Tuesday, August 4, 2020

किशोर कुमार । दिलीप ठाकूर

आज किशोरकुमारचा वाढदिवस.
यानिमित्ताने २०१४ साली "रविवार लोकसत्ता"साठी लीना चंदावरकरची जुहू येथील गिरी कुंज या निवासस्थानी मी घेतलेली मुलाखत...



मेरे दीवानेपन की भी दवा नहीं..  




किशोरकुमार यांच्या पत्नी लीना चंदावरकर यांनी त्यांच्यासोबतच्या सहजीवनाच्या कथन केलेल्या हृद्य आठवणी..



‘सबकुछ किशोरकुमार’ म्हणजे अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथाकार, गायक, संगीतकार, विक्षिप्त तसेच दंतकथांचा नायक अशी सगळीच विशेषणे त्याला लागतात. त्याच्या अष्टपैलूत्वाची ही ‘लिस्ट’ पुढे न्यायची तर चार संसारांचा अनुभव असणारा पती (पैकी पहिली पत्नी रुमादेवी यांचे वय आज ऐंशी आहे. अमितकुमार त्यांचा मुलगा. दुसरी पत्नी अभिनेत्री मधुबाला फारच थोडा काळ संसाराचे सुख अनुभवू शकली. तिचे दुर्धर आजाराने निधन झाले. तिसरी पत्नी योगिता बालीने किशोरदापासून घटस्फोट घेऊन मिथुन चक्रवर्तीसोबत संसार थाटला. तर चौथी पत्नी लीना चंदावरकर.) 
लीना चंदावरकरला आपल्या पतीबद्दल किती बोलू नि काय बोलू, असे झाले होते. बंगल्यात लावलेल्या किशोरच्या अनेक छायाचित्रांकडे पाहत लीना सांगू लागली, ‘हा माणूस आज आपल्यात नाही हे याक्षणीदेखील मला खरे वाटत नाही, इतके ते अफाट व अलौकिक व्यक्तिमत्त्व होते. नेमकी सुरुवात कुठून करू, हेच समजत नाहीए.’
‘तुमची पहिली भेट आठवते?’ 
‘हो तर! मी आणि माझे पहिले पती सिद्धार्थ बांदोडकर आम्ही दोघे लोणावळ्याला फिरायला गेलो असताना नेमके तेथे किशोरदा त्यांची पत्नी योगिता बालीसोबत तिथे आले होते. मी सिद्धार्थची किशोरदांशी ओळख करून दिली. आमची खूप थट्टामस्करीही झाली. किशोरजींना अभिनेते, पाश्र्वगायक आणि चित्रपटसृष्टीतील एक मजेशीर व वेगळे व्यक्तिमत्त्व म्हणून मी ओळखून व ऐकून होते. आपण ज्या क्षेत्रात वावरतो तिथे अनेकांच्या बाबतीत अनेक गोष्टी आपल्या कानावर येत असतात. त्यातून आपल्या मनात त्या व्यक्तींची प्रतिमा निर्माण होते.’
‘किशोरदांची तेव्हा कोणती प्रतिमा तुमच्या मनात होती?’
‘एक खटपटी-लटपटी करणारा कलंदर! ‘कलंदर’ या शब्दाचा तुम्ही येथे कसा अर्थ घेता ते महत्त्वाचे. पण एकूणच त्यांच्याबाबत सकारात्मक मत होते.’
‘तुमच्या भेटीगाठी कशा वाढल्या?’
‘सिद्धार्थच्या दुर्दैवी निधनानंतर मी पूर्णपणे खचले होते. आपल्या कामात लक्ष घालून मन हलके करणे आणि नव्या आयुष्याला सामोरे जाणे हेच माझ्या हाती होते. अशात एकदा माझ्या ड्रायव्हरने एक टेलिफोन नंबर देऊन मला सांगितले की, अत्यंत महत्त्वाच्या कामासाठी संपर्क करायचा निरोप आहे. तो नंबर किशोरजींचा होता. मी त्यांना भेटले तेव्हा त्यांना एकाच वेळी तीन चित्रपट निर्माण करायचे आहेत असे कळले. १९७९ सालची ही गोष्ट. त्यातल्या ‘प्यार अजनबी है’ या चित्रपटाचे काम सुरू झाले. शूटिंगच्या निमित्ताने आमच्या भेटीगाठी वाढल्या. मी त्यात रमत गेले. आमच्यात तब्बल २०-२१ वर्षांचे अंतर असूनही आमचे छान सूर जुळले. एव्हाना ते योगितापासून वेगळे झाले होते.’
‘तुमचे नाते पती-पत्नीत कसे बदलले?’
‘ते सेटवर नेहमी गाणे गुणगुणत- ‘मेरे दिल में आज क्या है, तू कहें तो मैं बताऊ..’ मला ते नेमकं हेच गाणे का म्हणत हे समजत नव्हतं. त्यांच्या असंख्य गाण्यांतील ते एक होते. पण एके दिवशी त्यांनी मला प्रचंड सुखद धक्का दिला. ते म्हणाले, ‘धारवाडला जाऊन तुझ्या कुटुंबीयांची माझ्याशी लग्न करण्यासाठी परवानगी घेऊन ये.’ यावर मी काय बोलणार? मी नुकतीच पहिल्या संसाराच्या दु:खद धक्क्यातून एव्हाना सावरत होते. किशोरजींची तर तीन लग्ने झाली होती. माझ्या कुटुंबीयांनी तर ‘नाही’ असेच सांगितले. पण किशोरजी ऐकायला तयार नव्हते. एकदा माझ्या वडिलांची त्यांनी भेट घेतली. माझे वडील आर्मी ऑफिसर होते. किशोरजी चक्क त्यांच्यासमोर चटईवर बसले आणि त्यांनी माझ्या वडिलांना एकेक गाणे ऐकवायला सुरुवात केली. पहिले ते सैगल यांचे ‘मैं क्या जानू, क्या जादू है’ हे गाणे गायले. मग ‘फंटूश’मधले ‘दुखी मन मेरे, सुन मेरा कहना’ म्हटले. त्यानंतर ‘सफर’मधले ‘जिंदगी का सफर’ आणि मग ‘जॉनी मेरा नाम’चे ‘नफरत करनेवालो के सिने में प्यार भर दू..’ हे गाणे ते अशा रीतीने गायले, की माझे वडील जागेवरून उठले आणि किशोरजींना जवळ घेत म्हणाले, ‘तुमचा आवाज माझ्यापर्यंत पोचला. तुमचे मन, तुमची भावना मला समजली.’ अर्थात माझ्या वडिलांचा आमच्या लग्नाला असलेला विरोध मावळला होता. तरी मी लग्न करण्यापूर्वी अमितशी चर्चा केली. आमच्या वयात फारसे अंतर नसल्याने तसे करणे मला भाग होते. किशोरजी माझ्या वडिलांशी हॉलीवूडच्या चित्रपटांवर गप्पा करीत.’
‘तुमच्या कशावर गप्पा होत?’
‘दोघेही सिनेक्षेत्रातले असल्याने इथल्या बऱ्याच गोष्टी गप्पांत येणे स्वाभाविक होते. पण त्यांच्याबाबत जे समज-गैरसमज प्रचलित होते व आजही आहेत, तसे ते अजिबात नव्हते. ते कंजुष मुळीच नव्हते. काही वेळा ते खूप लहरी वागत. त्यात त्यांना आनंदही मिळे. खरं तर त्यांना ‘प्रायव्हसी’ पसंत असे. पण नेमके त्यावरून काही समज-गैरसमज होत असतील तर त्याला काय करणार?’
‘तुमच्यासाठी त्यांनी गायलेले पहिले गाणे कोणते, ते आठवते का?’
‘‘मेहबूब की मेहंदी’चे ‘मेरे दीवानेपन की भी दवा नहीं..’ सिनेमात काका (राजेश खन्ना) माझ्यासाठी ते गातो. हे माझ्यासाठीचे किशोरजींचे पहिले गाणे. काका निर्माता झाल्यावर ‘अलग अलग’साठी किशोरजी एक गाणे फुकट गायले. ते आपल्या मैत्रीला जागले.’
‘नहीं जीना, नहीं जीना, तेरे बिन नहीं जीना’ हे ते गाणे..’ मी माहिती पुरवली नि पुढे म्हटले, ‘त्यांचे तुम्हाला आवडणारे सर्वात जास्त आवडते गाणे कोणते?’
‘तेच ते- ‘मेरे दीवानेपन की भी दवा नहीं..’ लीना जोरात हसली व पुढे म्हणाली, ‘बरीच आहेत हो. आता काकांच्या निधनाच्या वेळी त्यातील बऱ्याच गाण्यांची सगळीकडे दखल घेतली गेली.’
‘त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता?’
‘तीन नावे मी आवर्जून घेईन. के. एल. सैगल, मार्लन ब्रॅण्डो व बोरीफ कालौक.’
‘त्यांच्या व्यक्तिगत खाण्या-पिण्यातल्या खोडी वगैरे..’
‘ते सिगारेट ओढत नसत. दारूही पीत नसत. पण त्यांना खाण्या-पिण्याची प्रचंड आवड होती. विशेषत: खीर त्यांना खूपच पसंत होती. ‘गौरी कुंज’मध्ये चांगले खाण्याची कधीच कंजुषी नव्हती.’
‘त्यांचा वाढदिवस साजरा केलात तसं १३ ऑक्टोबरला काही विशेष करणार आहात का?’
‘त्यांची तर रोजच आठवण येते. त्यासाठी विशिष्ट दिवसच कशाला हवा? ते नेहमी म्हणत, ‘मी मेलो तरी लोकांच्या हृदयात कायम असेन.’ मला त्यांचा शेवटचा दिवस अजूनही आठवतो. सकाळी ते उशिरापर्यंत झोपून होते म्हणून मी गमतीत विचारलं- आज मला रजा वाटते. दुपारच्या जेवणानंतर ते म्हणाले, व्हिडीओवर ‘रिव्हर ऑफ नो रिटर्न’ पाहतो. पण थोडय़ा वेळाने त्यांना काहीसे अस्वस्थ वाटू लागले. अशक्तपणामुळे वाटत असेल म्हणून मी डॉक्टरना फोन करते म्हणाले तर ते ओरडले, ‘कशाला डॉक्टर हवा? तो म्हणेल हार्ट अटॅक आहे.’ थोडय़ा वेळाने खरोखरच तसे झाले. माझे दुर्दैव म्हणजे माझी आई, माझा भाऊ अनिल व किशोरजी हे तिघेही दिवाळीच्याच आसपास गेले. सुमीत त्यावेळी अवघा पाच वर्षांचा होता.’
‘किशोरदानी ‘गर्जना’ या चित्रपटासाठी शेवटचे पाश्र्वगायन केले..’ मी म्हणालो.
‘आमच्या रेकॉर्डप्रमाणे ‘वक्त की दीवार’चे त्यांचे गाणे हे शेवटचे प्रकाशित गाणे. चित्रपट पूर्ण होईल त्याप्रमाणे गाण्यांचा क्रम लागतो. त्यांची काही अप्रकाशित गाणीदेखील आहेत. आज अमित व सुमीत देश-विदेशात ‘स्टेज शो’साठी गेल्यावर किशोरजींच्या प्रत्येक गाण्याला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद अनुभवताना रोमांचक वाटते. मला त्यांचा जेमतेम सात वर्षांचा सहवास लाभला. पण त्यांच्या आठवणी व मोठेपण विसरता येणार नाही..’ 
गौरीकुंज बंगला आजही किशोरकुमारचा म्हणून का ओळखला जातो, याचे उत्तरच जणू लीना चंदावरकरच्या या भेटीत मिळाले  
-दिलीप ठाकूर  
==========

No comments:

Post a Comment