*जो हमनें दासताँ अपनी सुनाई , आप क्यों रोए?*
मंडळी , आज माझ्या अत्यंत आवडत्या संगीतकाराचा स्मृतीदिन ! जो इतका राजबिंडा होता आणि मनस्वीही , की या सिनेसृष्टीतील काही ठराविक गल्लेभरू संगीतकारांनी ठरवून केलेली त्याची गळचेपी त्याला सहन झाली नाही आणि या नैराश्यातून त्याचं पिणं वाढलं आणि वयाच्या ५१ व्या वर्षी लिव्हर सिराॅसिसने १४ जुलै १९७५ ला तो हे जग सोडून गेला ! हा श्रेष्ठ कलाकार म्हणजेच मदनमोहन !
जेमतेम २५ वर्षात पण याने जे निर्माण करून ठेवलंय ना मंडळी , ते आज सहा दशकांनंतरही आपण येताजाता गुणगुणतो आणि माझ्यासारख्या सेंटि माणसाला गलबलून येतं त्याच्या आठवणीने..... त्याचा जीवनपट असा एका लेखामधे मांडणं हा त्याच्यासारख्या श्रेष्ठ संगीतकाराएवढाच माझ्यासारख्या त्याच्या चाहत्या कानसेनावर व लिहिण्याची खुमखुमी असणार्या लेखकावर अन्याय आहे ! पण उपलब्ध वेळेत — काहिच न लिहिण्यापेक्षा थोडसं का होईना लिहावं या भावनेतून हा एक छोटासा प्रयत्न करतोय ! बघा जमलाय का ?..... चला तर सुरुवात करतो त्याच्या जन्मापासून.....
इराकची राजधानी बगदाद इथे *भगवंतीदेवी कोहली* प्रसूत होऊन त्यांना एक मुलगा झाला , *२५ जून १९२४* साली.इराक पोलीसमधे Accountant General म्हणून काम करणार्या *रायबहादूर चुनीलाल कोहली* यांच्या वंशाचा पहिला दिवा.त्याचं नाव ठेवण्यात आलं *मदन मोहन* मंडळी हाच तो मदन जो वयाच्या पाचव्या वर्षांपर्यंत तासन् तास ग्रामोफोन रेकाॅर्ड्ज ऐकायचा , आणि वयाच्या दुसर्या वर्षीच त्याने रेकाॅर्ड्जच्या थप्पीतून विशिष्ट रेकाॅर्ड अचूकपणे काढण्याचं कौशल्य विकसित केलं.घरी कुणी पाहुणे आले की रायबहादूर मदनला लहर येईल ती कुठलीहि रेकाॅर्ड काढून लावायला सांगायचे आणि मदन ती क्षणार्धात काढून लावायचा!
वयाच्या दुसर्या वाढदिवशी आई — बाबांनी एक ड्रम घेऊन दिला.योगायोगाने त्याच वेळेला घराबाहेरून इराकी पोलिसांची मार्चिंग ड्रम परेड चालली होती.लहानगा मदन या ड्रमसह त्यांच्यापाठी परेडमधे शामिल झाला व त्यातल्या संगीतकारांच्या ड्रमचा ठेका जुळवंत आपला ड्रम वाजवण्यात गुंगून गेला.मदन नाहिसा झाल्याचं लक्षात येताच युद्धपातळीवर शोधाशोध सुरू झाली व दोन तासांनी मदन पोलीस डेपोत सापडला! असा होता संगीतवेडा मदन मोहन !
ब्रिटिश राजवटीतून इराकच्या मुक्तिचे वारे वाहू लागले.रायबहादूर चुनीलाल यांच्यापुढे इराकी नागरिकत्व पत्करणं किंवा राजीनामा देऊन देश सोडून जाणं असे दोनच पर्याय होते! त्यांनी अर्थातंच दुसरा पर्याय स्वीकारला.रायबहादूर व भगवंतीदेवी आपल्या मदन मोहन , शांती आणि प्रकाश या बच्चेकंपनीसह अापल्या झेलम तालुक्यातल्या चाकवल या गावी आले.तिथे मदनचे आजोबा हकीम योगराज म्हणून प्रसिद्ध होते.इथे पाच वर्षाच्या मदनचं शालेय शिक्षण झालं पुढिल ६ वर्षांसाठी.मदननं संगीताचा वारसा कविता करणार्या व संगीतप्रेमी आईकडून उचलला.सात वर्षाचा झाल्यापासून गावकरी मदनचं गाणं ऐकत आले.
चाकवलमधे माध्यमिक शिक्षणाची विशेष सोय नसल्याने रायबहादूर कुटुंबियांसह मुंबईला मरीन ड्राईव्हला घेऊन आले जिथे त्यांनी हिमांशू रायसोबत बाॅम्बे टाॅकीज सुरु केलं होतं.घराशेजारीच त्याकाळची प्रसिद्ध गायिका जद्दनबाई आपली मुलगी नर्गीससह रहात असे व घरी मोठमोठ्या गायकांच्या मैफली करत असे.मदन घरच्यांच्या नकळंत तिथे हजेरी लावे आणि अपरात्री चोरपावलांनी मागील दाराने घरी परते, आई—बाबांना पत्ता लागू न देता!
Senior Cambridge exam पास झाल्यावर मदन वडिलांच्या आग्रहाखातर डेहराडूनच्या कर्नल ब्राऊनच्या मिलिटरी शाळेत भरती झाला.नंतर १९ वर्षाचा मदन याचं २ वर्ष बंगलोरला लेफ्टनंट म्हणून पोस्टिंग होतं.शरीराने भक्कम व आर्मीत असलेल्या मदनचं मन मात्र सिनेमाकडे धाव घेई!
एकदा मुंबईला घरी येताना मदन प्रभात स्टुडिओत शिरला आणि तिथे त्यावेळच्या प्रसिद्ध संगीतकार हुस्नलाल — भगतराम यांना भेटला व आॅर्गनवर एक चीज त्यांना वाजवून दाखवली.त्यादिवशी मदन घरी परतला *एक दिवस मी पण संगीतकार होईन!* हि मनाशी शपथ घेऊनंच !
पुढे १९४५ साली दुसर्या महायुद्धाची समाप्ती झाली अाणि मदननंहि आर्मीला रामराम ठोकला व तो लखनौ आॅल इंडिया रेडिओवर Programme Assistant म्हणून जाॅइन झाला.कुठलंहि संगीतातलं शिक्षण नसलं तरी ऐकून तयार झालेले कान आणि संगीताची आवड या जोरावर मदन तिथं चांगलाच स्थिरावला व इथे All India Radio (AIR) त्याचा संबंध मोठ्या संगीतकार व वादकांशी आला.हळूहळू मदन तुटकं फुटकं संगीत देणं शिकू लागला.आणि अचानक त्याची बदली AIR दिल्लीला झाली जिथे त्याला टेबलवर्क मिळालं आणि संगीत देत गाणी म्हणणं याच्या आड आपलं काम येतंय हे लक्षात येताच मदननं नोकरी सोडली व मध्यंतरी भेटलेल्या शेखर आणि राज मेहरासोबत मुंबई गाठली!
इकडे रायबहादूरनी डाॅ.प्रीतमशी दुसरं लग्न केलेलं व मदनचं नोकरी सोडून येणं न पटल्यानं त्याला घर वर्ज्य केलं.मुंबईत घर असूनहि पुढची ३ वर्ष मदननं AIR वर शास्त्रीय संगीत गायनाचा किरकोळ कलाकार , नट अशी कामं करत बर्याचदा उपाशी , फुटपाथवर असे हलाखीचे दिवस काढले.नट व्हावं म्हणून मुंबई गाठलेल्या मदनला नट म्हणून वाव मिळेना.मग त्यानं स्वत:च्या आवाजातल्या कंपनांचं भांडवल करत खाजगी गझलांचे कार्यक्रम केले.एकदा त्याला *बेझाद लखनौवी व दीवान शरारच्या* खाजगी गझला गाण्याची संधी मिळाली व *HMV ने त्याची 78 rpm ची रेकाॅर्डहि काढली.*
आणि एक दिवस नशिबाला मदनची दया आली...
*शहिद* सिनेमात एक छोटा रोल त्याला मिळाला व सिनेमातल्या छोट्या बहिणीवर व त्याच्यावर चित्रित गाणं गायची संधी मिळाली एका पोरगेल्याशाच गायिकेसोबत— *गुलाम हैदर* या त्याकाळच्या प्रसिद्ध संगीतकाराच्या संगितात.ते गाणं होतं *पिंजरेमें बुलबुल बोले मेरा छोटासा दिल डोले* अाणि ती गायिका होती लता मंगेशकर! गाणं रेकाॅर्ड झालं पण नंतर ते रेकाॅर्डवर पण आलं नाहि आणि सिनेमात पण नाहि!
पण या लताच्या गायकीने भारावलेल्या मदननं तेंव्हाच ठरवलं *ह्या लताचा आवाज आपल्या संगितामधे जास्तीत जास्त रचनांमधे वापरायचा!*
आणि हळुहळु मदनला संगीतकार म्हणून कामं मिळू लागली.....
मंडळी हि एवढी हकिगत सांगायचं प्रयोजन एवढंच की *मदन मोहनच्या गाण्यातली वेदना व आर्तता काळजाला का भिडते ? तर ती अशीच दुखावलेल्या , सोसलेल्या भावूक सर्जनशील मनाच्या तळातून येते म्हणून!*
चला आता तुम्हाला मुख्य सफरीवर नेतो :
संगीतकार म्हणून मदन मोहन बाबत असं म्हणतात की लताकडून मदननं बहुतेकदा गाऊन घेतलं आणि यात अतिशयोक्ति नाहि! पण मदन मोहन हा आधी *कानसेन* होता आणि स्वत: बर्याापैकी *तानसेन* होता — त्यामुळे सिनेमातील प्रसंग आणि गीत याची सांगड घालून गायक निवडणारा *जोहरी* संगीतकार होता ! म्हणूनंच लताला झुकतं माप देणार्या मदन मोहननं इतर कुठल्याच गायकावर अन्याय कधीही केला नाहि ! रफीबद्धल तर त्याला प्रचंड आदर व प्रेम होतं.मंडळी भारंभार वाण्याच्या यादीप्रमाणे रफी—मदन मोहन च्या गाण्यांची यादी देणं हा माझ्या लेखाचा उद्देशंच नाहिये , त्यामुळे मदन मोहनसाठी जवळपास पावणे दोनशे गाणी गायलेल्या रफीच्या गाण्यांची यादी तुम्हाला नेटवर पण मिळेल की! मी फक्त या *मदन मोहन—रफीच्या सफरनाम्यातील* महत्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे ! चला तर .....
*१९५० च्या दशकातील* लक्षवेधी गाणी पहा :
१९५० मधे मदन मोहनने पहिल्या चित्रपटाला संगीत दिलं *अाँखे* व यात त्याने *रेलमें जिया मोरा सननन होय रे* हे गाणं *राज खोसला* कडून गाऊन घेतलं , स्वत: *मदन मोहन शमशाद बेगम* बरोबर गायला *हमसे ना दिलको लगाना मुसाफिर*
अाणि संगीतकार म्हणून पहिलं गाणं रेकाॅर्ड केलं *मुकेशचं* — *प्रीत लगाके मैंने ये फल पाया*
अाणि रफी चं पहिलं सोलो गाणं होतं *हम इश्कमें बरबाद है*{ लताचं एकहि गाणं नव्हतं बरं का राव ! }
१९५४ ला *मस्ताना* मधलं किशोर—रफीचं ड्युएट *तिग्गी चौकी पंजी छक्की*
१९५५ चं *रेलवे प्लॅटफाॅर्म* मधलं *बस्ती बस्ती परबत परबत*
१९५६ च्या *फिफ्टि फिफ्टि* मधे तर मदनने चक्क रफी—किशोरचं ड्युएट केलं *आधी तुम खा लो*
तसंच मदन मोहन—रफी—किशोरचं *मेरे जैसा नहिं मिलेगा*
१९५७ चा *गेट वे अाॅफ इंडिया* : रफी—आशा चं *दो घडी वो जो पास आ बैठे*
आणि
एक बघणेबल गाणं : *रफी—लता—जाॅनी वाॅकर* चं *देखता चला गया मैं*
१९५८ चा *अाँखरी दाँव* मधलं *तुझे क्या सुनाऊँ मैं दिलरुबा*
१९५८ चा *अदालत* : रफी—गीता आशाचं एकदम *लाडिक आवाजातलं* — *जमीँसे हमें आसमाँपर बिठाके गिरा तो न दोगे?*
१९५८ चा *जेलर* यातलं रफी—आशाचं *मेरी हिरनी जैसी चाल* ह्या गाण्यात तुम्हाला भविष्यातील *नया दौर* च्या पाऊलखुणा सापडतील , नक्की ऐका !
१९५८ च्या *चंदन* मधलं जाॅनी वाॅकरवर चित्रित *बडा हि CID है वो नीली छत्रीवाला* — रफीचा अजोड *जाॅनी मदनी* सूर { *मालिश* वाला नाहि बरं का! }
१९५९ च्या *बाप बेटे* मधलं रफी—अाशाचं ड्युएट *मेरे दिलमें आनेवाले* — यात तुम्हाला मदनची मेलडी आणि ओ.पी.चा र्हिदम जाणवेल !
मंडळी , अाता वळूया मदन मोहन — रफी च्या सुवर्ण युगाकडे : *१९६० चं दशक*
१९६४ *सुहागन* : यातल्या *तू मेरे सामने है* व *मेरे प्यारमें तुझे क्या मिला?* बद्धल तर एक सविस्तर लेख पण कमी पडेल !
१९६४ चा *हकिकत*
मंडळी , इथे खूप मोठ्ठा पडाव अाहे बरं ! हा चित्रपट बेतलाय १९६२ च्या युद्धातील लडाखमधे मरण पावले असा समज असलेल्या पण नंतर कॅप्टन बहादूर सिंग व लडाखमधील आदिवासी जमातींकडून मुक्त करण्यात आलेल्या सैनिकांवर!चेतन आनंदचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट सुरुच होतो मुळी रफीच्या *मस्तीमे छेडके तराना कोई दिलका* या गाण्यानं , नंतर या चित्रपटात रफीचंच *मैं ये सोचकर तेरे दरसे उठा था* हे गाणं येतं ! मंडळी हे गाणं पडद्यावर बघा व हेडफोन्सवर ऐका ! नुकतंच लग्न झालेल्या सैनिकाला जेंव्हा कर्तव्यासाठी लडाखसारख्या दुर्गम प्रदेशात लढायला जावं लागतं तेंव्हा त्याची व्यथा रफीने गायलीय ! हे लिहित असताना पण मला ते कैफी अाझमीचे शब्द आणि रफीचा ह्रूदय पिळवटून टाकणारा स्वर आठवून डोळे पाझरायला लागलेत समोरचा स्क्रिन धूसर झालाय गळा भरून आलाय नाइलाजाने मी हुंदका फुटू नये म्हणून तोंडात फडकं कोंबलंय...बस्स लिहवंत नाहि....
आणखीन एक गाणं अाहे : तलत—रफी—मन्ना डे—भूपेंद्र सिंगच्या आवाजातलं , *होके मजबूर मुझे उसने भुलाया होगा , जहर चुपकेसे दवा जानके खाया होगा* मंडळी कल्पना करा , ज्या सौभाग्यवतीचा सैनिक पती लढायला गेलाय व नंतर त्याच्याबद्धल काहिहि कळंत नाहि अशा आपापल्या बायकांना काय वाटत असेल याचं वर्णन ते अज्ञातवासातले सैनिक करतायत् ...... कैफीचे काळीज चिरत जाणारे शब्द आणि मदनच्या संगीतात भिजलेले चार दिग्गज स्वर..... परत अापली अवस्था मी वर लिहिल्याप्रमाणेच होते....
अाणि आता वळतो या चित्रपटातल्या शेवटच्या गाण्याकडे : *कर चले हम फिदा जानो तन साथियों , अब तुम्हारे हवाले वतन साथियों* एकाच गाण्यात स्फुरण चढवणारा स्वर , त्यागभावना दाखवणारा स्वर आणि वैफल्यग्रस्त स्वर .....मदनने अक्षरश: आपल्या व्यक्तिगत आयुष्यातील आर्मीमधल्या पोस्टिंगच्या वेळची कणखरता व तितकंच भावूक कवी मन नुसतं प्रत्येक स्वरात पेरलंय ! पण रफीचं काय महाराजा ? तो कुठे सैन्यात होता ? पण रफी *ओठापासून नाहि तर पोटापासून* गायचा ! पत्थराला पण पाझर फुटेल असं गायलाय रफी !
१९६४ चा *शराबी* यातलं एकंच गाणं संपूर्ण चित्रपटातल्या मदन मोहनच्या संगीताचं प्रतिनिधित्व करायला पुरेसं आहे : *कभी ना कभी कहिं ना कहिं कोई ना कोई तो आएगा* दुर्दम्य आशावाद स्वरांतून प्रकटवावा तर *रफीनेच* !
१९६४ चा आणखीन एक संगीतातला हिट चित्रपट : *गझल* अाणि अप्रतिम गाणी : रफीची सोलो — *मेरी मेहबूब कहिं और मिला कर मुझसे* , *नगमा ओ शेरकी* , *रंग और नूरकी बारात किसे पेश करूँ?* , *इश्ककी गर्मी ए जझबात* , अाणि रफी—सुमनचं *मुझे ये फूल न दे* अाणि या शेरोशायरीवरील सिनेमाचा गीतकार अर्थातंच *साहिर लुधियानवी* सारखा मातब्बर शायर ! { मी त्याला साहिर न म्हणता कौतुकाने *माहिर* असंच *सप्रे* म नांव दिलंय! }
१९६४ चा *आपकी परछाइयाँ* : राजा मेहदि अली खान { सालं नावातंच इतकं राजेपण भरलंय ! } याची गीतं अाणि रफीची तीन सोलो : *मैं निगाहें तेरे चेहेरेसे हटाऊँ कैसे?* हे तारीफगीत , *यहि है तमन्ना तेरे दरके सामने* हे प्रेमळ ख्वाहिशीचं गीत अाणि रफी—अाशाचं *कभी इठलाके चलते हो* हि लाडिक तक्रार...
मंडळी , आता मी सांगतोय त्या हकिकतीवरून तुम्हाला *आपल्या मतांवर ठाम रहाणार्या आणि आपल्या संगीत क्षेत्रातले आपण दादा अाहोत याची खात्री असलेला* पण निव्वळ आपली मनमानी करण्यासाठी पण लताला झुकतं माप देत इतर गायकांवर अन्याय न करणारा बाणेदार आणि दिलदार मदन मोहन कळेल !
त्याचं असं झालं...
१९६४ च्या *जहाँ आरा* चित्रपटातील राजेंद्र कृष्ण यांच्या गीतांना संगीतबद्ध करण्याचं काम निर्मात्यांनी मदन मोहनकडे सोपवलं.हळुवार स्वभावाच्या नायकासाठी पहाडी आवाजाच्या रफीचा नाही तर *मलईसारखा मुलायम व लुसलुशीत* { *सप्रे* म ! } असा तलत महमूदचा आवाजंच योग्य आहे हे मदननं निर्मात्याला पटवून दिलं व तसं त्यालाहि ते पटलं होतं.पण थोड्या दिवसांनी निर्माता परत मदनकडे येऊन *तलत नको!* म्हणून हटून बसला.तेंव्हा मदन मोहनच्या अंगात व जिभेवर *संगीतकार सज्जाद हुसैन* संचारला { पक्षी : लताचे गाण्याचे स्वर ज्याच्या मनाजोगते लागले नाहि तर लताला पण *ठीकसे गाओ लता , ये नौशाद अलीकी धुन नहिं है!* असं जो फटकळपणे बोलत असे तोच तो Genius संगीतकार सज्जाद हुसैन ! }
मदन मोहनने निर्मात्याला परखडपणे झापलं: "तुम्हाला चित्रपटाची वाटते त्याहिपेक्षा लाखपट काळजी मला माझ्या संगिताची वाटते.तुम्हाला चित्रपट चालावा असं वाटतं आणि मला काय माझं संगीत पडावं असं वाटतं? मी तुमच्या प्रांतात ढवळाढवळ करंत नाहि ना? मग तुम्हिहि माझ्या क्षेत्रात हस्तक्षेप करू नये! नायकासाठी तलतचाच आवाज योग्य आहे याची मला शंभर टक्के खात्री आहे! याउपर तुम्हाला माझी निवड मान्य नसेल तर तुम्हि दुसरा संगीतकार शोधू शकता!".निर्मात्याने निमूटपणे काढता पाय घेतला. { या माहितीचं सौजन्य / संदर्भ : *शिरीष कणेकर लिखित गाये चला जा* }
And the rest is history ! चित्रपट चालला नाहि { मेणचट भारत भूषणचा *मिर्झा युसूफ चंगेझी* कोण सहन करेल हो! } पण गाणी तुफान चालली ! आजहि *जहाँ आरा* हा माला सिन्हाच्या औरंगझेबच्या बहिणीच्या — जहाँआराच्या उत्कृष्ट भूमिकेपेक्षा जास्त *मदन मोहनचा जहाँ आरा* म्हणून लोक ओळखतात ! आणि मदनची कमाल पहा : *तेरी आँखके आँसू पी जाऊँ ऐसी मेरी तकदीर कहाँ?* , *मैं तेरी नजरका सुरूर हूँ तुझे याद हो के ना याद हो* आणि *फिर वहि शाम वहि गम वहि तनहाई है* हि तीन सोलो गाणी तलतला , *ऐ सनम् आज ये कसम् खाएँ* हे गाणं तलत—लताला , *वो चुप रहे तो मेरे दिलके दाग़ जलते है* हे सोलो गाणं लताला , *जब जब तुम्हें भुलाया तुमऔर याद आए , जाते नहिं है दिलसे अबतक तुम्हारे साएँ* हे गाणं लता—आशाला देणार्या मदननं रफीला *बाद मुद्दत् के ये घडी आई आप आए तो जिंदगी आई* हे सोलो अाणि सुमन कल्याणपूर बरोबर *किसीकी यादमें दुनियाको है भुलाए हुवे , जमाना गुजरा है अपना खयाल आए हुवे* अशी दोन गाणी दिली!
मंडळी *बाद मुद्दत्...* एकदा ऐका , नुसतं मुद्दsssssत् वर जो रफी खेळलाय ना , तोडलंय गाणं अक्षरश: शहद टपकल्याचा भास होतो हो ! जियो *रफीसाहाब* !
अाणि *किसीकी यादमें....* हे रफीचं एकंच गाणं ऐकून जितकं माणूस *ट्रान्स* मधे जातो ना , तेवढं तर मुकेशची शंभर गाणी रात्री ११ नंतरच्या नीरव शांततेत ऐकल्यावर पण मी कधी *इतका ट्रान्स* मधे गेल्याचं मला स्मरंत नाहि ! { अाणि जगातल्या कुठल्याहि — अगदि पत्थरदिल माणसालाहि एकांतात ऐकल्यावर जबरदस्त ट्रान्समधे घेऊन जाण्याची *कशिष* आवाजात असलेला *मुकेश* हा एक उत्कृष्ट आवााज आहे ! }
जाता जाता
१९६५ चा *नीला आकाश* : राजा मेहदि अली खान याची गीतं : मी तीनंच गाणी सांगतो रफीच्या ५ गाण्यांपैकी : रफी—आशाचं *आपको प्यार छुपानेकी बुरी आदत है* आणि रफीची दोन सोलो : *आखरी गीत मुहब्बतका सुना लूँ तो चलूँ* हे समारोपाचं दर्दभरं गाणं आणि *तेरे पास आके मेरा वक्त गुजर जाता है* हे तारीफ गीत.... *गीतं लिहिणार्या राजाच्या रेंजची तारीफ करावी की घडवणार्या मदनची की आत खोलवर जाऊन भिडणार्या रफीच्या आवाजाची ?*
जाता जाता :
चित्रपटाचं संगीत गाजतं त्यामधे संगीतकार व गायक यांच्यापेक्षाहि काकणभर जास्तंच वाटा असणार्या गीतकार *राजेन्द्र कृष्ण* यांच्या असामान्य प्रतिभेला त्रिवार वंदन !
१९६६ चा मराठीतील *पाठलाग* चित्रपटावर बेतलेला *मेरा साया* : राजा मेहदि अली खान चं एकंच गीत मदननं रफीला दिलंय पण आपली बायको गेल्याने विधूर व सैरभैर झालेल्या मनाचं यथार्थ वर्णन *आपके पेहलूमें आकर रो दिये*
*मेरा साया* लताच्या *नैनोंमें बदरा छाए* , *मेरा साया साथ होगा* या मधाळ आर्जवी गाण्यांसाठी की आशाच्या *झुमका गिरा रे* सााठी की रफीच्या *अापके पेहलूमें* साठी जास्त आठवतो हे मला आजतागायत् ठरवता आलेलं नाहि!
१९६६ चा *दुल्हन एक रातकी* : गीतकार राजा मेहदि अली खान
यातल्या एकाच गाण्याबद्धल बोललो तरी तुम्हाला अख्ख्या सिनेमाच्या संगीताची कल्पना येईल : *इक हँसी शामको दिल मेरा खो गया* यातल्या रफीच्या *गया* नंतर पीस वाजतो की तो पीस रफीच्या आवाजातूनंच सुरु होतो हे न कळण्याएवढं बेमालूम आॅर्केस्ट्रेशन साधलंय मदन नी ! अाणि ती *हँसी* ची *ई* लांबवण्याची अदाकारी.....असं वाटतं एखाद्या देवदासची काळीकुट्ट उदास शामसुद्धा रफीच्या या स्वरांमुळे क्षणार्धात दुसर्या पारोला शोधायला निघणारी *हँसी* शाम होऊन जाईल राव!
१९६६ चा *नींद हमारी ख्वाब तुम्हारे* : राजेंद्र कृष्णचे प्रियाराधन करणारं गाणं *यूँ रूठो ना हसीना मेरी जानपे बन जाएगी , मेरी जानपे बन जाएगी , हाय* यातला *हाय* तर प्रेयसीच्या लटक्या रागानी खाल्लेल्या खोट्या *हाय* ची साक्ष देतो { पक्षी : *हाय* खाणे }
रफी—आशाचं *कभी तेरा दामन् ना छोडेंगे हम्* आणि यातला शेवटचा *हाsssए* हा मात्र *ओय होय* वाला खास *हाए* !
अाणि पुन्हा रफी—आशाचं *हुस्न जब ईश्कसे टकरा गया* ..... कुणीच हार न मानणारे प्रियकर—प्रेयसी आपआपल्या परीने समोरच्याची तारीफ करंत प्रेमाची कबुलीच देतात... काय रफीने गायलंय व आशाने पण तितक्याच ताकदीने केलेला पलटवार!
१९६७ चा *नौनिहाल* : *तुम्हारी जुल्फके साएमें शाम कर लूँगा* अाणि *मेरी आवाज सुनो* — दोन्हि सोलो गाणी रफी जबरदस्त *Soulfully* गायलाय!
१९६९ चा *चिराग* : रफीची दोन सोलो गाणी — *चराग दिलका जलाओ बहोत अंधेरा है* यातल्या दुसर्या ओळीतील *अंधेरा* मधल्या *धे* चा *ए* रफीने अशा ताकदीने फिरवलाय की भर उजेडातनं एकदम अंधार झाल्यावर येणारं भकास फिलिंग येतं तसं वाटायला लागतं...आणि नंतरचं ते गूढ वातावरण निर्मिती करणारं संगीत...
आणि या गाण्याच्या अगदि उलट यत्र तत्र सर्वत्र प्रेयसीच दिसणार्या प्रियकराच्या भावना पोचवणारं *तेरी अाखोंके सिवा दुनियामें रखा क्या है?*
मजरुह सुलतानपुरी तर शब्दाशब्दात भेटतो!
मंडळी आता परत येतेय मोठ्या पडावाची वेळ.....
१९७० चा *हीर रांझा*
मंडळी हा चित्रपट म्हणजे मदन मोहनच्या कारकीर्दितला सर्वोत्कृष्ट चित्रपट ! अख्खा पंजाब उभा केलाय मदन मोहननं ! मंडळी यातील सुरुवातीचे हीर—रांझाच्या भेटीच्या वेळेला घेतलेले शेतामधले शाॅट्स व नुसत्या दोघांच्या समोरासमोर भेटीतील शेरोशायरी नं खच्चून भरलेले संवाद व चालण्याला पण दिलेलं तबला—ढोलक सारख्या तालवाद्यांचं पार्श्वसंगीत !
नुसती मेजवानी आहे मेजवानी डोळ्यांना आणि कानांना!
आता यातल्या रफीनी गायलेल्या दोन सोलो गीतांविषयी : *तेरे कूँचेमें तेरा दीवाना आज दिल खो बैठा* — एकदम अस्सल पंजाबी ढंगाचं गाणं....
नंतर अालेलं *ये दुनिया ये मेहफिल मेरे कामकी नहिं मेरे कामकी नहिं*—मंडळी हे गाणं अगदि नीट कान देऊन ऐकण्याचं गाणंआहे बरं! ज्या क्रमाने रांझाच्या आयुष्यातील स्थित्यंतरं घडतात त्याच क्रमानं आणि गहराईनं कैफी आझमीचे शब्द येतात आणि त्या बेशकीमत शब्दांना *दुपट्यात गुंडाळलेल्या तान्ह्या बाळाला जोजवताना कसं नाजूकपणे हलक्या हातांनी झेलतात* तसं अलगद झेलंत येणारं मदनचं संगीत , विशेषत: एका कडव्याआधीचं *रांझ्याला विरक्ति येऊन संन्यास घेण्याचा झालेला त्याचा मनोनिग्रह दाखवणारं संगीत* {आर.डी.च्या *जिंदगीके सफरमें गुजर जाते हैं* मधल्या ऋतूदर्शक संगीताचं पण मला अपार कौतुक वाटतं पण मनस्थिती दाखवणार्या मदनचं व रफीचं वाटतं त्याच्या एक सहस्त्रांश पण नाहि हं! }
तर मंडळी , आज आपण पाहिली मदन मोहनची सांगीतीक सुरुवात झाल्या सालापासूनच्या — १९५० पासून ते १९७० पर्यंतच्या दोन दशकातील *रफीमय ठळक गाणी*
मंडळी , *रफी आणि मदनवर* एक अख्खं पुस्तक होईल एवढं दोघांचं कर्तृत्व आहे राव , मग ते या एका लेखामधे मी *तंग कपड्यात कोंबून कोंबून आपलं शरीर अधिक उठावदारपणे दाखवणार्या नंदा आणि आशा पारेखसारखं* कसं काय कोंबावं महाराजा ?यानंतर आपण पाहू १९७० च्या दशकातील *रफीमय* मदन मोहन ! *रफी—मदन मोहन* या दोघांवरहि कितीहि लिहिलं तरी *वन डे मधे २६४ धावांचा विश्वविक्रम करणार्या रोहित शर्माचा नंतरचा प्रत्येक गेम पाहताना वाटतं* तेच वाटंत रहातं : *The BEST is yet to come!*
मंडळी , मदन मोहनचं रफीसाठीचं योगदान हे *विवाहित स्त्रीच्या आयुष्यातील भरजरी प्युअर सिल्क व सॅटिनच्या साड्यांसारखंच* आहे — हळुवारपणे हाताळण्या व जपण्यासारखं! अाणि हा हळुवारपणा *आर्मीत दोन वर्ष काढलेल्या माणसाच्या संगीतात का व कसा?* हे सगळ्यांनाच पडलेलं कोडं सोडवण्यासाठीच विषय *रफी* असूनहि *मदनपट* उलगडून दाखवण्याचा हा माझा वेडा अट्टाहास !
आता उत्तररंगापूर्वी मदन मोहन आणि रफी यांना ऐकल्यावर मनात आलेली त्यांच्या नावाची फोड करुन सांगतो आणि पुढे जाऊया !
*मदन मोहन :*
*म* नातल्या
*द* र्दला
*न* जाकतीनं { आणि }
*मो* हक
*ह* रकतींनी
*न* मविणारा !
अाणि
*रफि :*
*र* सिली
*फि* रकवाला
मंडळी , इथवर आपण बघितलं की मदन मोहनने आपल्या पहिल्या वहिल्या चित्रपटापासून - म्हणजेच १९५० सालापासून ते १९७०
पर्यंतच्या 2 दशकात मोहमद रफीला किती
उच्च दर्जाची गाणी दिली.
पण मंडळी , माझ्याकडून १९७० च्या
*हीर रांझा* मधील एका
गाण्याचा
उल्लेख करायचा राहूनंच गेला - तेवढा एक भाग सांगून घेतो आणि मग आपण पुढील भागाकडे वळूया.
हा राहिलेला उल्लेख म्हणजे रफी आणि लताचं एक
गाणं
*मेरी दुनियामें तुम आईं क्या क्या अपने साथ लिये* या
गाण्यात मधे मधे प्रिया
राजवंश आणि राजकुमारचा पण
आवाज आहे.हे गाणे म्हणजे एका उत्कृष्ट
काव्यात्मक चित्रीकरणाचा
नमुना आहे.पडद्यावर
आपल्यासमोर साकार होत असलेलं हे प्रणय गीत रफी आणि लता ने
जीव ओतून गायलं आहे. *हीर* ला आपल्या जीवनातील तुझं स्थान किती उच्च आहे सांगताना रांझ्याच्या तोंडी कैफी आझमीने कवीचे शब्द पेरले आहेत आणि या प्रेमभावना मदनच्या तितक्याच नाजूक संगितात मधात घोळवून घोळवून रफी आणि लतानं गायल्या आहेत ! तमाम *मदन मोहन आणि रफी* प्रेमींना हे गाणं म्हणजे आयुष्यातली अत्युच्च कोटीची भेट आहे!
आता आपण वळूया
पुढील भागाकडे.
*१९७० च्या दशकात*.....
मंडळी , १९७१ ला एक चित्रपट आला होता
*परवाना*
यात मदन मोहन ने जी
काही मेलडी वापरली आहे आणि जे काही प्रयोग केले आहेत त्याला तोड नहि.
यात एक गाणं आहे रफीने
गायलेलं
*अरे हसनेवालो जरा ये भी सोचो* जे गाणं ऐकून
आपल्याला खरच त्या
गाण्यातील शब्दांप्रमाणे
विचारात पडायला होतं!एखाद्या दु:खी आत्म्याची आर्त साद अंत:करणापर्यंत पोचवण्यात कैफी आझमी—मदन मोहन—रफी संपूर्णपणे यशस्वी झालेत!
याच चित्रपटात एक गाणं मदन ने किशोर
कुमारकडून गाऊन घेतलय
*यूँ न शरमा फैला दे ,अपनी गोरी गोरी बाहें* आणि याच फास्ट गाण्यातला र्हिदम किशोरच्या एका कडव्यानंतर ब्रेक करत मदन ने रफिच्या ह्या
*अरे हसनेवलो* चं एक कडवं वापरलंय ! अाणि मग परत किशोरचं फास्ट र्हिदममधील *यूँ न शरमा* चं ध्रुवपद व एक कडवं ! सिच्युएशनप्रमाणे गाणं बदलतं हे जरी खरं असलं तरी दोन विरुद्ध टोकाच्या भावना दोन दिग्गज आवाजांत श्रवणीय स्वरूपात मांडणं अत्यंत कठीण आहे! *हि मदनची signature style आहे* — फारंच क्वचित् एखाद्या आॅर्केस्ट्रामधे हे गाणं आपल्याला ऐकायला मिळतं!
आणखीन एक गाणं मदन ने रफिला दिलय पण ते आशासोबत
*जिस दिन से मैने तुमको देखा है , इस दिल में इक सपना सा जागा है , इजाझत हो तो सुना दूँ*
यातला *हो* रफिने असा काही
आळवलाय आणि नंतरचा *सुना* पण असा नुसता
*मख्खन जैसा* फिरवलाय की
काय हिम्मत करेल प्रेयसी नाही
म्हणण्याची ! आणि आशा ने पण याला उत्तर म्हणून
*इस दिल ने जबसे तुमको पाया है , कुछ चोरी-चोरी मैने भी सोचा है ,अगर इजाझत हो तो बाता दूँ*
मंडळी , गाण्यातला भाव न बदलता कवीचा एखादा शब्द बदलून संगीतकाराने पेश करणं हे गाण्यातल्या या ओळीत आशाने गायलेलं *अगर* च्या ऐवजी *गर* — हे एक उत्तम उदाहरण आहे!
*गर इजाझत हो तो बता दूँ* असं गायलंय...
पूर्ण गाणं तर नितांत सुंदर आहेच
पण एकदा रफी
आणि एकदा आशा
ध्रुवपदात समेवर येतात ना , तेंव्हा असं वाटतं की ह्या दोन ओळी कधीच
संपू नयेत ! कमाल संगीत
दिलंय मदनने या गाण्याला!
आता वळूया १९७२ सालाकडे....
मंडळी मुक्या—बहिर्यांवर चित्रपट आला
होता *कोशिश*
ह्या चित्रपटात संजीव कुमार आणि जया भादुरी दोघेही
मुके आणि बहिरे. त्यांच्या
लग्नानंतर त्यांना एक मुलगा होतो , जो सुदैवाने बोलू व ऐकू शकणारा निघतो..
आता अशा या मुलाला
रडला तर कोण बघणार ?म्हणून यात आणखीन एक करुण
पात्र टाकण्यात आलं होतं — एक आंधळा !जी भूमिका ओम शिवपुरी याने
केली होती आणि या
अंध माणसाच्या तोंडी
गुलझार ने एक लोरी दिली होती
*मेरे बाबा रे नन्हे बाबा रे सो जा* जी मदन मोहनच्या संगीतात रफी ने गायली
अाहे.त्या लोरीला पण मदन ने इतका करुण स्वर दिलाय की तिकडे
पडद्यावर तो
लहान मुलगा ओम शिव पुरीच्या खांद्यावर झोपता झोपता मोठा होतो
तरी प्रेक्षकांच्या डोळ्यांमधलं पाणी थांबता थांबत नाही ! कधी कधी प्रश्न पडतो की
यही है तमन्ना सारखा गीत देणारा आणि
*सो जा बाबा रे* सारखी
लोरी देणारा मदन मोहन ही खरंच
एकच व्यक्ती आहे? आणि रफीच्या या लोरिमधला आवाज तर दूर कुठुन
तरी ईश्वरी संकेताचे
सूर यावेत तसा वाटतो...
आणि मंडळी आता येतोय
मदन मोहन च्या संगीत
कारकीर्दीतील आणखीन
एक शिरपेचाताला तुरा
शोभावा अश्या चित्रपटाकडे !
१९७३ चा *हसते जख्म*
यातलं *तुम जो मिल गये हो तो ये लगता है * हे कैफी
आझमी चे शब्दअसलेलं
गाणं रफीआणि लताने गायलंय आणि हि सिच्युएशन मदन मोहनने लीलया हाताळली आहे! संपूर्ण गाण्यात लताने फक्त ध्रुवपदाच्या तीन ओळी म्हटल्या अाहेत आणि त्या पण गाण्याची पेस — गती चेंज करण्यासाठी मदनने लताला दिल्या आहेत पण या तीन ओळी म्हणजे घरी केलेल्या व सुती पंचावर गाळलेल्या श्रीखंडातील अस्सल केशर आहे महाराजा — जे श्रीखंडाला सतेज रंग व चंव बहाल करतं !
रफी एक कडवं गातो आणि ते संपताना
उधाणालेल्या समुद्राची गाज
अापल्याला गाण्यात ऐकू येते
आणि मग एकदम सुरू होतं लताच्या एकदम धींम्या संयत आवाजातलं
ध्रुवपद...नंतर परत एकदम फास्ट
लयीत रफीचं पुढिल कडवं. ....
आणि ....दुसर्या कडव्याच्या शेवटी राफीने
मिल गया मधील *गया* वर घेतलेली फिरक!
मंडळी , संपूर्ण गाणं हे
धुवाँधार पावसातलं अत्यंत
रोमॅंण्टिक गाणं , त्यातलं
मधलं ते फास्ट म्यूझिक चं जे काही ऑर्केस्ट्रेशन मदन मोहन ने केलंय ना , तसं
परिणामकारक फास्ट व स्लो पेसचं काॅम्बिनेशन आणि ते पण रोॅमॅंण्टिक गाण्यात — एकटा मदनंच करु जाणे ! नुसत्या एका
गाण्यातंच दिल खुश !
मंडळी , धुवाँधार पावसात ड्रायव्हिंग करत आणि हे गाणं ऐकत जाणार्या कुठल्याहि व्यक्तिला चिरतरूण करणारं माझ्या मते हे एकमेव रोॅमॅण्टिक गाणं !
दुसरं एक सोलो गाणं मदन ने रफीला दिलंय
*ये माना मेरी जां मुहब्बत*
*सजा है , मजा इसमें*
*इतना मगर किसलिये है?*
या गाण्यात एकदम
पक्कं रांगडं पंजाबी संगीत दिलंय मदननेआणि
रफीने तर गाण्याचं
सोनं केलंय सोनं ! विशेषत:
गाण्याच्या सुरुवातीचा
*हाय* एकदम कातील !
सुरुवातीच्या *जां* वरची फिरक...
मधल्या कडव्यात मदन चा स्वत:चा आवाज .....
*तमन्ना मचलके* , *सहारेभी देखे* , *मेरे सूने दिलको तुम्हीने बसाया* ... एकदम फिदा
होण्यासारखा माहोल आणि कैफीचे शब्द... नशा येते
राव नशा गाण्याची!
*हसते जख्म* चित्रपटातली दोन्हि गाणी कुठल्याहि चांगल्या संगीतकार व गायकांसाठी कधीही न संपणारं आव्हान आहे ! ते पेलण्यासाठी ईश्वराला
परत दुसरे *रफी—लता—मदन मोहन* घडवावे लागतील! *रफी—मदन मोहन* आज आपल्यात नाहित आणि *लता* नावाचा स्वर्गीय आवाज आता वयोमानानुसार गायचा थांबलाय , पण आजंहि लताचा नुसता आवाज पण मंदिरातल्या घंटेच्या नाजूक किणकिणीसारखा वाटतो ! येत्या २८ सप्टेंबरला *लता* ८९ वर्षांची होईल , ईश्वर लताला उदंड आरोग्यमय आयुष्य देवो!
१९७४ साली अालेल्या *हिंदुस्तानकी कसम* मधे रफीने मन्ना डे व कोरस बरोबर *Title Song* गायलं ! या स्फूर्तीगीताचे कवी होते कैफी अाझमी.
१९७४ साली अालेल्या *चौकीदार* मधे रफी राजेंद्र कृष्णच्या गीतांचा आवाज बनून गायला *ये दुनिया नहिं जागीर किसीकी* व *इक लडकी भोली भालीसी* या सोलो गाण्यात आणि आशा व मुकेश बरोबर *जिंदगी जिंदगी , छोटि हो या लंबी हो*
मंडळी १९७५ साली अालेल्या *मौसम* नावाच्या सिनेमात ३ वर्षांनी गुलझारच्या शब्दात रफी—लता गायले *छडी रे छडी कैसी गलेमें पडी !* यावेळी पण *कोशिष* नंतर संजीवकुमार हिरो होता अाणि यातल्या प्रत्येक स्वरावर दोघेहि मनसोक्त विहरले! कितीहि दु:खी मूडमधे असलं तरी एकदम आनंदी मूडमधे आणण्याचं सामर्थ्य आहे या गाण्यात! शब्दांमधल्या प्रत्येक *अ* कारापासून ते *ई* कारापर्यंत सगळ्या व्यंजनांवर हंसाच्या चालीने विहार केलाय लता—रफीने! कमाल है मदन मोहन जी आप और कमाल है लता—रफी की अावााज .....
मंडळी अाता मी वळतोय एका अशा चित्रपटाकडे की ज्यात *मदन मोहनसाठी* रफी अशा एका नायकाचा आवाज म्हणून गाणी गायला ज्याच्या अाजोबांसाठी अाणि वडिलांसाठी पण रफी नायकाच्या आवाजात गायला !
१९७६ साली अालेला *लैला मजनू* हा तो चित्रपट आणि नायक होता ऋषि कपूर !
रफी — ऋषीचे अाजोबा पृथ्वीराज कपूरसाठी पण गायला आणि पुढे राज कपूरसाठी पण गायला! मंडळी , विचार करा , तीन पिढ्यांच्या तीन वेगवेगळ्या आवाजाच्या व्यक्तिंसाठी अावाज synchronise करून गाणं हे खायचं कामआहे का?
रफी तुला सलाम !
*लैला मजनू* मधे रफिने तीन सोलो गाणी गायली : *तेरे दरपे आया हूँ* , *बरबाद ए मुहब्बतकी दुवा साथ लिये जा* अाणि *ये दीवानेकी जिद है* अाणि लताबरोबर पाच : *कहना एक दीवाना तेरी यादमें* , *अब अगर हमसे खुदाई भी खफा हो जाए* , *इस रेशमी पाजेबकी झंकारके सदके* , *लिखकर तेरा नाम जमीपर* आणि *मेरे कासिद तू जब पहुँचे*
याखेरीज शंकर शंभू , अजीझ नाझा , अंबर कुमार या कव्वाल मंडळींसोबत *होके मायूस तेरे दरसे सवाली न गया* हे गाणं पण रफीने गायलं.
*लैला मजनू* मधली *तेरे दरपे आया हूँ* व *इस रेशमी पाजेबकी* हि रफीची गाणी विशेष गाजली!
मंडळी *१९४५ च्या लैला मजनू* त फकिराच्या भूमिकेत दिसलेला आणि नायक सोडून इतर आवाजात गायलेला रफी नंतर *१९५३ च्या लैला मजनू* मधे गुलाम महमदच्या संगितात शम्मी कपूर या नायकाचा व *१९७६ च्या लैला मजनू* मधे मदन मोहनच्या संगीतात ऋषी कपूर या नायकाचा आवाज बनून गायला ! अशा प्रकारे कपूर खानदानाच्या तीन पिढ्यांसाठी गाणारा रफी *चाचा—भतिजा* कपूरचा *मजनू* म्हणून पण गायला !
१९७६ मधेच अालेल्या *शराफत छोड दी मैंने* मधे रफीने अाशासोबत वर्मा मलिकचं *इक सपना मैंने देखा है* हे गाणं गायलं होतं!
१९७६ मधे अालेल्या *जलन* मधे रफीने अाशा बरोबर इंदिवरचं *जो सोचके करेगा वो प्यार क्या करेगा?* हे गाणं गायलं.यातला रफीचा सुरुवातीचा तीन वाक्यातला गद्यातला आवाज ऐका , त्यात पण तुम्हाला मदन मोहनची झलंक दिसेल , गाण्यात तर काय रफी नेहेमीसारखंच अप्रतिम गायलाय! आशा बरोबरचं रफीचं ट्यूनिंग तर झकास होतंच , उगीच नाहि रफी अाशासोबत सगळ्यात जास्त म्हणजे ७९९ गाणी व आशा व अन्य गायकांसोबत ८६ { एकूण ८८५ } गाणी गायला !
मंडळी , संगीत क्षेत्रात पण शिरलेल्या राजकारणाचा बळी ठरलेला अाणि *मोडेन पण वाकणार नाहि!* अशा बाणेदार वृत्तीच्या मदन मोहनला संगिताची कामं हळूहळू मिळेनाशी झाली.मदनची निराशा हळूहळू दारुच्या प्याल्यात बुडू लागली अाणि त्याचं रूपांतर व्यसनात झालं.अाणि हा इतका गुणी संवेदनशील राजबिंडा कलावंत *मदन मोहन* लीव्हर सिराॅसिस मुळे *१४ जुलै १९७५* ला आपल्याला सोडून गेला! तो गेल्यानंतर त्याने संगीत दिलेले लैला मजनू — १९७६ , शराफत छोड दी मैने—१९७६, साहेब बहादूर—१९७७ , जलन—१९७८ , इन्सपेक्टर ईगल—१९७९ व चालबाझ हे ६ चित्रपट प्रदर्शित झाले.
मदन मोहनच्या न वापरलेल्या ११ चाली मदनचा मुलगा संजीव कोहली याने २००४ साली यश चोप्राच्या *वीर झारा* साठी वापरल्या.यासाठी २००५ च्या फिल्मफेअर बेस्ट म्यूझिक डायरेक्टर अॅवाॅर्डसाठी *मदन मोहन* Nominated होता. ते जरी मिळालं नाहि तरी *वीर झारा* साठीच मदन मोहनला २००५ साली *IIFA Best Music Director Award* मिळालं!
मंडळी हे दोन्हि थोर कलावंत *जुलै* मधेच आपल्याला सोडून गेले ... मदन मोहन *१४ जुलै १९७५* ला अाणि मोहमद रफी *३१ जुलै १९८०* ला.....
मदन मोहन गेल्यानंतर संजीव कोहलींनी व यश चोप्रांनी *वीर झारा* १९७५ ते १९८० मधे काढला असता तर रफीचा आवाज त्यातल्या काहि गाण्यांत नक्कीच ऐकू आला असता !
मंडळी , इतक्या सुरेख *चालीं* चा मदन मोहन दारूच्या वाईट *चाली* ने आपल्याला दुरावला या काळाच्या निष्ठूर *चाली* चं वैषम्य वाटतं अाणि असं वाटतं की ,
"भविष्यात ..कधीकाळी आपल्यावर अतोनात प्रेम करणार्या कोण्या एका वेड्या *उदय सप्रे* ला आपल्याविषयीची दारूण हकिगत कळल्यावर अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी *मदन मोहन—रफी* लेखाचा समारोप करणार्या त्या *मदन—रफी* वेड्या उदयसाठी तर नसेल ना *राजा मेहदी अली खानच्या शब्दांत* म्हणून ठेवलेलं :
*जो हमने दासताँ अपनी सुनाई आप क्यों रोये ? तबाही तो हमारे दिलपे आई आप क्यों रोये?*
बस्स..... आता लिहिवंत नाहि.....
© *उदय गंगाधर सप्रे* म — ठाणे
No comments:
Post a Comment