Thursday, August 13, 2020

शशी थरूर

किंग ऑफ काॅन्ट्रोव्हर्सी !

काल सहज यु ट्युबवर 'आप की अदालत' मधे शशी थरूर यांचा भाग बघत होतो. (भाजपाकृत) रजत शर्मांनी त्यांना सुरूवातीला राजकीय क्षेत्राशी संबंधीत विचारलेले दिलखुलास, आणि वैयक्तिक आयुष्याशीही विचारलेले 'खोचक पण अनैतिक' प्रश्न, आणि त्यांना तेवढ्याच सहजतेने दिलेली त्यांची उत्तरे बघत असताना या माणसाचं स्वतःवरचं नियंत्रण, असलेलं अगाढ ज्ञान, समयसुचकता आणि संभाषण कौशल्य किती सुंदर पध्दतींनी स्वतःमधे घडवता येतं याचं एक नखशिखान्त उदाहरण बघायला मिळालं.

बरं आज का लिहावं वाटावं या माणसावर ? तर आज आहे कृष्णजन्माष्टमी. आणि ज्यांचा वाचनाशी कुठल्याही अर्थाने संबंध नाहीए अशा ब-याच जणांनी थरूर यांची इथे दरवेळी वेगवेगळ्या सुंद-यांबरोबर फोटो टाकून 'भारतीय राजकारणातला कृष्ण' अशी एक हेतूपुरस्सर चुकीची प्रतिमा करून ठेवलीय (अर्थात, ज्यांना ज्ञानाचं वावडं असतं त्यांना बुध्दीवाद्यांचा नेहमीच द्वेष वाटत आलेला आहे). बहुधा यांना थरूर कोण आहेत हे तेवढ्या खोलपर्यंत समजलेलं नसावं. असो.

दोन वर्षांपुर्वी S.Y.B.A ला त्यांचा 'Freedom of Press' हा पत्रकारितेवरचा शोधनिबंध शिकवायचा होता. जेव्हा तो वाचायला घेतला तेव्हा त्यातला शब्दसंग्रह बघून मेंदूला बराच ताण जाणवला. त्यातले कितीतरी शब्द हे कधी ऐकण्यात, बघण्यातले नव्हते. चार-दोन ओळींना डिक्शनरी घेऊन बसावं लागायचं. त्यावरूनच या माणसाची इंग्रजी भाषेतली खोली समजली. असं म्हणतात की अगदी ब्रिटिशांना सुध्दा या माणसाची पुस्तकं वाचताना डिक्शनरी घेऊन बसावं लागतं. हे सांगण्याचं कारण एवढंच की भाषेतली ही खोली कुठल्याही ऐ-यागै-याला साध्य होत नसते. (वेळ मिळालाच तर सध्याचे आपले प्रधानमंत्री हे एलिझाबेथ दुसरी यांना भेटल्यावरचं संभाषण आणि चेहे-यावरचे यु ट्युबवरचे भाव बघा. मी त्यावर जास्त इथे बोलत नाही).

आता येतो मुद्द्यावर. थरूर यांच्याबद्दल मला नेहमीच आदर आहे तो त्यांच्या विद्वत्तेसाठी. नेहमी त्यांचा सुंद-यांबरोबरचा फोटो फिरवणा-या 'का-यांना' कदाचित हे माहितही नसावं की ते आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रचंड गाजलेले एक जबाबदार आणि अभ्यासपूर्ण लेखक आहेत. हीच त्यांची या जगातली पहिली ओळख. एक ना दोन, तर तब्बल सतरा बेस्टसेलिंग पुस्तकांचा त्यांचा इतिहास आजपर्यंत माझ्यातरी कुठे पाहण्यात आलेला नाही. ज्यावेळी आपल्याला चड्डी घालायचीही माहिती नव्हती त्या वयाच्या सहाव्या वर्षी  या माणसानं स्वतः पुस्तक लिहायला चालू केलं आणि वयाच्या दहाव्या वर्षी ते प्रसिध्दही केलं.  'Paradoxical Prime Minister', ' Why I am a Hindu?', 'The Great Indian Novel', 'Inglorious Empire', 'An Era of Darkness', 'Pax Indica', 'The Five Dollar Smile', 'The Hindu Way', 'Nehru' ही त्यांची जगभर भरभरून गाजलेली आणि साहित्याच्या क्षेत्रात नावाजली गेलेली प्रचंड खपाची पुस्तकं. हे यांच एक अंग झालं साहित्याचं. 

या माणसाची विद्वत्ता तुम्हाला नक्की कुठे समजते ? तर वयाच्या अठराव्या वर्षी स्वामी विवेकानंदांवर पहिलं, चिंतनशील आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान जेव्हा थरूरांनी दिलं तेव्हा असं म्हणतात की ऐकणा-यांची मती गुंग झालेली. कारण विवेकानंदांना या कोवळ्या वयात एवढ्या प्रगल्भतेने समजून घेणारा आणि तेवढ्याच प्रगल्भतेने समोर मांडणारा बहुधा समोर बसणा-यांनी कधी ऐकलाच नसावा.

१९६९ ला सेंट झेविअर मधून प्राथमिक शिक्षण चालू करणा-या थरूरांनी त्यांचा आवडीचा विषय इतिहास होता म्हणून दिल्लीच्या नामवंत सेंट स्टिव्हन महाविद्यालयातून आपल्या आवडत्या इतिहास या विषयात पदवी घेतली. ज्ञानाला मर्यादा नसते हे तत्वं आणि सत्व समजून घेणारी माणसं ही कुठल्याही क्षेत्रातलं ज्ञान अगदी अधाशीपणानं घेत असतात. जगभराच्या इतिहासाचा अभ्यास चालू असतानाच बहुधा यांना इतिहासातलं कायद्याचं महत्व समजलं असावं. कारण आजपर्यंतच्या माणसाच्या जीवनावर त्या त्या काळातल्या कायद्याने अथवा शासनाने प्रचंड परिणाम केलाय. जगभरातले कायदे मुळातुन समजून घेण्याच्या जिज्ञासेनेच बहुधा यांना पदवीनंतरच्या कायद्याच्या अभ्यासाला प्रेरीत केलं असावं. ती मिळविण्यासाठी या ज्ञानवंतानं थेट गाठलं ते अमेरिकेतलं 'स्कूल ऑफ लाॅ' काॅलेज, आणि बघता बघता पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच वयाच्या फक्त २२ व्या वर्षी 'बेस्ट स्टुडंट ऑफ काॅलेज' या मानाच्या किताबासोबतच कायद्यातील डाॅक्टरेट (Ph.D) मिळवली. (गुडघ्यात मेंदू असणारी चाळीशीनंतरची माणसंही जेव्हा त्याचे विचित्र फोटो फिरवतात त्यांनी हे समजून घेणं अति महत्वाचं आहे).

थरूरांनी जेव्हा वयाच्या २२ व्या वर्षी डाॅक्टरेट पूर्ण  केली त्याच वर्षी ज्ञानाची किंमत ओळखणा-या अमेरिकेने त्यांना युनाईटेड स्टेट ऑफ अमेरिकेतर्फे काम करण्यासाठी ऑफर दिली. तब्बल सहा वर्षे UNHCR चा प्रमुख या युएस च्या महत्वाच्या पदावर नियुक्ती करून सिंगापूरला या विचारवंताकडून काम करून घ्यायला सुरूवात केली. त्यांच्या कामाचा आवाका आणि त्यातलं यश बघुन वयाच्या ४० व्या वर्षी युएसने कोफी अन्नान यांचा साहाय्यक म्हणून त्यांची नियुक्ती केली. साहजिकच आहे, कोफी अन्नान यांच्या स्वभावातलं आपल्या विचारांवर, त्यातल्या स्वातंत्रावर ठाम राहण्याचा गुण या माणसात आला नसता तरच नवल. हे काम तब्बल २००७ पर्यंत चालूच होतं. याच दरम्यान अमेरिकेतर्फे Peace Maker, Refugee Worker म्हणून महत्वाच्या जबाबदा-या तेवढ्याच प्रगल्भतेने पार पाडताना त्यांना 'Global Leader of Tomorrow' हा मानाचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळणार होता.

याच वर्षी म्हणजे २००७ साली एक महत्वाची गोष्ट त्यांच्या आयुष्यात घडली, ज्यानं त्यांच संपूर्ण आयुष्यच बदललं. आंतरराष्ट्रीय पातळीवर मानाच्या समजलेल्या अमेरिकेतल्या डिप्लोमॅसी पदाच्या मतदानात त्यांना फक्त एका मताने पराभव स्विकारावा लागला. फक्त एका मताने. आणि ते मत कुणी नाकारलं, तर खुद्द अमेरिकेनंच. बंकी मून हे त्यांच्याबरोबरचे सदस्य निवडून आले. अमेरिकेनं थरूर यांना मत न देण्याचं कारण एकच, त्यांच विचारस्वातंत्र. कुणापुढेही न घाबरता, कुणाच्याही दबावाला बळी न पडता आपलं मत मांडणं आणि काम करणं ही थरूर यांची खासियत. आणि अमेरिकेला नेमकं हेच नको होतं. कारण कोफी अन्नान यांच्यासारखा मुक्त विचाराचा माणूस पचवणंच अमेरिकेला आधी जड गेलेलं. झालं. तिथेच त्यांनी लाखो डाॅलर्सच्या या अलिशान नोकरीचा राजिनामा दिला आणि भारतीय राजकारणात सक्रीय होण्याचा त्यांचा विचार पक्का झाला.

त्यांचा हा विचार जेव्हा भारतीय राजकारणात समजला तेव्हा खुद्द भाजपा, काॅन्ग्रेस आणि कम्युनिस्टांची त्यांना आपल्या पक्षात ओढण्याची प्रचंड चढाओढ चालली होती. कम्युनिष्ठांचा टोकाचा कम्युनिझम त्यांना रूचणारा नव्हता. खुद्द घटनेत बदल करून हिंदूत्ववादी विचारसरणीने घटना हवी असा विचार करणारे गोळवलकर, पंडीत दिन दयाल यांच्या कडव्या धार्मिकतेच्या पक्षात पाय ठेवणं त्यांना कधीच शक्य नव्हतं. राहीला पर्याय विचारांच स्वातंत्र स्विकारणारा काॅन्ग्रेस पक्ष. मनमोहसिंग यांनी त्यांची बुध्दीमत्ता ओळखून लगेचच आपल्या पक्षातलं  External Affair Ministry हे पद त्यांना दिलं. २०१२ मधे HRD (Human Resource and Development) हे बदलाचं वारं आणणारं मंत्रीपदही त्यांना मिळालं. बहुधा जगातली बदलती शिक्षण पध्दती आणि जगाचा झालेला विकास हा चांगल्या संशोधनवरच होऊ शकतो याच विचारानं या माणसानं भारतीय शिक्षणपध्दतीत 'संशोधन' प्रक्रियेला चांगलं महत्व आणलं. याचं कारण म्हणजे सत्याच्या मुळाशी जाणं. पण तिथंपर्यंत जाताना चोहोबाजूंनी अभ्यास करून अंतिम निष्कर्ष काढता येतो हे त्यांनी जोपासलेलं तत्व. हा क्रांतिकारक विचार या माणसाने भारतीय शिक्षणप्रणालीत आणून एका वेगळ्या क्रांतीची आणि बदलाची सुरूवात केली. संशोधनाचं सगळं प्राधान्य तसं या माणसाला जातंच जातं.

२०१३ पासून सोशल मिडीयातही सगळ्यात जास्त फाॅलोअर्स असणारे थरूर यांनी एकदा सहज मोदींची आंतरराष्ट्रीय योग दिन चालू केल्याबद्दल आणि देशोदेशांच्या सततच्या भेटीवर प्रशंसा केली होती. काॅन्ग्रेसच्या इतर नेत्यांना ते आवडलं नाही ही गोष्ट वेगळी. अगदी त्यांच्या त्या प्रशंसेनं पक्षात बराच वैचारिक धुराळा उडवलेला. याचं कारण सरळ आहे, त्यांच्या विचारांमधील सत्य आणि त्यावर ठाम राहण्याची भूमिका. हीच गोष्ट अगदी अलिकडची आहे. ब्रिटिशांनी त्यांना ऑक्सफर्ड विद्यापीठात भाषणाला बोलावलं होतं. त्या भाषणात ब्रिटिशांच्या मायभूमित जाऊन त्यांच्याच भाषेत लचकेवारपणे त्यांचे वाभाडे काढणारे थरूर हे स्वातंत्रानंतरचे बहुधा पहिले भारतीय असावेत. ब्रिटिश भारतात आलेच नसते तर थरूरांच्या मते भारताची अतोनात लूट, राजकारण आणि हानी झालीच नसती; शिवाय मराठा साम्राज्यानेच आज भारतावर आपली पकड रोवली असती असं त्यांच प्रामाणिक पण अभ्यासपूर्ण ऐतिहासिक मत. अर्थात, ब्रिटिशांना या गोष्टीचा राग आला तरी त्यांना खाली मान घालून ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण ते वास्तवच होतं.

थरूरांवर ब-याचवेळा हिंदू विरोधी असल्याचा आरोप केला जातो. धर्माच्या मुद्द्यावरून त्यांच्या कार्यालयावर एकदा हल्लाही झालेला. पण सध्या थिरूवनंतपूरम या त्यांच्याच खासदारकीच्या भागाचा विचार केला तर तिथले ६० ते ७० % मतदार हे हिंदू आहेत. तरीही त्यांनी थरूरांनाच निवडून देणं पसंत केलं. याचं कारण म्हणजे तिथला 'अभ्यासु मतदार'. थरूरांवर आणि त्यांच्या ज्ञानावर त्यांना प्रचंड विश्वास आहे. थरूरांचा राजकारणातला एक विचार जो तिथल्या मतदारांना प्रचंड आवडतो तो म्हणजे, 'हा देश सर्वांचा आहे' हा होय.

आजही लिखाणावरचं त्यांच प्रेम आणि वाढत्या ज्ञानाचा विस्तार त्यांच्या वेगवेगळ्या प्रसिध्द होणा-या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या वृत्तपत्रांमधल्या काॅलम्सवरून समजून येतं.

तर थरूरांची ही न अभ्यासलेली अथवा पुढे न आणलेली बाजू समजून बहूधा इथून पुढे त्यांच्याकडे 'स्काॅलर' म्हणून बघीतलं तर आपल्याही मेंदूला आपला अभिमान वाटेल.

जगासाठी शशी थरूर म्हणजे, 'बस नाम ही काफी है' !

बाकी, तुम्हाला भारतीय राजकारणातल्या न समजलेल्या कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा ! 💐💐 😃😃

#shashitharoor 

©️ विक्रम राऊत (विरा)

No comments:

Post a Comment