Saturday, July 14, 2018

निळू फुले अतुल पेठे

( निळू फुले यांच्या ९ व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने BBC News करता लिहिलेला लेख )

|| मला उमजलेले निळूभाऊ ||

- अतुल पेठे

' बाई वाड्यावर या' हे गाणे ज्या ज्या वेळेस मी पाहतो त्या त्या वेळेस मी खट्टू होतो. 'बाई वाड्यावर या' असे म्हणणारे निळू फुले आजकाल जास्त 'फेमस' झालेत आणि तीच त्यांची ओळख बनली आहे. डोक्यावर तिरपी पांढरी गांधी टोपी, भेदक नजर, धोतराचा सोगा हातात धरलेला आणि तोंडाचा चंबु करून बेरकीपणानं हुंकारत निळूभाऊ बोलत. ती त्यांची 'स्टाईल' होती. अनेक मिमिक्रीवालेसुद्धा निळूभाऊंची एवढीच नक्कल करत आणि करतात. प्रसंगी पदरची वाक्ये बोलतात आणि निळूभाऊंच्या नावावर खपवतात. 'बाई वाड्यावर या' हे वाक्य कदाचित त्यातलेच ! पण हे वाक्य म्हणजे निळूभाऊंची खरी ओळख नव्हे. खरंतर हे वाक्य निळूभाऊंनी कुठल्या चित्रपटात उच्चारलं होतं याविषयी कोणालाही माहिती नाही. (अगदी त्यांच्या मुलीला, गार्गीलाही ते असं कुठल्या चित्रपटात बोललेत का याविषयी शंका आहे.) त्यामुळे आजच्या लोकांना 'बाई वाड्यावर या' ही निळूभाऊंची एवढीच आणि अशी ओळख राहणे हे माझ्या खट्टू होण्याचे कारण आहे.

सातारा - पुणे रस्त्यावर खंबाटकी घाटाच्या अलीकडे गेली ९ वर्षे निळूभाऊंचा फोटो रस्त्याच्या कडेला आहे आणि खाली लिहिले आहे 'मोठा माणूस !' निळूभाऊंची हीच ओळख मला आहे. 'मोठा अभिनेता' यापेक्षाही 'मोठा माणूस' ही निळूभाऊंची ओळख देखणी आणि खरी आहे.

चित्रपटातून दिसणारे निळू फुले मी वर्षानुवर्षे पाहतच होतो. त्यांची अनेक कामे मी पाहिलेली होती. त्यांच्याविना कुठलाही मराठी चित्रपट पूर्णच होऊ शकत नव्हता. निळू फुले म्हणजे मराठी चित्रपटातील अमिताभ बच्चन ! अनभिषिक्त सम्राट ! या सम्राटाने महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागावर अक्षरशः राज्य केलं. महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीतील काँग्रेस नेता त्यांनी हुबेहूब साकारला. अमर्याद सत्ता आणि त्यातून येणारा माज निळूभाऊंनी अनेक भूमिकांतून दाखवला. माझ्या मते लोहियावादी असणाऱ्या निळूभाऊंनी काँग्रेसवर असा राग काढला. साखर कारखानदार नेत्यांना चव्हाट्यावर आणून बदनाम करण्यात यांचा मोठा वाटा आहे. हे सारे राजकारण निळूभाऊंना पूर्णतः ठाऊक होते. किंबहुना हेच निळूभाऊंचे राजकारण होते. त्याची समज या कामांमधून दिसायची. अशा प्रकारच्या भूमिका करत असताना आवाज, नजर आणि देहबोली या तीन गोष्टींवर निळूभाऊंची हुकूमत विलक्षण होती. मराठी भाषेचे आणि त्यातल्या विविध बोलींचे त्यांना विचक्षण ज्ञान होते. ही त्यांची भाषा लोकनाट्यातून तयार झालेली होती. ती अस्सल रांगडी मराठी होती. याचे प्रत्यंतर 'कथा अकलेच्या कांद्याची' आणि 'सखाराम बाईंडर' या नाटकातूनही येत असे. बेदरकार, बेमुर्वतखोर आणि बेजबाबदार हे तीन अवगुण ते सखाराममध्ये पुरेपूर ओतत. त्यातूनच माणसाच्या रासवटपणाचे भेदक दर्शन ते घडवत. पण हे नाटक - सिनेमातले निळूभाऊ साऱ्यांच्याच परिचयाचे होते. तसेच ते माझ्याही माहितीतले होते. मात्र मला निळूभाऊ उमगू लागले ते साधारण १९९४/९५ सालानंतर.

नाशिकला एके ठिकाणी व्याख्यानामध्ये त्यांनी माझे नाव जाहीरपणे घेतले आणि प्रयोगशील नाटक करण्याबद्दल कौतुक केले. याबाबतची बातमी स्थानिक वृत्तपत्रातून आली होती. मी कमालीचा सुखावलो. १९९७ सालची गोष्ट. निळूभाऊंच्या समानशील डॉक्टर श्रीराम लागूंनीही माझे कौतुक केले. नाटकासाठी देणगी दिली आणि नव्या नाटकाची पृच्छाही केली. प्रसिद्ध लेखक श्याम मनोहर लिखित 'प्रेमाची गोष्ट ?' या नाटकाची संहिता मी डॉक्टरांच्या हातात दिली. डॉक्टरांना नाटक आवडले आणि त्यांनीच निळूभाऊंचे नावही सुचवले. इतकेच नव्हे तर त्यांनी त्यांच्या घरातून निळूभाऊंना थेट फोन लावला. निळूभाऊंनी डॉक्टरांना होकार दिला. दुसऱ्या दिवशी मी निळूभाऊंच्या घरी गेलो. त्यावेळेस निळूभाऊ  पुण्यात आयडियल कॉलनीच्या ग्राउंड जवळ राहात.

सकाळी दहा - अकराची वेळ. मी सकाळपासूनच तयारी करत होतो. मनात प्रचंड धडधड. निळूभाऊंना भेटायची कमालीची आस. अभिनयामुळे मी जसा प्रभावित होतो तशाच त्यांच्या माणूसपणाच्या अनेक गोष्टींनी मी आकर्षित होतो. राष्ट्रसेवा दलाच्या कलापथकातून लिहिलेली आणि केलेली वगनाट्य, सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मूलन अशी बहुविध कामे मला त्यांच्याजवळ जायला उत्सुक करत होती. 'सिंहासन' चित्रपटातील पत्रकार दिगू मला खूप जवळचा वाटत होता. काँग्रेसच्या उथळ राजकारणावर हा माणूस घाला घालतो आहे अशी प्रामाणिक भावना माझी होती. हे सर्व माझ्या मनात उचंबळून येत होते. मी दारावरची बेल वाजवली. दार उघडले गेले आणि साक्षात निळूभाऊ समोर उभे होते. पुंडलिकाला परब्रह्म भेटल्याचे जे परमसुख मिळाले असेल तेच मला मिळाले. लुंगी गुंडाळलेली होती आणि वर खादीचा झब्बा. हातात सिगारेट. खर्जातील आवाजात 'या' एवढेच म्हणाले. माझी नजर त्यांचं व्यक्तिमत्त्व टिपून घेत होती. अत्यंत साधा भाव त्यांच्या नजरेत होता. उभे राहण्यात लीनपणा होता. नाटकात असतात तितक्याच नैसर्गिक हालचाली त्यांच्या होत होत्या. मी त्यांना नाटकाची संहिता दिली. त्यावर ते 'करूया. डॉक्टरांची इच्छा पूर्ण करू या'.  एवढेच उद्गारले. मग निळूभाऊ इतर अनेक गोष्टीविषयी विचारू लागले, बोलू लागले. त्याच भेटीमध्ये त्यांनी मला डॉक्टर आ. ह. साळुंखे यांचे 'चार्वाक' हे पुस्तक भेट दिले. चहा पिता पिता निळूभाऊ अनेक विषयांवर बोलले. त्यांना विद्रोही तुकारामावर चित्रपट करायचा होता. निळूभाऊंची भेट घेऊन मी निघालो. मी पूर्णपणे बदललो होतो. निळूभाऊंचा समाजवादी प्रखर विचार काँग्रेसच्या सरंजामदारी वृत्तीवर जसा प्रहार करत होता तसाच नव्याने सुरू झालेल्या लालकृष्ण अडवाणी प्रणित हिंदुत्ववादी राजकारणावरही आघात करीत होता. अनेक वेळा त्यांना धर्मांध राजकारणामुळे कमालीचे अस्वस्थ झालेले मी पाहिले आहे. नथुराम गोडसे त्यादृष्टीने खलनायक होता. त्याचे उदात्तीकरण करणारे नाटक हा त्यांच्या चिंतेचा विषय होता. ब्राह्मणी राजकारणाचा आणि मनूवादी वृत्तींचा त्यांना पराकोटीचा राग होता. इतकेच नव्हे तर महात्मा जोतीराव फुले यांना तत्कालीन समाजाने अडाणीपणाने झिडकारले तसेच माळी समाजानेही नाकारले होते याचेही दुःख ते बोलून दाखवत. मनुष्याप्रति कळवळा असणारा हा निळूभाऊंचा स्वभाव त्यांना माणूस म्हणून मोठा करणारा होता.

निळू फुले आणि डॉक्टर लागू ही जोडगोळी महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत महत्त्वाची ठरलेली आहे. त्या दोघांना पाहिले की मला 'शेजारी' चित्रपटाची आठवण होई. त्यातील हिंदू-मुसलमान मित्र जसे घट्ट छंदिष्ट होते तसेच हे दोघेही होते. डॉक्टर लागू आणि निळूभाऊंची पार्श्वभूमी वेगळी आणि अभिनयाची शैलीही निराळी. डॉक्टर  शास्त्रीय पद्धतीने अभिनयाचा विचार करणारे तर निळूभाऊ नैसर्गिक पद्धतीने भूमिकेला भिडणारे ! डॉक्टरांचा प्रेक्षक वर्ग शहरी होता तर निळूभाऊंचा ग्रामीण ! दौऱ्याला निघालेली गाडी एखाद्या धाब्यावर थांबली की याचे प्रत्यंतर येई. त्या काळात मोबाईलचा सुळसुळाट नव्हता. तरीही अर्ध्या तासामध्ये सुमारे दोनशे माणसं निळूभाऊंच्या आजूबाजूला धाब्यावर जमत. तेवढ्या वेळात कुठून कॅमेरा आणत कोण जाणे. पण फोटो निघत. अनेकदा निळूभाऊ विशिष्ट घरामध्ये जेवायला गाडी थांबवत. मग तिथे राजकीय गप्पांचा फड बसे. मिश्किल आणि थेट घणाघाती बोलण्याच्या जोडीला मद्यपान आणि मांसाहार. निळूभाऊंच्या बोलण्यात त्यावेळेस गौतम बुद्धाविषयी आणि बुद्ध धर्माविषयी अनेक गोष्टी येत. हिंदू धर्मातील जाती व्यवस्था त्यांना अस्वस्थ करे. इतकी की आपणही बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे असे ते म्हणत. हा दृष्टीकोन मला नवा होता. निळूभाऊंनी मला अनेक पुस्तके भेट दिली. अनेक विषयांवर त्यांनी मला ठणकावले, सुचवले आणि वाचायला उद्युक्त केले. नाटकाच्या प्रयोगानंतर होणाऱ्या चर्चा हे खरं तर माझ्यासाठी शिबिर झाले. अचंबित होऊन ऐकणार्‍या आम्हा सगळ्यांचा तो अभ्यास वर्ग असे.

मी आजही आणखी एका आठवणीने थक्क होतो. त्या काळात पुण्यामध्ये नाटकाची बस झोपून जायला उपयुक्त अशी नव्हती. कलाकारमंडळी बसमधील बाकड्यांवरच आडवी व्हायची. डॉक्टर लागू त्यांची गादीची वळकटी आणायचे. तर निळूभाऊ मधल्या पट्ट्यात नाटकातल्या गादीवर झोपायचे. रात्री-अपरात्री गाडी थांबली की लोक काळजीपूर्वक बाकड्यांवर पाय ठेवत आणि कसरत करत गाढ झोपलेल्या निळूभाऊ आणि डॉक्टरांना ओलांडून जात. हे दृश्य मला गलबलून टाके. आपल्या साऱ्या व्यवस्थांचा राग येई. पण या दोघांचा थोरपणा हा की त्यांनी याविषयी एका शब्दानेही वाच्यता केली नाही. ठिकठिकाणी प्रचंड उकाडा असून कधी एसीची मागणी केली नाही की कुलरची ! आम्ही कलकत्त्याला 'नांदीकार'च्या नाट्यमहोत्सवात गेलो तेव्हाही निळूभाऊ आणि डॉक्टर आमच्याच बरोबर आगगाडीतून आले. दौऱ्यात मला निळूभाऊंनी तीन पानी पत्ते खेळायला शिकवले. निळूभाऊ कुठल्याही विषयावर पारदर्शीपणे बोलायचे. आयुष्यात अनाहूतपणे घडलेल्या चुकाही ते निर्धास्तपणे सांगायचे. अशा वेळेस मी त्यांना 'ते आत्मकथा का लिहीत नाहीत' असे विचारले तर 'खरे लिहायचे धैर्य माझ्यात नाही आणि थापा मारण्यात रस नाही' असे त्यांनी मला निर्मळपणे सांगितले.

' प्रेमाची गोष्ट ?' या नाटकात खरंतर एकच प्रसंग निळूभाऊंना होता. 'हिंदमाता रद्दी डेपो' हे रद्दीचे दुकान चालवणारा मराठा तात्या ही भूमिका ते अफलातून करत. त्यांच्या एन्ट्रीलाच टाळ्यांचा कडकडाट होई. या प्रसंगात त्यांचे डॉक्टर लागूंबरोबरचे जुने मैत्र अनुसंबंध ते विलक्षण ओलाव्याने दाखवत. त्या नाटकातील हा प्रसंग कौतुकाचा ठरलेला होता. प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता बी.व्ही.कारंथ यांनी निळूभाऊंच्या या कामाचे गुणगान केलेे आहे.

निळूभाऊ मेकअपरूममध्ये सतत मान खाली घालून पुस्तक वाचत असलेले मला आठवतात. नाटकावर श्रद्धा इतकी की, माझ्यासारख्या नवख्या दिग्दर्शकाला त्यांनी त्यावेळीस कधीच कुठलाही त्रास तर दिला नाहीच पण नाटकावर  टीका होत असूनही माझ्या पश्चात एका शब्दानेही ते आडवे बोलले नाहीत. 'बांधिलकी' या शब्दाचा व्यापक अर्थ मला इथे उमगला. वाक्यांमधले आणि वागण्यामधले राजकारण काय असते याचे शहाणे धडे मला निळूभाऊंनी दिले. याच कारणासाठी आम्ही 'दलपतसिंग येती गावा' हे माहितीचा अधिकार का आणि कशा तऱ्हेने मिळाला याबाबतचे नाटक निळूभाऊंना समर्पित केले होते.अधिकार नसलेल्या वंचित, शोषित आणि पीडित समाजाची दुःख सांगत असताना निळूभाऊंचा गळा दाटून येई. भारतीय मुस्लिम समाजाची स्थिती आणि गती दाखवणारा 'सच्चर समिती'चा रिपोर्ट त्यांनी मला वाचायला दिला होता. नाटक, चित्रपट आणि जगणे हे निळूभाऊंच्यासाठी एक आंदोलन होते. या साऱ्या गोष्टी आणि घटना मला आजच्या काळात अजब वाटतात. माणसाला महान व्हायला अशी मानवतावादी मूल्य लागतात. 'मोठा माणूस' या निळूभाऊंना मिळालेल्या उपाधीचा अर्थ मग उमजतो !

- अतुल पेठे

( निळू फुले यांच्या ९ व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने BBC News करता लिहिलेला लेख )

No comments:

Post a Comment