मंडळी *सप्रे* म नमस्कार !
आज १७ मार्च २०१८ .आजपासून बरोबर ५० वर्षांपूर्वी एक अत्यंत श्रेष्ठ कलाकार हे जग सोडून गेला..... त्याचं नांव उस्ताद गुलाम मोहम्मद — तोच *पाकीझा* चा संगीतकार ! या श्रेष्ठ कलाकाराचं आज पुण्यस्मरण आणि म्हणून हा आजचा विशेष लेख मी आपणांसमोर मांडतोय..... यासाठी पैगंबरवासी गुलाम मोहम्मद साहेबांचे ज्येष्ठ सुपुत्र मुमताज़ अहमद यांच्याशी जवळजवळ ५ तास प्रत्यक्ष भेटीत बोलण्याचा योग जुळून आला.सदरचा लेख हा दस्तुरखुद्द मुमताज़ भाईंनी सांगितलेल्या माहितीवर आधारीत असल्याने बर्याच गोष्टी ज्या आत्तापर्यंत अज्ञात होत्या त्या जगासमोर येतील याची खात्री आहे! चला तर मग या अवलियाचा जीवनपट उलगडून सांगतो.....
*आज हम अपनी लिख़ाईका असर देखेंगे....*
मंडळी , राजस्थानमधील बिकानेर राज्यातील नाड या गावी नबी बक्ष या उत्कृष्ट तबला वादक आणि अभिनयात पारंगत असलेल्या थोर कलाकाराला शुक्रवार — २० नोव्हेंबर १९०३ रोजी मुलगा झाला.याचं नांव ठेवण्यात आलं *गुलाम मोहम्मद*
मंडळी , नबी बक्ष यांनी गुलामवर पण तबलावादनाचे उत्तम संस्कार केले.आणि रक्तातंच अभिनय घेऊन जन्माला आलेल्या गुलामने वयाच्या ७ व्या वर्षापासूनंच नाटकात काम करायला सुरुवात केली.मोठा झाल्यावर तो उर्दू नाटकात बर्याचदा पुरुष भूमिकेबरोबर स्त्री भूमिका पण करत असे.नंतर नाटकाचं दिग्दर्शन पण तो करत असे. त्याच्यासोबत धाकटा भाऊ मोहम्मद इब्राहिम व सगळ्यात धाकटा अब्दुल करीम पण असे.इब्राहिम हार्मोनिअम मधे तर करीम तबला व ढोलक मधे वाकबगार झाला.
१९२८ मधे , म्हणजे वयाच्या पंचविशीत तरणाबांड गुलाम मोहम्मद मुंबईला आपलं भवितव्य घडवायला आला.कर्मधर्म संयोगाने *बाँके सिपैय्या* या सिनेमाचे संगीतकार दामोदर दास यांच्याशी त्याची गाठ पडली आणि त्याला त्यांच्यासोबत संगीत साजिंदा म्हणून काम मिळालं ! ही होती आपल्या या लेख—नायकाची संगीतक्षेत्रातील सुरुवात.... इतरांना ५० पैसे मानधन असे तिथे गुलामचं तबल्यावरील कौशल्य बघून दामोदर दास यांनी गुलामला ५ पट मानधन देऊ केलं : ₹ २.५० !
त्यानंतर गुलामने १९३० पर्यंत २ वर्षे जी.ए.चिश्ती , गुलशन सूफी , रफ़ीक गझनवी , शेखलाल , धूनी खाँ या संगीतकारांसोबत मिळेल तसं व मिळेल तेंव्हा काम केलं.
यानंतर गुलाम मोहम्मद १९३०—३१ दरम्यान संगीतकार झंडे खाँ यांच्याकडे रुजू झाला.
एके दिवशी झंडे खाँ साहेबांच्या घरी शिरत असता दरवान कुणाशीतरी हुज्जत घालंत जोरजोराने बोलत असल्याचं गुलामच्या लक्षात आलं.त्यादिवशी झंडे खाँ यांनी Audition ठेवली होती व एक तरूण यासाठीच आला होता.तेंव्हा गुलामने चटकन त्या नवागताचा हात धरून दरवानला सांगितलं की हा मोठा संगीतकार आहे व मी याला ओळखतो ! गुलामला दरवान ओळखत असल्याने साहजीकंच तो तरूण गुलामसोबत खाँसाहेबांकडे गेला.तिथे सगळ्यांबरोबर त्याचीही आॅडीशन झाली.तो तरूण सुटाबुटात असला तरी कोरड्या ओठांनी गात होता.तेंव्हा गुलामने आधी त्याला ( त्याची उपाशीपोटी आलेली ओठावरची कोरड पाहून ) चहा व खारी खायला दिली.खाँ साहेबांकडे गुलामचा भाऊ इब्राहीमची पण आॅडीशन झाली.तो तयारीचा असल्याने अर्थातंच त्याची निवड पक्की होती.पण जर त्याची निवड झाली असती , तर त्या गरीब तरूणाच्या पोटावर पाय आला असता.तेंव्हा झंडे खाँ साहेबांकडे ₹ ८५/— पगारावर गुलाम काम करत असे.त्याने धाकटा भाऊ इब्राहीमला समजावून सांगितलं की *बाबा रे , तुझ्या हार्मोनिअमच्या कौशल्यावर तुला कामं बाहेर पण मिळतायत् व यापुढेही मिळतील पण या तरुणाला काम मिळणं फार जरुरीचं आहे !* व त्याला निघून जायला सांगितले व त्यामुळे मग त्या गरीब तरूणाची वर्णी खाँ साहेबांकडे लागली. ₹ ३५/— पगारावर त्याची खाँ साहेबांकडे नेमणूक झाली. मंडळी तो तरूण म्हणजे पुढे नावारूपाला आलेला संगीतकार नौशाद अली !
गुलाम मोहम्मद तेंव्हा *ग़ाफिल* या तखल्लूसने ( टोपणनाव ) शायरी करत असे.एक शेर गुलामचा असा होता :
*कटतीं नहीं हैं राहें मुहोब्बतकी सख्तियाँ*
*पत्थर मिले कहीं तो बदल दे ज़िगरसे हम!*
गुलाम मोहम्मद हा अत्यंत शांत व संकोची वृत्तीचा होता.त्यामुळे वय व कला दोन्हीमधे नौशादला तो सीनिअर असूनही मागे पडला.नौशाद लवकरंच स्वतंत्र संगीत देऊ लागला व गुलाम त्याचा सहाय्यक संगीतकार बनला.पुढे संगीतकार अनिल विश्वास याच्याकडेही गुलाम सहाय्यक संगीतकार म्हणून अनेक वर्ष होता.
१९४३ मधे गुलामने आपल्या आयुष्यातील पहिल्या सिनेमाला स्वतंत्र संगीतकार म्हणून संगीत दिलं *मेरा ख़्ख़्वाब*
१९४३ ते १९६१ या १८ वर्षात गुलाम मोहम्मदने एकूण ३५ हिंदी , २ भोजपुरी व १ तेलगू अशा ३८ सिनेमांना संगीत दिलं.याखेरीज १७ अशा सिनेमांना संगीत दिलं जे रिलीझ होऊ शकले नाहीत !
मंडळी , गुलाम मोहम्मद म्हटलं की आपणांस आठवतो *पाकीझा* , पण त्याही आधी १९५४ मधे आलेल्या *मिर्झा ग़ालिब* या सिनेमाला गुलाम मोहम्मदने संगीत देऊन तो सिनेमा अजरामर करून टाकला ! *दिल—ए—नादाँ तुझे हुवा क्या है* , *इश्क मुझको नहीं वेहशतही सही* , *फिर मुझे दीद—ए—तर याद आया* ही तलतची , *रहिये अब ऐसी जगह* , *नुक्ताची है ग़म—ए—दिल* , *ये न थी हमारी किस्मत्* , *आहको चाहिये एक उम्र असर होने तक*
ही सुरैय्याची , *है बस की हर एक उनके इशारेमें निशाँ और* हे रफीचं , आणि *शिकवे भी जुबाँतक आ पहुँचे* ही बंदे हसन व रफीची कव्वाली ( शकील बदायुनी चे बोल ) , *चली पी के नगर* हे शमशादचं ( शकील बदायुनी चे बोल ) आणि *गंगाकी रेतीपे बंगला छवाई दे* हे सुधा मल्होत्राचं ( शकील बदायुनी चे बोल ) अशी ११ अत्यंत सुमधूर गाणी अतिशय सुरेल गेयरूपात गुलाम मोहम्मदने स्वरबद्ध केली !
डिसेंबर १९५५ मधे *मिर्झा ग़ालिब* ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला व मार्च १९५६ मधे राष्ट्रपती पुरस्काराने सोहराब मोदींना सन्मानित करण्यात आले ! राष्ट्रपती भवनामधे निर्माता—निर्देशक म्हणून सोहराब मोदी , सुरैय्या व गुलाम मोहम्मद गेले होते. सोहराब मोदींनी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्याकडून पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते व सुरैय्या , गुलाम मोहम्मद हे उपस्थित मोठ्या लोकांना भेटू लागले.त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहेरू गुलाम मोहम्मद साहेबांशी हस्तांदोलन करून म्हणाले , *उस्तादजी , हम अबतक मिर्झा ग़ालिबकी शेरोशायरी सिर्फ पढतें आएँँ हैं , पर आपने तो हमें मिर्झा ग़ालिब गुनगुनाना सिखा दिया!*
यावर या विनम्र व संकोची माणसाने *अच्छा , पंडितजी , आपको मेरा संगीत पसंद आया ? बहोत बहोत शुक्रिया!* असं म्हणून हात जोडले व बाजूला झाला ! कुठेही आत्मप्रौढी नाही की पंडितजींबरोबर फोटो काढून घेण्याची हाव नाही ! ( आज ६२ वर्षांनी गुलाम मोहम्मद यांचे चिरंजीव — ७७ वर्षांचे मुमताज़ भाई यांच्याही डोळ्यांत हे सगळं सांगत असताना वडिलांबद्धलचा अभिमान , प्रेम व आदर काठोकाठ जाणवत होता ! पण या पुरस्काराची एकही खूण वा फोटो आपल्याकडे नसावा याबाबत मनात कुठेही खेद खंत वा सोहराब मोदींविषयी ईर्ष्या वा असूया एका कणानेही जाणवली नाही ! याउलट *मोदीसाहेबांकडे तो पुरस्कार अजूनही त्यांच्यापश्चात् जपून ठेवलेला असेल!* असं त्यांनी आदराने सांगितलं ! )
मुमताज़भाईंनी गुलाम मोहम्मद यांची कुठल्याही सिनेमाला संगीत देण्याची कार्यपद्धती सविस्तर उलगडून सांगितली ती अशी :
सिनेमाच्या दिग्दर्शकाकडून आधी गाण्याची सिच्युएशन समजून घ्यायची.मग ते गाणं सिनेमामधे पडद्यावर २४ तासांपैकी कुठल्या प्रहरातील आहे हे जाणून घ्यायचं व त्याप्रमाणे गीतासाठी रागांची निवड करायची.मग त्या गीताच्या मुखड्याच्या १०—१२ चाली तयार करायच्या.निर्माते—दिग्दर्शकाला पसंत पडेल ती चाल फायनल करून मग त्या गाण्याचे मुखड्याआधीचे संगीत — prelude व अंतरे व मधील संगीत — interlude तयार करायचे.( हे सगळं *गुलाम मोहम्मद व त्याकाळचे सगळे संगीतकार स्वत: करायचे* कारण त्याकाळी संगीत संयोजक वगैरे प्रकार अस्तित्वात नव्हते ! ) मग आपला सहाय्यक पिंटो याच्याकरवी सगळ्या साजिंद्यांना त्यांच्या त्यांच्या पीसेसचे नोटेशन्स द्यायचे.मग त्याच्या कमीत कमी ५—६ रिहर्सल्स चालायच्या फक्त संगीत कलाकारांच्या ! त्यानंतर मग गायक कलाकारांसह ४—५ रिहर्सल्स — पाली हिलच्या आपल्या *इकबाल हाऊस* या बंगल्यावर.आणि मग रेकाॅर्डिंग स्टुडिओमधे रेकाॅर्डिंग करायचं.बरं इतकं करूनही तिथेही पहिल्याच टेक ला कधीही रेकाॅर्डिंग पार पडत नसे , तर दिवस दिवसभर व कधी कधी रात्रभरही रेकाॅर्डिंग चाले Live Orchestra सह आणि मग त्या सगळ्या टेक्स मधील एक निर्दोष रेकाॅर्डिंग फायनल होत असे!
गुलाम मोहम्मदने एकूण ३५ हिंदी , २ भोजपुरी व १ तेलगू अशा ३८ सिनेमांना संगीत दिलं जे रिलीझ झाले. हे सिनेमे वर्षागणिक असे होते :
*क्र.* *सिनेमा* *प्रदर्शन वर्ष*
१ मेरा ख्वाब १९४३
२ मेरा गीत १९४६
३ डोली १९४७
४ टायगर क्वीन १९४७ (*)
५ ग्रिहस्थी १९४८
६ पगडी १९४८
७ काजल १९४८
८ रशीद दुल्हन (**)
९ पराई आग १९४८
१० दिलकी बस्ती १९४९
११ पारस १९४९
१२ शायर १९४९
१३ हँसतें आँसूं १९५०
१४ परदेस १९५०
१५ माँग १९५०
१६ बिखरे मोती १९५१
१७ नाज़नीन १९५१
१८ शीशा १९५२
१९ अंबर १९५२
२० अजीब लडकी १९५२
२१ हजार रातें १९५३
२२ हजार रातें ( तेलगू ) ( // )
२३ गोहर १९५३
२४ लैला मजनू १९५३
२५ रेलका डिब्बा १९५३
२६ दिल—ए—नादाँ १९५३
२७ मिर्झा ग़ालिब १९५४
२८ गुजारा १९५४
२९ कुंदन १९५५
३० सितारा १९५५
३१ हूर—ए—अरब १९५५
३२ पाक़ दामन १९५७
३३ मालिक १९५८
३४ दो गुंडे १९५९
३५ शमा १९६१
३६ सैंया से नेहा लगै बे (***)
३७ राम करे सो होए (***)
३८ पाकीझा १९७२
(*) : *टायगर क्वीन* हा सिनेमा १९४७ ला रिलीझ झाल्याची नोंद आहे व त्यात *दिलकी दुनिया बसाए जाओ बसाए* , *घिर घिर के बदरवा आए* , *मेरे जोबनवा के प्याले मजेदार हो राजा* , *ओ बेदर्दी साजन तडपाए जा* व *परदेसी बालम से मोरे नैना लडे हाए* अशी ५ गाणी होती इतकीच नोंद सापडते.ही गाणी उपलब्ध नाहीत.
(**) : *रशीद दुल्हन* हा सिनेमा भारताच्या स्वातंत्र्याच्या आसपास तयार झाला व तो नंतर लाहोरला रिलीझ झाला.
(***) : *सैंया से नेहा लगै बे* व *राम करे सो होए* हे भोजपुरी सिनेमे १९६१ नंतर रिलीझ झाले.परंतू कुठल्या वर्षी ते साल अधिकृतरित्या उपलब्ध नाही.
(//) : *हजार रातें* या मूळ हिंदी सिनेमावरून तेलगू सिनेमा ( री मेक ) बनवण्यात आला , पण त्याचे नांव व साल उपलब्ध नाही !
मंडळी , आता मी तुम्हाला सांगतो गुलामच्या कारकीर्दीतील सर्वोच्च कामगिरीबद्धल — अर्थात् , *पाकीझा* बद्धल !
*मिर्झा ग़ालिब* १९५५ ला रिलीझ झाला त्यावेळी कमाल अमरोहींनी गुलामच्या संगीतावर खूश होऊन *पाकीझा* साठी गुलामला संगीतकार नेमायचं ठरवलं.त्यासाठी दळवी नावाचा एक असिस्टंट गुलामकडे गेला.पण कमालच्या अटी नामंजूर करत गुलामने दळवीतर्फे कमालला नकार कळवला.मग कमालनी आपल्या सेक्रेटरी — बाकरना पाठवलं , पण तेही नकार घेऊन परतले! शेवटी कमाल अमरोही स्वत: बांद्र्याला गुलामच्या बंगल्यावर *इकबाल हाऊस* वर पोचले.तेंव्हा गुलामने कमालना संगीतासाठी राॅयल्टीची अट घातली.पण ती मान्य न करता कमालने मानधन वाढवून देण्याची तयारी दाखवली.हो—नाहि करता करता अखेर चौथ्या—पाचव्या दिवशी गुलाम तयार झाला.
मग कमाल,मजरूह सुलतानपुरी,कैफी आझमी व कैफ भूपाली यांच्याशी गुलामसोबत ८—१० दिवस बैठकी झाल्या.
मजरुहने १९४१ च्या *हिम्मत* मधील *इन्हि लोगोंने ले लीना दुपट्टा मेरा* हे अझीझ काश्मिरी यांचे गीत जे पंडित गोविंदराम यांच्या संगीतात शमशाद बेगमने गायलंय , त्यात थोडाफार बदल करून तयार केलं आणि *थाडे रहियो* हे राजस्थानी लोकगीतावर आधारीत गाणं लिहून काढलं.
पण मार्च १९५६ मधे *मिर्झा गालिब* च्या पुरस्कार सोहळ्यानंतर गुलाम मोहम्मद दिल्लीहून मुंबईला परतला आणि २ दिवसांत त्याला हार्ट अॅटॅक आला.ह्रृदयातली एक नस ब्लाॅक झाल्यामुळे डाॅ.रुस्तम यांनी गुलामला ६ महिने सक्तीची विश्रांती सांगितली.पण जिद्दी गुलाम कुठला ऐकायला? त्याने काही महिन्यांनी कमालला निरोप पाठवला की मी नौशाद अली व मोहम्मद इब्राहीमच्या सहकार्याने गाणी रेकाॅर्ड करतो.तेंव्हा दादर टी.टी. ( आताचं खोदादाद सर्कल ) येथील *रंग महाल* स्टुडिओमधे जिने चढायला मनाई असलेला गुलाम आरामखुर्चीत बसून गेला व पहिलं गाणं रेकाॅर्ड केलं लताच्या आवाजात *मौसम है आशिकाना* , दुसर्या दिवशी *इन्हीं लोगोंने* आणि तिसर्या दिवशी *थाडे रहियो* रेकाॅर्ड केलं लताच्याच आवाजात.
पहिल्याच दिवशी तिथे कुणी चार्ली नावाचा ज्योतिषी आला होता व त्याने कमालला *पाकीझा* न करण्याबद्धल सांगितलं.कमालने कारण विचारताच त्याने *अनेक समस्या सतावतील , सिनेमाशी संबंधित काही माणसं निधन पावतील , काही सोडून जातील!* असं सांगितलं.पण ज्योतिषापेक्षा आपल्या कर्तृत्वावर अधिक विश्वास असलेल्या कमालने *आणि तरीही मी नेटाने हा सिनेमा पूर्ण करीनंच ! मग काय होईल?* असं म्हणताच चार्लीने *तर मग हा सिनेमा अजरामर होईल!* असं सांगितलं!
मंडळी या शेवटच्या वाक्याने कमालला बूस्टर डोस मिळाला ! १७ जानेवारी १९५७—कमालच्या वाढदिवशी *पाकीझा* चा मुहूर्त व शूटिंग सुरू झालं.सुरुवातीला १५ दिवस Black & White शूट केल्यावर मीनाकुमारीने सिनेमा रंगीत करायचं सुचवलं.मग काय? पुन्हा शूटिंग सुरू.मग गुरुदत्तचा *कागज़ के फूल* सिनेमास्कोप अवतारात रिलीझ झाल्याने कमालच्या डोक्यात सिनेमास्कोपची टूम आली! परत सगळं शूटिंग सुरू! परत मधे कॅमेरामन जोसेफ विरशिंगला *परफेक्शन* च्या वेडापायी ४ महिने जर्मनीला फोकस तंत्र शिकायला पाठवलं ! मग शूटिंग सुरू!
५ मार्च १९६३ ला मीनाकुमारीचं व कमालचं भांडण होऊन ती वेगळं राहू लागली.मग ६ वर्षांनी संगीतकार ख़य्याम व त्यांची पत्नी जगजीत कौर यांच्या मध्यस्थीने ७ मार्च १९६९ ला शूटिंग परत सुरू झालं ! अखेर १९७० मध्यावर हा सिनेमा पूर्ण झाला.पण तोवर सिनेसंगीताचा ढाचा व चेहेरा मोहरा पालटून गेलेला! ५ जानेवारी १९६० ला *आज हम अपनी दुवाओंका असर देखेंगे* हे शेवटचं गाणं रेकाॅर्ड करून गुलाम मोहम्मद पण १९६८ ला अल्लाला प्यारा झालेला! ( या आपल्या नायकाच्या मृत्यूविषयी नंतर सविस्तर बोलणारच आहे , पण त्याच्या संगीताची झेप व आवाका कळणार्या या सिनेमासंबंधीत माहिती आधी पूर्ण करतो ! ).शंकर—जयकिशन पैशांच्याबाबत तडजोड स्वीकारूनही *पाकीझा* ला संगीत द्यायला उत्सुक होते.पण *पाकीझा चं गुलाम मोहम्मदचं संगीत कधीही जुनं होणार नाही!* याची कमालला खात्री होती.गुलामच्या अनुपस्थितीत पार्श्वसंगीतासाठी ख़य्यामना विचारण्यात आलं पण , आपल्या संगीतची स्टाईल वेगळी असल्याचं सांगून ख़य्याम नकार दिला ! ( केवढा हा विनम्रपणा व मोठेपणा! हाती आलेली संधी संगीताचा खरा पूजक असल्याने ख़य्यामने नाकारली ! सलाम तुला बा ख़य्याम! ) कमालने गुलामचे सुपुत्र मुमताज़ अहमदना याबाबत विचारलं तेंव्हा त्यांनी सलील चौधरी व नौशाद अशी दोन नावं प्राधान्याच्या त्याच क्रमाने सुचवली.
आता ज्याच्याबरोबर कित्येक वर्षे गुलामनं काम केलं त्या नौशादकडे पार्श्वसंगीताची जबाबदारी आली व ती त्याने समर्थपणे पेलली ! *पाकीझा* ४ फेब्रुवारी १९७२ ला प्रदर्शित झाला! त्यानंतर नौशादने *साँग्ज आॅफ द वेव्हज् बाय नौशाद* या नावाची लाँग प्ले रेकाॅर्ड अमेरिकेत जाऊन तयार केली व इकडे बाजारात आणली ! पार्श्वगीताची लाँग प्ले रेकाॅर्ड असलेला *पाकीझा* हा पहिला सिनेमा!आणि दैवदुर्विलास बघा मंडळी , ज्या सिनेमाच्या संगीतासाठी कमालनी गुलामला राॅयल्टी देण्याचं नाकारलं , त्याच सिनेमाच्या केवळ पार्श्वसंगीतासाठी दीड टक्के ( १.५% ) राॅयल्टी कमालने नौशादसाठी मान्य केली !
मंडळी हे झालं *पाकीझा* पुराण.आता आपल्या नायकाची — गुलाम मोहम्मदची कमाल पाहूया :
यात एकूण १४ गाणी गुलामने संगीतबद्ध केली होती —
१) चलते चलते यूँही कोई .... गीतकार कैफी आझमी , गायिका लता
२) चलो दिलदार चलो .... गीतकार कैफ भोपाली , गायक लता—रफी : या गाण्यात आधी रफीचा आवाज नव्हता— एकट्या लताचा होता.चालही थोडी वेगळी होती ( ऐका : हम है *तैय्यार* चलो) व गाणं फास्ट र्हिदमचं होतं!नंतर गाण्याची सिच्युएशन बदलली व मग रफी व लताचं गाणं रेकाॅर्ड केलं गेलं.एल.पी.वर दोन्ही गाणी होती.
३) इन्ही लोगोंने ले लीना.... गीतकार मजरूह , गायिका लता
४) मौसम है आशिकाना... गीतकार कमल अमरोही , गायिका लता
५) थाडे रहियो ... गीतकार मजरूह , गायिका लता : हे गाणं दादरच्या रंग महल मधे रेकाॅर्ड झाल्यावर ४—६ महिन्यांनी कमाल गुलामला म्हणाले *थाडे* ऐवजी *ठहरे रहियो* चांगलं वाटेल.गुलामने समजावून सांगितलं की *थाडे* चं वजन *ठहरे* मधे येणार नाही! पण कमालच्या हट्टापायी *ठहरे रहियो* परत ताडदेवच्या फेमस मधे रेकाॅर्ड केलं.पण मग दोन्ही गाणी ऐकल्यावर कमालला गुलामचं म्हणणं पटलं व *थाडे रहियो* कायम झालं...पण *थाडे रहियो* हे गाणं पण संपूर्णपणे रेकाॅर्ड झालेलं ऐकल्यावर मग सिनेमातील प्रसंगानुरूप गाण्यामधे *तोडा* हवा असं नृत्यदिग्दर्शक लच्छू महाराज म्हणाले! हे ऐकल्या ऐकल्या गुलामने लच्छूंना आधी एक कचकचीत शिवी हासडली ( गुलाम व लच्छू महाराज अत्यंत चांगले मित्र होते व अगदी अरे—तुरे च्या भाषेतंच एकमेकांशी बोलायचे!) व त्यांना म्हणाले *xxx , मग अजूनपर्यंत कुठे होतात?*
पण एक कुशल संगीतकार म्हणून गुलामला त्यांचं म्हणणं पटलं.तो एकदम लताला म्हणाला , *लता कल क्या कर रही हो?* यावर लताने काही रेकाॅर्डिंग नाही याअर्थी *कुछ खास नहीं!* म्हटलं.मग गुलाम म्हणाला , *चलो आज के लिए पॅक अप ! अपने आर्टिस्ट को मैं सेटपे तंग नहीं करता ! चलो मेरे साथ , और कल फिर आना, इस गीतको फिरसे रेकाॅर्ड करेंगे!* आणि मग गाडीतून लताचं घर येईपर्यंत गुलामने दादरातला तोडा लताला लिहून दिला व दुसर्या दिवशी पाठ करून यायला सांगितलं.दुसर्या दिवशी फेमस स्टुडिओला मीनू कात्रकला बोलावून परत जिथे लच्छू महाराजांना तोडा अपेक्षित होता तिथे तो लताने गात रेकिॅर्डिंग पूर्ण केलं आणि तो ऐकताच लच्छू महाराज खूश झालेले पाहून गालातल्या गालात हसत त्यांना कोपरखळी देत गुलाम म्हणाला , *महाराज आप रख्स (नाच) जानते हो तो भाई हमभी तो तबला जानतें हैं!* लच्छू महाराजांनी सद्गतीत होऊन गुलामचे दोन्ही हात प्रेमभराने दाबले!
६) आज हम अपनी दुवाओंका असर देखेंगे.... गीतकार कैफ भोपाली , गायिका लता
७) तनहाई सुनाया करती है.... गीतकार कमाल अमरोही , गायिका लता
८) ये किसकी आँखोंका नूर हो तुम.... गीतकार मजरुह , गायक रफी
९) हटकर तेरे कदमोंसे — कव्वाली...गीतकार कैफ भोपाली , गायक—रफी—शमशाद
१०) गिर गई रे मोरे माथेकी बिंदिया.....गीतकार कैफ भोपाली , गायिका सुमन कल्याणपूर
११) पी के चले....गीतकार मजरुह , गायिका लता
१२) प्यारे बाबूल .....गीतकार कैफ भोपाली , गायिका लता
१३) कोठे से बडा लंबा...गीतकार कैफ भोपाली , गायिका शमशाद
१४) बँधन बाँधो.... शोभा गुर्टू ( त्याचं हिंदी सिनेमातील पहिलं गाणं! )
*यापैकी ७ ते १४ क्रमांकाची अशी एकूण ८ गाणी निरनिराळ्या कारणांनी सिनेमातून काढून टाकण्यात आली.* नंतर गुलामच्या पश्चात् नौशादने वरील १ ते ६ गाण्यांत स्वत:च्या संगीत संयोजनातील ३ गाण्यांची भर टाकली , जी सिनेमात बॅकग्राऊण्डला वाजतात :
७) कौन गली गयो शाम....गीतकार मजरूह , गायिका परवीन सुलताना
८) मोरा साजन सौतन घर लाए...गीतकार मजरुह , गायिका वाणी जयराम
९) नजर का वार था.....पारंपारीक गीत , गायिका राजकुमारी
याखेरीज *पाकीझा* ची Title ची आलापी *धिर ताना दे रे ना* नौशादने लताकडून गाऊन घेतली!
मंडळी , मूळ १४ गाण्यांऐवजी आपण फक्त ६ गाणी गुलामची आज *पाकीझा* मधे ऐकतो — म्हणजे ५०% हूनही कमीच आणि त्या गाण्यांचाच अक्षरश: कैफ आपल्याला चढतो , मग सगळी गाणी ऐकली तर आपलं काय होईल याचा विचार करा! आणि हे सगळं संगीत फक्त ७ प्रमुख वाद्य वापरून गुलामने तयार केलं होतं महाराजा : तबला ( करीम खाँ ) , नाल ( लाला भाऊ ) , सारंगी ( रामनारायण , जहूर खाँ ) , बासरी ( बर्वे , हरीप्रसाद चौरसिया ) , साँग व्हाॅयलीन ( नार्वेकर ) , क्लॅरिनेट ( देवीलाल ) आणि तानपुरा.
मंडळी, १९७३ साली फिल्मफेअर अॅवाॅर्डझ् घोषित झाली.यात संगीतासाठी *पाकीझा*—गुलाम मोहम्मद , *बेईमान*—शंकर जयकिशन आणि *शोर*—लक्ष्मीकांत प्यारेलाल अशी नामांकनं होती.बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर म्हणून *बेईमान* मधील भूमिकेसाठी प्राणला अॅवाॅर्ड मिळालं ! पण बेस्ट म्यूझिकसाठी प्राणच्या मते *मरणोत्तर गुलाम मोहम्मदला* अॅवाॅर्ड मिळायला हवं होतं , त्याऐवजी ते *बेईमान* साठी शंकर जयकिशन यांना देण्यात आलं ! हे गुलाम मोहम्मदसाठी अन्यायकारक आहे असं वाटल्यामुळे प्राणने त्याचं अॅवाॅर्ड नाकारलं ! *पाकीझा* शी कुठेही संबंधित नसताना प्राणने गुलाम मोहम्मदसाठी स्वत:चं अॅवाॅर्ड नाकारणं हा एक प्रकारे गुलामचा सर्वोच्च सन्मानंच नाहि काय ? आणि संबधित लोक मात्र आपआपल्या अॅवाॅर्डसह सुखाने घरी गेले!
मंडळी आता मी तुम्हाला गुलामचे काही किस्से सांगतो.....
एकदा आपल्या गुरुंच्या (पीर) आश्रमात गुलामने चाल लावलेलं गाणं त्याचा भाऊ मोहम्मद इब्राहीम गाऊन दाखवत होता *मरना तेरी गलीमें जीना तेरी गलीमें* जे गुलामने अर्पण केलं होतं पीरबाबांना ! जे ऐकताना पीरबाबांची नजर अंतराळात लागून काही क्षण ते अक्षरश: समाधीअवस्थेला पोचले! पुढे नौशादकडे काम करणार्या इब्राहीमने त्या सुंदर चालीबद्धल नौशादला सहज बोलता बोलता सांगितलं.ती चाल त्याला इतकी आवडली की त्याने *शबाब* मधील *मरना तेरी गलीमें जीना तेरी गलीमें* याच गाण्यासाठी ती चाल वापरून टाकली. मूळ गाणं ही सद्गुरुंना अर्पण केलेली भावना होती. याच मुखड्यावर शकील बदायुनीकडून संपूर्ण गीत लिहून घेऊन प्रेमिका — नूतन प्रियकर — भारत भूषणसाठी गाते त्याप्रसंगी नौशादने लताकडून गाऊन घेतलं ! नंतर बोलता बोलता जेंव्हा इब्राहीमने गुलामला याबद्धल सांगितलं तेंव्हा गुलामने इब्राहीमला शिव्याची लाखोली वाहून म्हटलं , *गाढवा , ती चाल मी "लैला मजनू" साठी जपून ठेवलेली!*
गुलामचा एक शागिर्द पुण्यवान व पुण्यवानचा शागिर्द दत्ताराम हे दोघे शंकर जयकिशनकडे साजिंदे म्हणून काम करत असत. १९४९ सालची हकीगत..... *बरसात* सिनेमातील *बरसातमें* गाण्याचं रेकाॅर्डिंग ताडदेवच्या फेमस स्टुडिओमधे सुरु होतं.परंतू रिहर्सलमधे काही केल्या गाणं प्रवाही वाटेना! ढोलकवरचा पुण्यवान याला काही एके ठिकाणचा ठेका जमेचना ! रात्रीचे दहा वाजले.शेवटी कंटाळून पुण्यवान म्हणाला , *रुको , उस्तादको लेके आता हूँ!* शंकर जयकिशन चपापले ! कारण ते खूप ज्यूनिअर संगीतकार व उस्ताद गुलाम मोहम्मद म्हणजे नावजलेले ज्येष्ठ संगीतकार ! बरं वेळ रात्रीची , बाहेर धो धो पाऊस ! ते म्हणाले , *उस्ताद आएँगे?* यावर पुण्यवान म्हणाला, *जरुर ! वो आप हमपे छोड दो!* मग पुण्यवान व रेकाॅर्डिस्ट मीनू कात्रक गुलामच्या घरी ग्रँटरोडला आले.गुलाम तसा मुलखाचा घाबरट , विशेषत: धो धो पाऊस , रात्रीचे ११ वाजलेले! पण प्रसंगाचं गांभिर्य लक्षात आल्यावर गुलाम पटकन तयार होऊन या दोघांसोबत फेमस स्टुडिओला आला.गुलामला बघताच शंकर जयकिशन यांनी चटकन त्यांचे पाय शिवले.मग गुलामने रिहर्सल सुरु करून गाणं कुठे अडलंय ते दाखवायला सांगितलं.नंतरच्या टेक ला गुलामने स्वत: ढोलक हाती घेतला व गाणं मुखडा संपून *बरसातमें* या शब्दावर संपत होतं तिथे र्हिदम चालू ठेवत तोंडाने म्हटलं *ताक धिना धिन* — बास ! या ३ शब्दांनी जादू केली आणि मग पुढे Interlude चं संगीत व पुढच्या गाण्याचा अडलेला प्रवाह सोपा झाला.नंतर मग गाण्याच्या सुरुवातीचं संगीत — Prelude ला पण हेच ठेक्याचे शब्द वापरण्यात आले.रेकाॅर्डिंगसाठी आलेला राज कपूर स्वत: गुलामसाठी व्हिस्की चा पेग घेऊन आला.गुलामला घट्ट मिठी मारून गुलामच्या हाती तो पेग दिला.अाणि सरतेशेवटी ₹ ७०१/— चं पाकीट गुलामच्या हाती ठेवलं ! तेंव्हा मंडळी, आता *बरसातमें* ऐकाल तेंव्हा तुम्हाला गुलाम चा *ताक धिना धिन* आठवेल !
मंडळी आता मी तुम्हाला काही गाणी सांगतो जी तुम्ही जिवाचे कान करून ऐका.....
१९५० च्या *परदेस* मधील गुलामचं लताने गायलेलं *किस्मत बनानेवाले जरा सामने तो आ* ऐका आणि मग ऐका १९५७ च्या *मदर इंडिया* मधील नौशादचं लताने गायलेलं *ओ जानेवालो जाओ न घर अपना छोडके*
१९५९ च्या *दो गुंडे* मधील गुलामचं लता—रफीने गायलेलं *भीगी पलकें उठा* , ( पडद्यावर अजित बरोबर सुरेख जयश्री गडकर ! ) आणि मग ऐका १९६२ च्या *सन आॅफ इंडिया* मधील नौशादचं लताने गायलेलं *चल दिये देके ग़म*
१९६१ चा *शमा* मधील गुलामचं सुमन कल्याणपूरने गायलेलं *मेरे मेहेबूब तुझे प्यार करूँ या न करूँ* ऐका आणि मग ऐका १९६१ च्या *गंगा जमना* मधील नौशादचं रफीने गायलेलं *नैन लड जई है*
मंडळी , *पाकीझा* हा गुलाम मोहम्मदने संगीत दिलेला व रिलीझ झालेल्या तारखेप्रमाणे शेवटचा सिनेमा ! पण त्याचं संगीत रिलीझ व्हायच्या एक तप म्हणजे १२ वर्षं आधी गुलामने १९६० सालीच पूर्ण केलं होतं ! पण काय दिव्यदृष्टी होती हो या अवलियाकडे ! संगीत बनवून झाल्यानंतर आज ५८ वर्षांनी जरी डोळे बंद करून कुठलंही गाणं ऐकलं तरी माणूस संपूर्णपणे मनाने लखनौच्या कोठ्यांवर जाऊन पोचतो ! *पाकीझा* नंतर गुलामने *शमा* ह्या हिंदी सिनेमाला संगीत दिलं व नंतर २ भोजपुरी सिनेमांना ! खर्या अर्थाने *शमा* हाच त्याचा शेवटचा हिंदी सिनेमा ! गुलामने जरी फक्त ३८ सिनेमांना संगीत दिलं असलं तरी तुम्ही त्याच्या कुठल्याही सिनेमातील कुठलंही गाणं ऐका , ते अत्यंत श्रवणीय व गोड अशा गेय चालीचंच सापडेल ! उदाहरणार्थ : १९५५ च्या *हूर—ए—अरब* मधील लताचं *ता रा रा रा रम मेरे दिलमें सनम्* , १९६१ च्या *शमा* मधली सगळीच गाणी — पण त्यातल्या त्यात सुमन कल्याणपूरनी गायलेली *मेरे मेहेबूब तुझे प्यार करूँ* व *दिल ग़मसे जल रहा है जले पर धुवाँ न हो* तसंच सुरैय्याने गायलेली *धडकते दिलकी तमन्नाओं मेरा प्यार हो तुम* व *आपसे प्यार हुवा जाता है* ही गाणी अवीट गोडीची होती.
*शमा* या हिंदी आणि *सैंया से नेहा लगै बे* आणि *राम करे सो होए* या भोजपुरी सिनेमांनंतर मात्र आताशा ह्रृदयरोगाने ग्रस्त गुलामने नवीन कुठलंही काम स्वीकारणं बंद केलं होतं.मोठा मुलगा मुमताज अहमद अवघ्या २० वर्षाचा होता! पण ९ अपत्यांपैकी २ मुली — नजमुन्नीसा व रईसुन्निसा वगळता बाकी ७ मुलांना संगीतामधील कुठल्या ना कुठल्या वाद्याची तालीम गुलामने अवश्य दिली होती.पण आताशा शरीर थकत चाललं होतं. *पाकीझा* चं काम बंदंच पडलं होतं — १९६३ नंतर !
१७ मार्च १९६८.....तो रविवार होता.....सकाळपासूनंच गुलामला काहीतरी अस्वस्थ वाटू लागलेलं.त्यावेळी तो मुलाबाळांसह बोरीवलीला रहात असे.थोडा वेळ वाट पाहूनही बरं वाटेना , तेंव्हा त्याने मुमताज़ अहमद या आपल्या मोठ्या मुलाला हाक मारली व आपल्याला अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं.ऐन जवानीतल्या — २७ वयाच्या मुमताज़नं ताबडतोब धावपळ करून गुलामला बाॅम्बे हाॅस्पीटलमधे नेलं.लगेच उपचार सुरूही झाले.पण ४—५ तासांच्या अथक परीश्रमानंतर तबला—ढोलकवर थिरकणारा व *ताक धिना धिन* करणारा गुलामचा आत्मा अखेर परमात्म्यामधे विलीन झाला ! ज्या *पाकीझा* साठी आपण गुलाम मोहम्मदला ओळखतो , तो सिनेमाच मुळी गुलाम हे जग सोडून जाईतोवर परत शूटिंगसाठी सुरू व सिनेमा म्हणून पूर्ण झाला नव्हता ! अजरामर संगीताचा ख़ज़ाना आपल्यासाठी सोडून गेलेल्या गुलाम मोहम्मदला तर हे जग सोडून जाताना पुसटशीही कल्पना नव्हती की *आपल्या पश्चात् जग आपल्याला अशा सिनेमाच्या संगीतासाठी आजन्म आठवेल जो आपल्या हयातीत पूर्णंच झाला नाही ! जो सिनेमा आपल्या पश्चात् ४ वर्षांनी रिलीझ होईल आणि आपण संगीतबद्ध केलेल्या एकूण १४ पैकी फक्त ६ गाणी सिनेमात असली तरी फक्त तेवढ्याच अजरामर संगीतावर भाळून दुनिया आपल्याला ओळखेल , बेमुर्वत लोक मरणोत्तर पण आपल्याला उत्कृष्ट संगीतकार हा सन्मान देत नाहीत हे पाहून निम्मं आयुष्य खलनायक बनलेला प्राण नामक आपला एक ज़िंदादिल चाहता तत्वनिष्ठ होत आपल्यासाठी स्वत:चं अॅवाॅर्ड नाकारेल आणि आपण गेल्यानंतर बरोबर ५० वर्षांनी पीळ पडलेल्या ह्रृदयासह डोळ्यांत अश्रू आणि घशांत आवंढा आणून कैफ भोपालीचे शब्द थोडेसे बदलून ठाण्याचा कुणी एक आपला वेडा चाहता उदय गंगाधर सप्रे आपल्याला श्रद्धांजली वाहताना असं म्हणेल की "आज हम अपनी लिखाईका असर देखेंगे , बहते अश्क देखेंगे जख्मे जिगर देखेंगे!*
बा स्वर—तालांच्या बादशहा , गुलाम मोहम्मद नावाच्या अवलिया कलाकारा , तुला साश्रू नयनांनी श्रद्धांजली वाहताना इतकंच म्हणेन की.....
*दिलसे जो बात निकलती है , असर रख़ती है,*
*पर नहीं , ताकत—ए—परवाझ मगर रखती है!*
( मनापासून जी गोष्ट येते त्या गोष्टीला पंख नसले तरी प्रचंड ताकदीच्या पंखांच्या पक्ष्याप्रमाणे ती उडण्याचं धैर्य राखून असते! )
अल्विदा गुलाम मोहम्मद साहाब अल्विदा......
© *उदय गंगाधर सप्रे* म — ठाणे
E-mail : sudayan2003@yahoo.com
सेल फोन : +९१९००४४१७२०५ (संध्या. ५.३० ते ६.३० या वेळेतच कृपया संपर्क करावा ही विनंती ! )
No comments:
Post a Comment