हे वर्ष लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिशताब्दीचे वर्ष असून १ऑगस्ट २०२० रोजी त्यांच्या
महानिर्वाणास शंभर वर्षे पूर्ण होत आहेत.
२३ जुलै हा त्यांचा जन्मदिन.
*२३ जुलै ते १ ऑगस्ट २०२०*
या नऊ दिवसांमध्ये लोकमान्यांच्या प्रेरक स्मृतींचे संस्मरण करण्याचा अल्पसा प्रयत्न केला....
त्याची आज सांगता करतांना खूप काही मिळवले व खूप काही राहिले आहे अशी भावना आहे.
*टिळक पर्व हे स्वातंत्र्य आंदोलनातील धगधगते पर्व आहे.*
त्यांची.... पत्रकारिता,गणितज्ञता,लोकनेतृत्व,
राजकीय नेतृत्व,तत्वचिंतन ...
किती पैलूंना स्पर्श करून
वंदन करू .....लक्षात येत नव्हते.
आदरणीय सर्वश्री
कै गोविंदराव तळवलकर,
मा. अरविंद व्यं.गोखले,
मा. न्या.नरेंद्रजी चपळगावकर
यांच्या पुस्तकांमधील निवडक प्रसंग या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला.
मूळ चरित्र वाचण्याची प्रेरणा अनेकांना मिळावी अशी अपेक्षा!
🙏🙏🙏
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
(१०)
*लोकमान्य टिळक व महात्मा गांधीजी*
लोकमान्य आणि गांधीजी यांच्या राजकीय धोरणात असलेला फरक काहीवेळा फारच ढोबळ शब्दात सांगितला जातो. टिळकांची भूमिका जशास तसे किंवा 'शठं प्रति शाठ्यम्' अशी होती, अशी साधारण समजूत आहे. टिळकांच्या या धोरणाबद्दल आपला मतभेद व्यक्त करणारा एक लेख गांधीजींनी १४ जानेवारी १९२० रोजीच्या 'यंग इंडिया'त लिहिला. गांधीजींच्या या लेखाला उत्तर देणारे एक पत्र लोकमान्यांनी पाठवले व तेही नंतर 'यंग इंडिया'त प्रसिद्ध झाले आहे.
'राजकारणात सर्व क्षम्य असते, अशीही टिळकांची भूमिका आहे,' असे गांधीजींनी सूचित केले होते. टिळकांनी त्याचा या पत्रात इन्कार केला होता. मात्र ,'राजकारण साधूंचा खेळ नाही तर तो ऐहिक जीवन जगणाऱ्यांचा खेळ आहे, म्हणूनच अक्रोधाने क्रोधाला जिंकण्याचा भगवान बुद्धांचा प्रयत्न आपल्याला (राजकारणात) करता येणार नाही. त्याऐवजी 'ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भज्याम्यहम्' या भगवान श्रीकृष्णाच्या उक्तीचा अवलंब करणे मला पसंत आहे,' असे त्यांनी लिहिले होते. गांधींजींनी लोकमान्यांच्या या उत्तराला प्रत्युत्तर दिले होते. त्यात 'द्वेषाला प्रेमाने, असत्याला सत्याने जिंकता येते, असे मला गीतेतच सांगितलेले आढळून येते आहे,' असे म्हटले होते.
गांधीजींचे एक स्नेही आणि चरित्रकार रोमा रोलॉं यांनी लिहिले आहे, *"टिळक अधिक जगले असते, तर गांधीजी चळवळीचे एक धार्मिक नेते म्हणून राहिले असते. (राजकीय नेतृत्व टिळकांकडे गेले असते).*
*भारतीय जनतेची अशा दुहेरी नेतृत्वामध्ये वाटचाल किती मनोरम झाले असती!'*
लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्या भूमिकांतील फरक प्रसिद्ध लेखक आणि अभ्यासक प्राध्यापक
ग. प्र. प्रधान यांनी अतिशय सोप्या शब्दात पण नेमका मांडला आहे. "साध्य-साधनां" बाबत लोकमान्य टिळकांनी त्यांची भूमिका
" 'साधनानाम् अनेकता'- स्वराज्य या ध्येयासाठी अनेक साधने परिस्थितीप्रमाणे वापरावी लागतात- या शब्दात स्पष्टपणे मांडली आहे. लोकमान्य टिळकांची भूमिका वास्तववादी होती असे मला वाटते.
ज्यावेळी इंग्लंडमधील पार्लमेंटच्या समितीपुढे भारताच्या राजकीय आकांक्षा मांडायच्या होत्या, त्यावेळी नामदार गोखले यांनी हे कार्य अत्यंत प्रभावीपणे केले आणि लोकमान्य टिळकांनी त्याबद्दल गोखल्यांना
जाहिरररीत्या आणि 'केसरी'तील अग्रलेखातूनही धन्यवाद दिले होते. म्हणजे नेमस्त कार्यपद्धती हे एक साधन म्हणून लोकमान्य टिळकांना मान्य होते. त्यांनी याच पातळीवर गांधीजींच्या सत्याग्रहाला ही मान्यता दिली होती. परंतु अहिंसक सत्याग्रह हाच एकमेव मार्ग आहे ही मात्र टिळकांची भूमिका नव्हती. *पूर्णपणे अहिंसक पद्धतीने शस्त्राशिवाय राज्यसंस्था चालू शकत नाही आणि देशाचेही रक्षण होऊ शकत नाही, हे वास्तव गांधीजींनी आपल्या उत्तरायुष्यात मान्य केलेले दिसले.* काश्मीरमध्ये टोळीवाल्यांच्या व पाकिस्तानच्या आक्रमणाला तोंड देण्यासाठी सैन्य पाठवण्याच्या निर्णयाला त्यांनी दिलेला पाठिंबा व रझाकारांचे अत्याचार वाढल्यानंतर निजामी सरहद्दीवर हैदराबाद स्टेट काँग्रेसने प्रतिकार शिबिरे
उभारल्याबद्दल ,"ठीक आहे अत्याचाराला शरण न जाता, शस्त्राने का होईना प्रतिकार करता आहात,' ही त्यांनी हैदराबाद लढ्याच्या जवळ व्यक्त केलेली प्रतिक्रिया या दृष्टीने महत्त्वाची आहे.
● *त्यांना समजून घेताना*
लेखक :
(निवृत्त न्यायमूर्ती)
श्री नरेंद्र चपळगावकर
राजहंस प्रकाशन, पुणे
पृष्ठ क्रमांक (१७-१८) वरुन साभार.
- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
*मर्द पुरुष*
दुसरी आठवण आहे ती सातारचे नजमुद्दिन खाँसाहेब यांची."सातारच्या उर्दू शाळेला पुण्यातून मदत मिळावी म्हणून ते पुण्यात आले व
डॉ. भांडारकर यांना भेटले. तेवढ्यात 'टाइम्स' आला. लगेच डॉ. भांडारकर यांनी आपल्या वाचकाला बोलून ठळक बातम्या वाचण्यास सांगितले. एक बातमी अशी होती, की रत्नागिरीत खाजगी शाळेतही टिळकांचे चित्र लावण्यात सरकारने बंदी घातली. डॉ. भांडारकर यांना यांचा फार राग आला. ते म्हणाले, "काय या सरकारास म्हणावे तरी काय? जेथे त्यांचा जन्म झाला, तेथे त्यांच्या चित्रास बंदी ! शहाणे सरकार खास चुकते आहे. टिळकांचे व माझे ध्येय व मार्ग भिन्न असले तरी
*बावनकशी सोन्याप्रमाणे तो देशभक्त परमशुद्ध असल्यामुळे आम्हाला तो हवा आहे.*"
न्यायमूर्ती रानडे यांची भावना याच स्वरूपाची होती. एकदा अण्णासाहेब देशपांडे हे रानडे यांना भेटण्यास गेले. असता तेथे बसलेल्या जठार यांनी 'केसरी'त टिळकांनी आपल्याला भरपूर शिव्या दिल्या असल्याचे रानडे यांना सांगितले. त्यावर रानडे म्हणाले, "बळवंतरावांच्या मनगटात सामर्थ्य आहे, म्हणून ते तसे लिहितात. सरकारशी आम्ही कारणांपेक्षा जास्त संबंध ठेवतो, हा खरोखरच आमचाच कमकुवतपणा आहे व याचा त्यांना फार राग येतो. *तो मनुष्य मर्द आहे.* त्यास हे स्वाभाविकच आवडत नाही. तेव्हा त्याने त्याबद्दल आम्हास नावे ठेवल्यास, नव्हे मनापासून शिव्या दिल्यास, ते त्यास शोभण्यासारखे आहे. *दुसरा तरी असा मर्द व निर्भीड मनुष्य आपणात कोण आहे?*"
टिळकांची शैली व युक्तिवादाची पद्धती, महाभारतावरील लेखमाला, स्पेन्सर वरील लेख इत्यादींबाबत धीरगंभीर बनते, तर सामाजिक व राजकीय प्रश्नांसंबंधी ती कमालीची त्वेषपूर्ण होते. अखेरीस ठसा उमटतो तो या शैलीचा मर्दानीपणाचा!
त्यांच्या या शैलीचा गौरव त्यांचा विरोधक जो चिरोल त्यानेही केला आहे. तो लिहितो.....
"With a stubborn and arrogant faith in his religion and his race; he was a born leader of male ruthless fighter though he fought not with this sword but.... with his pain and his tongue. He spoke and wrote English well of his own rugged Maharashtra mahratta language, he was an incomparable master."
( *आपला धर्म व वंश यावर त्यांची अढळ आणि गर्वयुक्त श्रद्धा होती. ते जन्मजात नेते होते आणि कमालीचे निर्घृण लढवय्ये होते.* *पण ते शस्त्राच्या नव्हे तर, लेखणी आणि वाणीच्या सहाय्याने लढत. इंग्रजी भाषेत ते चांगल्यापैकी लिखाण करीत व बोलत आणि त्यांच्या रगेल मराठी भाषेवरील त्यांचे प्रभुत्व अजोड होते.*)
टिळकांचे हे असामान्य भाषाप्रभुत्व त्यांच्या असामान्य व्यक्तित्वातून,
जीवनपद्धतीतून अवतीर्ण झाले होते. कर्मयोगीत्व, विज्ञाननिष्ठा, त्याग, देशप्रेम, देश प्रेमासाठी देहदंड सोसण्याची तयारी यांच्या मुशीतून ही शैली तयार झाली.
*लोकमान्यांच्या चारित्र्याने, व्यक्तित्वाने व या शैलीने तत्कालीन समाज भारावून गेला होता.*
तेव्हाच्या राजकीय व सामाजिक वादांचा धुरळा आता खाली बसल्यामुळे या गुणांचे स्मरण आजही स्फूर्तिदायक होते.
● *बाळ गंगाधर टिळक*
लेखक : कै.गोविंद तळवलकर
मॅजेस्टिक प्रकाशन,मुंबई
(पृष्ठ ८५-८६ व ९६ वरून) साभार
संकलन: दिलीप क्षीरसागर (नासिक)
94 222 45 582
No comments:
Post a Comment