Tuesday, July 10, 2018

अनिल विश्वास उदय सप्रे

संगीतकार कै.अनिल विश्वास यांच्यावरील विशेष *सप्रे* म लेखमाला : *आरजू है दम में जब तक दम रहे.....— भाग ३*

मंडळी , *सप्रे* म नमस्कार ! मागच्या भागात आपण पाहिलं की भूमिगत अनिल घरी परतल्यावर आई यामिनीदेवीच्या सांगण्यावरुन हेडमास्तर राईचरण सरकार यांच्या भेटीस निघाला.
तिथे पोचल्यावर सरकारबाबूंनी त्याला सांगितलं की त्यांनी *अनिलसाठी १५ ₹ मॅट्रिकची फी भरुन ठेवली होती अशा विचाराने की पोरगं वेळेत आलं तर परिक्षा देईल पण नाही आलं तर फी चे पैसे फक्त फुकट जातील ! पण निव्वळ फी वेळेवर भरली नाही म्हणून त्याची परिक्षेला बसण्याची संधी हुकता कामा नये !*
अनिलचे डोळे भरून आले ! त्याने हेडमास्तरांच्या म्हणण्याचा मान राखत परिक्षा दिली व  मॅट्रिक पास झाला !
पण दुर्दैवानं अजून अनिलची पाठ सोडलेली नव्हती ना राव ! मॅट्रिकचे पेपर संपल्यानंतर कुणीतरी पोलिसांना कळवलं की चोरीच्या खटल्यात ती आठ मुलं होती — म्हणजे अनिल ,नीरेन घोष , सत्यव्रत घोष व आणखीन ५ मुले.यापैकी नीरेन व सत्यव्रत राजकारणात भाग घेतल्यामुळे आधीच पकडले गेले व राजनैतिक कैदी या नात्याने *ए क्लासचे कैदी* होते व अनिलसह इतर ६ जण नंतर पकडलेले ते झाले साधे कैदी !
या ८ जणांवरील खटला इतर वेळेप्रमाणे पंधरवड्यात न संपता ७—८ महिने चालला.या दरम्यान अनिलसह सहाजणांना कैदेत फार सोसावं लागलं.सकाळी नाश्त्याला लस्सीसारखा घट्ट पदार्थ कैद्यांच्या टीनच्या डब्यात टाकला जाई — जो बेचव असल्याने अनिल मित्रांना देऊन टाकी.कुठलीतरी सडकी भाजी आणून शिजवून जेवायला देण्यात येई— जी खाऊन २ मुलं हगवणीने मेली ! पांघरायला दिलेली कांबळी घाण व ढेकणांनी भरलेली असे ! रात्रभर डास आणि ढेकूण मारण्याच्या पार्श्वभूमीवर जागा असलेला अनिल रात्र रात्र मोठ्याने गाई : *दु:ख तोदेर घूँजबे कॅबे , दु:ख जॅदि ना पावे तो दु:ख तोदेर घूजबे कॅबे? विषके विषेर दाहॅन दिए दॅहन कॅरे मारते हॅबे ?* — म्हणजेच दु:ख सोसल्याखेरीज ते संपेल कसं?
इतर निर्ढावलेले कैदी आसपास असत ते बिनघोर झोपत व अनिल जागाच ! पहाटे पहाटे तो मुकुंददासांचे गीत गाऊ लागे : *मॅरा गांगे बान डेकेछे खुलते हॅबे नाओ ,  तोरा एखोने घुमाओ* — म्हणजे *कोरड्या तटावर भरतीचं पाणी आलंय — नाव चालवायच्या अशा वेळी तुम्हि झोपलायत !*

नीरेन—सत्यव्रत *ए ग्रेडचे कैदी* असल्याने त्यांना सर्व सुखसोई होत्या , बाहेरच्या खाण्यापिण्याच्या वस्तूही मिळत! त्यापैकी काही भाग चोरून अनिलपर्यंत पोचता होई व तेही अनिल आळीपाळीने आपसात वाटून देई ! कर्मदरिद्री निर्ढावलेले कैदी  मात्र अनिलमार्फत चांगल्या खाण्याऐवजी विड्या मागवून घेत !
७—८ महिने खटला चालवूनही गुन्हा सिद्व होऊ न शकल्याने या आठ मुलांना सोडून देण्यात आलं !

जोगेशबाबूंच्या — अनिलच्या वडिलांच्या मृत्यूनंतर त्याला किरण राय नामक संपन्न गृहस्थाने मुलासारखं वागवलेलं.या किरण रायची व सब—इन्स्पेक्टर मकसूद मियाँ ची मैत्री होती—हे माहित असल्याने अनिलशी तुरुंगातील अधिकारी सुटकेनंतर सहानुभूतीने वागत होते.अनिलला घेऊन आलेला शिपाई प्रभावात्मक आवेशात अनिलला घरी आणून सोडताच त्याच्या आईसमोर धपाटे घालत म्हणाला , *समजवा याला व त्या गुंडांपासून दूर ठेवा!* आणि विजयी मुद्रेनं अनिलच्या आईकडे पाहू लागला, तोच अनिलची आई कडाडली , *जरूर ! त्याला समजावून सांगेन की देशासाठी मरायला तयार असलेल्या मित्रांना सोडून पोलिसांच्या सांगण्यावरुन असं कुठलंच काम कधीही करू नकोस की ज्यामुळे तुला तुझे हे मित्र देशद्रोही ठरवून तुझ्या तोंडावर थुंकतील !*
यामिनीदेवींचे ते शब्द ऐकून त्यांना वेड्यात काढत तो शिपाई मुकाटपणे अनिलचा हात सोडून देत माघारी वळला !
आधुनिक युगातील यामिनीदेवीरुपी जिजाऊ इंग्रजरूपी औरंगझेबच्या तावडीतून सुटून आलेल्या शिवरायरूपी अनिलला कवटाळून त्याच्या डोक्यावर अश्रूंचा अभिषेक करती झाली !
अनिल मॅट्रिकला बसू शकला ते सरकार सरांच्या कृपेममुळेच — नुसती फी नाही , वय १६ शिवाय मॅट्रीकची परिक्षा देता येत नसे व अनिल १४ चा असूनही सरकार सरांनी परिक्षेच्या फाॅर्मवर त्याचं वय सोळा दाखवलं ! त्याकाळी एवढंच पुरायचं — वेगळे पुरावे लागत नसत!
वयाच्या १५ व्या वर्षी अनिल काॅलेजमधे दाखल झाला.शाळेतल्या शिक्षकांसारखं इथे काॅलेजमधे ओळखीचे शिक्षक नव्हते किंवा वर्षानुवर्षे एकत्र असलेले मित्र—मैत्रिणीही नव्हत्या ! त्यामुळे मूळच्याच मिश्किल व खोडकर असलेल्या अनिलची विनोदी वृत्ती जागी झाली नसती तरंच नवल !
शिक्षकांच्या बांध्यावरुन अनिलने पाच शिक्षकांची निवड करुन त्यांच्यावर संस्कृतमधे रचना करुन आपल्या दोस्तांना ऐकवली :
*मासमेकं सौर जाती दौमासे सतीशातुलौ , मणीरेकं दिनं जाती अद्यभक्ष हेमांघोष:॥*
आता अनिल संस्कृतमधे स्काॅलर होता हो , पण इतरांना हे कसं समजावं राव ? मग अनिलने अर्थ समजावून सांगितला :
*जंगलचा राजा सिंह जसा आपली भूक भागवण्यासाठी रोज एक जनावर खातो , तसेच आम्ही सौरेंद्रबाबू , सतीश दास , अतुल बाबू , मणी गांगूली आणि हेम घोष यांना खाऊ ! सौरेंद्रबाबू खूप लठ्ठ म्हणून त्यांना एका महिन्यात ( पुरवून पुरवून ) खाऊ , सतीश दास व अतुल बाबू एवढे जाड नसल्यांने त्या दोघांना दुसर्‍या महिन्यात खाऊ , मणी बाबू सडसडीत असल्याने एकाच दिवसात खाऊ आणि हेम घोष इतके अशक्त की त्यांना आपण आत्ताच खाऊ !*
हा अर्थ ऐकल्यावर मात्र सगळ्यांची करमणूक झाली व ही रचनाही सगळ्यांना पाठ झाली !
पुढील आयुष्यात लेखक , कवी , संगीतकार म्हणून हिंदी सिनेसृष्टी गाजवणार्‍या अनिलकडून अशा नटखट लीला काॅलेजमधे साकार होत होत्या ! पण हाही आनंद अनिलच्या भाळी नियतीनं फार काळ लिहिला नव्हता ! सगळं आलबेलसं भासत असताना असं नेमकं काय घडलं अनिलच्या जीवनात की त्याला बारिसाल सोडून पळून जावं लागलं — हे पाहुया पुढच्या भागात !
कळावे ,
आपला विनम्र,
© *उदय गंगाधर सप्रे* म — ठाणे

No comments:

Post a Comment