My London - Part 2 आठवणी लोकमान्य टिळकांच्या लंडन वास्तव्याच्या
आज १ ऑगस्ट. लोकमान्य टिळकांची शंभरावी पुण्यतिथी. पार्ले टिळक विद्यालयात शिक्षण झाल्याने १ ऑगस्टचे महत्व शाळेपासूनच कळले होते. तेव्हा शाळेत या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा असायच्या. माझ्या मोठ्या भावाने त्या कायमच गाजवल्या. मला एखाद्या बक्षिसाचा अपवाद सोडला तर हि वक्तृत्वकला काही फारशी जमली नाही पण आज मी तुम्हाला लोकमान्य टिळकांची एक कहाणी सांगणार आहे जी कदाचित तुम्ही कधी ऐकली नसेल. गेल्या आठवड्यात मी फेसबुकवर "माय लंडन" नावाचा एक ब्लॉग चालू केला ज्यात गेल्या सलग तीन वर्षात आणि एकूणच गेल्या वीस वर्षतल्या माझ्या लंडनच्या भ्रमंतीतील काही माहितीच्या तर काही हटके जागांची कहाणी उलगडून दाखवणार आहे.
लंडनच्या सुरवातीच्या काही भेटीतून तुम्ही नेहमीच्या पॉप्युलर गोष्टी बघून घेतल्यात कि तुम्हाला पर्यटकांचे लंडन सोडून खरं लंडन बघायची उत्सुकता जागृत होते. त्यातून तुम्ही इतिहासाचे अभ्यासक किंवा इतिहासप्रेमी असलात तर तुम्हाला कुबेराच्या लॉकररूमची किल्ली हातात ठेवल्यासारखे वाटेल इतका इतिहास या शहरात ठासून भरला आहे आणि मुख्य म्हणजे त्यांनी तो जीवापाड जपला आहे. गेल्या काही वर्षातल्या लंडन दौऱ्यात मी पायाला भिंगरी लावल्यासारखा भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी निगडित इतिहास किंवा ऐतिहासिक जागा बघायला पायपीट केली आहे. अर्थात इंग्लिश समरमधली हि पायपीट सुखावह असते. मिल्टन किन्सच्या वासुदेव गोडबोल्यानी या ठिकाणांबद्दल माहिती गोळा करून माझासारख्यांचे काम मात्र सोपे केले आहे. तर आता आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे ते लोकमान्य टिळकांच्या लंडनमधील पाऊलखुणा दाखवायला.
सर व्हॅलेंटाईन किरोल याची "द टाईम्स" या प्रसिद्ध वृत्तपत्राने परदेशी संपादक म्हणून भारतात नियुक्ती केली होती. भारतात जे ब्रिटिश सरकारविरुद्ध असंतोषाचे वातावरण तयार होत ते एखादी वावटळ आहे का एखाद्या वादळात त्याचे रूपांतर व्हायची शक्यता आहे याचा अभ्यास करणे हे या किरोलचे प्रमुख काम होते. २३ जुलै १९०८ ला टिळक वयाच्या बावन्नाव्या वर्षी मुंबई-कोचीन-त्रिवेंद्रम-मद्रास-रंगून- मंडाले असा ३००० मैलाचा खडतर प्रवास करून आपली ६ वर्षाची शिक्षा भोगायला मंडाले ला पोहोचले होते. ब्रिटिशांचा शिक्षा करायचा आणि त्या भोगण्यासाठी निवडलेल्या ठिकाणांचा कपटीपणा, क्रूरपणा यातून दिसून येतो. त्याकाळी ब्रिटिशांचे सरासरी आयुष्यमान पन्नाशीच्या आत होते तेव्हा बावन्न वर्षांच्या मधुमेहाचा त्रास असलेल्या टिळकांना मंडाले ठिकाण निवडण्यामागे सुप्त हेतू हाच हि हा प्रवासच झेपायला नको. टिळक नुसते मंडालेला पोहोचले नाहीत तर शिक्षा भोगताना त्यांनी गीतारहस्य लिहून आपली सहनशीलता दाखवून दिली.
या किरोलने दरम्यानच्या काळात आपल्या अभ्यासावर "इंडियन अनरेस्ट" नावाचे पुस्तक लिहिले. लोकमान्य टिळकांना "भारतीय असंतोषाचे जनक" हि जी उपाधी मिळाली ती किरोलने या पुस्तकात प्रथम टिळकांना दिली. वास्तविक त्याने हे शब्द उपरोधाने वापरले होते पण पुढे हिच टिळकांची सन्माननीय ओळख ठरली. टिळक जेव्हा आपली शिक्षा संपवून पुण्याला परत आले तेव्हा त्यांनी हे शब्द वापरल्याबद्दल किरोलवर मानहानीचा खटला भरला. पारतंत्र्यात राणीचा नाईटहूड 'किताब असलेल्या इंग्लंडच्या प्रमुख वृत्तपत्राच्या संपादकांवर खटला भरायला धाडस लागते. हा खटला लढायला टिळक ३० ऑक्टोबर १९१८ ला लंडनला आले. पहिले महायुद्ध ११ नोव्हेंबर १९१८ ला संपले म्हणजे या महायुद्धाच्या धामधुमीत स्वातंत्र्यलढ्यातील प्रमुख नेता प्रवास करत होता. तसे धाडस त्यांनी प्लेगच्या साथीतही पुणे न सोडता आणि घरात न बसता रस्त्यावर उतरून लोकांना मदत करताना दाखवले होते म्हणा!
टिळक लंडनला जवळजवळ ११ महिने जिथे राहिले ते घर आहे ते ठिकाण लंडनच्या पॅडिंग्टन स्टेशनपासून साधारण अर्ध्या मैलावर आहे. हे घर बघायला जाताना मला प्रचंड उत्सुकता होतीच पण लंडनमधली भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी निगडित अशी अनेक ठिकाणे मी जेव्हा पाहिली तेव्हा जाणवते ते म्हणजे भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे कुणा दोन चार व्यक्तींमुळे मिळाले नसून अनेक जहाल, मवाळ, क्रांतिकारी विचारवंतांच्या परिश्रमाची ती एकत्रित फलश्रुती आहे. टिळक हा खटला चालवायला आले पण एखादी फिक्स्ड मॅच असावी तसा निव्वळ २७ दिवसात ज्युरींनी किरोलच्या बाजूने निकाल दिला. टिळकांच्या वतीने युक्तिवाद करायला कोण होते माहित आहे? ज्यांना आपण सायमन गो बॅक करून हाकलवून लावले ते सर जॉन सायमन. टिळकांचे आणि सायमन दोघांचे निकालाविरुद्ध पुन्हा अपील करण्यात अर्थ नाही हे मत झाल्याने प्रकरण तिथेच थांबले पण या खटल्यासाठी टिळकांना त्याकाळी चौदाहजार पौंड खर्च झाला. हा खर्च जनतेने देणग्या देऊन केला यावरूनच त्यांना लोकमान्य का म्हणायचे ते कळून येईल. खटला हरला तरी ब्रिटिशांविरुद्ध पुकारलेल्या असंतोषाची यामुळे पोचपावती मिळाली आणि ते महत्वाचे होते. या वास्तव्यात टिळकांनीं इंग्लंडच्या मजूर पक्षाला दोन हजार पौंडांची भरघोस मदत करून त्यांचे मुखपत्र साप्ताहिकवरून दैनिक बनवले. इंग्लंडमध्ये महायुद्धानंतर हुजूर पक्षाचा विजय होऊन सत्तास्थापन झाले होती. तेव्हा शत्रूंच्या विरोधकांना बळकट करणे हितावह होते.
टिळकांच्या या लंडनच्या वास्तव्याचा अजून एक कुटुंबाला फायदा झाला तो म्हणजे मॅकनॅटली या दांपत्याला. मूळचे हे आर्यलँडचे कुटुंब होते पण त्यांना टिळकांच्या देखभालीसाठी नेमले होते. आयर्लंड आणि इंग्लंड यांच्यातही सख्य नसल्याने शत्रूचा शत्रू या नात्याने टिळकांची अत्यंत सुंदर व्यवस्था केली. टिळकांना मधुमेहाचा त्रास असल्याने त्याला चालेल असे जेवणही या मॅकनॅटली बाई करून देत असत. या सर्व प्रवासात त्यांचा भारतीय स्वयंपाकावर चांगला हात बसला. टिळक पुढे भारतात परतल्यावर या मॅकनॅटली दांपत्याने लंडनमध्ये चक्क इंडियन रेस्टॉरंट काढले. त्या उपाहारगृहाच्या अंतर्भागात त्यांनी "भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक यांच्या आशीर्वादाने " अशा अर्थाची इंग्रजीत पाटीही लावली होती. आजकाल तर इंग्लंडचे गोरे भारतीय खाण्याला चाटले आहेत पण तेव्हाही हे मॅकनॅटलीचे रेस्टॉरंट खूप चालायला लागले आणि एके दिवशी ज्याच्याविरुद्ध केस लढायला टिळक लंडनला आले होते तो सर व्हॅलेंटाईन किरोलच या रेस्टॉरंटमध्ये जेवायला आला होता. ती पाटी बघून त्याने मालकाला बोलावले पण तो बाहेर होता म्हणून त्याने वेटरला ती पाटी काढायला सांगितली पण त्याने सपशेल नकार दिला. जिवंत लोकशाहीत हे शक्य असते.
विविध विषयांचे गाढे अभ्यासक, निर्भीड, निस्पृह अशा लोकमान्य टिळकांनी आपले लंडनमधले हे वास्तव्य एकही दिवस पर्यटक म्हणून घालवले नाही. त्यांचा दिनक्रम आणि कामाचा सपाटा बघून थक्क व्हायचो असे त्यांच्या बरोबर ६ महिने राहिलेले न.चि. केळकर आणि टिळकांचे स्वीय सहाय्यक नामजोशी यांनी लिहून ठेवले आहे. मेंबर्स ऑफ पार्लमेंटच्या भेटीगाठी, हाऊस ऑफ कॉमन्सच्या चर्चांना हजेरी, मजूर पक्षाच्या नेत्यांशी चर्चा अशा अनेक गोष्टींनी त्यांचा दिवस व्यापलेला असायचा. महायुद्धात खिळखिळ्या झालेल्या इंग्लंडच्या अर्थव्यवस्थेचा भारताला स्वातंत्र्यमिळवून देण्यात फायदा करून घेण्यावर त्यांचा भर होता.
लोकमान्यांच्या या घराचा पत्ता आहे १०, हौली स्ट्रीट. मी जेव्हा तिथे पोहचलो तेव्हा दुपारची शांत वेळ होती. इंग्लिश समर बहरात आला होता. खरं तर आपले काम झाल्यावर जनतेच्या पैशाने रहायचे आहे तर काहीतरी कामे दाखवत टिळकांना सुखात रहाता आले असते पण आपण इथे आलोय ते जनतेच्या पैशाने आणि जनतेच्या हितासाठी तेव्हा तेरा महिन्यातला प्रत्येक दिवस त्यांनी स्वातंत्र्याच्या कार्यासाठीच खर्च केला. एकीकडे कायम स्कॉटलंड यार्डच्या पोलिसांची सावली सांभाळत त्यांनी आपली कामे, सभा चालूच ठेवल्या. या भारतीय असंतोषाच्या जनकाला इंग्रज वचकून होते तर तिथल्या भारतीयांच्या टिळकांवर अमाप आशा होत्या. त्या टिळकांच्या १०, हौली स्ट्रीट ला तेव्हा तिकडचे समस्त भारतीय १० डाउनिंग स्ट्रीट म्हणजेच इंग्लंडच्या पंतप्रधानांचा पत्ता म्हणायचे.
आज बरोबर शंभर वर्षांपूर्वी आपण या दूरदर्शी नेत्याला गमावून बसलो. दुर्दैवाने आपल्यात शेंगा न खाल्याने टरफले न उचलायचा तत्वनिष्ठपणा उरलाय ना सरकारला डोके ठिकाणावर आहे का विचारायचे धाडस उरलंय. अशा वेळी उरते ते केवळ अशा महान नेत्याच्या आठवणीत नतमस्तक होणे.
-निमिष वा. पाटगांवकर
No comments:
Post a Comment