:Source:तरुण भारत12 Nov 2017
१९५९ साली तिचा भारतीय नौसेनेतील कमांडर रजनीश बहल यांच्याशी विवाह झाला. बहल यांची आई थेट महाराजा रणजीत सिंह यांच्या राजघराण्यातील, त्यांच्या राजघराण्याला साजेशी अशी सून मिळाली होती नूतन आणि ती वावरलीही तशीच. बहल यांनी कधीही नूतनला विवाह उपरांत सिनेमे करण्यास मज्जाव केला नाही. प्रतिष्ठेने, आत्मसम्मानाने आपले जीवन जगली नूतन, पण तरीही त्यात कुठेही माज नव्हता, कारण त्याला नेहमी आध्यात्माचं कवच असे.
॥ कलारंग : अजय देशपांडे |
अत्यंत हुशार, बोलक्या डोळ्यांची, मानसशास्त्राची खोलवर जाण असल्यामुळे संवेदनशील, सामर्थ्यवान अभिनेत्री प्रथमतः आपल्या सिनेजगताला अनुभवयास मिळाली असेल तर ती नूतनच्या स्वरूपात. भावस्पर्शी अभिनय किंवा संवाद कसे असावेत, हे मी नूतनकडून शिकले, अशी कबुली एकदा स्मिता पाटील हिने नूतनच्या निधनोपरांत दिल्याचे मला आजही आठवते. साधना ही असेच काही नूतनबद्दल आदरातून बोलली होती. असे काय विशेष होते नूतनमध्ये की, १९४० ते १९६० च्या दशकांत जन्मलेल्या अनेक स्त्रियादेखील तिच्या चाहत्या होत्या? त्याकरिता तिच्या जीवनप्रवासाचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
नूतनचा जन्म ४ जून १९३६ चा. आई त्या काळातील सुप्रसिद्ध अभिनेत्री शोभना समर्थ. नूतन २ महिन्यांची पोटात असताना आईला मोठा अपघात झाला, अगदी गर्भपाताची पाळी आलेली. पण दैव योगाने गर्भपात टळला व त्यानंतर सुखरूप नूतनचा जन्म झाला. शोभना समर्थ यांचेवर ‘राम राज्य-१९४३’ यातील ‘बीना मधुर-मधुर कछु बोल’ हे भीमपलास मधील गाणं चित्रीत झाल्याचं बर्याच रसिकांच्या स्मरणांत असेल. गांधींनी त्यांच्या हयातीत फक्त एकच सिनेमा बघितला असल्याचं बोलल्या जातं आणि तो म्हणजे ‘राम राज्य’. नूतनची मावशी होती नलिनी जयवंत. नूतनच्या वयाच्या १०-१२ व्या वर्षी आई-वडील वेगळे झाले. पण आई शोभना – समर्थ होती, त्याकाळातही आपल्या आपत्यांचे संगोपन करण्यास. त्यामुळे नूतन किंवा तनुजा (लहान बहीण) ला कुठल्याही क्षणी वडिलांची कमतरता भासू दिली नाही.
शोभना समर्थ यांनी १९५१ साली नूतनला के असिफ यांच्या ‘हमारी बेटी’ मधून चित्रसृष्टीत आणलं. चित्रपट फारसा चालला नाही, पण नूतन लक्षात राहिली, तिच्या चमकदार अभिनयामुळे व लक्षात राहिले हे उत्कृष्ट लता-गीत जे स्नेहल भाटकरांनी स्वरबद्ध केलं होतं – ‘मेरे सपने बने आज अपने’. सन १९५१ नूतनला लाभदायक ठरलं. ‘नगिना’ व ‘हमलोग’ असे दोन चित्रपट तिला मिळाले. नगिनात कथानकामुळे तिला फारसा वाव नव्हता, परंतु झिया सरहद्दीच्या हमलोगमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका तिच्या वाट्यास आली आणि नूतन अशी संधी कसली सोडतेय? तिने चीज केले या भूमिकेचे. मुरलेला नट- बलराज साहनी हमलोगमध्ये होता. त्याच्याशी १५ वर्षीय नूतनची टक्कर होती, पण या भूमिकेचे आव्हान अगदी लिलया पेलवत फार उत्कृष्ट भूमिका नूतनने प्रस्तुत केली. लताबाईंनी गायलेलं ‘चली जा छोड के दुनिया तुन’ कसलेला अभिनय तिचा दिसून पडतो. नगिनातल्या तिच्यावर चित्रित ‘तुने हाये मेरे’ या लताबाईंच्या लाजवाब गीतावर सब-कुछ कुर्बान असे म्हणावेसे वाटते. नगिना हा रहस्यपट होता, A सर्टिफिकेट मिळालेला व नूतन अल्पवयीन असल्याने तिला तिचाच सिनेमा चित्रपटगृहांत त्यावेळी बघता आलेला नव्हता. नंतर तिने बघितल्याचं सांगितलं जातं. नगिनातूनच तिची नासिर खानसोबत जोडी जमली, जी पुढील २-३ वर्षांत आणखीन काही चित्रपटांत झळकली.
१९५२ साली नूतनच्या नशिबी येतात – ‘निर्मोही’, ‘शीशम’, ‘हंगामा’ व ‘पर्बत’. दुर्दैव बघा, या चारही चित्रपटांच्या प्रिंट्स उपलब्ध नाहीत, अर्थात असे शेकड सिनेमे आहेत. आम्ही भारतीय आपल्या कलेच्या संवर्धनाबद्दल इतके उदासीन कसे असू शकतो, हे मला न उलगडलेले कोडे आहे. हॉलीवूडमध्ये आजही १९२७-२८ च्या नंतरच्या प्रत्येक सिनेमाची प्रिंट व्यवस्थित जतन करून ठेवल्याचे निदर्शनास येते. ‘मुस्कुराहट तेरे होठों की मेरा सिंगार है’ (शीशम), ‘अब गम को बना लेंगे’, ‘दुखियारे नैना’ (निर्मोही), ‘तेरे दर पे ख़ुशी मांगी’ (हंगामा) किंवा प्रेमनाथ बरोबर पर्बतमध्ये ‘होठों पे तराने आ गये जी’- ही सर्व अप्रतिम लता-गीतं पडद्यावर नूतन गात असलेली बघतांना कोणाला आवडली नसती? पण गेलं हे कायमचं.
१९५३ साली तिचे ‘लैला मजनू’, ‘आगोश’ व ‘मालकीन’ प्रदर्शित झाले. लैला मजनूमध्ये शम्मी कपूर होता, तर उर्वरित दोन्ही चित्रपटांत परत होता नासिर खानच. लैलाची भूमिका तिने समर्थपणे उभी केलेली आहे. ‘किसकी आँख के आंसु हैं सितारे ना कहो’ (आगोश) मधील गाणे बघताना कोवळ्या नूतनच्या अभिनयाची दाद द्यावीशी वाटते. १९५४ सालचा ‘शबाब’ लक्षात राहतो तो एकतर लताबाईंमुळे किंवा नूतन मुळे. लताबाई नूतनकरिता आपला विशेष स्वर राखून ठेवत असत का, हा प्रश्न बरेचदा मला पडतो. प्रत्येक गाण्यात नूतन व लताबाई समरस झाल्याच्या आढळतात, त्यालाच आपण लीप सिंकींग असे ही म्हणतो.
नूतनच्या जीवनात खरा बदल आला १९५५ पासून, जेव्हा तिला सुप्रसिद्ध निर्देशक अमिय चक्रवर्तींनी चित्रपट दिला – ‘सीमा’. तिच्या भूमिकेच्या अवती-भोवतीच फिरणारे कथानक असल्याने तिला तिची प्रतिभा खुलवून दाखवण्याचा पुरेपूर वाव होता आणि त्यातून साकार केली तिने गौरी, एक अविस्मरणीय गौरी. नूतनच्या प्रत्येक भूमिकेत तिचा प्रचंड आत्मविश्वास झळकत असे. मानसशास्त्राची किती खोलवर जाण तिला एवढ्या लहान वयात असेल हे तिच्या अभिनयातून प्रदर्शित होतं. तिचं खाजगी जीवन ही तसेच होते. अत्यंत निर्मळ मनाची, प्रचंड अध्यात्मिक, गर्भश्रीमंत असूनही अत्यंत साधी जीवन शैली आणि प्रत्येकाची मदत करणे हे नूतनच्या स्वभावातील काही वैशिष्ट़्ये
१९५७ साली तिला प्रथमतः देव आनंद बरोबर दोन सिनेमांत झळकायची संधी मिळाली. ‘पेईंग गेस्ट’ व ‘बारिश’. देव आनंद बरोबरीला असल्यास लोकं नायिकांना विसरतात असा अनुभव आहे, पण येथे व त्यानंतरच्या ‘तेरे घर के सामने-१९६३’ मध्ये असे नूतन ने आपल्या अभिनयाच्या सामर्थ्यावर फोल करून दाखवले. प्रेक्षकांनी तिला विसरण्यास ‘नकार’ दिल्याचे आढळते. अगदी हलके-फुलके रोल्स तिच्या वाट्याला या तिन्ही चित्रपटांत आले जे तिने सहजरित्या हाताळले. ‘फिर वोही चॉंद’ (बारिश), ‘छोड दो आंचल’ (पेईंग गेस्ट), ‘देखो रुठा ना करो’ (तेरे घर के सामने) ही काही माझी आवडीची द्वंद्व-गीतं या जोडीवर चित्रीत झालेली. ‘सोने की चिडिया’-१९५८, ‘दिल्ली का ठग – १९५८’, ‘अनाडी-१९५९ मधील नूतनच्या भूमिकेंची चौफेर तारीफ केली गेली. याच दरम्यान दिलीप कुमार सोबत तिचा ‘शिकवा’ नावाचा चित्रपट यायचा होता पण तो दुर्दैवाने अपूर्ण राहिला.
नूतनमधल्या अभिनेत्रीला अजून बरीच आव्हाने पेलायची होती, आणि ती आली बिमल रॉय यांच्या ‘सुजाता-१९५९’ आणि त्यांनंतर प्रदर्शित झालेल्या ‘बंदिनी-१९६३’ तून. सुजाता ह्या अस्पृश्य मुलीची भूमिका कसली दमदारपणे साकारली आहे. त्या मुलीच्या मनातील आंदोलनं ज्यारीत्या नूतनने ‘जलते है जिसके लिये’ या ३ मिनिटांच्या गाण्यातही प्रस्तुत केली आहेत त्याला तोड नाही, मग अडीच तासाच्या सिनेमात कसला अभिनय असेल तिचा? आजकाल असे चित्रपटच बनत नाहीत, आणि एखाद्याने बनवायची हिम्मत ही केली तरी नूतन सारखी अविस्मरणीय भूमिका साकारणारी अभिनेत्री आहे तरी कुठे? बंदिनी तील कथानक ही स्त्री प्रधान होतं, त्यात कल्याणी नावाचं तिचं पात्रं होतं. अचाट करणारा नूतनचा अभिनय बंदिनीतूनही लोकांना अनुभवायास मिळाला. ‘मिलन-१९६७’ मध्येही तिने राधाची भूमिका फार समर्थपणे सादर केली. ‘कन्हैय्या-१९६०’, ’दिल ही तो है-१९६३’, सरस्वती चंद्र-१९६८ मधील नूतनच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. नूतन एक चांगली गायिका पण होती, ‘छबिली-१९६०’ मधील तिने गायलेली ‘लेहरों पे लहर’ (हेमंतकुमार सोबत डुएट) किंवा ‘ए मेरे हमसफर’ ही गाणी आजही बर्याच लोकांच्या स्मरणात असावेत. नूतनला एकूण उत्कृष्ट नायिकेचे ५ फिल्म फेअर पुरस्कार मिळाले आहेत. ते चित्रपट होते – सीमा, सुजाता, बंदिनी, मिलन व मै तुलसी तेरे आंगन की (१९६८). माझ्या मते हा ही एक विक्रम असावा. १९७४ साली पद्मश्रीने भारतीय सरकारने तिला सम्मानित केलं आहे.
१९५९ साली तिचा भारतीय नौसेनेतील कमांडर रजनीश बहल यांच्याशी विवाह झाला. बहल यांची आई थेट महाराजा रणजीत सिंह यांच्या राजघराण्यातील, त्यांच्या राजघराण्याला साजेशी अशी सून मिळाली होती नूतन आणि ती वावरलीही तशीच. बहल यांनी कधीही नूतनला विवाह उपरांत सिनेमे करण्यास मज्जाव केला नाही. प्रतिष्ठेने, आत्मसम्मानाने आपले जीवन जगली नूतन, पण तरीही त्यात कुठेही माज नव्हता, कारण त्याला नेहमी आध्यात्माचं कवच असे. नूतनला फावल्या वेळात शिकार करायचा छंद होता, अत्यंत निपुण होती त्यातही. जुन्या वस्तू संग्रहित करण्याचा तिचा छंदही अनेकांना आजही आठवतो. ठाण्याजवळच्या मुंब्रा येथील तिच्या बंगल्यात अमूल्य अशा बर्याच वस्तू जमवल्या होत्या, ज्या मध्यंतरीच्या काळात दुर्दैवाने चोरीस गेल्याचे ऐकले. १९९१ साली, वयाच्या ५५ व्या वर्षी नूतन हिचे कॅन्सरनी निधन झाले.
शेवट तिच्यावर चित्रित एका अजरामर गीताने करतोय, मदन मोहन यांचं संगीत, मजरूह यांनी नूतनला ध्यानात ठेवून लिहिलेलं, फिल्म ’आंखरी दाव-१९५८’, नूतनचे भावस्पर्शी डोळेच नुसते बघत रहावेत..
तुझे क्या सुनाऊँ मैं दिलरुबा
तेरे सामने मेरा हाल है
तेरी इक निगाह की बात है
मेरी ज़िंदगी का सवाल है
http://tarunbharat.org/?p=39124
No comments:
Post a Comment