Wednesday, July 18, 2018

काका ..उदय सप्रे प्रशांत कुलकर्णी

कोलकत्त्याचा एक कार्यक्रम.यायला आधीच उशीर झाल्याने घाईघाईने मंचावर आधीच स्थानापन्न झालेल्या मान्यवरांसोबत बसायला घाईघाईने निघालेल्या शर्मिला टागोरला एक ओळखीचा *हाय* ऐकू येतो आणि केवळ त्या आवाजामुळे ती त्याला ओळखते — एरवी तो खूप रोड झालेला असल्याने त्याला ओळखणं अशक्यच असतं! शर्मिलाचं मन नकळत भूतकाळात मागे जातं.....
शक्ती सामंता शम्मी कपूरसोबत एका मोठ्या सिनेमाचं प्लानिंग करत होते पण त्याच्या तारखांअभावी मग शर्मिलाला घेऊन एका टॅलेंट हंट स्पर्धेतील नव्या चेहेर्‍यासोबत त्यांनी एक छोटा सिनेमा लाँच केला जो कल्पनेपलिकडे यशस्वी झाला — *आराधना* आणि मग हा नवा चेहेरा यशाच्या पायर्‍या चढत गेला — याचं नांव *राजेश खन्ना*
एक लोभस निरागस चेहेरा.....त्याला पाहून वयस्करांनी तरूण व्हावं आणि तरूणांनी कानात वारं भरलेल्या वासरासारखं उंडारावं .....देखणेपणाचा मानदंड , ज्या स्टुडिओत याचं काम चाललेलं असे त्याच्याबाहेर बालपण ते वार्धक्यापर्यंत सर्व वयाच्या स्त्रियांची रांग लागत असे , काही त्याच्या गाडीला हार घालत तर काही त्याच्या फोटोला हार घालत तर काही त्याला स्वत:च्या रक्तानं लिहिलेलं पत्र पाठवत ! त्याचं डिंपलशी लग्न झाल्यावर कित्येक तरुणींनी पांढर्‍या साड्या नेसायला सुरुवात केली होती..... ज्यानं १९६९ ते १९७२ या ४ वर्षाच्या काळात रिलीझ झालेल्या एकसे एक हिट सिनेमांद्वारे जनमानसांवर अक्षरश: गारूड केलं जे पुढे कित्येक दशकं टिकून राहिलं आणि एखादा तरूण जास्तंच नटा—मुरडायला लागला की ज्याला लोक अगदी आत्ता आत्तापर्यंत *स्वत:ला काय राजेश खन्ना समजतोस काय?* असं म्हणत , जो हिरो या दृष्टीने कधीही *मॅचो मॅन* नव्हता उलट अगदी नाजूक चणीचा निरागस  चेहेर्‍याचा पण प्रचंड नाट्यमय आवाजाचा , ज्यानं कुणाचीही नक्कल न करता स्वत:ची अशी एक स्टाईल निर्माण केली त्या राजेश खन्ना ऊर्फ काकाचा आज स्मृतीदिन ! १८ जुलै २०१२ ला काका हे जग सोडून गेला.त्यानिमित्त त्याच्यावर लिहायचं ठरवलं आणि लक्षात आलं की काका हे एका लेखामधे सामावणारं व्यक्तिमत्वच नाहिये ! *ज़िंदगी बडी होनी चाहिये , लंबी नहीं बाबुमोशाय!* , *आय हेट टिअर्स* , *मैं मरनेसे पहले मरना नहिं चाहता* असे डायलाॅग्ज मारणारा व रसिकांच्या मनात स्वत:बद्धल *अमर प्रेम* निर्माण करणार्‍या काकाबद्धल लिहायचं तर इतकं काही लिहावं लागेल की त्यासाठी लेखमालाच हवी..... आणि म्हणून आज त्याच्या स्मृतीदिनी सुरुवात करतोय एका विशेष *सप्रे* म लेखमालेची .....

*.....वो फिर नहिं आतें , वो फिर नहिं आतें!*

पूर्वीच्या अखंड भारतातील लाहोर शहरातील एक रेल्वे काॅन्ट्रॅक्टर अक्रुमल खन्ना — यांना ३ मुलगे : मुन्नीलाल , चुन्नीलाल आणि नंदलाल.मुन्नीलालला ३ मुली होत्या तर नंदलालला ४ मुली होत्या वत्रएक मुलगा होता : चंचल , विजय , कमलेश , मंजू आणि नरेंद्र.
२९ डिसेंबर १९४२ ला नंदलालची बायको चंद्राणी अमृतसरला प्रसूत झाली आणि तिनं अपल्यासारख्याच देखण्या रुपाच्या मुलाला जन्म दिला — ज्याचं नांव ठेवलं कराचीमधील एका देवळात — *जतिन*
चुन्नीलाल आणि त्याची बायको लीलावती यांना मूलबाळ नव्हतं आणि त्यांना चंद्राणीनं दिल्या वचनाला जागून जतिन त्याच्या काका—काकूंच्या ओटीत घातला !
अक्रुमल खन्ना व त्याचं हे ३ मुला—सुनांचं व ९ नतवंडांचं मोठं एकत्र कुटुंब अमृतसरहून मुंबईला आले व गिरगावच्या ठाकूरद्वारमधील सरस्वती निवास येथे स्थाईक झाले.
जतिनच्या जन्मानंतर अक्रुमलचा जोरात चालू असलेला धंदा आणखी जोरात चालू लागला.मूलबाळ नसलेल्या काका—काकूंचा तर जतिन जीव की प्राण झाला.साहजीकच तो लहानपणापासून मर्यादेबाहेर लाडावलेला हट्टी व आत्मकेंद्री मुलगा बनत गेला.जतिन गिरगावातील सेंट सेबेस्टियन गोवन हायस्कूलमधे शिकू लागला जिथे त्याचा शाळासोबती होता रवी कपूर.लाडावलेल्या जतिनला लहानपणापासूनच सगळे काका म्हणू लागले.काकाने एकदा सायकलची मागणी केली व त्यासाठी ती मिळेपर्यंत भोकाड पसरून रडत राहिला! पाच रुपये मागितले तर त्याला दहा मिळत गेले.शाळेतसुद्धा वर्गात बसायचं की नाही हे काकाच्या मर्जीवर अवलंबून असायचं ! पैशाची व वेळेची किंमत न करण्याची सवय काकाला फार लहान वयातंच लागली.....
असंच लाडाकोडात वाढलेला काका मॅट्रिकनंतर पुण्याच्या वाडिया काॅलेजमधे बी.ए. करायला गेला पण २ वर्षांनी *मोरू परतुनी आला!* मुंबईच्या के.सी.काॅलेजमधे शिकू लागला व इथेही रवी कपूर त्याच्या सोबत होताच.लहानपणी शाळेत व मग मोठेपणी काॅलेजमधे नाटकांकडे काका आकर्षित झाला.नाट्यसृष्टीशी काकाचा एक दूरचा नतलग भाऊ संबंधित होता.त्यानं एकदा एका नाटकात काकाला छोटासा रोल दिला आणि त्यातील संवादातील एक ओळ म्हणताना काका गळपटला ! सगळ्या प्रेक्षकांनी हुर्यो केला ! काका रंगमंच सोडून घर येईपर्यंत नाॅनस्टाॅप पळत आला !
असं असलं तरी जतिन आणि रवी या दोघांनीही अभिनेता व्हायचं स्वप्न उराशी बाळगलं होतं ! कधीकाळी पायलट होण्याचं स्वप्न पहाणार्‍या जतिनला आता मात्र सिने—नाट्यसृष्टीचे वेध लागलेले! रवी आणि जतिन स्क्रीन टेस्ट , आॅडिशन यासाठी एकमेकांना प्रशिक्षण देत व वेळप्रसंगी एकाच भूमिकेसाठी झगडत पण असत.जतिनला सिनेसृष्टीचं वेड लागायला कारणीभूत ठरली गीता बाली ! त्याचं असं झालं .....
जतिन अनेक नाटकात काम करत असे. एका नाटकाच्या तालमीसाठी जतिन एकदा एका इमारतीत शिरला.तालीम आटपून तो घाईघाईनं जिना उतरत असताना समोरून जिना चढून वर येणार्‍या गीता बालीला धडकला.साॅरी म्हणत तो थांबला , त्याची आणि गीता बालीची दृष्टादृष्ट झाली.गीता बालीनं त्याला सांगितलं की त्याच इमारतीत तिचं प्राॅडक्शन आॅफीस होतं व ती निर्माण करणार असलेल्या भावी *एक चादर मैलीसी* या नवीन सिनेमाच्या मुख्य रोलसाठी जतिनचा चेहेरा चपखल बसत होता ! मुळातंच नाट्यसृष्टीत नादावलेला जतिन हवेत तरंगत सिनेसृष्टीची स्वप्न पाहू लागला ! गीताच्या अकाली मृत्यूमुळे ती चादर मैलीच राहिली पण जतिन सिनेसृष्टीच्या ध्यासानं झपाटला गेला.त्यातच इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन — इप्टा संस्थेशी संबंधित अशा प्रभावी थिएटर संस्थेतील हरीभाई जरीवाला ऊर्फ संजीवकुमारशी पण नाटकांच्या स्पर्धेत सामना करावाच लागत होता.तो पुढे १९६८ च्या *संघर्ष* पासून सिनेमात चमकला.त्याआधी रवी कपूर याला व्ही.शांतारामच्या *नवरंग* मधे १९५९ ला ब्रेक मिळाला व नंतर १९६४ च्या *गीत गाया पत्धरोंने* मधे तो हिरो बनला.जतिनने यारी दोस्तीमधे कधीतरी सांगितलेलं *जितेंद्र* हे आपलं सिनेसृष्टीतील भावी नांव रवी कपूरनं वापरलं ! जतिनच्या अभिनयाचं तारू मत्र अजून भरकटलं होतं — सिनेसृष्टीत कामंच नव्हतं मिळालं तिथे *नाम* ची कसली आलीय महती महाराजा?
आणि अगदी अचानक जतिनच्या आयुष्याला कलाटणी देणारा एक प्रसंग घडला.....
सिनेसृष्टीत राज कपूर—देव आनंद—दिलीपकुमार यांनी आपलं बस्तान बसवायला सुरुवात केलेली.बाकी ठोकळाछाप हिरो खूप होते पण आता या तिघांना पर्यायाची गरज सिनेसृष्टीला भासू लागलेली व तोही असा पर्याय की जो हरीकृष्ण गिरी गोस्वामी याला अभिनेता बनायला प्रोत्साहन देणार्‍या व त्याचं मनोजकुमार असं नामकरण करणार्‍या दिलीपकुमारची काॅपी करणार नाही , जो राजेंद्रकुमारसारखी दिलीपकुमारची काॅपी करणार नाही , जो *तुमसा नहीं देखा* नाकारणार्‍या देव आनंदमुळे ज्या शम्मी कपूरला त्याच्या लागोपाठच्या जवळपास १९ फ्लाॅप सिनेमानंतर यशाचा सूर गवसला व उरलेल्या आयुष्यात बर्‍याचदा ज्याने देवची नक्कल केली — त्या शम्मीसारखा जो वागणार नाही , जो *स्वत:ची स्टाईल व  अॅक्टिंग करील !*
यासाठी मग बी.आर.चोप्रा , बिमल राॅय , देवेंद्र गोयल , एफ.सी.मेहरा , जी.पी.सिप्पी , एच.एस.रवेल , हेमंतकुमार , नासीर हुसेन , जे.ओमप्रकाश , मोहन सैगल , शक्ती सामंता आणि सुबोध मुखर्जी अशा १२ निर्मात्यांनी मिळून युनायटेड प्रोड्युसर्स कंबाईन या नावाने फिल्मफेअरसह *टॅलेंट हंट* स्पर्धा जाहिर केली.या स्पर्धेचा उद्देशच मुळी सिनेसृष्टीसाठी स्वतंत्र कॅलिबरचे नवीन अभिनेते व अभिनेत्री निवडणे हा होता.विजेत्यांना *युनायटेड प्रोड्युसर्स कंबाईन* चा प्रत्येक सभासद त्यांनी भविष्यात निर्माण केल्या जाणार्‍या सिनेमात संधी देणार होता.देशभरातून हजारो स्पर्धकांनी यात भाग घेतला होता.बाकी इतर स्पर्धेप्रमाणेच याही स्पर्धेचा फाॅर्म जतिनने भरला.लीना चंदावरकरने मद्रासहून फाॅर्म भरला — जेणेकरून महाराष्ट्राबाहेरील स्पर्धक म्हणून तरी प्राथमिक फेरीत निवड व्हावी.१०,००० स्पर्धक शाॅर्ट लिस्ट ( *शाॅर्ट ?* ) करण्यात आले.यातही अनेकांनी दिलीप—राज—देव यांपैकी कुणा ना कुणाची किंवा सगळ्यांची नक्कल केलीच.अंतिम फेरीसाठी या १०,००० स्पर्धकांमधून
६ स्पर्धक निवडण्यात आले.जे.ओमप्रकाशना जतिनचा भावनाप्रधान अभिनय भावला व त्यांना कुठेतरी एक वेगळा स्पार्क त्याच्यात जाणवला.
अंतिम फेरीसाठी सहाही जणांना एकाच सीनवर काम करायचं होतं : एक तरूण आपल्या आईशी वाद घालतोय !
६ स्पर्धकांमधे जतिन व विनोद मेहेरा यांच्यात चुरस होती !
जतिन तो सीनचा कागद घेऊन दिड़मुढ अवस्थेत उभा असता त्याचं लक्ष गेलं तो जी.पी.सिप्पी समोर उभे  त्यानं त्या सीनमधील कॅरेक्टरबद्धल अधिक माहिती द्यायची जी.पीं.ना विनंती केली ! जी.पीं.नी जतिनला आपादमस्तक न्याहाळत एकच विचारलं : *थिएटरसे हो?*
एवढं ऐकण्याचा अवकाश , जतिननं सीनमधल्या त्या तरुणाविषयी वय , बॅकग्राऊंड , आर्थिक स्थिती , आईशी कसे संबंध वगैरे प्रश्नांची इतकी सरबत्ती केली की जी.पीं.नी त्याला शेवटी *तुम तुम्हें जो आता है वो करके दिखाओ* असं सांगितलं!
मग जतिननं आधी केलेल्या नाटकातलं एक स्वगत म्हणून दाखवलं — ज्यात एका गरीब मुलावर एक मुलगी प्रेम करत असते.तो मुलगा दिसायलाही अगदीच सुमार असतो.तो मुलगा तिच्यावर *केवळ तुला बरं वाटावं म्हणून तू माझ्यावर प्रेमाचा दावा करत्येयस्!* असा आरोप करतो ! खूप अद्वतद्वा बोलतो ! ते संवाद आवाजाच्या बेफाट चढउतारासह जतिननं साभिनय म्हटले.संपूर्ण थिएटर या १२ अतिरथी महारथींसह स्पेल बाऊण्ड झालेलं ! आपल्या चाळ्यांकडे सगळ्या मोठ्या माणसांचं लक्ष आहे हे कळताच लहान मूल जसं चेकाळतं व अधिक ऊर्मीनं चाळे करू लागतं , अगदी तसंच — परिक्षकांचं आपल्या हाय्येस्ट पीचकडील संवादाकडे व अभिनयाकडे लक्ष आहेसं लक्षात येताच जतिननं सातव्या आस्मानातून आपला आवाज पार तळघरापर्यंत आणत त्या तरुणावर प्रेम करणार्‍या मुलीच्या भूमिकेत शिरत तिचे संवाद म्हणायला सुरुवात केली व त्यातून सीनचा क्लायमॅक्स उलगडला की ती मुलगी आंधळी असते व तिचं त्याच्यावरचं प्रेम हे प्लॅटोनिक लव्ह या सदरातलं उच्च कोटीचं असतं ! बाराच्या बारा परिक्षकांनी एकमेकांकडे पाहिलं आणि प्रेक्षकांच्या टाळ्यांनी त्यांना जतिनला गुण देण्याची आठवण करून दिली ! जतिन अव्वल नंबरानी उत्तीर्ण झाला होता व जतिन व फरिदा जलाल यांनी विभागून प्रथम क्रमांकानी स्पर्धा व मुकुट जिंकला ! अवघ्या पंधरा वर्षांच्या लीना चंदावरकर हिने दुय्यम स्थान पटकावलं !
आपल्याला मागे सारून पुढे निघून जाणार्‍या रवी कपूर ऊर्फ जितेंद्र पासून त्याचा पहिला यशस्वी सिनेमा *फर्ज* — १९६७ आणि नाटकातील प्रतिस्पर्धी संजीवकुमार हा *संघर्ष* — १९६८ पर्यंत अजून पोचायचे होते आणि जतिनचं भूमिकांसाठी दारोदार भटकणं आता संपणार होतं !
*युनायटेड प्रोड्युसर्स कंबाईन*  तर्फे आता जतिनला काम मिळणार होतं.त्याचे मामा के.के.तलवार किंवा मोठा भाऊ नरेंद्र किंवा काका चुन्नीलाल यांपैकी कुणीतरी सुचवलेलं *राजेश* हे नांव सिनेमातील पडद्यासाठी घेण्याचं त्यानं ठरवलं आणि तो खुशीत गाजरं खाऊ लागला !
पण स्वप्न आणि सत्यात खूप अंतर असतं हे नियती लवकरंच *राजेश खन्ना* ला दाखवून देणार होती ! असं काय घडलं की *युनायटेड प्रोड्युसर्स कंबाईन* ची टॅलेंट हंट स्पर्धा जिंकूनही काकाचा वनवास संपू नये ? — हे पाहूया पुढच्या भागात !

काका , तू यशाची *आराधना* करत सिनेसृष्टीत *आनंद* पसरवत आलास आणि आम्हां रसिकांच्या मनात *अमर प्रेम* निर्माण करून आजपासून ६ वर्षांपूर्वी १८ जुलै २०१२ ला निघून गेलास पण अजूनही ओठांवरती शब्द येतात *आनंद कभी मरते नहीं!* आणि कंठ दाटून येतो , डोळे पाणावतात..... कसा लोकप्रीयतेच्या शिखरावरचा तू होत्याचा नव्हता झालास आणि काळजावर चरे , ओरखाडे काढत निघून गेलास रे काका! तुला विनम्र श्रद्धांजली वाहताना डबडबणार्‍या डोळ्यांना तुझेच बोल आठवतात *.....वो फिर नहिं आतें , वो फिर नहिं आतें!*

तुझा वेड्यासारखा चाहता,

© *उदय गंगाधर सप्रे* म — ठाणे

18 जुलै ,संध्याकाळी सहाच्या सुमारास मोबाईल वाजला.पलीकडे एक पाकिस्तानी मित्र बोलत होता.त्याने निर्विकारपणे बातमी दिली.'ओ,यार तुम्हारा राजेश खन्ना मर गया'. बातमी अनपेक्षित नव्हती.सकाळीच त्याला परत हॉस्पिटल मधे दाखल केल्याचे ऐकले होते.त्यामुळे कदाचित आणखीन तब्येत खालावून जीवाचे बरे-वाईट होण्याची  शक्यता होतीच.आठवडाभरापूर्वी तो असाच हॉस्पिटल मधे दखल झाला होता.तेव्हाच मिडिया ने 'तयारी' केली होती.पहिली 'ब्रेकिंग न्यूज' दिली कि  त्याच्यावरची फिल्म पण channel वर  तयार होती. पण तेव्हा त्यांची तयारी फुकट गेली.!(काहींनी तो बरा होऊन घरी गेला तरीहि  ती फिल्म दाखवून पण दिली !!) यावेळेस मित्राची 'ती' बातमी  खोटी असण्याची शक्यात खोटी असण्याची शक्यता कमी होती.धावत घरी गेलो.टीवी लावला .इंटरनेट वर चेक केले पण कुठेच काही बातमी नव्हती.मग जरा हायसे वाटले.असं म्हणतात कि जिवंतपणी मृत्यूची बातमी पसरली तर  त्या माणसाचे आयुष्य वाढतं.तसं असेल तर 'त्या' पाकिस्तानी मित्राचा राग न येता मी त्याला दुवाच दिला असता.मृत्यू ची बातमी ऐकून जर राजेश खन्ना चे आयुष्य वाढणार असले तर लाख वेळा अशा बातम्या ऐकायची माझी तयारी होती.मित्राच्या दृष्टीने ती निव्वळ बातमी होती.पण आमच्या पिढीच्या दृष्टीने तो एक आघात होता.माझ्या भाव-भावनांशी त्याला काही घेणे देणे नव्हते..बातमी देऊन त्याने फोन बंद केला होता.पण माझ्या भाव विश्वातल्या आठवणीचा दरवाजा  मात्र तो उघडून गेला होता. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा आमची पिढी वयाच्या दशकात शिरत होती तेव्हा पासून राजेश खन्ना नावाचे गारुड आमच्या मनावर राज्य करू लागलं होतं.१९६५ च्या कुठल्याशा स्पर्धेत त्याची निवड झाली होती आणि लगेच बबिता बरोबर  'राज ' मिळाला.पण सर्वप्रथम रिलीज झाला तो चेतन आनंद चा इंद्राणी मुखर्जी बरोबर 'आखरी खत'. सुरवातीचे हे दोन्ही चित्रपट तसे आपटले.तसाच नसीर हुसैन चा 'बहारोके सपने'  देखील.पण १९६९ साली शक्ती सामंता चा 'आराधना' रोक्सी ला लागला आणि राजेश खन्ना एका रात्रीत स्टार झाला.आराधना बरोबर किशोर कुमार च्या कारकिर्दीला पण वेग आला.आधी किशोर देव आनंद चा आवाज म्हणून ओळखला जायचा पण आता राजेश खन्ना चा आवाज म्हणून ओळखला जाऊ लागला.दिलीप,राज,देव हि त्रयी उताराला लागली होती.नवीन पिढी एका  आयडॉल च्या शोधात होती.तो त्यांना राजेश खन्ना च्या रूपाने मिळाला,त्याचे mannerism ,मान तिरकी करत गाणे म्हणण्याची स्टाईल ,दोन्ही डोळे मिचकावून बोलण्याची लकब,हसरा चेहरा त्या पिढीला एकदम आपलासा वाटला.त्याच साली आलेल्या बी.आर. चोप्रा च्या  'इत्तेफ़ाक़' ,'दो रास्ते' मधे त्याच्या अभिनयाची चमक दिसली.वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी राजेश खन्ना superstar पदावर आरूढ झाला.मग त्याला मागे वळून पाहायला फुरसतच नाही मिळाली.७० साली खामोशी,सफर सारख्या चित्रपटात गंभीर भमिका करून त्यांनी लोकांची मने जिंकली आणि नंदा बरोबर 'दि ट्रेन'मधे 'गुलाबी आंखे म्हणत सस्पेन्स थ्रीलर मधे पण काम केले.तोपर्यंत राजेश खन्ना लोकांना आवडयला लागला होतं  ६९ साली रोक्सी ला आराधना गोल्डन जुबिली साजरी करत असतानाच मिनर्वा ला 'दो रास्ते 'मध्ये तो मुमताज बरोबर 'चूप गये तारे'म्हणत गर्दी खेचत होता.(जुन्या मिनर्वा मधला दो रास्ते हा शेवटचा चित्रपट .नंतर ते पडून नवीन बांधण्यात आले आणि नवीन मिनर्वा मधला पहिला चित्रपट होता 'लाल पत्थर')'दो रास्ते' नंतर त्याचा आमने सामने असलेला पहिला डबल रोल (आराधना मध्ये पहिला राजेश मरतो मग दुसरा जन्म घेतो) मनमोहन देसाई चा 'सच्चा झुटा' dreamland  ला लागला आणि 'दिल को देखो चेहरा न देखो  म्हणत राजेश यशाची आणखी एक पायरी चढला .त्यावर्षी चे फिल्मफेअर  अवार्ड देखील मिळवले.त्याकाळी लग्नाच्या वरातीत जी काही निवडक गाणी वाजवली जायची त्यात 'मेरी प्यारी बहानिया' चा वरचा क्रमांक होता.पण ७१ साली ह्रीशिकेश मुखर्जी चा 'आनंद 'स्वस्तिक ला लागला आणि याने लोकांच्या हृदयात घर केले.हा चित्रपट त्याला कारकीर्दीच्या सर्वोच्च शिखरावर घेऊन गेला.असं म्हणतात हृषिदांच्या मनात  हा चित्रपट राज कपूर ला घेऊन काढायचे विचार कित्येक वर्ष  घोळत होते.पण जेव्हा आनंद काढायची वेळ आली तेव्हा राज कपूर चे वय त्याच्या चेहऱ्यावर दिसायला लागले होते.हृषीदांनी राजेश ची निवड केली आणि राजेश ने देखील आलेल्या संधी ची सोने केले. ७१ साली मुंबईत स्वस्तिक ला लागलेला 'आनंद 'सिल्वर जुबिली करूनच उतरला.त्यात राजेशचे ते बाबूमोशाय म्हणणे,जिंदगी बडी होनी चाहिये लम्बी नही.उदासी क्या खुबसुरत नही होती बाबूमोशाय?,तुम्हे क्या आशीर्वाद देऊ बहन ये भी तो नही कह सकता कि मेरी उमर तुम्हे लग जाये.हम सब रंगमंच कि कठ्पुतलीया है जिनकी डोर उपरवाले कि उन्गलीयोसे बंधी हुई है ,आनंद चा एकेक डायलॉग त्यावेळचे रेडियो प्रोग्राम ऐकून आजही स्मरणात आहे.आनंद बघून  थेटर च्या बाहेर पडलेला पब्लिक गहिवरून डोळे पुसतच बाहेर पडायचा.आनंद ने त्याच्या हृदयात घर केलेले असायचे.आनंद राजेश खन्ना ला कारकीर्दीच्या सर्वोच्च स्थानावर  घेऊन गेला.स्वस्तिक मध्ये आनंद गर्दी खेचत असताना अलंकार ला तो 'आन मिलो सजना' मध्ये आशा पारेख बरोबर  'अच्छा तो हम चालते है 'म्हणत पब्लिक ला वेड लावत होता.नाझ ला मर्यादा मध्ये मालासिन्हा बरोबर 'चुपकेसे दिल दै नही तो' म्हणत छेड काढत होता.तर 'अंदाज' मध्ये हेमा मालिनी ला  मोटार सायकल वर बसवून 'जिंदगी एक सफर है सुहाना' म्हणत  मुंबईची सैर घडवून आणत होता.'अंदाज' मध्ये इंटर्वल च्या आधी जेव्हा तो मरतो तेव्हा अखं थेटर हळहळायचे.अंदाज मधले त्याचे नाकाच्या मध्यावर थोडा खाली खेचून गॉगल घातलेले पोस्टर लोकांना आकर्षून घेत होते.त्यावेळेस तो जे करेल ती स्टाईल व्हायची .आनंद पासून त्याने घातलेल्या गुरु शर्ट  ची फेशन आली .अंदाज मध्ये pant वर शर्ट  घालून त्यावर बेल्ट लावायची भन्नाट कल्पना त्याचीच (त्याने ते पोट लपवण्यासाठी केले हि गोष्ट वेगळी !) Novelty  ला   'हाथी मेरे साथी' मध्ये 'चल चल मेरे हाथी' म्हणत आबाल वृद्धाना वेड लावत होता.(बंगलोर ला हाथी.. चे शूटिंग करताना राजेश च्या डोळ्याला हत्ती चा दात लागल्याची  अफवा पसरल्यावर निर्मात्यांचे धाबे दणाणले होते आणि fans  च्या हृदयाचा ठोका चुकला होता.)७२ ला ताडदेव ला गंगा जमना हे थेटर उभे राहिले आणि 'सच्चाई छुप नही सकती'म्हणत  मिशी लावलेला राजेश चा 'दुश्मन' लोकांना प्यारा झाला.रोक्सी हे तर राजेश च्या चित्रपटांचे माहेरघर झाले होते.आराधना नंतर आलेला कटी पतंग व त्यानंतर अमर प्रेम   यात राजेश,किशोर  आर डी च्या संगीतात लोकांना न्हावू  घालत होते.त्याचवेळी लिबर्टी ला 'आपण देश' मध्ये तो मुमताज बरोबर 'सून चंपा सून तारा'करत 'दुनिया  मे लोगो को धोका कभी हो जाता है'  म्हणत आरडी च्या आवाजात गर्जत होता.पण हि गर्जना राजेश ची स्वतःची झोप उडवीत होती.याच काळापासून राजेश चे पिक्चर पडायला सुरुवात झाली होती.दिल दौलत दुनिया,मेहबूब कि मेहंदी ,बावर्ची जोरू, का गुलाम ,मेरे जीवन साथी,मालिक ,शेह्जादा द्वारे अपयशाच्या निसरड्या पायऱ्या  उतरायला सुरुवात झाली होती .मग सुरु झाली हे superstar  पद आपल्याकडे कायम ठेवण्याची धडपड.७३ ला फक्त 'अ' या आद्याक्षराने आपल्या चित्रपटांची सुरुवात करणारे जे.ओमप्रकाश चा 'अ' कि कडी तोडकर अशी जाहिरात केलेला  'राजा रानी' फ्लोप ठरला.पण यश चोप्रा  production  चा पहिला चित्रपट 'दाग'  मिनर्वा ला हीट गेला.हृषिदा चा 'नमकहराम 'Novelty  ला चालला आणि राजेश खन्ना ने आपण अजून संपलो नाहीं हे दाखवून दिले.पण सूर्य अस्ताला जाताना जसा मोठा होतो तसे हे होते.आनंद आणि नमक हराम मध्ये राजेश ला तुल्यबळ लढत देणारा नवख्या  अमिताभ चा जंजीर ७३ साली इम्पेरिअल ला लागला.रोमांटीक हिरो चा जमाना संपत आला होता.Action  युगाची सुरुवात होत होती.पण राजेश हा बदल स्वीकारायला तयार  नव्हता.७४ साली आप कि कसम,प्रेम नगर,रोटी हीट झाले.परत राजेश खन्ना कॅम्प मधून राजेश खन्ना च्या comeback  घोषणा झाली.पण त्याच साली तिकडे अमिताभ चा 'दिवार' आला आणि अमिताभ ने आपले स्थान पक्के केले.राजेश मात्र अपयशाच्या खाईत गटांगळ्या खात होता.अजनबी ,हमशकल,प्रेमकहाणी,आक्रमण,महाचोर,बंडलबाज,मेहबूबा ,त्याग,कर्म,चलता पुर्जा ,अनुरोध,आशिक हू बहारोन्का ,आईना,पलको कि छाव  मे,जनता हवालदार,प्रेम बंधन,मजनून,रेड रोज,आंचल..... अपयशाची मालिकाच लागली.मधेच एखादा chaillababu  व अमरदीप हीट व्हायचा आणि काका च्या कॅम्प मधून परत comeback  ची घोषण व्हायची .पण राजेश चा जमाना संपला होता,ज्या वेगाने तो यशाच्या शिखरावर चढला त्याच्या दुप्पट वेगाने तो अपयशाच्या दरीत फेकला गेला.यशाला विनम्रतेची ,विनयाची    जोड मिळाली तर पाय जमिनीवर राहतात आणि अहंकाराची किनार लाभली  तर ते यश डोक्यात जातं.माझ्या सारखा मीच  हा गंड राहतो. बांद्रा च्या ज्या कार्टर रोड वर राजेंद्र कुमार चा 'डिम्पल'हा बंगला त्याने विकत घेऊन त्याचे 'आशीर्वाद' हे नामकरण केले होते.त्या  आशीर्वाद बंगल्या समोर एके काळी राजेश खन्ना ची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची रांग लागलेली असायची.त्याचे नुसते दर्शन होताच जे चित्कार बाहेर पडायचे त्याने तो देखील सुखावला जायचा.देव देव म्हणजे काय?हा प्रश्न त्याला पडायचा.त्याच्या चाहत्यांच्या दृष्टीने तो पृथ्वीतलावरचा देवच होता.ते त्याची पूजा करायचे.त्याची नुसती गाडी दिसली तर तिला तरुणींचा गराडा पडायचा.आणि गाडी वर चुबनांचा वर्षाव होऊन ती लिपस्टिक च्या मार्क्स ने न्हाऊन निघायची..गाडी निघून जाताच टायर खालची धूळ मुली सिंदूर म्हणून कपाळाला लावायच्या. त्याच्या नुसत्या फोटो बरोबर अनेक तरुणींनी त्याला मनोमन वरून लग्न लावले होते.तरुणींची रक्ताने लिहिलेली पत्रे आशीर्वाद वर यायची असे एक न अनेक किस्से. एकेकाळी या बंगल्याच्या बाहेर निर्मात्यांची रांग लागलेली असायची.तो आशीर्वाद बंगला आता ओस पडला होता.संध्याकाळी गर्दी व्यायची ती त्याच्या चाहत्यांची नव्हे तर त्याच्या गोतावळ्यातील त्याच्या चमच्यांची .ते म्हणायचे 'उपर आका नीचे काका' त्याला ते खरे वाटायचे. superstar  पदाची नशा  हवी हवीशी वाटायची.१९७३ साली BBC  ने त्याच्यावर  Bombay  superstar  नावाची documentry  केली होती.देश -विदेशातून लोकं त्याला बघायला यायचे. दिल दौलत दुनिया,त्याग,भोला भाला,चलता पुर्जा,नौकरी,मेहबूब कि मेहंदी,दुश्मन दोस्त,असे अनेक चित्रपट  पूर्ण होऊन त्यांचे भवितव्य दिसायला लागल्यावर आपल्या कारकीर्दीवर  त्याचा परिणाम होऊ नये म्हणून  रिलीज होण्यापासून लांबवले. ८० नंतर  पण कुदरत,राजपूत,धनवान ,दर्द सारखे त्याचे चित्रपट आले .मधूनच एखादा टीना मुनीम बरोबर  फिफ्टी फिफ्टी,सौतन हीट व्हायचा.पण आता तो पूर्वीचा राजेश राहिला नव्हता.शबाना आझमी बरोबर'थोडीसी बेवफाई' म्हणत 'अवतार' घ्यायचा.पण बात जमत नव्हती.मग त्याने राजकारणात उडी घेतली.तिथेही बात जमि नाहीं आणि एकेकाळचा राजेश खन्ना नावाचा superstar  अलग अलग पडायला  लागला.त्याच्या वैयक्तिक आयुष्यात न शिरलेले जास्त चांगले.कलाकाराचे खाजगी आयुष्य हे बाहेर चर्चेचा विषय असते. पण राजेश आपल्याला बाहेरून जसा भावला,आवडला तसाच आपण त्याचा स्वीकार केला.त्याच्या भूमिकांच्या आपण प्रेमात पडलो.त्याची अदाकारी भावली,त्याचे संवाद मनाला कुठेतरी भिडले,त्याच्या लकबी डोळ्यांना सुखावून गेल्या.एकेकाळी आमच्या कळत्या नकळत्या वयात मनाच्या भावविश्वात  त्याने प्रवेश केला.कुठेतरी त्याने आम्हाला सिनेमाचे वेड लावले.सिनेमा बद्दलची ओढ निर्माण केली.त्याची अदाकारी,त्याच्या चित्रपटातील गाणी गुणगुणत आम्ही मोठे झालो.मोठे झाल्यावर आम्हाला आमचे नवीन आयडॉल्स सापडले.पण तरीही आम्ही राजेश खन्ना ला सोडले नव्हते.त्याच्या पडत्या काळातही आम्हाला मनापासून वाटायचे कि ह्याचा हा चित्रपट तरी हिट व्हावा.आमच्यासाठी नाही तर केवळ त्याच्यासाठी.कारण आम्ही राजेश खन्ना नावाचा तो भारावलेला काळ विसरूच शकत नाही.म्हणून राजेश खन्ना ला उद्धेशुनच म्हणतो......... "आनंद मध्ये जेव्हा ' तू जिंदगी कैसी ही पहेली हाय' असं म्हणाला होतास तेव्हा आम्हालाही ते एक कोडे वाटून  आम्ही माना डोलावल्या होत्या .नंतर तू याच जीवनाला खेळकर पणे  बघत' अंदाज' मध्ये मोटार सायकल वर बेदरकारपणे गात होतास'जिंदगी एक सफर ही सुहाना,यहा कल क्या हो किसने जाना' आम्हाला  हे हि पटले होते. मग तूच 'सफर'मध्ये 'जिंदगी का सफर है ये कैसा सफर'म्हणून सवाल केला होता आणि आमचे डोळे पाणावले होते.मग तूच 'आप कि कसम 'मध्ये आमची समजूत काढलीस 'जिंदगी के सफर मी गुजर जाते है जो मकाम वोह फिर नाही आते'आम्ही हेही समजून घेतले.पण जीवनाचे हे सर्व तत्वज्ञान गाण्यातून ऐकणं आणि पडद्यावर साकारणं सोपं आहे रे.तुझ्या जाण्यानंतर आता जाणवतेय कि जीवन हे किती क्षणभंगुर आहे.शेवटी तुझ्या दाग मधील काव्यात्मक ओळीचा आधार घेतो 
" आप न जाने मुझको समझते क्या? मैं तो कूछ भी नही.
इस कदर प्यार इतनी बडी चीज मैं रखुंगा कहा?इस कदर प्यार रखने के काबिल नही.
मुझको इतनी मोहोब्बत न दोस्तो,सोचलो दोस्तो! इस कदर प्यार कैसे सम्भालुंगा मैं ?मैं तो कूछ भी नही.
प्यार अगर एक पल  का भी मिल सके तो बडी चीज है जिंदगी के लिये मगर आदमी को ये भी मिलता नही
मुझको इतनी मोहोब्बत मिली आपसे ये मेरा हक नही मेरी तकदीर है,
मैं जमाने के नजरोमे कूछ भी न था
मेरी आंखो मी अबतक वो तस्वीर है ,
इस मोहोब्बत के बदले क्या नजर दु
मैं तो कूछ भी नही,
इज्जते,चाहते,उल्फते,शोहरते कोई चीज  दुनिया मे रहती नही
,आज मैं हू जहां कल कोई और था,
ये भी एक दौर है ,वोह भी एक दौर था ,
आज इतनी मोहोब्बत न दो दोस्तो ,
के मेरे कल कि खतिर कूछ  भी न रहे
आज का प्यार थोडा बचाके रखो मेरे कल के लिये
,कल !! कल जो गुमनाम है,कल जो सुनसान है,कल जो अनजान है,कल जो वीरान है
मैं तो कूछ भी नही मैं तो कूछ भी नही..........
१८ जुलै ला राजेश खन्ना गेला.त्यानंतर त्या पाकिस्तानी मित्राचा फोन आला नाही.जर आला असता तर मी त्याला सांगितले असते कि राजेश मरा नही राजेश मरते नही.त्यांची स्मृती आमच्या हृदयात अमर आहे
अलविदा राजेश !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! प्रशांत कुलकर्णी coolkarnipr@gmail .com

No comments:

Post a Comment