धितांग धितांग बोले....!!!!
पश्चिम बंगालमधील "हरिनवी" हे हिरव्यागार निसर्ग सौंदर्याने नटलेले गाव...इथेच तो जन्मला होता...लहानगा बाच्यू...!!निळे आकाश,खळखळ वाहणाऱ्या नद्या,पाखरांचा किलबिलाट, नजरेत न सामावणारे चहाचे हिरवेगार मळे आणि त्यात काम करणाऱ्या मजुरांनी गायलेली मधुर लोकगीते ऐकत ऐकत,काझीरंगाच्या जंगलात हत्तीवर बसून केलेल्या भ्रमंतीत आसमंतातील सूक्ष्म ध्वनी टिपण्यात त्याचे बालपण कधी सरले ,ते कळलेच नाही...घरी वडिलांचे आवडते पाश्चिमात्य ढंगाचे सिम्फनी संगीत कानावर येई...त्याच्याही नकळत हे दोन्ही संगीत प्रकार त्याच्या मनाच्या गाभाऱ्यात रुजत होते...वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी तो बासरी वाजवायला शिकला...हळू हळू इसराज, व्हायोलिन,पियानो यावरही त्याने प्रभुत्व मिळविले..शास्त्रीय संगीत,देशविदेशीचे लोकसंगीत,मोझार्ट,हॅन्स आइस्लर,बिथोवन यांच्या सिम्फनी यांचे उत्तम कोलाज आपल्या संगीतातून रेखाटणारा हा जिनिअस होता...सलील....सलील चौधरी...!!!आज त्यांची जयंती....!!! मधुर संगीताची निर्मिती करणाऱ्या या महान संगीतकाराला लक्ष लक्ष प्रणाम...!!!
त्यांच्या प्रत्येक गीताचा गंध वेगळा,रंग वेगळा...!!!त्यांचे संगीत कधीच विशिष्ट साच्यात बंदिस्त नव्हते...त्यात बंगाली लोकगीतांची जादू होती, तरंग होते,नदीच्या प्रवाहाप्रमाणे अगदी प्रवाही ...!! भावनांचा ओलावा होता...गीताचा अर्थ आणि मनात नाचणारे स्वर कारंजे यांचा तो अपूर्व असा संगम असायचा....तारुण्यात सलिलदा साम्यवादाने प्रेरित झाले,चहाच्या मळ्यातील मजुरांवर होणारे अत्याचार त्यांनी पाहिले होते...आणि वडील ग्यानेंद्रमय यांच्याप्रमाणेच ते निर्भीड होते.सलीलदा हृदयस्पर्शी कविता करत...याच कवितांच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली,आपल्या संगीतकलेला साम्यवादाच्या प्रसाराचे माध्यम बनवले ,समाज जागृतीचे साधन केले,आर्थिक व सामाजिक विषमता,शेतमजुरांवरील अन्याय याविरुद्ध त्यांनी आपल्या "जनचेतनार गानातून" (songs of consciousness)आवाज उठवला...पुढे ते इप्टा चे सदस्य झाले..."बिचारपती तोमार बिचार कोरबे जारा"या त्यांच्या बंगाली कीर्तन शैलीतील हार्मनीने परिपूर्ण अशा गीताने त्यांना अपार लोकप्रियता मिळवून दिली.
१९४९मध्ये त्यांचा "परिवर्तन"हा बांगला मधील पहिला चित्रपट साकारला...त्यानंतर बरजात्री(१९५१),पाशेर बाडी(१९५२),भोर होए एलो(१९५३),रिक्षावाला(१९५३)असे काही बंगाली चित्रपट गाजले... कोलकता शहरात मोलमजुरी करून आपली गांवाकडील जमीन सावकाराच्या पाशातून सोडवण्याची स्वप्ने पाहणा-या गरीब बिचा-या माणसाच्या जीवनाची कशी फरफट होते या गोष्टीवर त्यांनी लिहिलेली कथा 'रिक्शावाला' या नांवाने बंगाली सिनेमाच्या पडद्यावर आली."बिमल रॉय" यांना ती कथा खूप आवडली आणि त्यांनी सलीलदांना यावर हिंदी चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी मुंबईला बोलावले...मुंबई या महानगरात एका जिनिअस कथाकाराचे,गीतकाराचे ,बुद्धिवान संगीतकाराचे,कुशल अरेंजरचे,उत्तम पार्श्व संगीत देणाऱ्या या अष्टपैलू कलाकाराचे आगमन झाले ... सुवर्ण काळातील ती हिंदी चित्रपटसृष्टी या हरहुन्नरी कलाकाराच्या आगमनाने हरखून गेली...!!!
"दो बिघा जमीन" या चित्रपटातील गीतांनी इतिहास रचला...!!! इप्टा मध्ये केलेल्या गीतांपैकी "उरू टाका टाका ताधिना"या गीताने "हरियाला सावन ढोल बजाता आया "असे रूप घेतले.मन्ना डे आणि लतादीदी यांच्या स्वरात शेतकऱ्यांच्या डोळ्यातील हे "हिरवे स्वप्न" फुलले आणि रसिकमनात ही स्वरांची हिरवाई रुजली...खळखळ वाहणाऱ्या नदीच्या प्रवाहासारखा नितळ दिदींचा स्वर आणि "भाई रे"अशी साद घालणारा, भारतीय संस्कृतीशी आणि बंगाली लोकगीताशी नाळ जोडणारा मन्ना डे यांचा स्वर मिसळून जे सृजन झाले ते अप्रतिम होते..."धरती कहे पुकार के" या गीताची प्रेरणा सलीलदांनी "रशियाच्या मार्चिंग सोंग" वरून घेतली आणि संगीताच्या कक्षा रुंदावल्या..याच चित्रपटातील "आ जा री आ निंदिया तू आ..."ही लतादीदींनी गायलेली सुंदर लोरी...सलील टच लाभलेली , दमसास करणारी..केवळ लतादीदींसाठीच रचलेली.. सलीलजी आणि दीदी यांचे हे पहिले गीत...दोघांच्या कलेचा कस लावणारे..."उत्कृष्ट" या सदरात मोडणारे...!!!!पुढे या द्वयीने आपल्या सुंदर गीतांनी रसिकमनावर गारूड केले.. "गजब तेरी दुनिया हो मोरे रामा"(रफी आणि साथी)हे पुरबी लोकसंगीताचा सुगंध घेऊन आलेले यातील गीतही खूप सुंदर...!!!!
सलीलजींच्या अनेक रचना पाश्चात्य सिम्फनी च्या तरंगांवर लहरत येतात... आणि तेच मधुर तरंग आपल्या मनी उमटवतात...जसे "रिमझिम झिम झिम बदरवा बरसे(तांगेवाली)यातील "झिम" या शब्दाची पुनरावृत्ती तर"झिर झिर झिर झिर बदरवा बरसे "(परिवार) यातही (झिर झिर झिर झिर)या शब्दांची पुनरावृत्ती सुंदर नाद निर्मिती करते ,विलक्षण माधुर्य आणि पुरबी ढंगाचा हलकासा स्पर्श येथे जाणवतो...जणू स्वरांचे कारंजेच...!!!"बरखा न भाये गोरी तेरे बिना"हे घरंगळत येणारे शब्द जणू मनीचे अरमान जागवितात...!!!कधी "धितांग धितांग" तर कधी "रुन झुन झुन "तर कधी "गुन गुन गुन "असे शब्द वापरून त्यातील नादमधुरता ते वाढवत असत..."झूमे रे नीला अंबर झूमे"..(एक गाव की कहानी)हे गीत तर मनात आनंद लहरी मनात निर्माण करणारे..तलतजींच्या रेशीम स्वरातील मुलायमता, त्यांच्या आलापातील गोडवा यात अनुभवावा."कोई देख लेगा"(एक गाव की कहानी) हेही नितांत सुंदर गीत तलत- लताजी यांच्या स्वरातून मुग्ध प्रणयाचे दर्शन घडविणारे ...!!!लयीची जादू अधोरेखित करणारे "छुओ ना छुओ ना अलबेले मेरे सैय्यां"(हनिमून...मुकेश-सविता चौधरी) थक्क करणारे तर "दुनिया न देखे"(लता द्विजेन) हे त्यातीलच तार स्वरातील आलापांनी सजलेले आणि सर्वात सुंदर म्हणजे लताजींचे "अहा रे मगन मेरा चंचल मन"...अनंत स्वर लाटांनी बहरलेले...आपल्याला डोलविणारे...आणि खासियत म्हणजे दिदींचा मधाळ स्वर....सलीलजींच्या संगीताला चार चांद बहाल करणारा...!!
चित्रपट गीतात "कोरस" महत्वपूर्ण भूमिका बजावतो...सलीलदांची गीते याच नित्य नूतन कोरस ने सजलेली दिसतात...तिथेही त्यांची प्रतिभा बहरते,प्रयोगशीलता दिसते...!!!"परख" मधील "मेरे मन के दिये "या लतादीदींच्या मृदू स्वरातील गीतात त्यांनी "चर्च" मधील ऑर्गन संगीत,इंग्लिश फ्लूट आणि कोयर शैली वापरली आणि गीतास एक अलौकिक झळाळी दिली.."समर्थ मानवी स्वर" कोरस म्हणून गीतात वापरल्याने गीताला प्रार्थना स्वरूप प्राप्त झाले.."जानेवाले सीपाही से पुछो"(मन्ना डे आणि साथी-उसने कहा था)हे गीतही अतिशय हृदयद्रावक आणि कोरल गायन,पाश्चात्य सिम्फनी चे एक उत्तम उदाहरण आहे. "लाल बत्ती" या चित्रपटातील लतादीदींचे "हाय झिलमिल झिलमिल ये शाम के साये" या मुलायम,हळुवार गीतात कोरस मध्ये "हमिंग" चा प्रयोग त्यांनी केला तर त्यांच्या गाजलेल्या "बिछुआ" गीतात "चढ गयो पापी बिछुआ " म्हणणारा कोरस,"ओय ओय ओय ओय "ही लतादीदींनी उत्स्फूर्तपणे घेतलेली जागा,गीताच्या सुरवातीचे आलापही त्यांचेच आणि यातील सलीलदांनी केलेला आसामी आणि कुमाऊ लोकसंगीताचा चपखल वापर कसा विसरायचा...!!!!त्यांच्या "आवाज" चित्रपटातील "धितांग धितांग बोले "ची गंमत काही औरच...!!!लावणीच्या ढोलकीच्या थापेने झालेली सुरुवात गोवन लोकसंगीताच्या दिशेने वाटचाल करते.(ही ढोलकी श्री लाला गंगावणे यांनी वाजविली होती असे संगीत समीक्षक श्री अरुण पुराणिक यांनी सांगितले.)हार्मोनियम आणि अकॉर्डियनची मोहक महिरप आणि "आये रे आये प्यार के दिन आये" या ओळीतून उमटणारी कोरस ची लहर आणि लतादीदींच्या स्वरातील लाडिक "हाय रे हाय" ऐकले की घायाळ व्हायला होते...तो ठेका,ती लय ,ते सूर आपल्यात जणू भिनतात... नकळत पावले थिरकतात...!!!"नाम मेरा निम्मो"(सपने सुहाने...लता-मन्ना डे-द्विजेन) हे असेच प्रवाही गीत,सुंदर कोरस असलेले...यात कोरस मध्ये "आहा रे झुमती नवेली", "आहा रे नार अलबेली","आहा रे प्यार की पहेली "असे शब्द गुंफून पार्श्वभूमीत "आहा आहा आहा" असे गुंफलेले शब्द गीतास वेगळे सौंदर्य देतात...!!!"बाबा तेरी सोन चिरैय्या "(आवाज-लता-साथी)या गीतात त्यांनी "द्रुत गरबा शैली" चा कल्पकतेने वापर केला आहे..विविध वाद्याना त्यांनी रिदम साठी वापरले आहे.."सुरेर झरना"हे गीत ऐकले की याचा प्रत्यय येतो.यातील एकॉर्डियन आणि सगळीच वाद्ये,कोरस अप्रतिम...एखाद्या वाऱ्याच्या लाटेवर आपण स्वार झालोत असाच प्रत्यय हे गीत देते...!!!!
सलीलदांनी काही शास्त्रीय संगीतावर आधारित गीतही दिली,जी आजही रसिकमनात दरवळत आहेत..."परिवार" मधील "हंसध्वनी" रागावर आधारित "जा तोसे नहीं बोलू कन्हैय्या"(मन्ना डे-लताजी)अतिशय मधुर तानांनी सजलेले असे "कृष्णराधा" नृत्य गीत आहे तर "छम छम नाचत आई बहार" हे "बसंत बहार" रागावर आधारित लताजींचे गीत आहे...अविस्मरणीय असेच....!!! "जागो मोहन प्यारे" हे "जागते रहो "मधील कोरस ने सजलेले सदाबहार गीत "भैरव "रागावर आधारित असून मास्टर पीस असेच याचे वर्णन करता येईल...याच रागातील "मन रे हरी के गुण गा"(मुसाफिर) हे कीर्तन शैलीवर आधारित आहे... त्यांच्या'तेरी याद न दिल से जा सकी (चांद और सुरज)या "भैरवी" तील सुंदर गीताला विसरणे केवळ अशक्य...!!!रचना गायला क्लिष्ट पण कर्णमधुर आहे..प्रेमात पाडणारी...!!!पारंपरिक ठुमरी "लागी नाही छुटे राम"वर आधारित एक ऐतिहासिक युगलगीत त्यांनी लताजी आणि खुद्द दिलीपकुमार यांच्याकडून "मुसाफिर"चित्रपटासाठी गाऊन घेतले.."लागी नाही छुटे रामा चाहे जिया जाय "हेच ते सुंदर गीत...!!!!
कधी कधी सलीलजी त्यांच्या गीताच्या इंटरल्युड्स मध्ये त्यांच्याच दुसऱ्या गीताची झलक देत ..जसे "आजा रे परदेसी" च्या इंटरल्युड्स मध्ये "घडी घडी मेरा दिल धडके" ची झलक तर "साथी रे" (पुनम की रात)या गीतात "बाग में कली खिली"(चांद और सुरज)ची झलक मिळते आणि त्यामुळे मूळ गीत अधिक खुलते.
"लता"चा स्वर म्हणजे सलीलजींच्या संगीतातील मुख्य स्वर...!!त्यांनी काही खास गाणी केवळ दिदींसाठी रचली आणि दिदींनीही आपल्या तलम स्वराने त्यांचे सोने केले...शृंगार,कारुण्य,भळभळणारे दु:ख,नितांत प्रेम साऱ्याच भावना दिदींच्या स्वरातून अलवार उमटायच्या आणि रसिकांच्या मनाला भिडायच्या..."परख" मधील "ओ सजना" हे गाणे तर मर्म बंधातली ठेवच जणू...!"जयराम आचार्य" यांच्या सतारीच्या झंकाराने पर्जन्य थेंबांची कल्पिलेली रिमझिम कित्ती सुंदर...!!! "खमाज" ची छाया घेऊन आलेल्या या गीताची प्रेरणा सलीलजींना भर पावसात गाडी चालवत असताना वायपर्स च्या होणाऱ्या आवाजातून मिळाली होती असे वाचल्याचे आठवते...!!!बंगालीतील "ना जेओ ना रोजोनी एखोनो बाकी"या गीतावरुन याची चाल बांधली आहे..हे गीतही तितकेच मधुर आहे...आश्चर्य म्हणजे ध्वनिमुद्रित झाल्यावर हे गीत दिदींशिवाय फारसे कुणाला आवडले नव्हते..त्यामुळे सलीलदा नाराज झाले पण पुढे मात्र या गीताने इतिहास घडविला...!!
"ना जिया लागे ना"(आनंद,मालगुंजी रागावर आधारित),"न जाने क्यू"(रजनीगंधा),"ओ रे मन गुन गुन गुन गुन झुमके","आज कोई नहीं अपना"(अग्निपरीक्षा),"निसदिन निसदिन"(अन्नदाता)ही सगळीच त्यांची सोलो गीते अप्रतिम...आपले वेगळेपण जपणारी...!!!"रातों के साये घने" हे मात्र खऱ्या अर्थाने त्यांच्या गायकीचा कस लावणारे गीत..स्केल मधील चढ उतार दाखविणारे,शोपीन ची रचना "Nocturnal"च्या प्रेरणेने रचलेले...यातील इंटरल्युड्स मधील "choral huming" ने नि:स्तब्ध रात्रीच्या शांततेत तरंग उठतात...!!!गीतातील भावना अधिक तीव्र आणि गहन करतात...!!!"मधुमती" हे स्वरशिल्प त्यांच्या कारकिर्दीतील मानाचे पान...!!!त्यातील लताजींची "आजा रेssssssपरदेसी"ही साद कोण विसरेल??बागेश्रीच्या छायेत असलेले हे गीत ,मनोहारीदांच्या बासरीने बहरले आहे...त्याची पहिली ओळच मन काबीज करते...अवीट गोडीचे असेच हे गीत...!!!!
लताजींच्या आवाजाच्या रेंज चे असीम क्षितिज पारखून त्यांनी त्याचा सुंदर वापर केला...त्यांच्या गळ्यातून येणाऱ्या तार स्वरातील आलापांचा वापर त्यांनी वाद्यासारखा केला."माया" मधील "ए दिल कहा 'तेरी मंझील"(द्विजेन-लता) "वो एक निगाह क्या मिली"(लता-किशोर-हाफ टिकट), आँखो से काजल की लेकर सियाही(लता-झूला)यातील त्यांचे आलाप हाय पिच मधील असून पाश्चात्य ढंगाचे आहेत,तरीही ते गीतात एकरूप झाले आहेत..
"मुकेश" हे त्यांचे आवडते गायक...!!!त्यांच्या आवाजाची रेंज मर्यादित असली तरी त्यांच्या स्वरातील विशिष्ट गुणधर्म(timbre),स्वरातील चढ उतार(intonation)आणि भावभावनांचे प्रकटीकरण अद्वितीय असेच होते ,त्यामुळे मुकेशजींच्या स्वरांवर त्यांचे प्रेम...!!!"मैने तेरे लिये"(आनंद)हे पियानोच्या साथीने म्हटलेले गीत,"कहीं दूर जब दिन ढल जाये"(आनंद)मधील संध्यासमयीच्या उदास सावल्यांचे त्यांच्या स्वरातून व्यक्त झालेले गंभीर रूप...सारेच मन हेलावणारे...!!!"सुहाना सफर और ये मौसम हसीन" या मधुमतीतील गीताचा ताजेपणा काय वर्णावा...!!तलतकडून हे गीत सलीलदांना गाऊन घ्यायचे होते,पण मुकेशजींनी त्याचे सोने केले....!!!!दिलीपकुमार मुकेशजींच्या स्वरावर तितकेसे राजी नव्हते...पसन सलीलदांनी निर्णय घेतला होता..पूर्व युरोप मधील लोकसंगीत सलीलदांचे आवडते...लताजींबरोबर मुकेश यांनी म्हटलेले "दिल तडप तडप के कह रहा है" हेही एक सुंदर गीत..."हंगेरी झेकोस्लोवकिया" च्या लोकसंगीतावर आधारित...!!!!
सलीलदांच्या संगीत दिग्दर्शनातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे गाण्यातील स्केलमध्ये केलेला झटपट बदल...आणि म्हणूनच त्यांची गीते गायला कठीण असत...गुजर जाये दिन(किशोर...अन्नदाता),ये बन्सी क्यू गाये(लता...परख),मचलती आरजू खडी बाहे पसारे(लता-उसने कहा था),दूर बहोत आबादी से(लता-मुकेश-झूला),नजर से मिल गयी नजर(सविता-द्विजेन-सपन सुहाने)ही गाणी त्या शैलीची काही उदाहरणे..!!
मुकेश प्रमाणेच किशोरकुमार यांच्या आवाजाचाही त्यांनी सुंदर उपयोग केला.."छोटासा घर होगा" (नौकरी...किशोर-सविता)हे सुंदर गीत त्यांनी नेपाळी धुन "बोलाउंदा न बोलने कस्तो हुजूर "यावरून घेतले आहे,त्यातील "आsssआई लो" खूप गोड..!!!"हाफ टिकट" मधील "चिल चिल चिल्ला के","चांद रात तुम हो साथ"(लताजींबरोबर),"आँखो में तुम"(गीताजींबरोबर),"आके सिधी लगी दिल पे जैसी अटरीया"(किशोरजींच्या स्वराचा मेल आणि फिमेल या दोन्ही साठी या गीतात वापर)यासारखी धमाल गीते दिली..या चित्रपटाच्या यशात संगीताचा आणि गायकांचाही मोलाचा वाटा होता.
"तलत" यांच्या मखमली स्वरात "छाया" चित्रपटात "आँखो में मस्ती शराब की" सारखे रोमँटिक तर "आँसू समझ के क्यू हमे "हे हृदयद्रावक असे गाणे दिले..मोझार्ट च्या 40व्या सिम्फनी वर आधारित "इतना ना मुझसे तू प्यार बढा" (लताजींबरोबर)ही सुंदर रचना दिली..."आहा रिमझिम के ये प्यारे प्यारे गीत"(लताजींबरोबर...उसने कहा था)हे सदाबहार गीत तर अगदी वेगळ्या ढंगाचे गुलजार यांचे "सावन की रातो में" (प्रेमपत्र-लताजींबरोबर)हे मल्हार मधील सतारीने बहरलेले गीत दिले.."ये मेरे अंधेरे उजाले न होंगे"(तलत-लता-प्रेमपत्र) हे यमनी बिलावल मधील पियानो ची संगत लाभलेले गीत दिले...
"गंगा आये कहा से"(हेमंतकुमार-काबुलीवाला) हे भटियाली ढंगाचे गीत हेमंतदांनी जीव ओतून गायले आहे... तर मन्ना डे यांचे सदाबहार गीत "ए मेरे प्यारे वतन" जे एका दर्द भर्या अफगाणी लोकगीतावर आधारित होते..काय सुंदर रचना...फक्त "बेमिसाल" असेच याचे वर्णन करता येईल.."मर्जी है तुम्हारी"(मेरे भैय्या लता-मन्ना डे)या गीतात मनासारखा हार्मोनियम चा परिणाम साधत नव्हता,मग सलीलदांनी स्वत: यात हार्मोनियम वाजविली आहे..बिमल रॉय यांच्या "अमानत" चित्रपटातील आसामी लोकसंगीतावर आधारित "हो जबसे मिली तोसे अंखिया" (हेमंतकुमार आणि गीता दत्त)याचा गोडवा काही औरच !!!सुरवातीचा आलापच सुंदर आणि त्यानंतरची बासरी म्हणजे जणू पक्षांची किलबिल .....गीताजींनी "डोले"चा उच्चार असा लाडिक केलाय की बस्स...!!!"नाच रे धरती के प्यारे"(हेमंतकुमार-लता-हिरामोती)हे शेतकऱ्यांचे आनंदगान कोरस च्या साथीने आणि सुंदर आलापांनी नटले आहे.बंगाली फिल्म "रिक्षावाला" मधील "रे हे पौषाली बाताशे "चे हे हिंदी रूपांतर...!!!
"बासरी" हे सलीलदांचे आवडते वाद्य...तिचा त्यांनी भरभरून वापर केलाय..ये बन्सी क्यू गाये,मिला है किसिका झुमका,(परख),झूम झूम मनमोहन रे(हेमंत कुमार-बिराज बहू)ही त्यातील काही गीते,त्यातील बासरीच्या नाद उल्लेखनीय...!!!
गीताजींचे "झूमे रे कली भवरा उलझ गया काटो मे"(नौकरी)मधील बंगाली संगीताची गोलाई,गाण्याचा लोभस अंदाज सारेच सुंदर...(आपणही गुंततो त्या स्वरांच्या भवऱ्यात)
तसेच "बाकी अदाये देखना जी देखना "हे एकॉर्डियनच्या मोहक सुरांनी सजलेले गीत...गीतांजींची नितांत सुंदर अदाकारी...!!!!तसेच आशाजींनी "बाग में कली खिली "(चांद और सूरज)हे स्केल चेंगिंग च्या तंत्राचे,जॅझ शैलीच्या वाद्यवृंदात नटलेले आशाजींचे हे सर्वश्रेष्ठ गीत आणि "ठंडी ठंडी सावन की फुहार" (जागते रहो)हे अफलातून गायकीचे विरहगीत भावना ओतून त्यांनी अमर करून ठेवले आहे.रफिंचे "तसवीर तेरी दिल में"(माया-लता-रफी)हे अप्रतिम युगलगीत आणि टुटे हुए ख्वाबॉंको (मधुमती)मधील विरहगीत दोन्ही अवीट गोडीची आहेत...
सलीलदा म्हणजे सुरांचे चित्रकार...कमालीचे प्रतिभावान...अप्रतिम वाद्यवृंद....जलद चाली...स्वरांचा चढ उतार असलेल्या,मेलडीने ओतप्रोत गीते..देशविदेशीचे लोकसंगीत आणि पाश्चात्य संगीत याना भारतीय संगीताच्या कोंदणात लीलया बसविणारे कुशल संगीतकार...बंगालीतील कितीतरी गोड गीते त्यांनी हिंदीत आणली...त्यांची बंगाली गीतही तितकीच सुंदर...भाषेचा अडसर न येता सुरांच्या जाळ्यात मात्र रसिकांना अलगद अडकविणारी...संगीताप्रमाणे उत्तम पार्श्व संगीतही देणारे...देवदास च्या चार रिळांसाठी तर कानून, इत्तेफाक, अचानक,काला पथथर,अनोखी रात यांचे पार्श्व संगीत त्यांचेच...अखेरीपर्यंत त्यांच्या प्रतिभेचा झरा आटला नाही..."श्याम से आँख में नमीं सी है" सारखी मुकेशजींनी गायलेली सुंदर रचना,
आशाजींचे "ऐसा लगे कही दूर से","कान्हा बोले ना"(लता-मन्ना डे),"आ आ रे मितवा"(येशूदास -सविता)अशा सुंदर रचना त्यांनी दिल्या...
हा सुरांचा बादशहा व्यवहारी जगात मात्र नेत्रदीपक यश मिळवू शकला नाही...बडे बेनर्स त्यांना क्वचितच लाभले ...राजकपूर सारख्या दिग्गज संगीताच्या जाणकाराला सुद्धा यांच्या प्रयोगशील संगीताची भुरळ पडली...पण त्यांची स्वतंत्र प्रज्ञा,प्रयोगशीलता,स्वतंत्र वृत्ती त्यांच्या यशात अडसर ठरली का??...यश आणि सृजन याचे कोडे काही सुटत नाही...पण त्यांच्या प्रतिभेची झेप गगनाला गवसणी घालणारी अशीच होती....त्यांचा तो नवनिर्मितीचा ,प्रयोगशीलतेचा ध्यास पाहून थक्क व्हायला होते... आपल्या संगीताच्या झुल्यावर आजही सलीलदांची गीते रसिकांना झुलवत आहेत... बंगाली,हिंदी,मराठी(केवळ एक चित्रपट "सुनबाई"),तामिळ,मल्याळम,तेलगु भाषिकांच्या मनी आजही गीतांच्या रूपाने सलीलदा वसतात..."हरियाला सावन आला" की मन "बोले पिहू पिहू रे पपिहरा "म्हणू लागते...दूर कुठेतरी "भाई रे" ची साद ऐकू येते... डोळे ओलावतात...पण मनातला दीप तसाच शांत तेवत असतो....!!!तृप्ततेने म्हणत असतो..
ख़ाक हो जाएँ हम प्यार के नाम पर
प्यार की राह में रौशनी तो रहे
मेरे मन के दिये …
मानसी पटवर्धन
No comments:
Post a Comment