Tuesday, August 4, 2020

किशोर कुमार आणि भीमसेन ।मकरंद कुलकर्णी

भारत रत्न पंडित भीमसेन जोशी यांची सुरेल मैफल व गायकी ही सर्वश्रुत आहेच.. पण पंडितजी व किशोर कुमार यांच्या अद्भुत मैत्री बद्दल फार कमी लोकांना माहिती असेल..
हि गोष्ट आहे १९७२ सालची.. त्या वेळेस पंडितजी आपल्या मैफल जगात रममाण व व्यस्त होते..
त्याच काळी शक्ती सामंत यांनी दिग्दर्शित केलेला " अमर प्रेम" प्रदर्शित झाला होता...
ह्या चित्रपटाने व त्यातील गाण्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता..
आणि त्या वेळेस एका पत्रकाराने पंडितजी यांची वेळ घेऊन मुलाखत घेतली होती.. 
संध्याकाळची वेळ ठरली होती..
ठरल्या वेळी तो पत्रकार सदाशिव पेठेत त्या फुला पानांनी गच्च भरलेल्या हिरव्या गार गल्लीत दाखल झाला..
लांबुनच त्याला " कुछ तो लोग कहेंगे लोगो का काम है कहेना" ची तान ऐकू आली.. क्षणभर तरी तो पत्रकार  गांगरला.. आणि आपण चुकीच्या पत्त्यावर आलो आहे अशी भावना वाढीस लागली..
तो स्वर त्या पत्रकाराला एखाद्या दिवाळीत केलेल्या बेसनाच्या लाडूचा असलेला एक स्वर्गीय गंध पसरतो तसा जाणवला..
जसा जसा तो पत्रकार घराच्या जवळ येत होता तसा तो गंध अधिक गडद होत होता..
त्याने त्या घराच्या खिडकीच्या फटीतून एक आलोकिक दृश्य पाहून हरखून गेला..
पंडितजी आपल्या आराम खुर्चीवर बसून समोरच्या ग्रामो फोनच्या माध्यमातून किशोर कुमार यांनी गायलेले गाणे एकत होते..
पत्रकाराला झिट यायची वेळ आली कारण हा जगप्रसिद्ध शास्त्रीय संगीत भूमीचा अनभिषिक्त सम्राट एका फिल्मी गाण्यावर मान डोलवत आहे..
तसा तो पत्रकार त्यांची ही साधना भंग करत आत गेला. आणि प्रचंड कौतुकाने पाहत त्याने " पंडितजी, हे मी काय पाहतोय आपण चक्क फिल्मी गाण्यावर मान डोलवत आहात" पंडितजी गडगडाट हास्य करून गाणे बंद करून म्हणाले..
" अरे ज्यांनी पंचम चे संगीत ऐकले नाही त्यांनी संगीताचा प्रांत सोडून द्यावा" पंचम चे संगीत म्हणजे स्वर्गीय सुख समाधान वाटते.. त्यांनी परत गाणे सुरू करून म्हणाले, किशोर कुमार यांनी गायलेले गाणे म्हणजे दोन रागांचा सुरेल संगम आहे..
" बघ, गाण्याचा प्रारंभ राग खम्माज ने सुरू होऊन मध्येच राग कलावती कडे वळल्या जातो" 
किशोर कुमार यांनी या दोन रागांचा इतका सुदंर मेळ घातला आहे की आमच्या सारख्या बड्या बड्या गायकांची गोची झाली असती..
पुढे जवळच असलेल्या चहाचा आस्वाद घेत विनोदाने म्हणाले," अरे बर झालं किशोर कुमार यांनी शास्त्रीय संगीत शिकले नाही, अन्यथा आमच्या सारख्या बड्या बड्या गायकांची पोटा पाण्याची पंचायत झाली असती."
एखाद्या जगप्रसिद्ध शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात यश संपादन केलेल्या या गंधर्व भीमसेन जोशी यांनी सांगितल्या प्रमाणे किशोर कुमार यांच्या अद्भुत गायकी बद्दल विचार करावा तेवढा थोडाच!
आज किशोर कुमार जिवंत असते तर ९१ वर्षाचे झाले असते.. त्यांचा सारखा एवढा प्रतिभाशाली गायक १०००० वर्षात एखादा जन्माला येतो..
आज त्यांच्या जयंती निम्मित वाहलेली ही शब्द सुमांनजली...
मकरंद कुलकर्णी...

No comments:

Post a Comment