Monday, August 3, 2020

कानिटकर सर। प्रदीप गबाळे

*गुरुवर्य श्रीराम कानेटकर सर एक समर्पित जीवन*
         *गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर:*!
*गुरुर्साक्षात परब्रम्ह तस्मै: श्री गुरवे नमः*!
विस्कटलेले केस, शर्टाची बटने वर-खाली झालेली,अर्धा शर्ट पॅन्ट मध्ये खोचलेला तर अर्धा बाहेर, पायात कधी चप्पल घातली आहे तर कधी चप्पलच  नाही असा बावळा वेष.पण ही व्यक्ती बोलायला लागली कि असं वाटायचं की हिचा आपला जन्मोजन्मीचा ऋणानुबंध आहे. आवाजात इतकी आपुलकी, इतका गोडवा की ऐकणाऱ्याने ऐकतच रहावं.चेहऱ्यावरचं हास्य तर त्यांच्या मनात इतकच निर्मळ. म्हणतात ना शिक्षणाचं सौंदर्य शिक्षकांत लपलेलं असतं आणि शिक्षकाच सौंदर्य त्याच्या चारित्र्यात लपलेलं असतं. असं चारित्र्यवान, संस्कारशील सौंदर्यानं नटलेलं एक व्यक्तिमत्व म्हणजे कोल्हापूरचे कानेटकर सर. अध्यापन ही व्रतस्थ भावनेनं करावयाची 'सेवा' समजून आपण ईश्वराची 'भक्ती' करत आहोत या भावनेनं आपलं आयुष्य वेचलेलं वंदनीय व्यक्तिमत्व म्हणजे कानेटकर सर . शाळेचं सौंदर्य म्हणजे कानेटकर सर. शाळेचं बलस्थान म्हणजे कानेटकर सर. शाळेचा इतिहास म्हणजे कानेटकर सर. शाळेचे चारित्र्य म्हणजे कानेटकर सर. शाळेचे तत्वज्ञान म्हणजे कानेटकरसर. 
      २४-११-१९२४ रोजी कोकणातील ' कोकीसरे' या छोट्या गावात जन्मलेले श्रीराम केशव कानेटकर शालेय शिक्षणाच्या निमित्ताने कोल्हापूरच्या भक्ति-सेवा विद्यापीठ हायस्कूल मध्ये आले आणि ते कायमचे विद्यापीठाचेच होऊन गेले. १९४८  साला पासून १९८७ साला पर्यंत सुमारे ३९ वर्षं  त्यांनी विद्यापीठाची तन-मन धनाने सेवा केली. देव कोणी पाहिला आहे काय,हे मला ठाऊक नाही पण देवा सारखेच वाटणारे कानेटकर सर विद्यार्थ्यांच्या  जीवनात आले आणि त्यांनी  अनेक विद्यार्थ्यांचे जीवन पालटून टाकले. परिसाच्या स्पर्शाने जसं लोखंडाचं सोनं होतं तसं कानेटकर सरांच्या संस्कारामुळे विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं सोनं झालं. गोरापान चेहरा,तेजस्वी डोळे,आवाजामध्ये लोण्यासारखे मृदुता आणि विचारांमध्ये केवळ विद्यार्थी आणि विद्यार्थी विकास. ज्ञानदाना साठी तेवणारा जणू नंदादीप.
       विद्यापीठ हायस्कूलचे संस्थापक कै. गं. य. दीक्षित गुरुजी यांच्या शैक्षणिक तत्वज्ञानाचा फार मोठा पगडा कानेटकर सरांच्या वर होता. त्यामुळेच ' भक्ती ईश्वराची- सेवा मानवाची' हे व्रत केवळ विद्यापीठ संस्थेचं व्रत नव्हतं तर ते संस्थापकानी आणि शिक्षक वर्गानं स्वेच्छेनं स्वीकारलेलं व्रत होतं . कानेटकर सर त्याला अपवाद नव्हते. त्यामुळेच शाळेमध्ये केवळ पुस्तकी शिक्षण म्हणजेच ' शिक्षण' असा भर न देता विद्यार्थ्यांची शारीरिक, बौद्धिक आणि भावनिक उन्नती करण्यासाठी आणि भारताचे आदर्श नागरिक बनवण्यासाठी जे जे करावे लागेल ते ते त्यांनी केले. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये एक स्नेहमय, खेळीमेळीचे आणि आपुलकीचे वातावरण कानेटकर सरांच्या मुळे निर्माण झाले. शाळा हे माझे एक कुटुंब आहे अशी भावना विद्यार्थी वर्गात निर्माण झाली ती केवळ आणि केवळ कानेटकर सरांच्या मुळेच.
     कानेटकर सरांचे संपूर्ण जीवन म्हणजे एक आदर्श पुस्तक आहे असं मला वाटतं. आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समर्पित सेवाभाव कसा असावा हे सरांच्या कडून शिकण्यासारखं आहे.सरांनी आपल्या चालण्या बोलण्यातून, आपल्या वर्तणुकी मधून संस्कारांचं अमूल्य देणं विद्यार्थ्यांना दिलं आहे.
   वयाची नव्वदी ओलांडल्यानंतर ही सरांची स्मृति ठणठणीत होती. सरांना शाळेच्या हजारो मुलामुलींची नावं तोंडपाठ होती, एवढेच नव्हे तर एखादा मुलगा कोठे राहतो, त्याचे पालक काय करतात,त्या मुलाचे गुणदोष काय आहेत, त्या मुलाच्या सवयी कोणत्या आहेत, त्या मुलाचा शाळेतील मित्रपरिवार कोणता आहे हे सगळं  सगळं  सरांना आठवत होतं. एखादा मुलगा शाळेला एक दोन दिवस आला नाही तर सर लगेच त्याचे घर गाठून  तो का आला नाही याची कारणे शोधंत असंत. सरांचे मन खूप हळवं होतं, त्यामुळे सर विद्यार्थ्यांच्या मध्ये भावनिक गुंतलेले असायचे. आपल्या विद्यार्थ्यांचे यश, विद्यार्थ्यांचा आनंद यामुळे सर आनंदी होत असत,तसेच विद्यार्थ्यांचे अपयश म्हणजे स्वतःचे अपयश समजत असत.वर्गात,मैदानावर एवढेच नव्हे तर सामाजिक स्तरावर वावरताना सुद्धा आपल्या वर्तणुकी मधून ते विद्यार्थ्यांना शिकवत असत.सर एअरफोर्स एन.सी. सी. चे ऑफिसर असल्यामुळे स्वच्छता, टापटीप, वक्तशीरपणा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक होता आणि त्याचे परिणाम विद्यार्थी वर्गावर झाले आहेत. एकदा सर जिमखाना प्रमुख म्हणून काम करत होते मुलांना लोकशाही म्हणजे काय, तिचे कार्य कसे चालते, सार्वजनिक निवडणुका कशा होतात याचे प्रात्यक्षिक ज्ञान बालवयात व्हावे म्हणून शाळेत जिमखाना निवडणुका होत असतात.निवडणुकीची आचारसंहिता शाळेत जाहीर केली जायची व फलकावर लिहिली जायची. प्रचार कसा करावा, केव्हा करावा, काय करू नये याबाबतची स्पष्ट नियमावली मुलांना सांगितली जायची. पण त्या वर्षी निवडणुका झाल्यानंतर निवडून आलेल्या अकरावीच्या मुलांनी निवडणूक नियमांचा भंग केला.वास्तविक निवडणूक निकालानंतर  गुलाल वगैरे उधळायला परवानगी नव्हती. पण त्यावर्षी विजयी विद्यार्थ्यानी उत्साहाच्या भरात निकालानंतर शाळेच्या मैदानावर गुलाल उधळला. सरांच्या नजरेत ही गोष्ट आली.मुलांना खुलासा विचारायला सर मैदानावर जाईपर्यंत मुले घरी पळून गेली. पण ही गोष्ट सरांच्या मनाला फार म्हणजे फारच लागली. आपण जिमखाना प्रमुख असताना शाळेच्या परंपरेला गालबोट लागणारी घटना घडली यात आपलाच दोष आहे असे त्यांच्या मनाला वाटले.  झालेल्या घटनेची जबाबदारी स्वतःवर घेऊन सरांनी त्याच दिवशी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.इतर शिक्षकांनी आणि स्वतः मुख्याध्यापकांनी कानेटकर सरांचा काहीही दोष नाही , आणि दोष असेल तर तो मुलांचा आहे, तरी सरांनी राजीनामा मागे घ्यावा असे सांगितले.पण सर तयार होईनात. शेवटी तीन आठवड्यांनी ज्या मुलांनी गुलाल उधळला होता ती सर्व मुले आणि त्यांचे पालक साश्रूनयनांनी सरांच्या, देशपांडे गल्लीतील घराकडे माफी मागण्यासाठी गेले. आपल्यामुळे सरांनी शाळा सोडली, नोकरी सोडली हे त्या मुलांना सहन झाले नाही. मुलांच्या भरून आलेल्या डोळ्यानी सरांचे मन पाझरले आणि सर पुन्हा शाळेत येऊ लागले मुलांच्या आनंदाने आनंदून जाणारे आणि मुलांच्या दुःखाने दुःखी होणारे कानेटकरसर हे विद्यापीठाचे वैभव होते.
  कानेटकर सरांच्या नुकत्याच म्हणजे दिनांक १५ जुलै रोजी झालेल्या दुःखद निधनानंतर त्यांची अनेक रुपें आज माझ्या डोळ्यासमोर आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुला-मुलींना सायकल चालवणे शिकवताना दोन-दोन तास  सायकल धरून त्यांच्या मागून पळणारे, घामेघूम झालेले कानेटकर सर मी पाहिले आहेत. दीक्षित गुरुजीनी सुरू केलेल्या सुरंगी येथील मोफत पोहण्याच्या वर्गाचे व्यवस्थापन करणारे आणि मुलांना पोटाला धरून प्रत्यक्ष पोहायला शिकवणारे कानेटकर सर मी पाहिले आहेत‌.शालेय वेळापत्रक, एक दिवसीय क्रीडा स्पर्धा, सूर्य नमस्कार संकल्प, सहलींचे नियोजन, विविध शालेय समारंभ, परीक्षा, अभ्यासिका, हरवले- गवसले विभाग, पालक सभा या सर्वांचे सूक्ष्म नियोजन करणारे सर मी अनुभवले आहेत. तपोवनातील विहिरीचा गाळ काढण्यासाठी श्रमदान करणारे कानेटकर सर मी पाहिले आहेत. सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंत शाळेतच रमणारे, एखाद्या मुलाला सायकलवरून त्याच्या घरी सोडणारे, प्रत्येक सोमवारी श्री स्वप्नेश्वर  देवालय पाण्याने स्वच्छ धुऊन काढणारे,वर्गातील एखादा भाग अस्वच्छ दिसला तर संपूर्ण वर्गच स्वतः झाडून काढणारे, रामनवमी,गोकुळाष्टमी, केळवकर दिन, शाळेचा वर्धापन दिन, अनंतचतुर्दशी, एक लक्ष श्रीसूर्यनमस्कार संकल्पात स्वत: सूर्य नमस्कार घालणारे, विविध शालेय कार्यक्रमात स्वयंसेवक म्हणून काम करणारे कानेटकर सर माझ्या डोळ्यासमोर आहेत.एखाद्या मुलानं रागाच्या भरात शिवी दिली तर स्वत:ला त्रास करून घेणारे सर मी अनुभवले आहेत.नवीन आलेल्या शिक्षकांना शाळेच्या परंपरा, श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव न करता, बरोबरीच्या नात्याने समजावून सांगणारे सर मी पाहिले आहेत. वयाने अगदी लहान असणाऱ्या विद्यार्थ्यांना अहो ........ म्हणून हाक मारणारे कानेटकर सर मला आठवतात.आनंदाच्या आणि दु:खाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या तसेच सहकारी शिक्षकांच्या घरी न विसरता जाणारे सर  मी पाहिलेले आहेत. गरीब विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी स्वत:चर्या पगारातील अल्पसा पण लाखमोलाचा आर्थिक भार नियमितपणे उचलणारे सर मी पाहिले आहेत. एखाद्या दिवशी सूर्य नमस्कार घातलेले नाहीत म्हणून भिजवलेले शेंगदाणे न खाणारे कानेटकर सर मी पाहिले आहेत.  सरांचे श्रद्धास्थान असलेले कै. पूज्य दीक्षित गुरुजी आजारी पडल्यानंतर त्यांची पुत्रवत सेवा करणारे कानेटकर सर मी पाहिले आहेत.गुरुजींचे मलमूत्र काढण्यापासून त्यांना आंघोळ घालणारे कानेटकर सर मी पाहिले आहेत.
   जीवनाचं अंतिम आणि अटळ सत्य असणारा ' मृत्यू' समीप आल्याची जाणीव झाल्यानंतर कानेटकर सरांनी स्वहस्ताक्षरात लिहिलेले एक पत्र मला वाचावयास दिले. मृत्यूच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच असंख्य विचारांची आवर्तनं त्यांच्या मनात सुरू होती हे त्या पत्रातून स्पष्ट होतं.त्या पत्रातील काही वाक्य मला अंतर्मुख करून गेली. त्या वाक्यांचा सारांश असा होता की 'जर शाळा, कार्यालय सुरू असताना माझे निधन झाले तर माझ्या निधनानिमित्त शाळेला सुट्टीत देण्यात येऊ नये. शिक्षकांनी अध्यापनाचे आपले काम थांबवू नये,तसेच इतर कोणीही आपले काम वगैरे सोडून माझ्याकडे येऊ नये.आपण आपले काम करत राहिलात तर मला आनंद मिळेल'.कोरोनाच्या 'लाॅक डाऊन' ने सरांची ती इच्छा पूर्ण केली असेच म्हणावे लागेल.
आयुष्यभर केवळ विद्यापीठ शाळा आणि विद्यार्थी विकास हाच ध्यास घेतलेले कानेटकर सर म्हणजे विद्यापीठ हायस्कूलचा श्र्वास होते. त्यांना आधुनिक 'साने गुरुजी' म्हणावं असं मला वाटतं.
प्रदीप गबाले
निवृत्त मुख्याध्यापक
विद्यापीठ हायस्कूल, कोल्हापूर.
भ्रमणध्वनी:- 9766747884.
*हा लेख आपण आपल्या संबंधितांना पाठवूया आणि कै. कानेटकर सरांचे कार्य इतरांपर्यंत पोहचवूया.जास्तीत जास्त शेअर करुया.*

No comments:

Post a Comment