गप्पा तुमच्याशी’ हा माझा नवीन कार्यक्रम आटोपून मी मंचावरून खाली उतरत होतो तेवढय़ात मला एका प्रेक्षकानं म्हटलं, ‘तुम्ही माला सिन्हाविषयी काहीच बोलला नाहीत.’
मी चक्रावलो. माला सिन्हाविषयीच का, अनेक नायिकांविषयी मी काहीच बोललो नव्हतो. मीनाकुमारी व मधुबालाविषयीही मी चकार शब्दही काढला नव्हता. ओघात ज्यांची कोणाची नावं आली असतील ती आली. त्यात काही योजकत्व नव्हतं की कोणाचं नाव कटाक्षानं वगळायचं असं काही धोरण नव्हतं. मुळात माझा कार्यक्रम हिंदी चित्रपटांवर नव्हताच.
ही सगळी टोपली मी त्याच्या माथ्यावर उपडी केली. त्याचं शंकानिरसन झालं असावं या समाधानात मी होतो. पण छय़ा! तो पुन्हा म्हणाला, ‘पण माला सिन्हावर काहीतरी बोलायलाच हवं होतं.’
माफ करा, पण त्याच्या निर्बृद्ध आडमुठेपणाचा मला आता राग यायला लागला होता. अन्य नायिकांचं त्याला काही सोयरसुतक नव्हतं. बस्स, एक माला सिन्हा हवी. माझे कलाकार मित्र अनंत जोग यांनाही माला सिन्हाची काही ‘डिपार्टमेंटस्’ आवडतात. पण त्या काळात ‘डिपार्टमेंट स्टोअर’ कुठं होतं? माला सिन्हा हे देशातील पहिले ‘डिपार्टमेंट स्टोअर’ असू शकेल का? माला सिन्हा भलतीच उन्मादक व आकर्षक होती याबाबत दुमत असू नये. जर कोणाचं असेल तर त्यानं उपरोल्लिखित प्रेक्षकास एकांतात भेटावे व यथेच्छ धुलाई करून घ्यावी. माला सिन्हानं त्याच्या हृदयाच्या तारा तुटेपर्यंत छेडल्या असाव्यात.
‘परवरीश’मध्ये ती पडदा बाजूला सारून आपलं दर्शन घडवते आणि पार्श्वभूमीवर दत्तारामची सतार झणझणते, त्यासरशी भावनावेग असह्य होऊन माझ्या जाड चष्मेवाल्या मित्रानं भाजीची पिशवी तोंडात कोंबल्याचं मी अंधारातही स्पष्ट पाहिलं होतं. ‘फॅशन’मध्ये तिच्या नवऱयाचा मित्र म्हणवणारा बदमाश चंद्रशेखर तिच्याशी अतिप्रसंग करायचा अयशस्वी प्रयत्न करतो तेव्हा तो प्रयत्न यशस्वी व्हायला हवा होता यावर आम्हा मित्रांचं एकमत झालं होतं. माला निसटते पण तिच्या अंगावरची शाल चंद्रशेखरच्या हाती लागते. ती पांघरून तो झोपतो. ही शाल कुठे मिळेल का याची माझ्या जाड चष्मेवाल्या मित्रानं कसून चौकशी केली होती.
माला सिन्हाची सुबक ठेंगणी आकृती पाहताना मला नेहमी वाटायचं की रहस्यकथेतल्या झुंजारची विजया थेट अशीच दिसत असेल. त्या पाच फुटी नेपाळी ख्रिश्चन बाहुलीत स्फोटक द्रव्य ठासून भरलेलं होतं. ‘हम जान गये सरकार’ (लव्ह मॅरेज), मैंने तो नहीं पी’ (मैं नशे में हूं) किंवा ‘ओ मोरा नादान बालमा’ (उजाला) अशी बेफाम गाणी म्हणताना तिची अदा इतकी मादक असायची की जणू प्रत्यक्ष कामदेवाचं शिफारसपत्र ती पर्समध्ये घेऊन आल्येय. ‘मस्ती भरा है समा’ (परवरीश), ‘याल्ला याल्ला दिल ले गया’ (उजाला), ‘तसवीर तेरी दिल में’ (माया), ‘धडकने लगी बेकरारों की दुनिया’ (धूल का फूल) यांसारख्या धुंदफुंद द्वंद्वगीतात ती अनुक्रमे राज कपूर, शम्मी कपूर, देव आनंद व राजेंद्रकुमार यांना तर चेतवतेच, पण प्रेक्षकांनाही चाळवते.
माला दिलीपकुमार सोडून अन्य सर्व नायकांची नायिका झाली. (‘फिर कब मिलोगी’ या तिच्या व विश्वजीतच्या चित्रपटात दिलीपकुमार पाहुणा कलाकार म्हणून चमकला होता, पण चित्रपटात त्याचा मालाबरोबर एकही सीन नव्हता). गुरुदत्त (प्यासा), धर्मेंद्र (अनपढ), मनोजकुमार (हिमालय की गोद में), शम्मी कपूर (दिल तेरा दीवाना), अशोककुमार व सुनील दत्त (गुमराह), राजेंद्रकुमार (गहेरा दाग), राज कपूर (फिर सुबह होगी), किशोर कुमार (बॉम्बे का चोर), राजकुमार (कर्मयोगी), भारत भूषण (जहाँआरा), विश्वजीत (आसरा), अमिताभ बच्चन (संजोग), राजेश खन्ना (मर्यादा), संजय खान (दिल्लगी), जॉय मुखर्जी (हमसाया) एवढय़ा साऱया नायकांबरोबर माला चमकली. शिखरावर असतानाही तिनं कोणत्या नायकाबरोबर काम करायला नकार दिला नाही हे महत्त्वाचे.
लीला चिटणीसनं तिच्या आत्मचरित्रात एक किस्सा सांगितलाय. एकदा शूटिंगच्या दरम्यान कलाकार गोलाकार खुर्च्या टाकून गप्पा मारीत बसले होते. काही विनोद झाला की शम्मी कपूर अंग घुसळून हसायचा व मालाच्या गुडघ्यावर बुटाची लाथ मारायची. ती कळवळत होती. असं बराच वेळ चाललं होतं. नंतर तिनं लीला चिटणीसला गुडघा दाखवला. तो रक्तबंबाळ झाला होता.
‘अगं पण तू त्याला सांगितलं का नाहीस?’ लीलाबाईंनी विचारलं.
‘काय सांगणार?’ माला खिन्नपणे म्हणाली, ‘तो एवढा मोठा हीरो पडला…’
‘हरजाई’ चित्रपटात माला सिन्हा व शम्मी कपूर हे रणधीर कपूरचे आईबाप झाले होते. दिग्दर्शकाला मालाचे केस थोडेफार पांढरे दाखवायचे होते. त्यानं रणधीरला मध्ये घातले. त्यानं मालापाशी प्रस्ताव मांडला. तिनं सपशेल नकार दिला.
‘तुझ्या सख्ख्या आईचे आहेत का केस पांढरे?’ तिनं रणधीरला विचारले व त्याचे तोंड बंद केले.
हा किस्सा मला खुद्द शम्मी कपूरनं सांगितला होता. पण माला हॅड अ पॉइंट देअर.
लिहिता लिहिता मलाही वाटायला लागलं की, कार्यक्रमाचा विषय काहीही असो, श्रोते कोणीही असोत, प्रसंग कोणताही असो. माला सिन्हावर बोलायलाच पाहिजे. पण उद्या एखाद्या कार्यक्रमानंतर कोणी प्रेक्षकानं म्हटलं, ‘तुम्ही चाँद उस्मानीविषयी काहीच बोलला नाहीत तर मी काय करू?’
आज वांद्रय़ाला टर्नर रोडवर एखाद्या ८० वर्षांच्या काळपट, चपट, तेलकट वृद्धेकडे बोट दाखवून कोणी म्हणेल- ‘ही माला सिन्हा!’
काहीतरीच! जी उफाडय़ाची नाही, जिच्या डोळय़ात नर जातीला एक विलक्षण आव्हान नाही आणि मुख्य म्हणजे जी तारुण्यानं मुसमुसलेली नाही ती माला सिन्हा असूच कशी शकेल?…
No comments:
Post a Comment