Tuesday, November 13, 2018

घाणेकरांची अखेर

*आणि डॉ काशिनाथ घाणेकर*                               एक चांगला चित्रपट पाहिल्याचे समाधान वाटले . अमरावतीच्या बाबतीत केलेला  चित्रपटाचा शेवट - या बाबतीत काही ठिकाणी मते मतांतरे वाचली .त्यामुळे नक्की काय घडले याचा साक्षीदार म्हणून डॉ .च्या शेवटच्या प्रयोगाबद्दल लिहितो आहे .' वनिता समाज'  च्या प्रांगणात हा प्रयोग झाला होता .त्या काळी अमरावती ला नाट्यगृह नसल्यामुळे बहुतेक नाटकं याच छोट्याशा जागेत व्हायची .त्या दिवशी पावसाळी वातावरण असले तरी अमरावतीला पाऊस नव्हता. चित्रपटात जोरदार पाऊस दाखवलाय . प्रयोग झाला, हेही खरे आहे .कारण मी त्या प्रयोगाला हजर होतो . नाटक ' तुझे आहे तुजपाशी'  होते .चित्रपटात वेगळेच सांगितले . घाणेकरांचे काम अतिशय सुमार झाले .प्रेक्षक उभे राहून त्यांची खिल्ली उडवू लागले . न राहवून पहिल्या  अंकानंतर  मी एका मित्रासोबत आत स्टेजवर गेलो .स्टेजवर एका तरुणाने अडवले .भेटू दिले नाही .आम्ही म्हणालो की त्यांचे काम खूपच वाईट होत आहे .त्यांनी अती मद्यपान केलं असावं अशी प्रेक्षकांना शंका आहे .त्या गृहस्थाने सांगितले की त्यांनी मद्यपान केले नसून त्यांची प्रकृती ऐनवेळी खूप बिघडली आहे . अमरावतीचे डॉ .धवड यांनी औषधोपचार केले आहेत .मी त्यांना म्हणालो की घाणेकरांच्या  तब्येतीविषयी प्रेक्षकांना सांगून पुढील अंक बंद करा , डॉ.ना विश्रांतीची गरज आहे हे प्रेक्षक समजून घेतील. पण त्यांनी ऐकले नाही .तो विदर्भ दौरा असल्याचे त्यांनी सांगितले . चंद्रपूरला वगैरे जायचे आहे म्हणून ते बोलले . शेवटी कसेबसे नाटक पार पडले .नाटकात डॉ स्टेजवर लडखडत होते .खोकल्याची उबळ येत होती. अधेमधे सोबतची पात्रे त्यांच्या पाठीवरून हात फिरवत होती .त्या महान नटाला अशा अवस्थेत पाहून कसेसेच वाटत होते .  घाणेकरानी घाण केली असे लोक म्हणू लागले .' अरे तू काय बोलतोस हे तुझे तुला तरी कळते का ? '  असा नाटकातल्या आचार्यांचा संवाद आहे .हा संवाद सुरू असतानाच भर नाटकात एका प्रेक्षकाने  उभे राहून डॉ .ना ' बिलकुल बरोबर आहे . तुम्ही काय बोलता हे तुमचे तुम्हाला तरी कळते का ' ,  असे सुनावले. डॉ .आपले संवाद थांबवून हे ऐकत होते .त्यांना हे मनाला खूप लागले असावे .कारण प्रयोग संपला त्या रात्रीच त्यांचे निधन झाले .
रेल्वे स्टेशनजवळच्या टुरिस्ट हॉटेलला ते उतरले होते . त्या काळी मोबाईल नव्हते .फोनही कमीच ! प्रयोगाचे स्थळ आणि हॉटेल यामधले अंतर म्हणजे रेल्वे पुलाचे दोन टोक , एवढे कमी ! चित्रपटात मात्र उशीर झाला आहे आणि चिंताग्रस्त होऊन  डॉ.ची प्रयोगाला येण्याची वाट पाहात आहेत असे दाखवले आहे .      डॉ .रात्री गेल्यामुळे सकाळच्या वृतपत्रात बातमी नाही ! यामुळे डॉ .घाणेकर गेल्याचे  अमरावतीकराना कळले ते तिसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रातून ! त्यामुळे   ते गेले त्या दिवशी त्यांना निरोप देण्यासाठी गर्दी होणे शक्यच नव्हते . वृतपत्रातून माहीत झाल्यानंतर मात्र  अमरावतीत शोकसभा होऊन श्रद्धांजली वाहण्यात आली.                                                                  *- सुरेश आकोटकर , अमरावती*

No comments:

Post a Comment