Saturday, July 14, 2018

बाबूजी मानसी पटवर्धन

आज चांदणे उन्हात हसले,तुझ्यामुळे....!!!!

बाबूजींच्या वैविध्यपूर्ण गीतांचा अथांग महासागर पाहिला की रसिकांची स्थिती "देणाऱ्याचे हात हजार,दुबळी माझी झोळी"अशीच होते...गीताचा अर्थ,भाव,उच्चार या सगळ्याचा विचार करून बाबूजींनी समर्थपणे संगीत दिले..

त्यांची युगलगीते म्हणजे जणू वसंत वैभव...!!त्यातील तरल भावना सुरांच्या माध्यमातून अलवारपणे रसिक हृदयात विराजमान होतात.कधी आलापीतून,कधी शब्दांचा वैशिष्ट्यपूर्ण वापर करून,कधी संवाद साधत त्यांची युगलगीते बहरली... त्यांच्या संगीतात आशा ताईंचा सिंहाचा वाटा...!!प्रत्यक्ष ती. ललिताताईंनी बाबूजींकडे आशाजींची शिफारस केली ."पुढचं पाऊल" या चित्रपटातील "माझ्या जाळ्यात गावलाय मासा" हे त्यांचे बाबूजींच्या संगीत दिग्दर्शनातील पहिले गीत...आशाताईंनी बाबूजींची गायकी आत्मसात केली ,त्यांचे उच्चार,लकबी,भाव सारे सारे त्यांच्या स्टाईल ने गायले.. आशा ताई त्यांना "फडके साहेब" म्हणत...ते त्यांचे सुगम संगीतातील "गुरू" होते.त्यांचा स्त्रीसुलभ स्वर शब्दसुरांवरील वेलांट्या लक्षात घेत,स्वरांच्या महिरपी जाणून,चालीमधील बारकावे आणि स्पष्ट उच्चार टिपत फडकेसाहेबांच्या स्वरात बेमालूमपणे मिसळून जाई. बाबूजींचा स्वच्छ नितळ,भावनापूर्ण  स्वर आशाताईंच्या स्वरात असा मिसळून जाई की रसिक त्या सप्तरंगी स्वरांच्या इंद्रधनूत हरवून जात..कित्ती गाण्यांची साक्ष द्यावी...!!!

अगदी "लाखाची गोष्ट" या चित्रपटापासून ही जादू घडत आहे...या चित्रपटात आशा ताईंची सोलो गाणी होतीच ,पण बाबूजींच्या बरोबर त्यांचे "डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे" हे गीत खूप गाजले...!!

मी वाचले मनीं ते, फुलली मनात आशा
सांगावया तुला ते नाही जगात भाषा
हितगूज प्रेमिकांचे, हे बोल त्या मुक्यांचे

प्रेमिकांच्या डोळ्यात फुललेले प्रेम,प्रेमाची मनोमनी दिलेली कबुली,त्याची धुंदी सारे सारे या गीतातून बाबूजी आणि आशा ताईंनी स्वरातून खुलवले आहे..."डोळ्यात "हा उच्चार सुद्धा ऐकून पहा...यावर सुद्धा एक छोटा स्वर हिंदोळा आहे...ज्यातून ही प्रेमाची मुकी भाषा अधिक गहिरी होते...!!!

१९६० मध्ये आलेला "जगाच्या पाठीवर" हा चित्रपट म्हणजे "बाबूजी-गदिमा-राजा परांजपे" या बिल्वदलाने  सादर केलेला  शब्द -सुरांचा चंदेरी पडद्यावरून केलेला दृश्यात्मक रसपूर्ण आविष्कार !!!सारेच अचंबित करणारे.....!!!!!!या तिघांनी निर्माण केलेले हे मधुर आठवणींचे संचित आजही मराठी मनात मानाने झळकते आहे...........!!!!!यात बाबूजी आणि आशा ताईंची दोन सुंदर युगलगीते होती...!!!

बाबूजींना खर तर शास्त्रीय संगीत गायक व्हायचे होते..........पण दैवयोगाने ते उत्तम संगीत दिग्दर्शक आणि सुगम संगीत गायक झाले.

माई मैने गोविंद लिनो मोल
कोई कहे सस्ता,कोई कहे महंगा
लीनो तराजू तोल
"मीराबाईंच्या" या भजनावरून  शब्दप्रभु  ग दि माडगुळकरांनी "बाई मी विकत घेतला श्याम" ही सुंदर रचना बांधली.मीराबाईंच्या भजनातील तंतोतंत भाव,गदिमांचे प्रत्ययकारी शब्द,बाबूजींची अजोड संगीत रचना,आशा ताई-बाबूजी यांची प्रभावी गायकी आणि गीताच्या सुरवातीला शामराव कांबळ्यांनी वाजविलेला ओपनिंग पीस...सारेच जुळून आले आणि एक अनुपम रचना जन्मली...!!

मीरेच्या रचनेवरून गीत बांधले असल्याने बाबूजींनी यात फक्त मुखडा आणि मधले आलाप म्हटले आहेत...पहाडी/मांड मधील ही रचना आशा ताईंनी सुंदर खुलविली आहे...

बाळ गुराखी यमुनेवरचा
गुलाम काळा संताघरचा
हाच तुक्याचा विठ्ठल आणि दासाचा श्रीराम !
बाई मी विकत घेतला श्याम...

पेटीवर राजा परांजपे आणि नाचणारी अंध मुलगी सीमाताई यांनी आपल्या सुंदर अभिनयाने गीत जिवंत केले आहे..प्रत्येक अंतऱ्याच्या शेवटच्या शब्दावर सुंदर आलाप आहे जसे वरील अंतर्यात "श्रीssssराम"...!!श्यामराव कांबळ्यांचे इंटरल्युड्स मधील हार्मोनियम चे पीस सुंदर...!!!याच चित्रपटापासून ते बाबूजींचे "सहायक" बनले.बाबूजींबरोबर केलेल्या कामामुळे माझ्या सांगीतिक जीवनास वेगळे वळण प्राप्त झाले असे ते म्हणत...

बाबूजी आपल्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांच्या गुरूंचे,पाध्येबुवांचे  "संत सूरदासांचे"  भजन गात असत........''अब मैं नाचों बहोत गोपाल.".......''यावरूनच गदिमांनी ''नाचनाचुनि अति मी दमले ''ही देखणी रचना बांधली............आणि तिची लोकप्रियता सर्वश्रुत आहेच.यासाठी आशाताईंनी तब्बल ८ दिवस सराव केला होता..गीताचा अर्थ खूप गहन...आपले जीवन सुखाच्या शोधात,विषय वासनांमध्ये गुरफटलेले असते..आयुष्याच्या सायंकाळी पैलतीर दिसू लागल्यावर त्या विधात्याची आठवण येते..पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते...येथे गदिमांच्या लेखणीला, बाबूजींच्या सृजनाला,आशा ताईंच्या गायकीला सलाम करावासा वाटतो.

"कलंक शोभा" चित्रपटातील "आज चांदणे उन्हात हसले" हे युगलगीतही तितकेच सुंदर,तरल प्रीत भावना उमलवणारे,ही प्रीती शब्द सुरांच्या पाकळी पाकळी ने,  गोड आलापांच्या  साथीने एखाद्या फुलाप्रमाणे  उमलत जाते...बाबूजींनी  वैशिष्ट्यपूर्ण उच्चारलेला "तुझ्यामुळे" हा शब्द काळजात रुततो!!आधी "मुकी" असलेली प्रेम भावना कालांतराने शब्दांतून हळुवार उलगडते...जसे
परोपरीचे रंग जमविले(यानंतर सुंदर आलाप)
स्तब्धच होते करी कुंचले(यानंतरही आलाप)
रंगांतुन त्या चित्र रंगले तुझ्यामुळे, तुझ्यामुळे !

यातील पहिल्या आणि दुसऱ्या ओळीनंतर आशा बाईंचे सुंदर आलाप गीताच्या सौंदर्यास चार चांद लावतात...गाण्यातील प्रीतीचा आपल्याही मनावर गुलाबी रंग चढतो...!!बाबूजींच्या अस्सल मराठमोळ्या संगीताने नटलेला हा भाव आपल्याला मनोमनी आवडतो..!!

याच चित्रपटातील शांता शेळके यांनी लिहिलेले "तुला न कळले ,मला न कळले,कसे प्रीतीचे धागे जुळले"हे गीतही नितांतसुंदर...!!!पियानोच्या साथीने होणारी सुरवात आणि नंतर उमलणारा बाबूजी ,आशा ताईंचा स्वर...!!!!दृष्टादृष्ट होताच ,मनचे मनाला गूढ उमगते आणि प्रीत फुलते....पहा शांताबाईंचे सुंदर शब्द...या अंतर्यात शेवटच्या ओळीत शब्द अवरोही ढंगात एखाद्या मोत्यांच्या माळेतील मोत्यांसारखे घरंगळत येतात,पहा..."कसे कळीचे फूल उमलले"...फार सुंदर संगीत आहे बाबूजींचे पहा ऐकून...!!!!

ते डोळ्यांचे पहिले मीलन
ते पहिले स्मित, ते संवेदन
शब्दाहुन ते गोड मुकेपण
कसे कळीचे फूल उमलले ?

गदिमांचे चपखल,चित्रदर्शी शब्द आणि त्यावर बाबूजींनी समर्थपणे चढविलेला स्वरसाज...हे अनोखे शब्दसुरांचे मीलन रसिकांनी अनेकदा अनुभवले..."भिंतीला कान असतात" या चित्रपटातील एक गीतात गदिमांनी पतीपत्नीच्या संसाराचे सुंदर सुखचित्र रेखाटले आहे ...पत्नीला ते येथे "सचिव" म्हणून संबोधतात आणि "सजीव" ,"सचिव" असे सुंदर यमक साधतात...

डोळ्यापुढे दिसे गे मज चित्र ते सजीव
माझ्या घरातली तू गृहिणी, सखी, सचिव

कार्येषु मन्त्री करणेषु दासी
भोज्येषु माता शयनेषु रम्भा ।
धर्मानुकूला क्षमया धरित्री
भार्या च षाड्गुण्यवतीह दुर्लभा ॥यात वर्णिलेल्या पत्नीच्या गुणांप्रमाणेच गदिमांनी गृहिणी ,सखी ,सचिव असे वर्णन केले असावे...जगाच्या गजबजाटात आपले घरकुल हे शांततेचे मंदिर असेल...येथे गदिमांनी "सोलीव"(अस्सल) हा वेगळाच शब्द वापरला आहे.

कोलाहली जगाच्या घरकूल आपुले गे
"सोलीव" शांततेचे मंदिर सानुले गे
मी तेथली पुजारी, तू पूजनीय देव
येथे "तुम गगन के चंद्रमा हो, मैं धरा की धूल हूँ" मधील
"तुम हो पूजा मैं पुजारी, तुम सुधा मैं प्यास हूँ"या ओळीची नक्कीच आठवण होते...दोन्हीत समर्पण भाव अग्रेसर आहेच...!!!

दिन सोनियात न्हावा, रजतात रातराणी
आनंद तोच यावा लेवून बाललेणी
साकार ये समोरी स्वप्नात हीच शीव
माझ्या घरातली तू गृहिणी सखी सचिव

गदिमांनी या गीतात काही संस्कृत शब्द वापरून गीत प्रभावी केले आहे,पहा ना रजतात रातराणी ही कल्पनाच किती सुंदर...!!सुख स्वप्न पाहत असता दुडू दुडू धावणाऱ्या पावलांची जेव्हा ओढ लागते ,तेव्हाच ते सुख स्वप्न पूर्ण होते...वेगळ्या धर्तीचे,संसाराचे सुंदर चित्र डोळ्यासमोर साकारणारे गीत..पुन्हा बाबूजी आणि आशाताई यांच्या स्वरातील सुंदर केमिस्ट्री येथेही अनुभवता येते...!!!

आम्ही जातो आमुच्या गावा या अत्यंत गाजलेल्या चित्रपटातील हे गीत...!!!
स्वप्‍नात रंगले मी, चित्रात दंगले मी
सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी

एकमेकांच्या प्रेमात गुंतलेल्या प्रेमिकांची अवस्था येथे जगदीश खेबुडकर यांनी सुंदर वर्णिली आहे.
या वृक्षवल्लरींना ही ओढ मीलनाची
पाहून जाणिली मी भाषा मुकेपणाची
माझ्या प्रियापुढे का लाजून राहिले मी

येथे खेबुडकरांनी निसर्गाच्या पार्श्वभूमीवर मानवी भावना उत्कटतेने वर्णिल्या आहेत..प्रेमिकांना सारे जग सुंदर दिसते ,याचा प्रत्यय येथे येतो."लाजून"चा आशाताईंनी केलेला उच्चार अगदी बाबूजींच्या पठडीतील...!!!सुधीर फडके यांच्या स्वरात एक तरल अभिनय आहे,त्यामुळे गीतात व्यक्त होणारे अनुभव,भाववृत्ती ते स्वर उच्चाराच्या माध्यमातून उत्तम व्यक्त करतात...!!!यात बाबूजींनी आणखी एक सुंदर प्रयोग केला आहे.अंतऱ्याची शेवटची ओळ नायिका म्हणत असताना , नायक हमिंग करतो आणि एकाच वेळी ते ऐकायला खूप गोड वाटते...एकंदरीत हे गीतही मोठे बहारदार झाले आहे.आता इथेच थांबते...बाकीची युगलगीते पुढच्या लेखात पाहूया....!!!!

मानसी पटवर्धन

1 comment:

  1. Manasi Patvardhan - who is this person who has such a great command on Marathi ? Felt very happy to read this

    ReplyDelete