिसते, लाकूड दिसते, दगड दिसतो पण देव दिसत नाही. आपल्या घरातील बालकृष्णाला आपल्या ह्रदयाशी घेऊन प्रगाढ आलिंगन द्यावेसे आपल्याला कधी वाटते का? कधी त्या देवाला डोक्यावर घेऊन नाचावेसे वाटते का? किर्तन प्रवचनात देहभान विसरून मोठ्यांदा टाळ्या वाजवायचीही आपल्याला लोक काय म्हणतील म्हणून लाज वाटते. आपल्या घरातील देवाकडे एकदा प्रेमाने बघा आयुष्यात काय सकारात्मक बदल घडतो ते असे सर्व संत सांगतात.
 
शबरी भावाकुल झाली. तिने भगवंतांचे दोन्ही हात धरले. मुकाट्याने भगवंत चाललेत. शबरी म्हणाली, ‘जरा थांबा, आधी तुमचे पाय धुते.’ लक्ष्मण बोलणार होते, ‘नको, दादा कधी पाय धुऊन घेत नाहीत.’ पण लक्ष्मणाने पाहिले की, भगवंत काहीच बोलत नाहीत. शबरीने रामचंद्रांचे चरण मनसोक्त धुतले. श्रीरामांनीही आढेवेढे घेतले नाहीत. श्रीराम कशालाही नाही म्हणत नाहीत. जणू काय त्यांना आपल्या प्रेमळ भक्ताला भेटल्यानंतर स्वतःच्या नियमांचा विसर पडला. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे ‘वेडा झाला वेडा झाला, देव वेडा झाला।‘ जो देवाकरीता वेडा होतो देव त्याच्याकरीता वेडा होतो. केवटाला प्रभूंचे चरणप्रक्षालन करायचे होते तेव्हा प्रभूनी हो नाही, हो नाही म्हणत किती वेळ घालवला. पण तेच प्रभू शबरीकडून पाय धुवून घेताना काही बोलत नाहीत. वाल्मीकि रामायणात वर्णन आहे की,शबरीने प्रभूना दोन्ही हात धरून आसनांवरती बसवले. तिने आपल्या सद्गुरूंना देवाची पूजा करताना पाहिले होते. अगदी तशा प्रकारे तिने रामांची पूजा केली आणि प्रभूनीही ती पूर्ण पूजा करून घेतली. पूजेच्या अंतर्गत देवाला नैवेद्य अर्पण करायचा असतो.
 
भगवती शबरीने अतिशय सुंदर गोड गोड फळे देवाला अर्पण केली. शबरीने बोरे दिली असे वर्णन वाल्मीकि रामायणात नाही. पण बोरे म्हणणे चूक देखील नाही. ती आपली म्हणण्याची पध्दत आहे. एखाद्या माणसाचे घर मोठा बंगला असतो. पण तो बोलावताना म्हणतो- आमच्या गरिबाच्या झोपडीला तुमचे पाय लागू द्या. प्रत्यक्षात झोपडी नसते पण झोपडी म्हणायचे असते. जेवायला श्रीखंडपुरीचा बेत असला तरी गरीबाची चटणी-भाकरी खा, असे म्हणायचे असते. आलेल्या पाहुण्याला कुणीही चटणी-भाकरी खायला घालत नाही. पण हे विनयाचे शब्द आहेत. उत्तम फळे शबरीने आणली. एकेक फळ भगवंतापुढे करताना ती म्हणते, ‘हे जास्त गोड आहे. हे घ्या.’ लक्ष्मणाला सांगायचे होते की प्रभूंचा नियम आहे की कुणीही आणलेले खायचे नाही. गुहाने आणलेली फळे रामानी घेतली नव्हती. पण शबरीच्या आश्रमात प्रभूना जणू सर्व नियमांचे विस्मरण झाले आहे. शिवाय असे नाही की नाइलाजास्तव भगवंत फळं खातात. ते अत्यंत प्रेमाने आणि अत्यंत आवडीने शबरीने दिलेली फळं खातात. शबरीला ते म्हणतात, ‘शबरी, किती गोड फळं आहेत ही. कित्येक दिवसात इतकी गोड फळे खायला मिळाली नाहीत.’ केवळ औपचारिकता म्हणून प्रभू फळं गोड आहेत असं म्हणतात, असेही नाही. गोस्वामीनी एक प्रसंग वर्णन केला आहे. अयोध्येत राज्याभिषेक झाल्यानंतर प्रभू अनेक मंत्र्यांच्या घरी मेजवानीकरीता जातात. ऐश्वर्यसंपन्न अयोध्येतील शाही मेजवानीत विविध पदार्थांचा आस्वाद घेताना प्रभू लक्ष्मणाला म्हणतात, ‘शबरीची बोरे यापेक्षा किती गोड होती.’
 
शबरीच्या बोरांमध्ये असे काय होते? बोरांचा गोडवा कशाचा होता? शबरी अत्यंत उत्सुकतेने, भक्तीभावाने भारून जाऊन एकेक फळ प्रभूंच्या हाती देत होती. शबरीच्या नेत्रातून वाहणारा, शब्दाशब्दातून ओसंडणारा प्रेमभाव याची ती गोडी होती. गोस्वामी म्हणतात, रामहि केवल प्रेम पियारा। जानि लेउ जो जाननिहारा। हात जोडून शबरी प्रभू रामचंद्रांच्या समोर उभी आहे. ।।श्रीरामचंद्रार्पणमस्तु।। 
 
अखेरच्या श्वासापर्यंत रामनाममय होण्याचे शबरीचे सामर्थ्य आणि बुध्दी मला आणि सर्वाना प्राप्त व्हावी केवळ यासाठीच माझ्या अल्पमतीनुसार शबरीचरित्र साध्यासरळ संक्षिप्तस्वरूपात शब्दबध्द करण्याचा हा विनम्र प्रयत्न.।।अवघ्या आशा श्रीरामार्पण।।श्रीरामसमर्थ।।जय जय रघुवीर समर्थ।।-
 Vrushali Prabhavalkar

No comments:

Post a Comment