[15/08, 20:15] Charudatta Kulkarni: १५ ऑगस्ट १९७५:- स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर "शोले" सिनेमा थिएटरमध्ये झळकला
आजचा दिनविशेष
१५ ऑगस्ट १९७५ :-
स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर "शोले" सिनेमा थिएटरमध्ये झळकला.
या सिनेमातील सर्वच कलाकारांनी अविस्मरणीय भूमिका वठवल्या. म्हणूनच हा सिनेमा हिंदी सिनेसृष्टीतील मैलाचा दगड ठरला आहे. आजची तरुणाईसुद्धा या सिनेमाला पसंतीची पावती देते. रेल्वेच्या इंजिनाने लाकडाच्या ओंढक्यांना उडवण्याचा प्रसंग या चित्रपटाच्या पोस्टरवर छापण्यात आला होता. पनवेल ते रोहा या त्या काळात एकाकी असलेल्या रेल्वे मार्गावर या चित्रपटाचं चित्रीकरण केलं होतं.
'शोले' प्रदर्शित होणार, एवढ्यात "फिल्म में जो कॉमेडी पोर्शन है, यह फिल्म के टोन के साथ मेल नहीं खा रहा है! लिहाजा इसे काट दें तो अच्छा रहेगा!!' असा अनाहूत सल्ला कोणीतरी दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना दिला. काहीशा नाराजीनेच त्यांनी जगदीप आणि असरानींचा रोचक भाग काढून चित्रपट प्रदर्शित केला. चार आठवडे झाले तरी "शोले'ने मुंबई वगळता इतर ठिकाणी विशेष कामगिरी नोंदवली नव्हती. मुंबईतील मिनर्व्हा थिएटरमध्ये मात्र तिकिटे ब्लॅकने विकली जात होती. अखेर रमेश सिप्पींना यामागचे रहस्य उमगले. मिनर्व्हाचा पडदा ७० एमएमचा होता. येथे प्रदर्शित झालेली प्रिंट लंडनहून प्रोसेस होऊन आलेली मूळ प्रिंट होती, ज्यात जगदीप आणि असरानींचे सर्व भाग जसेच्या तसे होते. एकंदर हाणामारी, दहशतीच्या वातावरणात ही दोन पात्रे प्रेक्षकांना विरंगुळ्याचे काही क्षण देत होती. शेवटी मिनर्व्हाप्रमाणेच "अंग्रेजों के जमाने के जेलर' आणि "सूरमा भोपाली' यांच्यासह पुन्हा चित्रपटगृहांत "शोले' दाखल झाला आणि त्याने इतिहास घडवला.
या सिनेमासाठी पटकथालेखक सलीम-जावेद यांनी खूप मेहनत घेऊन संवाद लिहिले होते. अपेक्षा ही होती की, दोन पात्रांमधले हे संवाद गाजतील, प्रेक्षकांच्या मनावर कोरले जातील. परंतु प्रत्येक कलाकाराने ज्या पद्धतीने या संवादातल्या सवालांचं सोनं केलं, आणि त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळाला, नव्हे हे सवालच "शोले'चे संवाद म्हणून प्रचंड लोकप्रिय झाले. अब तेरा क्या होगा कालिया?.. इतना सन्नाटा क्यों है भाई? कितने आदमी थे? याला काय संवाद म्हणायचे? पण हाच तर खरा चमत्कार आहे. "शोले'ची कथा आधी कितीतरी निर्माता-दिग्दर्शकांनी नाकारली होती, हेही एक वास्तव होतं. प्रकाश मेहरासारख्या पारखी नजर असलेल्या दिग्दर्शकानेसुद्धा धोका समजून पाठ फिरवली होती. पण जीपी सिप्पी-रमेश सिप्पी हे दोघे डेअरिंगबाज लोक होते. सांबा, कालिया, सूरमा भोपाली, बसंती, धन्नो असी सगळी पात्रं या सिनेमात भाव खावून गेली होती. सिनेमातील छोटी-छोटी पात्रंही आजही रसिक विसरु शकलेली नाही. सिनेमा इतका मोठा हिट होईल याची कल्पना सिनेमाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनीही केली नव्हती.
शोलेच्या कथेतील अनेक कलाकार हे पटकथालेखक सलीम-जावेद जोडीने 'निर्माण' केले होते. म्हणजे चित्रपटातील "ठाकूर बलदेवसिंग" हे समील खान यांच्या सासर्याचे नाव आहे, जय-वीरू ही त्यांच्या शाळेतील मित्रांची नावे आहेत तर "गब्बरसिंग" नावाचा एक डाकू खरोखरच ५०च्या दशकात होऊन गेला होता ज्याचे किस्से त्यांनी वडिलांकडून ऐकले होते.५० च्या दशकात चंबळमध्ये या डाकूची दहशत पसरली होती. या गब्बरचा लोकांचे नाक कापणे हा आवडता छंद होता.गुजरांचे गाव असलेल्या डांग गावातच १९२६ मध्ये गब्बरचा जन्म झाला होता.त्यावेळी उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशासह तीन राज्यांच्या पोलिसांनी गब्बर सिंगवर २५ हजारांचे बक्षिस ठेवले होते. मात्र त्याला पकडणे अशक्य होते. त्यामुळे ५० च्या दशकात पोलिसांनी बक्षिसाची रक्कम वाढवून ५० हजार रुपये केली होती. देशातील तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरुसुद्धा चंबळच्या परिस्थितीमुळे चिंतित झाले होते.डाकू गब्बर सिंगवर आधारित अनेक किस्से तत्कालीन आयपीएस ऑफिसर केएफ रुस्तमजींच्या डायरीत नमूद होते. रुस्तमजी ५०च्या दशकातील मध्य प्रदेश पोलिसांचे महानिरीक्षक होते आणि ते दैनंदिन डायरी लिहायचे.नोव्हेंबर १९५९ मधअये डीएसपी मोदी यांना रामचरण नावाच्या एका व्यक्तीने गब्बर सिंगविषयीची माहिती दिली होती.१३ नोव्हेंबरच्या दिवशी पोलिसांना गब्बरच्या ठिकाणाची माहिती मिळाली आणि पोलिसांना दोन्ही बाजुने वेढे घालून गोळीबार सुरु केला.एक ग्रेनेड गब्बर सिंगच्या बाजुला पडले. त्यामुळे गब्बर गंभीर जखमी झाला. काही वेळाने चंबळचा कुख्यात डाकू गब्बरचा खात्मा झाला. पोलिसांना संपूर्ण गँगला कंठस्नान घातले. हा हल्ला गावातील लोकांसमोर झाला होता. एका रेल्वेच्या छतावर उभे होऊन लोक हे बघत होते.
"शोले'च्या अख्ख्या टीममध्ये नशिबाने दान पदरात पडलेले दोनच नट होते. त्यातला एक अमजद खान आणि दुसरा अमिताभ बच्चन. रमेश सिप्पीने ‘शोले’च्या निर्मितीला हात घातला, अमिताभ यांचे ओळीने सात सिनेमे फ्लॉप झाले होते.तेव्हा "फ्लॉप' असा शिक्का बसलेला अमिताभ अक्षरश: रिकामटेकडा बसलेला होता. कुणीही निर्माता-दिग्दर्शक त्याला काम देण्याचा धोका पत्करत नव्हता. जयच्या भूमिकेसाठी शत्रुघ्न सिन्हाला रमेश सिप्पींनी जवळपास नक्की केले होते. त्यासाठी त्यांनी एक पार्टी ठेवली होती. धर्मेंद्र, हेमामालिनी आणि शत्रुघ्न सिन्हा हे त्या पार्टीत प्रामुख्याने झळकत होते, त्यांच्यावरच फोटोग्राफर्सचे कॅमेरे रोखलेले होते. पण अंगात १०२ ताप असूनही ‘शोले’त काम मिळेल, या आशेने पार्टीत सामील झालेल्या अमिताभकडे कुणाचं लक्षही नव्हतं. त्या वेळी कुणीतरी वितरक अमिताभकडे बघत रमेश सिप्पींच्या कानात कुजबुजलाही होता, 'यही है आप की स्टारकास्ट, उस लंबुजी का सोचना भी मत…' पुढे एकापेक्षा एक तगड्या कलावंतांची यादी लांबत गेली, तसे रमेश सिप्पी सावध झाले, सगळं काही सांभाळून घेता येईल, पण या स्टार लोकांचे अहंकार कोण सांभाळेल? सलीम-जावेदने शांत आणि अंतर्मुख स्वभावाच्या अमिताभचं नाव पुढे केलं. धर्मेंद्रने त्याला दुजोरा दिला आणि तोवर फ्लॉप ठरलेला लंबुजी जयच्या भूमिकेत अलगद शिरला…"शोले’तला जयच्या मरणाचा सीन आयकॉनिक नव्हे, तर पुढे येणाऱ्या अमिताभच्या अनेक सिनेमांच्या यशाचं परिमाणही ठरला.
निर्मिती अवस्थेच्या प्रारंभापासून ‘शोले’तला अमजद खान हा एकमेव नट असा होता, जो सगळ्यात असुरक्षित होता, ज्याच्या क्षमतांबद्दल अगदी शूटिंगच्या अखेरच्या दिवसांपर्यंत सहकारी कलावंत-तंत्रज्ञांना(अॅडिशन) शंका होत्या. मुळात हा रोल डॅनीच साकारणार होता, तशी सर्व तयारी निर्माता-दिग्दर्शकाने केलेली होती. पण, डॅनीने ‘धर्मात्मा’साठी ‘शोले’वर पाणी सोडलं. पण एवढी मोठी संधी मिळाल्यावर गब्बर सिंग साकारणाऱ्या अमजद खानला शूटिंगच्या पहिल्या सत्रात जराही सूर गवसला नव्हता.पुढे महत्प्रयासाने अमजद खानने व्यक्तिरेखेवर ताबा मिळवला.सिनेमातील अमजद खानच्या अप्रतिम अभिनयाने गब्बरच्या भूमिकेला चार चॉंद लावले.
बंगळूरुजवळील रामनगर येथे रामगडचा सेट उभा करण्यात आला होता. आज या भागाला रामगड या नावानेच ओळखले जाते. शूटिंगवेळचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. उदाहरणार्थ, हेमामालिनी यांच्यासोबत अधिकाधिक रिटेक करण्याची संधी मिळावी यासाठी धर्मेंद्र स्पॉट बॉईंजना पैसे देऊन सीन खराब करायला सांगत होते. अभिनेता संजीव कुमार यांना खर तरं वीरुची भूमिका करायची होती. मात्र, रमेश सिप्पींनी त्यांना कनव्हिंन्स करुन ठाकूरची भूमिका दिली. ठाकूर हे हिंदी सिनेमातील अजरामर पात्रांपैकी एक कॅरेक्टर आहे. सिनेमातील संजीव कुमारांच्या अभिनयाने सगळ्यांचीच वाहवा मिळविली. सिनेमातील 'त्यांचा ये हात नही फॉंसी का फंदा है' हा डायलॉग तुफान हिट झाला होता.
सिनेमाच्या यशात सिनेमाच्या संगीताचाही मोलाचा वाटा आहे. आर.डी.बर्मन यांच्या संगीताची जादू चांगलीच चालली. एकापेक्षा एक सरस गाणी सिनेमात होती. शोलेचा रिमेक बनविण्याचाही बऱ्याच जणांनी प्रयत्न केला मात्र त्यांना तोंडघाशीच पडावं लागलं. शोलेचा रिमेक बनविणे केवळ अशक्य आहे. कारण 'शोले'सारखा सिनेमा पुन्हा होणं शक्य नाही.
साभार :- दिव्यमराठी
[15/08, 20:49] Charudatta Kulkarni: शोले !
आज, १५ ऑगस्टच्या दिवशी शोले रिलीज झाल्याला ४५ वर्ष झाली भावांनो. आमच्या मागच्या पुढच्या दोन जनरेशनला 'पिच्चर' म्हंजे 'शोले' एवढंच माहीतीय. किती आले किती गेले. शोलेचा नाद नाय करायचा !! आजपन शोले कुठल्याही चॅनलवर लागलेला दिसू दे, पाच मिन्टं तरी चॅनल बदलत नाय आमी !!!
जय,वीरू,बसंती,ठाकूर,बहू, गब्बरसिंग पासून सांबा,रामलाल,मौसी,अहमद,चाचा,कालीया पर्यन्त... अगदी 'सुनो गांववालोंS' म्हणत गब्बरचं पत्र वाचून दाखवणारा तो गांवकरी, 'अरे भई ये सुसाट क्या होता है' म्हणणारा म्हातारा, मेहबूबा मेहबूबा वर थिरकणारी हेलन, मेंडोलीन वाजवत गाणारा आगा प्रत्येक व्यक्तीरेखेनं मनात घर केलंय...आर.डी.चं संगीत, माऊथ आर्गनचे सूर, रमेश सिप्पीचं डायरेक्शन, रामगढचा भव्य सेट... अग्ग्गदी अहमदची खबर मिळाल्यावर गब्बर हातावर फिरणार्या मुंगळ्याला मारतो, तो मुंगळाही 'नीट' लक्षातय.
...पण एक माणूस असाय ज्याचा 'शोले'च्या यशात अक्षरश: सिंहाचा वाटा आहे.. प्रचंड कष्ट आहेत त्याचे शोलेमध्ये..पण तो कायम पडद्यामागं राहीला.. कायम ! तो माणूस मराठी आहे !! द ग्रेट एडिटर एम. एस. तथा माधवराव शिंदे !!!
..खुप कमी जणांना माहिती असेल, 'शोले' ला त्या वर्षी 'फिल्मफेअर'ची ९ नामांकने होती पण ॲवाॅर्ड फक्त एकच मिळालं.. ते माधवरावांना होतं.
ज्यांना त्या काळातल्या अतिशय किचकट एडिटींग पद्धतीविषयी कल्पना नसेल त्यांच्यासाठी सांगतो..शोले सारख्या भव्य 'कॅनव्हास' असलेला सिनेमा एडीट करणं हे त्या काळात खायचं काम नव्हतं ! लै जबरदस्त मेहनत केली या माणसानं.. शूट झालेली ती फिल्म होती तब्बल ३००,००० फूट ! सोप्या भाषेत सांगायचं तर ती फिल्म जर सरळ उलगडत रस्त्यावर पसरली तर तब्बल ९२ कि.मी. भरेल. अशा डोंगराएवढ्या राॅ स्टाॅक ची प्रत्येक फ्रेम - प्रति एक फ्रेम - 'अभ्यासून', कापून ,जोडली या माणसानं... भल्याभल्यांना तोंडात बोटं घालायला लावेल असं काम शिंदेंसारख्या आपल्या मराठी माणसानं केलं. त्यांना पगार होता दरमहा २००० रूपये..
माधवरावांचे कित्येक 'कट्स' आजही 'एडिटींग अभ्याक्रमात' अभ्यासाला आहेत...दुर्दैवानं या त्रिवार सलाम !
- किरण माने.
[15/08, 20:51] Charudatta Kulkarni: #CinemaGully
सिनेमा सिनेमा
लिबर्टी थेटर मध्ये लगबग होती, लग्नकार्याचे वातावरण होते, आत गेल्यावर अतिशय सुंदर सजावट केली होती, सिनेमा चे पोस्टर्स जागोजागी लावले गेले होते. आमच्या मुलींच्या ग्रुप साठी हे नवीन नव्हते कारण आमची इथे येण्याची ही पाचवी वेळ होती, सिनेमा होता अर्थातच हम आप के है कौन...
हम आप के है कौन ने single handedly पब्लिक ला थेटरात खेचून आणलं, म्हणजे त्या आधी बरेच चित्रपट थेटरात लागत होते लोकं जात ही असत, परंतु या चित्रपटाने सिनेमा थेटर चे हरवलेले ग्लॅमर मिळवून दिले. बऱ्याच वर्षांनी लोकांनी फुलून गेलेल्या आणि सजलेल्या त्या वास्तूलाही गदगदून आले असेल.
फ्लॅशबॅक , माझा जन्म माझ्या सुदैवाने सिनेमा प्रेमी घरात झाला आणि त्याला पोषक अश्या परिसरात, गिरगावात झाला, गिरगावात आमच्या बिल्डिंग च्या डायगोनली समोर सेन्ट्रल सिनेमा हे थेटर होते, तसेच रॉक्सि, ऑपेरा हाऊस, ही चालत जाण्यासारखी थेटर्स होती, आज्जीने देव आनंद चा CID लेके पेहला पेहला प्यार या गाण्यापर्यंत अठरा वेळा पाहिला हे ऐकून होते, त्यामुळे सिनेमा चे वेड हे रक्तातच होते आणि आहे. पहिला पाहिलेला सिनेमा आठवत नाही पण तेव्हा आम्ही सगळं कुलकर्णी खानदान एकत्र सिनेमा पाहायला जात असू हे आठवतंय, रात्रीचे जेवण झाले की अचानक कोणाचा मूड येत असे,मग जमवाजमव करून सगळी गॅंग एकत्र जात असे. एक किस्सा आठवतोय, काकाने सगळ्यांची म्हणजे 10-12 असतील किंवा त्या पेक्षा जास्त अगदी माझी तेव्हा तान्ही असणारी बहीण धरून , एका सिनेमा ची तिकीट्स काढली, सगळं लटांबर आपापल्या जागांवर स्थानापन्न झालं, अंधार झाला आणि अचानक स्क्रीन वर महेश कुमार अँड पार्टी प्रेसेन्ट्स "तमेरे चम्पे अमे के" अशी पाटी झळकली, सगळी रांग च्या रांग तडक उठून बाहेर, अर्थात त्या नंतर नाउमेद न होता लगेच दुसरा सिनेमा बघण्यात आला.
नंतरची एक आठवण , मी लहान होते, पण एक सस्पेन्स सिनेमा पाहायला गेले होते, आई होती , मला वाटतय नाव होतं सबुत (विद्या सिन्हा) होती बहुतेक, मी प्रचंड घाबरले होते आणि तोंड खुर्चीत लपवून बसले होते. पण त्या वातावरणाची झिंग चढायची हे मात्र खरे, तसेच समोरच सेन्ट्रल सिनेमा असल्यामुळे माझ्या बहिणींबरोबर त्या काळी जितेंद्र श्रीदेवी जयाप्रदा चे तद्दन साऊथ टाईप सिनेमे पाहण्याचा धडाका लावल्याचे आठवतेय, थेटर च्या तिकीट विंडो चा माणूस आमच्या ओळखीचा झाला होता, तेव्हा समहाऊ आजूबाजूची लोकं काही वाह्यातपणा करत नसत, म्हणजे मला तरी असा अनुभव आला नाही, त्यामुळे सिनेमा बघायला जाणे हे काही वाईट आहे असे कधी जाणवले नाही. सेफ वाटत राहिलं. माझ्या आई चं माहेर माहीम ला होतं, आणि तिथे योगायोग म्हणा, पण बादल बिजली बरखा अशी तीन थेटर्स होती, त्यामुळे तिथेही सिनेमा हा मस्ट असे, प्लाझा थेटर हे तर खासच वाटे, म्हणजे काहीतरी स्पेशल वेगळं, युनिक, राजकमल स्टुडिओ मधले अनेक प्रॉप कदाचित तिथे ठेवले गेले असतील, त्यांची ती भव्य पोस्टर्स, तो लाल पडदा, अनेक कलात्मक शिल्पे, भारी वाटायचं, बनवाबनवी तसेच सुबह (हिंदी उंबरठा), महान हे तिथे पाहिल्याचे आठवतात.
फोर्ट तेव्हा जवळ होतं, त्यामुळे तिथे स्पेशल इंग्लिश सिनेमे पाहिले जायचे, मेट्रो, इरॉस, रिगल, लिबर्टी, मध्ये आफ्रिकन सफारी, beautiful people, sound of music, हे सिनेमे अगदी भारावून जाऊन पाहिलेले आठवतात, mackenna's gold मिस झाल्याचे वाईट वाटते, मेट्रो ला तेव्हाचा पहिला 3d छोटा चेतन एन्जॉय केल्याचे आठवते.
अशी थेटर्स होणे नाही, एक नशा होती ती, थेटर मध्ये आत गेल्यावर इतर ठिकाणी अभावाने दिसणारा गालिचा, सहसा लाल रंगाचा, मखमलीचा, लाल पडदा, दोन्ही बाजूनी सोडलेले गोल्डन सुळसुळीत पडदे, तो intoxicating वास मिश्र ,शरीरांचा, पानाचा, जुन्या गालीच्याचा, पॉपकॉर्न चा, चोकोबर आईस्क्रिम चा, हवाहवासा , आजही थेटर मध्ये गेले की तो वास भरून घेते, आजकाल पॉपकॉर्न चा prominant वास येतो पण तरीही तो वास वेगळाच.
70s की 80s मध्ये, सिनेमा सिनेमा नावाचा हिंदी सिनेमा वर आणि त्याच्या वेड्या प्रेक्षकांवर आधारित एक सिनेमा केला गेला होता ,बहुतेक युट्युब वर तो उपलब्ध आहे, नक्की बघा, त्यात भारतीयांच्या सिनेमा वेडावर अगदी इत्यंभूत दाखवले आहे, अगदी प्रेक्षकांच्या एक्सप्रेशन्स सकट, दुःखी सिन ला रडणारी लोकं, गाण्यावर पैसे उडवणारी, फैटिंग सिन ला चेकाळणारी, लव सिन ला चेहऱ्यावर एक लाजरे स्माईल असणारी अशी ही वेडी जनता, सिंगल स्क्रीन थेटर ची मजा या सिनेमा मधून घेता येईल.
नंतर आमचं उपनगरात स्थलांतर झालं, अचानक सिनेमाच्या पंढरीतून कुठे आलो असे वाटले पण मग तिथेही आहे त्यात समाधान मानून घेतले कारण चित्रपटवरचे प्रेम, शोले हा माझ्या जन्मा आधी रिलीज झालेला सिनेमा, पुनःप्रदर्शीत झाला तेव्हा आम्ही तो इथल्या थेटर मध्ये पहिला, त्यावेळी लक्षात राहिलेला ट्रेन चा पाठलाग करणारे डाकू आणि त्यांचा तो 70mm चा पडदा व्यापून टाकणारा थरारक पाठलाग, विसरुच शकत नाही, तसेच तेव्हा शेजारच्या सीटखालून गेलेला उंदिरमामाही लक्षात राहील, असो तिथेही आमचे वेड कमी झाले नाही , आमचा सहकुटुंब सहपरिवार सिनेमा ला जायचा सिलसिला तिथेही चालू राहिला, लमहें, आइना, ddlj, वगैरे सिनेमे एकत्र पाहून मग त्यावरचं हॉट डिस्कशन , एक वेगळीच मजा होती. सत्या, मुन्नाभाई , लगान, च्या वेळी अनुभवलेला स्टॉल मधला मास histeria विसरुच शकत नाही. लोकांच्या प्रतिक्रिया अनुभवणे हा ही एक स्वतंत्र अनुभव आहे, आज मला खूप डिस्टर्ब होतं कुणी बोलत असेल किंवा मोबाईल चा लाईट डोळ्यावर आला की, पण तेव्हा लोकं क्रेझी व्हायची आम्ही कधीकधी उभे राहून पण पाहिलेत काही सिनेमे, that was single screen magic.
मग लग्न झाल्यावर, कुछ कुछ होता है बघायला इंटरवल च्या आधी गेलो आणि माझे आयुष्य खरंच बदललंय याची जाणीव झाली, सिनेमा पाहायला अर्धा तास आधी जाणारी मी, आणि कुठूनही सिनेमा पाहून तितकेच एन्जॉय करणारा नवरा, युनिक कॉम्बिनेशन, तो गोविंदरावांचा पंखा, गोविंदरावांचे सिनेमे कुठूनही पाहू शकतो त्यामुळे आधी जायलाच हवं असं काही नाही,
हळुहळु बिचारा माझ्यामुळे वेळेवर सिनेमे पाहू लागला , त्यातल्या त्यात एक समाधान की त्यालाही माझ्यासारखीच सिनेमे बघायची आवड. आता अनेक ठिकाणची थेटर्स पहिली , प्रत्येक वेळी तोच उत्साह, तीच हुरहूर, अजूनही टिकून आहे.
आज माझा मुलगा थेटर मध्ये सिनेमा पाहणे पसंत करतो, कारण त्याला सिनेमा ला न्याय देणे काय असते हे न सांगता कळले आहे, त्याच्या सुदैवाने/ दुर्दैवाने त्याला बरेच ऑप्शन उपलब्ध आहेत, तरीही तो इनसिस्ट करतो की हा मुव्ही बिग स्क्रीन वर मस्त वाटेल बघायला. नकळत आपले genes त्यात उतरले आहेत याचा आनंद होतो,
गुलाबजाम चित्रपटातला शेवटचा सिन आठवतो, थेटर ची अंधुक प्रकाशातली, लाल रंग असलेली लॉबी, त्याच्या भिंतींवरची पोस्टर्स, जादुई दुनियेची सफर घडवणारा नागमोडी वळणाचा कॉरिडॉर, काही काळ तरी आपल्या विवंचना विसरायला लावणारा,, हवाहवासा अंधार....
जुईली
[15/08, 20:55] Charudatta Kulkarni: हॅपी बर्थडे बाॅस!
आर. डी. बर्मन अर्थात पंचम अर्थात पंचमप्रेमींच्या ‘बाॅस’चा आज हॅपी बर्थडे…
त्यानिमित्ताने 'आर. डी. बर्मन : जीवन संगीत' या अनिरुद्ध भट्टाचार्य आणि बालाजी विठ्ठल यांनी लिहिलेल्या मूळ राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या सांगितिक चरित्रग्रंथाच्या इंद्रायणी साहित्य प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या मराठी अनुवादातला हा एक संकलित लेख. हा अनुवाद करण्याचं सौभाग्य मला लाभलं होतं…
शोले : संगीत आणि पार्श्वसंगीत
शोले जॉन स्टर्गीजच्या द मॅग्निफिसंट सेव्हनवर आधारलेला होता, याची कबुली जावेद अख्तर यांनी नसरीन मुन्नी कबीरकडे एका मुलाखतीत दिली होती.
वीरू आणि जय हे नायक मात्र बुच कॅसिडी अँड द सनडान्स किड (1969) या सिनेमावरून घेतले असावेत. धर्मेंद्रने दारू पिऊन पाण्याच्या टाकीवर चढून केलेला तमाशाही नवा नव्हता. किशोर कुमारने चाचा झिंदाबादमध्ये (1959) आणि अँथनी क्विनने द सिक्रेट ऑफ सान्ता व्हिट्टोरियामध्ये (1969) हीच धमाल केली होती. दोन्ही बाजूला एकच चित्र असलेलं नाणं उडवून आपल्याला हवा तो निकाल मिळवण्याचा प्रकार हेन्री हॅथवेच्या गार्डन ऑफ एव्हिलमधून (1954) किंवा मार्लन ब्रँडोच्या वन आईड जॅकमधून (1961) घेतला असावा.
पण, संगीताचं काय?
शोले हा एक ऍक्शनपट असल्यामुळे त्याच्या 188 मिनिटांच्या कालावधीत कान बधीर करणार्या ट्रम्पेटच्या किंकाळय़ा आणि 85 पीसच्या ऑर्केस्ट्राची ढॅणढॅण ऐकायला मिळेल, असंच प्रेक्षकांना अपेक्षित असायला हवं होतं. पण, त्यांच्या कानावर जे पडलं, ते फारच वेगळं होतं.
सिनेमात गाणी ही संकल्पना आपल्या उपखंडातली. अगदी व्याख्येबरहुकूम जायचं, तर गाण्यांनी सिनेमात कसलीही कथात्म भर पडत नाही, सिनेमॅटिक अभिव्यक्ती पातळ होते- अपवाद फक्त म्युझिकल्स म्हणजे गाण्यांमधूनच उलगडणार्या संगीतिकेचा. सिनेमाच्या एकूण परिणामात आणि आकृतीबंधात गाण्यांपेक्षा पार्श्वसंगीताचा वापर किंवा अभाव यांची महत्त्वाची भूमिका असते.
शोलेचं पार्श्वसंगीत सिनेमाच्या कथनशैलीच्या गाभ्याचा हिस्सा होतं. ठाकूर, गब्बर, वीरू आणि जय यांच्या खालोखाल पार्श्वसंगीत ही या सिनेमाची त्यांच्याच बरोबरीची पाचवी मिती होतं.
सर्जिओ लिओनीच्या वन्स अपॉन अ टाइम इन द वेस्टमधल्या (1968) हेन्री फोंडाने केलेल्या हत्याकांडाच्या धाटणीवर गब्बरने ठाकूरचं सगळं कुटुंब मारून टाकण्याच्या प्रसंगामध्ये फक्त गोळीबाराचे आवाज ऐकायला येतात. त्यांना जोड असते डोंगरउतारावरून खाली येणार्या घोडय़ांच्या टापांची आणि हिरवळीवरच्या झोक्याच्या करकरण्याची. या प्रसंगात ऍक्शनचा भाग कमी आहे, दहशतीचा अधिक.
जयच्या अंत्यसंस्काराच्या वेळी फक्त सुकं लाकूड जळताना तडतडल्याचा आवाज आणि त्याला हार्मोनिकाची साथ.
`कितने आदमी थे?'च्या प्रसिद्ध प्रसंगात गब्बर आपल्याच साथीदारांबरोबर रशियन रूलेचा गेम खेळतो आणि त्यांना भीतीने अर्धमेले केल्यानंतर बेसावध स्थितीत असलेल्या तिघांनाही एकाच वेळी उडवून देतो, त्या प्रसंगात भयकारी मरणसूचक आरोळीच फक्त मागे गुंजत राहते. हा जबरदस्त इफेक्ट केरसी लॉर्ड यांचा ऑर्गन, बासू चक्रवर्ती यांचा चेलो, देशी बनावटीचा हायड्रोफोन आणि एक प्रिरेकॉर्डेड टेप लूप यांच्या साहय़ाने तयार करण्यात आला होता- तो असामान्य आहे.
ठाकूरसमोर जेव्हा त्याच्या कुटुंबियांचे मृतदेह पडलेले असतात, तेव्हा मागे गब्बरची थीम वाजत असते आणि त्याला व्हायोलिनच्या समूहस्वरांची जोड असते. ठाकूर शोकसंतप्त सुडाने पेटून गब्बरला गाठण्यासाठी त्याच्या अड्डय़ाकडे धाव घेतो, त्याचं सूचन या पार्श्वसंगीतातातून होतं. उच्चस्वरात वाजणारे व्हायोलिन्सचे स्वर चरमोत्कर्षाला पोहोचून अचानक थांबतात. कारण, त्या क्षणी ठाकूर गब्बरच्या तावडीत सापडलेला असतो. त्याचे साथीदार ठाकूरला, त्याचे बाहू फैलावलेल्या स्थितीत बांधतात. पुन्हा सिंथेसाइझ्ड संगीताचा तुकडा कानावर पडू लागतो, तीच ती मुडदेफरास आरोळी घुमू लागते. गब्बर ठाकूरच्या जवळ येतो आणि मग किंकाळी. कट टु वर्तमानकाळ. ठाकूरच्या घशातून एक बारीकसा दचकल्याचा आवाज बाहेर पडतो आणि त्याच्या खांदय़ावरून शाल पडते. त्याच्या थोटय़ा हातावरच्या रिकाम्या बाहय़ा फडफडत असतात. या ठिकाणी आपल्याला ऐकायला येते वार्याची हलकी शीळ. आधीच्या प्रसंगातलं भयंकर क्रौर्य गडद करण्यासाठी तिची तीव्रता थोडी वाढवण्यात आलेली आहे.
क्लायमॅक्साला ठाकूर वीरूला सांगतो, गब्बरला माझ्याकडे सोपव. तेव्हाही सिनेमाभर वाजलेली ओळखीची धुन अंगावर काटा आणते.
डाकूंनी बसंतीचा पाठलाग करण्याच्या प्रसंगात पंचमने केलेला तबल्याचा वापर अनोखा होता. अशा प्रसंगांमध्ये सहसा व्हायोलिन्स किंवा ऍकॉर्डियनचा वापर करण्याचा प्रघात होता.
पंचमच्या मृत्यूनंतर मूव्ही मॅगझिनच्या फेब्रुवारी, 1994च्या अंकात प्रकाशित मुलाखतीमध्ये रमेश सिप्पीने म्हटलंय, `शोलेच्या पार्श्वसंगीतासाठी पंचमने काही नावीन्यपूर्ण कल्पना सुचवल्या. बग्गीच्या पाठलागाच्या प्रसंगाला त्याने दिलेलं संगीत मला आठवतंय. त्याने फक्त घोडय़ाच्या टापांबरोबर तबला, ढोलक आणि घुंगरू यांचा आवाज वापरला. ही अगदी साधी कल्पना होती. पण, तिने त्या प्रसंगाची परिणामकारकता प्रचंड प्रमाणात वाढवली.'
पंडित सामता प्रसाद यांनी या प्रसंगासाठी एकटय़ाने तबला वाजवला, अशी एक गैरसमजूत प्रचलित आहे. केरसी लॉर्ड सांगतात, `सिनेसंगीत हे सुगम संगीत असतं आणि ते स्थळकाळानुसार बदलून घ्यावं लागतं. पंडित सामता प्रसाद हे माहीर तबलिये आहेत, पण त्यांचं क्षेत्र शात्रीय संगीताचं आहे, सुगम संगीताचं नाही. मारुती राव कीरांनी दुसर्या तबल्यावर ठेका धरून पंडितजींना त्यांचा तुकडा वाजवायला मार्गदर्शन केलं. त्यातून हा यादगार प्रसंग उभा राहिला.'
सगळं गाव झोपलेलं असताना जय ठाकूरच्या हवेलीच्या आवारात एकटा बसून माउथ ऑर्गनच्या सुरांमधून आपली उदासी व्यक्त करत असतो आणि त्याच वेळी ठाकूरची तरुण विधवा सून बाल्कनीतले दिवे एकेक करून मालवत जाते. माऊथ ऑर्गनवरचे ते नितळ सूर या दोघांमध्ये एक अदृश्य धागा निर्माण करतात- एक भुरटा चोर आणि एका भीषण दुपारी सगळी स्वप्नं कायमची संपून गेलेली एक युवती यांच्यातल्या अव्यक्त कोमल भावनेचा धागा.
`अमिताभने पडदय़ावर वाजवलेली मूळ धुन बहुतेक बासू चक्रवर्तीला सुचली होती,' हार्मोनिकावर ती वाजवणारे भानू गुप्ता सांगतात, `अमिताभला या धुनेनुसार ओठांची हालचाल करणं जमत नाहीये, हे लक्षात आल्यावर अशा तपशीलांच्या बाबतीत अतिशय काटेकोर असलेल्या रमेश सिप्पीने अमिताभचं चित्रिकरण प्रोफाइलमध्ये करून तोच हार्मोनिका वाजवत असल्याचा आभास निर्माण केला.'
भानू गुप्ता पुढे सांगतात, `एकदा मी काही महत्वाच्या कामासाठी मुंबईत आलेलो असताना गाडी वेगाने चालवत होतो. ट्रफिक पोलिसाने मला थांबवून लायसन्स मागितलं. त्याच्याशी वाद घालण्यात अर्थ नाही, हे लक्षात आल्यावर मी त्याला कळवळून सांगितलं की मी एक वादक आहे आणि एका रेकॉर्डिंगला चाललोय. पोलिसावर त्याचा शून्य परिणाम झाला. तेव्हा मी त्याला विचारलं, तुम्ही शोलेमधला तो तुकडा ऐकलाय का माऊथ ऑर्गनचा- तो मी वाजवलाय. त्याने मला लगेच सोडलं.'
शोलेमध्ये पटकथेत जेवढं आवश्यक आहे, तेवढंच पार्श्वसंगीत देण्याचा जो संयम पंचमने पाळलाय, तोच त्याची ताकद ठरला. गिटारच्या जोशिल्या कॉर्ड्स, फ्रेंच हॉर्न आणि पर्कशन, तबला तरंग यांच्या पार्श्वसंगीताने रेल्वे स्टेशनकडून रामगडच्या दिशेने येत असलेल्या दोन घोडेस्वारांच्या प्रवासाला साथ मिळते. गावं, शेतं मागं टाकत ते हिरव्यागार निसर्गातून प्रवास करत असताना कॉर्ड आणि बीटच्या माध्यमातून संगीतही लोकसंगीताच्या रांगडय़ा धाटणीकडे वळतं आणि शेवटी दक्षिणा मोहन टागोर यांची तार शहनाई सुरू होते. तिथून पुन्हा ऍकोस्टिक गिटारच्या मूळ कॉर्ड आणि फ्रेंच हॉर्न यांच्या साथीने घोडेस्वार ठाकूर बलदेव सिंह यांच्या बंगल्याच्या दाराशी पोहोचतात.
या ऍकोस्टिकच्या सुरांमध्ये अशी काही झनक आहे जी आपल्याला वाइल्ड वेस्टवाल्या सिनेमांची आठवण करून देते. हॉर्नचा पोकळ सूर अरिष्टसूचक आहे. फ्रेंच हॉर्नच्या आकारामुळे रेकॉर्डिस्ट बी. एन. शर्मा त्याला `जलेबी' म्हणत. तो हिंदी सिनेमात फार क्वचित वाजला आहे आणि त्याचा असा परिणाम तर कधीच ऐकायला मिळालेला नाही.
आजही स्टेज शोजमध्ये मनोहारी सिंह, रमेश अय्यर, किशोर सोढा आणि त्यांच्या टीमला ही लोकप्रिय रोड टय़ून खास मागणीवरून वाजवायला लागते.
शोलेचा टायटल ट्रक राजकमल स्टुडिओमध्ये ध्वनीमुद्रित करण्यात आला होता. तिथे भारतातली पहिली सिक्स ट्रक रेकॉर्डिंग सिस्टम होती. रेकॉर्डिंगनंतर केरसींना हा ट्रक ऐकायचा होता. पण, रेकॉर्डिस्ट मंगेश देसाई ऐकवत नव्हते. अखेर पंचमने हस्तक्षेप केल्यानंतर त्यांनी तो ऐकवला. तेव्हा रेकॉर्डरमध्ये दोष असल्याचं लक्षात आलं. तो तुकडा पुन्हा रेकॉर्ड करावा लागला. शोलेचा टायटल ट्रक रेकॉर्ड करण्याच्या आधी, 1973च्या सुमारास केरसी यांनी मिनी मूग खरेदी केला.
टायटल ट्रक प्रत्यक्षात ज्या सुरात रेकॉर्ड केला होता, त्याच्या वरच्या सुरात सिनेमात डब करण्यात आला. कॉर्डबदलाला भानू गुप्ताही दुजोरा देतात. `पंचमच्या डोक्यात ही धुन पक्की होती. ओपन स्ट्रिंग्ज वापरून हा परिणाम साधण्यासाठी कोणती कॉर्ड वापरायला हवी, हे त्याने आम्हाला विचारलं. भूपी आणि मी त्याला डी वापरण्याचा सल्ला केला. प्रामुख्याने एलपींसाठी गिटार वाजवणारे आर. के. दास हेही रेकॉर्डिंगच्या वेळी आमच्यात सामील झाले. आम्ही तिघांनी मिळून एटीन स्ट्रिंग गिटार वाजवली, असं म्हणता येईल.'
सिनेमात टायटल ट्रक डी-शार्प स्केलवर आहे. रेकॉर्डच्या तुलनेत बहुतेक गाणी सिनेमात वरच्या पट्टीत आहेत. मुंबईच्या रेकॉर्डिंग स्टुडिओंमध्ये, खासकरून निवासी भाग असलेल्या ताडदेवच्या फिल्म सेंटरमध्ये विजेच्या कमी-अधिक दाबाचा म्हणजे व्होल्टेज फ्लक्चुएशनचा फ्रिक्वेन्सीवर विचित्र परिणाम व्हायचा.
`मेहबूबा, मेहबूबा'चा अपवाद वगळता शोलेमधली सगळी गाणी सिच्युएशनल होती आणि त्यांच्या माध्यमातून कथानकात काही ना काही घडत होतं. `ये दोस्ती'मध्ये पुरुषांमधल्या मैत्रभावाचं दर्शन होतं. भारतीय समाजात ही अभिव्यक्ती कॉमन होती. परदेशात मात्र या गाण्यातून, तेव्हा अगदीच अनैतिक मानल्या जाणार्या समलैंगिकतेचा चुकीचा संदर्भ काढला गेला असता. हीरोला वाचवण्यासाठी हेमामालिनी ज्यावर नाच करते, ते `जब तक है जान' हे गाणं राज खोसला यांच्या शरीफ बदमाश (1973) या सिनेमातल्या `मोहब्बत बाजी जीतेगी'ची आठवण करून देतं. तिथेही ती पंचमनेच स्वरबद्ध केलेल्या गाण्यावर नाचली होती. या सिनेमासाठी पहिलं निवडलं गेलेलं गाणं होतं `कोई हसीना जब रूठ जाती है तो'. त्यात नायक नायिकेला यशस्वीरित्या पटवताना दिसतो. `होली के दिन' हे गाणं हिंदी सिनेमातलं आजवरचं सर्वाधिक गाजलेलं होलीगीत असू शकेल. त्याच्या शेवटी गब्बर रामगडवर हल्ला चढवतो आणि गावकर्यांना चढलेला उत्सवाचा ज्वर उतरवतो.
या गाण्यांमध्ये खास पंचमचा स्पर्श लाभलेले अनेक घटक आहेत. रणधीर कपूर सांगतो, `एक दिवस मी पंचमच्या घरी गेलो, तेव्हा पंचम आणि त्याचे सहाय्यक अर्ध्या भरलेल्या बीयरच्या बाटल्यांमध्ये फुंका मारताना दिसले. हे काय चाललंय, असं विचारल्यावर पंचम म्हणाला, मी एक नवा साऊंड तयार करतोय. `मेहबूबा मेहबूबा' या गाण्याच्या सुरुवातीला आपल्याला हाच साऊंड ऐकायला मिळतो.'
रेकॉर्डिंगच्या वेळी हा साऊंड निर्माण केला होता बासू चक्रवर्ती यांनी. त्यांना मादलची साथ होती. पाठोपाठ रबाब आणि उर्दू ढोलक (म्हणजे वरची बाजू खाली धरून वाजवलेला ढोलक) यांचा ठेका देण्यात आला होता.
`जब तक है जान'ची अडतीस सेकंदांची तिसरी इंटरल्यूड स्वतंत्रपणे लघुगीत बनण्याच्या योग्यतेची होती. गुंगूश या इराणी गायिकेला हे गाणं तिच्या `जोमेह' या गाण्यावरच बेतलेलं आहे, असं निश्चितच वाटलं असतं. `ये दोस्ती' या गाण्यातली दोस्तीची मस्ती धमाल रंगतदार आहे, कारण, हे गाणंही `युगुलगीत' आहे- मनोहारी सिंह यांच्या शीळेचे स्वर आणि भानू गुप्ता यांची हार्मोनिका यांच्या युगुलस्वरांचं गीत. या गाण्याने 1970च्या दशकात दोस्तीवाल्या गाण्यांची मालिकाच लावली. या गाण्याचं वर्णन करताना पंडित अजय चक्रवर्ती म्हणतात, `अतिशय आनंदी ते अगदी खोल भावस्पर्शी अशा टोकाच्या भावनांचं दर्शन एका साध्याशा धुनेतून कसं घडवता येतं, याचं हे क्लासिक उदाहरण आहे.' `कोई हसीना'च्या इंटरल्यूडमध्ये प, सा आणि कोमल रे या सुरांचा वापर आहे. हेच सूर आपल्याला `चिंगारी कोई भडके'च्या प्रिल्यूडच्या गिटारस्वरांमध्ये आधी भेटलेले आहेत. हे साम्य अगदी तयारीच्या श्रोत्याच्याही लक्षात येत नाही. पंचमने जणू पुदोव्हकिनच्या कटिंग आणि एडिटिंग या विषयावरच्या पुस्तकातून धडा शिकून त्याचा वापर करून एकाच स्वरमालेतून दोन वेगवेगळय़ा धुना तयार केल्या आहेत आणि एकमेकांपेक्षा अतिशय वेगळय़ा अन्वर्थाने त्या वापरल्या आहेत.
आनंद बक्षी यांनी मध्य भारतातून आयात केलेल्या चार भांड (मध्य भारतातला कव्वालीच्या धाटणीचा एक लोकप्रिय लोकसंगीतप्रकार) गाण्याचा सिनेमात वापर झाला नाही. ते किशोर कुमार, मन्ना डे, भूपेंद्र आणि आनंद बक्षी यांनी गायलं होतं.
रेल्वे स्टेशनवरच्या शेवटच्या सीनमध्ये पुन्हा टायटल म्युझिकच वाजवण्यात आलं होतं. फक्त त्यात फ्रेंच हॉर्नची जागा मनोहारी सिंह यांच्या शीळेने घेतली होती. ती कशी कोण जाणे, पण यावेळी वेगळी वाजली होती. तिच्यात श्रोत्याला आतून हलवून टाकण्याची आणि खोलवरच्या भावना ढवळून काढण्याची ताकद होती. मनात कातर उदासी जागवणार्या या शीळेमुळे तोवर आपण पडदय़ावर पाहिलेल्या संवेदनाशून्य हिंसाचाराबद्दल, वीरू आणि ठाकूर यांना जे गमावावं लागलं त्याबद्दल आपल्या मनात सखेद विस्मयाची भावना तयार होत होती. स्टेशनातून ट्रेन निघते आणि वीरू-बसंती यांना कोणत्या तरी दूरच्या, अनाम गावात नव्याने आयुष्य सुरू करण्याची संधी देते, या पार्श्वभूमीवरच श्रेयनामावली सरकू लागते.
प्रदर्शित झाल्यानंतर 35 वर्षांनीही शोले हा आजही भारतातला सर्वात विस्मयकारक ऍक्शन म्युझिकल सिनेमा बनून बसला आहे.
##CinemaGully
[15/08, 20:56] Charudatta Kulkarni: #CinemaGully...
शोले - लेखनाचे दोन पैलू माझ्या नजरेतून...
रमेश सिप्पी दिग्दर्शित, "शोले" हा चित्रपट सर्वांनाच परिचयाचा आहे. आपण सगळ्यांनीच आजवर अनेक वेळा "शोले" पाहिला असेल. इतकंच कशाला, त्यातले संवाद, गाणी आणि व्यक्तिरेखाही सर्वांच्या डोक्यात फिट्ट बसल्या आहेत. "मुग़ल-ए-आज़म" नंतर हिंदी चित्रपटसृष्टीचा milestone ठरलेला "शोले" तुमच्याप्रमाणेच मीही अनेक वेळा पाहिला आहे. गेल्याच आठवड्यात टि.व्ही.वर पुन्हा मी "शोले" पाहिला. त्यावेळी मला चित्रपटाच्या लेखनाबद्दल जाणवलेल्या काही गोष्टी...
ट्रेन हल्ल्याचा सीन...
सीन असा घडतो, इंस्पेक्टर बलदेव सिंह बेड्यांमध्ये जखडलेल्या जय व वीरूला घेऊन ट्रेनने जात असतात. अचानक ट्रेनवर दरोडेखोर हल्ला करतात. जय व वीरू मदतीचा हात पुढे करतात आणि त्यांच्या मदतीने इंस्पेक्टर बलदेव सिंह तो हल्ला परतवून लावतात. या तुफान action sequenceचं चित्रिकरणही तितकंच सुंदर झालं होतं. या सीनच्या लेखनाची एक दुसरी बाजू मला जाणवली...
सीन सुरू होतो तेव्हा ट्रेनवर दोन हवालदार आणि एक इंस्पेक्टर, म्हणजे तीन बंदुका असतात. दोन्ही हवालदार धारातीर्थी पडतात आणि एकच पिस्तूल उरते. जय व वीरू लढायला तयार होतात. जय आणि वीरूमध्ये नजरानजर होते आणि वीरू इंजीनकडे धाव घेतो. इथे एकही संवाद न देता लेखकाने दाखवलं की नेम धरून गोळी मारण्यात जय पारंगत आहे तर एखादं वाहन वेगाने चालवण्यात वीरू पटाईत आहे...
वीरू तितक्याच वेगाने ट्रेन चालवतो जितक्या वेगात घोड्यावरून दरोडेखोर आत प्रवेश करू शकतील. हव्या तेवढ्या बंदुका आत येताच वीरू ट्रेनचा वेग वाढवतो आणि संकटाला मागे टाकून ट्रेन पार होते. दुसरीकडे जय आणि बलदेव सिंहमध्येही एकही संवाद न वापरता प्लॅन ठरतो आणि बलदेव सिंह ट्रेनमागून येणाऱ्या हल्ल्याला थोपवतो तर जय ट्रेनच्या बाजूने येणाऱ्या हल्ल्याला परतवतो. जय व बलदेव सिंह, ट्रेनवर येणाऱ्या संकटाला लांब ठेवण्याचा plan execute करतात तर वीरू ट्रेनला संकटापासून दूर नेण्याचा plan execute करतो...
थोडक्यात, एकही संवाद न वापरता, planning, execution आणि quality identification या तीनही गोष्टी लेखकाने प्रभावीपणे दाखवल्या आहेत...
नाणेफेकीचे सीन...
नाणेफेकीचे सगळे सीन्स पाहिले, तर नाणं फक्त जय उडवतो आणि नाण्याच्या दोन्ही बाजूंबद्दलही तोच बोलतो. प्रत्येक वेळी 'हेड' येतं आणि प्रत्येक वेळी जयच नाणेफेक जिंकतो. पण यातही, वीरू सारखा हरतो आहे हे मात्र दर्शवलं गेलं नाही. Decision makingच्या बाबतीत वीरू थोडा गोंधळलेला दाखवला गेला आहे तर जय सक्षम असतो. त्याला जे हवं तेच तो नाण्याच्या 'हेड' या बाजूवर ठेवतो आणि तेच येतं...
प्रत्येक वेळी जयला माहित असतं की वीरू एकटा योग्य निर्णय घेऊ शकणार नाही किंवा वेळ लावेल. अशा वेळी जय वीरूला बरोबरीची संधी देत नाणेफेकीच्या मार्गाने स्वत:चाच निर्णय उचलून धरतो. पण तरीही, वीरूला कुठेही कमी लेखण्याचा प्रयत्न दिसत नाही...
थोडक्यात, नाणेफेकीसारखी छोटी गोष्ट वापरून लेखकाने fair decision making आणि decision implementation या दोन गोष्टी खूप छान पद्धतीने मांडल्या...
इतक्या संदर लेखनाबद्दल सलीम-जावेद म्हणजेच सलीम खान व जावेद अख़्तर या लेखक द्वयींना सलाम...
@ अनिकेत परशुराम आपटे.
[15/08, 20:57] Charudatta Kulkarni: सौजन्य : विवेक महेश्वर अभ्यंकर
१९७४ ला 'शोले' रिलीज झाला आणि त्याने बॉक्स ऑफिसला अशी आग लावली की अजूनही ऑलटाईम ब्लॉकबस्टर मुव्ही लिस्टमध्ये तो अग्रस्थानी आहे. 'शोले'बद्दल अनेकांनी अनेकवेळा लिहिलंय कारण त्यात प्रचंड कंटेंट ठासून भरलेलं आहे. 'शोले'तलं हेलनवर चित्रित केलेलं 'मेहबूबा मेहबूबा' हे अप्रतिम गाणं अफाट गाजलं होतं. आरडींना हे गाणं आधी आशाजींकडून प्लेबॅक करून हवं होतं. त्यांनी त्यासाठी होकारही दिला होता पण तेंव्हा आरडींची एक अट होती. आशाजींनी हे गाणं पन्नाशीत पोहोचलेल्या जिप्सीचा आवाज जसा उतरलेला असतो तशा काहीशा भसाडया आवाजात प्लेबॅक करून हवं होतं ही अट आरडींनी घातली होती. आशाजींनी यावर निर्णय घ्यायला वेळ लागला कारण अशा स्वरात गाणं म्हटल्याने वोकल कॉर्डसना ताण पडू शकतो आणि त्यामुळे आवाज बसला तर प्लेबॅकसिंगींगच्या वेळापत्रकातील इतर गाण्यांवर परिणाम होऊ शकतो म्हणून त्यांनी विचारपूर्वक नकार दिला. (ही माहिती त्यांनी स्वतः 'आरडीरिमिक्स'मध्ये दिली आहे.) आशाजींनी नकार दिल्यावर आरडी अगदी चकित झाले होते कारण आशाजी आणि हेलन असं कॉम्बिनेशन गृहीत धरून फिमेल प्लेबॅकच्या हिशोबाने हे गाणं त्यांनी लिहून घेतलं होतं. आरडींनी आशाजींची मनधरणी करून पाहिली पण काही फरक पडला नाही.
दोन तीन दिवस तसेच गेले. चौथ्या दिवशी त्यांचं आनंद बक्षींशी बोलणं झालं. 'मेहबूबा मेहबूबा' बक्षींनी लिहिलं होतं. वास्तविक पाहता या गाण्याची धून आरडींकडे आधीच तयार होती. आरडींनी आनंद बक्षींना धून ऐकवली होती आणि त्या धूनला साजेसं ठरेल व चित्रपटातील जिप्सींच्या सीनसिक्वेन्सला सूट होईल असं गाणं बक्षींना लिहून द्यायला सांगितलं होतं. पूर्वीच्या सिच्युएशननुसार पडद्यावर हेलनजीच हे गाणं गाणार होत्या. त्यामुळे या गाण्यात फिमेल सिंगरसाठीचे बोल होते. आता आशाजींनी नकार दिल्यावर त्यात काही सुधारणा करून गाण्याचा मतितार्थ आणि ट्यून तीच ठेवून त्यांनी बक्षींकडे हेच गाणं मेल प्लेबॅकसाठी लिहून मागितलं. एकाच बैठकीत आनंद बक्षींनी गाणं लिहून दिलं आणि विचारलं की, "बदल का केला गेलाय ? हेलनजी नही है क्या ?" आरडींनी सगळी कथा ऐकवली त्या सरशी आनंद बक्षींनी विचारलं की, "आता कोण गाणार आहे हे गाणं ? " आरडी काही क्षण गप्प राहिले आणि उत्तरले "मीच गाणार आहे !" चकित होण्याची वेळ आता आनंद बक्षींची होती. गाणं हातात पडल्यावर ही गोष्ट आरडींनी जीपी सिप्पींच्या कानावर घातली. त्यांनी एकदा आरडीकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं आणि घशाला हात लावत विचारलं, "ये काम करेगा क्या ?" आरडींनी उत्तर दिले "गाना तो मै ही गाऊंगा लेकीन आवाज मेरी नही होगी !" चकित होण्याची वेळ आता सिप्पींची होती. आरडींनी त्यांना समजावून सांगितले की मी चाळीशी पार केलेल्या एका भसाडया आवाजाच्या जिप्सी पुरुषाच्या स्वरात हे गाणं गाणार आहे, तो आवाज माझा आहे असं कोणालाच वाटणार नाही... " सिप्पींनी सांगितलं की, "तू जे काही करशील ते विचारपूर्वकच करशील याची मला खात्री आहे."
जलाल आगा आणि हेलनवर हे गाणं चित्रित झालं आणि अबालवृद्धांच्या तोंडी हे गाणं लोकप्रिय झालं. वीजेच्या चपळाईने नाचणारी, आपल्या मादक अदांनी घायाळ करणारी, अंगाला देखणे हिसके देणारी, आरडीच्या संगीतावर ठेका धरून नाचणारी, हेलनची फ्रेम माझ्या डोक्यात तर गच्च रुतून बसलेली आहे. दाढीचे खुंट वाढलेला, भांग अस्ताव्यस्त झालेला, तंबाखू खाऊन दात विटून गेलेला, कळकट कपड्यातला अन करारी नजरेचा गब्बरसिंग बाजेवर डाव्या अंगाला रेलून बसलेला आहे. त्याच्या शेजारी धगधगती शेकोटी पेटलेली आहे. आजूबाजूला सगळे डाकू धुंद होऊन गेलेले आहेत आणि बंजारयांची टोळी आपलं कोणतं कसब दाखवणार याकडे लक्ष आहे. गब्बरच्या अड्ड्यावरच्या सगळ्या राहुट्या, तंबू बेफाम झालेले आहेत. रात्रीच्या अंधारात एक अनामिक नशा आहे. दिलरुबा वाजवणारा जलाल अगा गुडघ्यावर बसून दिलखेचक संगीत पेश करतो आणि मासुळी अंगाची हेलन डाव्या पायाने माती उडवत उडवत गब्बरच्या दिशेने नाचत नाचत पुढे सरकते. आणि थियेटरमध्ये कल्लोळ होतो. पब्लिक मेहबूबा मेहबूबावर शिट्ट्या वाजवत नाचत राहतं. हे दृश्य अजूनही डोळ्यात जसेच्या तसे तरळते. 'शोले'मधला हेलनचा हा डान्स आणि मेहबूबा मेहबूबा गाणं या दोन्हीचं कॉम्बिनेशन म्हणजे व्हिस्की आणि बर्फासारखं आहे, एकमेकासाठी अर्पण होणारं अन दीर्घकाळ मेंदूतल्या संवेदनेत जिवंत राहणारं असं !
ड्रम, कोंगो बोंगो या वाद्यांचा अप्रतिम वापर आरडींनी या गाण्यात केला होता. मात्र या गाण्याची जन्मकथा वेगळीच आहे. त्यासाठी आणखी थोडं मागे जावं लागेल. दक्षिणपूर्व युरोपला लागून असणाऱ्या भूमध्य सागराच्या बेटसमूहातील गायक संगीतकार असणारया मिशेल्स व्हायोलेरीस या गायकाने १९७३च्या पूर्वार्धात सायप्रसचं 'टा रिआलिया' हे प्रसिद्ध लोकगीत नवीन वाद्यमेळाच्या ट्यूनवर गायले आणि युरोपमध्ये धमाका झाला होता. सायप्रीऑटीक ग्रीक भाषेतलं हे गाणं इटली आणि ग्रीसमध्ये चार्टबस्टर ठरलं. अनेक ठिकाणी मैफलीत हे गाणं मादक अदांनी साजेलेल्या रोमन जिप्सींच्या पारंपरिक वेशभूषेतील मदनिका सादर करू लागल्या. अनेकांचे कलेजे खलास झाले. 'शोले'मधली 'मेहबूबा मेहबूबा'साठीची हेलनजींची वेशभूषा देखील डीक्टो अशीच होती. हे गाणं आरडींकडे कसे आले ? याच्या खोलात शिरण्याआधी आणखी एक मजेशीर नोंद घ्यावी लागते.
१९७३ च्या अखेरीस डेमिस रुसेस या गायकाने याच गाण्यावर रिमिक्स शैलीतल्या गाण्यावर काम सुरु केलं. हा डेमिस म्हणजे एक अवलिया माणूस होता. नवनवी वाद्ये वापरणे आणि गायकाच्या स्वराच्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी वापरून वेगळं काही तरी रसिकांना देणे हा त्याचा आवडता उद्योग. तर या डेमिस रुसेसने 'टा रिआलिया'वर बेतलेलं 'से यु लव्ह मी' हे गाणं गायलं. जाझ, ट्रम्पेट आणि इजिप्शियन, अरेबिक संगीताचा हा किती वेडा होता हे या गाण्याला ऐकले की लक्षात येतं. आरडींनी जेंव्हा 'मेहबूबा मेहबूबा' स्वतःच्या आवाजात गायलं तेंव्हा त्यातला हेल आणि भसाडेपणा हा बहुतांशी डेमिस रुसेसच्या याच गाण्यासारखा होता. आरडींना असं डुप्लिकेशन नको होतं. त्यांच्या डोक्यात त्या ग्रीक जिप्सी मदनिकांचा नाच होता आणि जोडीला डेमिस रुसेसच्या गायकीच्या धर्तीवरचं तशाच जाड्याभरडया आवाजातलं फिमेल प्लेबॅक हवं होतं. पण आशाजी तयार झाल्या नाहीत आणि आरडींनी अगदी ढंगदार शैलीत हे गाणं गायलं. 'टा रिआलिया'ची ट्यून, 'से यु लव्ह मी'च्या ढंगाची गायकी आणि रोमन जिप्सींची मादक नृत्यशैली हे सर्व बॉलीवूडला पचेल अशा पद्धतीने आणि भारतीय चित्रपट रसिकांच्या पचनी पडेल अशा शैलीने मांडणे ही एक अवघड कसरत होती. मात्र आनंद बक्षींच्या साह्याने आरडींनी ती पूर्ण केली. हेलनजींनी त्यावर चार चांद चढवले. मात्र एक प्रश्न अनुत्तरीत राहतो की, हे सर्व मटेरियल आरडींच्या जवळ कसे पोहोचले ? याचे उत्तर आहे गिना लोलोब्रिजीड ही इंटरनॅशनल सेक्ससिम्बॉल प्लस इटालियन हिरॉईन प्लस फोटोजर्नॅलिस्ट प्लस शिल्पकार महिला !!
गिना लोलोब्रिजीड ही एक भन्नाट बाई ! २०१३ मध्ये ती पुन्हा चर्चेत आली होती कारण तिने तिची सगळी ज्वेलरी विकून त्यातून आलेल्या पाच मिलियन डॉलर्सची देणगी स्टेम सेल फौंडेशनला दिली होती. ही अवलिया स्त्री, तिचं सौंदर्य, तिचे किस्से आणि तिची आगळी वेगळी विचारसरणी हा एका स्वतंत्र पोस्टचा विषय आहे. गिना लोलोब्रिजीड तिच्या काही भूमिकांसाठी गोल्डन ग्लोब आणि बाफ्टाला नॉमिनेट झाल्या होत्या. १९७०च्या सुमारास तिनं चित्रपटातलं लक्ष कमी केलं. कारण त्यातलं नाविन्य संपलं होतं. तिनं फोटोजर्नॅलिस्टचं काम सुरु केलं. १९७१ च्या सुमारास ती अरब राष्ट्रांच्या दौऱ्यावर आली होती तेंव्हा तिच्या कानावर आरडींचे संगीत पडले. ही बाई अगदी चोखंदळ आवडीनिवडीची असल्याने आणि तिचं करिअर फिल्मी असल्याने तिला आरडींशी संपर्क साधायला काही अडचण पडली नाही. आरडी म्हणजे संगीताचे वेड आणि संगीत म्हणजे आरडी असे समीकरण असल्याने नवनवीन माणसं आणि नवनवीन संगीतप्रयोग याचा प्रचंड ध्यास त्यांना होता. त्यामुळे त्यांच्या व्यक्तीसंग्रहात कलासक्त गिना लोलोब्रिजीडची भर पडली....
रात्रीच्या वेळी जग झोपी गेलेले असताना तासंतास रेडीओ कानाला लावून बसणे हा आरडींचा आवडता छंद. एके रात्री 'टा रिआलिया' त्यांच्या ऐकण्यात आलं. या गाण्याने त्यांच्यावर असं काही गारुड केलं की त्यांनी रेडीओ ऐकताना सवयीप्रमाणे ते रेकॉर्ड केलेलं असल्याने दिवसभर ती ट्यून त्यांच्या ओठी खेळत राहिली. अधिक माहितीसाठी त्यांनी गिनाशी संपर्क केला आणि तिने पुढचे काम सोपे केले. त्या नंतर तिने 'टा रिआलिया'वर बेतलेलं डेमिस रुसेसने 'से यु लव्ह मी' हे गाणं आणि त्यातली जाड्या आवाजातल्या गीताचा अर्थ समजून सांगताना या गाण्यावर रोमन जिप्सीचे कॉम्बिनेशन कसे खुलून दिसेल हेही आरडींच्या मनावर ठसवले. याच काळात योगायोगाने सिप्पींच्या 'शोले'त गब्बरच्या अड्ड्यावर जय-वीरू हल्ला करायला येतात तेंव्हा व्हॅम्पवर चित्रित केलं जाणारं गाणं स्टोरी सिच्युएशनमध्ये हवं होतं. आरडींनी त्यांच्या डोक्यात घोळत असलेल्या ट्यूनला बक्षींनी प्रोव्हाईड केलेल्या'मेहबूबा मेहबूबा'च्या पूर्ण भारतीय रुपात पेश केले आणि चित्रपट अधिक जानदार झाला. 'शोले'ची सक्सेस पार्टी जेंव्हा झाली होती तेंव्हा उपस्थित विदेशी पाहुण्यांच्या यादीत साहजिकच गिना लोलोब्रिजीडचं नाव होतं. सोबतच्या तसबिरीत डावीकडून आनंद बक्षी, आरडी आणि गिना आहेत. बॉलीवूडच्या एका मधाळ आणि मादक गाण्याचे शिल्पकार !!
- समीर गायकवाड.
(परिश्रमपूर्वक माहिती गोळा करून लिहिलेल्या लेखांचे शेअरींग करताना मूळ लेखकाच्या नावासहीत शेअर केलं जावं ही प्रामाणिक अपेक्षा)
[15/08, 20:58] Charudatta Kulkarni: प्रिय जय,
तू जाऊन आता जवळजवळ चाळीस वर्षे झाली. आज एका फेसबुक समूहातील एका उत्कृष्ट उपक्रमाच्या निमित्ताने तुला पत्र लिहायची संधी मिळाली!
मित्रा, माझ्या जिवलगा आपल्या मैत्रीच्या वेळेपासून जग खूपच बदलले आहे. आपली साईड कार वाली येझदी आता भंगारात किलोच्या भावाने विकली जाते. तू वाजवत असलेला माऊथ ऑर्गन यांत्रिक वाद्यांच्या कोलाहलात गंज लागून पडून आहे. मारामारीसाठी आपण वापरत असलेले सुरे आणि पॉईंट टूटू रायफल आता फक्त पोलिसांकडे क्वचित आढळतात. घोडे तर आता टांग्याला देखील ओढत नाहीत. फक्त रेसकोर्सवर एखाद्या डर्बीत धावतात!
आपल्या रामगढ मध्ये आता माझ्यासारखी काही म्हातारी खोडं सोडली तर कोणीच राहात नाही. गाव ओसाड झालाय. सगळे शहराकडे गेले आहेत. शहरांचा श्वास घुसमटतो आहे . इथे आता लुटण्यासारखं काही नसल्याने डाकू यायची शक्यताच नाही. तसही आपण दोघांनी गब्बरला संपावल्यावर रामगढकडे वाकड्या डोळ्यांनी बघायची हिम्मत कोणत्याच डाकुत नव्हती. पण मित्रा गब्बर परवडला रे! अगदी त्याने तुला मारला असला तरी! तो दाखवून, सांगून, वागून खुलेआम डाकू होता. घोड्यावरून यायचा आणि गाव लुटून जायचा. पण हल्ली डाकू हसतमुख चेहर्याने कधी पांढरा, कधी काळा, कधी खाकी, कधी इतर कोणत्याही रंगात येतात. हसतमुख चेहरा, महागड्या गाड्या, सोफिस्टिकेटेड रुपात येतात आणि नकळत लुटून जातात. पूर्वी डाकू गावापासून लांब, जंगलात, डोंगरात राहायचे. आता ते आपल्या शेजारच्या घरात, नात्यात, रोजच्या व्यवहारात, रस्त्यात कुठेही असू शकतात. आता सामान्य माणूस डाकुंच्या वस्तीत रहातो आणि रोज विविध गोंडस नावाच्या धाडी पडून लुटला जातो.
असो. पण आपले दिवस खरंच मस्त होते रे मित्रा. खूप साधे आणि सोपे. माणसं काळी किंवा पांढरी होती. हल्ली दिसणारी करड्या रंगाची नरो वा कुंजारोवा जमात महाभारतानंतर हल्लीच परत उदयास आली आहे. त्यावेळी आपण दोस्ती केली ती खुल्या दिलाने आणि गब्बरशी दुश्मनी केली ती पण खुल्या दिलाने. हल्ली छातीत गोळ्या न घालता पाठीत विषाच्या सुया टोचणारे मित्र जास्त आढळतात. म्हणून हल्ली कशातच मन लागत नाही. मी आपल्या जुन्या आठवणींच्या आनंदात सुख शोधत असतो. कधीतरी गब्बरच्या त्या अड्ड्यावर फेरफटका मारतो. आता तिथे दगड फोडून खडी बनवायची यंत्र लागली आहेत. ते सर्व कातळ, बसंतीने नाच केला तो दगड, गब्बरने ठाकूरचे हात कलम केले ती वेदी सगळंच नष्ट झालंय!
बाकी ठाकूर दहा वर्षांपूर्वी निवर्तले. राधा वहिनींनी वाड्यात भाडेकरू ठेवले आहेत. त्यांच्या खोलीत लावलेला, चंदनाचा हार घालेला तुझा ऑर्गन वाजवतानचा फोटो अजून तसाच आहे. वाहिनी रोज तो आसवांनी पुसतात आणि तुझ्या तिथीला त्यांच्याच बागेतील बकुळीच्या फुलांचा हार फोटोला चढवतात!
जेलर साहेब केव्हाच रिटायर्ड होऊन गावाला गेले. मधून मधून पत्र येतात त्यांची. ते पण आता थकले आहेत. सुरमा भोपाली इतका म्हातारा झाला तरी आपल्या कथा अजूनही सांगतो. पण कथेत जय मारला गेला हे सांगताना त्याच्या घशात आजही औंढा येतो. तो शांतपणे मफलर ने डोळे टिपतो! बाकी रामलाल काका गेल्याच वर्षी गेले. आता वाहिनी एकट्याच आहेत. पण मी किंवा बसंती रोज एक चक्कर मारतो त्यांच्याकडे.
तू मौसिकडे शब्द टाकून जमवून दिलेले माझे आणि बसंतीचे लग्न तू गेल्यावर तीन महिन्यात झाले. अंगावर अक्षता पडल्या तेव्हा सर्वांच्या मागे उभा राहून मला आशीर्वाद देत असलेला लंबूटांग तू फक्त मलाच दिसलास आणि ढसाढसा रडलो मी! भ#@ का गेलास तू मला सोडून? आपलं ठरलं होतं ना की "ये दोस्ती हं नही तोंडेंगे?" मग? तू आम्हा दोघांना फसवलस. मला आणि मृत्यूला. तो माझ्याकडे येणार होता पण तू त्याला ओढून नेलास!
असो. बसंती मजेत आहे. ती गावातल्या उरल्यासुरल्या पोरांसाठी नाचाचे क्लास घेते. मी दारू सोडून आता शेतकरी झालो आहे. तुला म्हणून सांगतो. बसंती आज आजी झाली तरी चाळीस वर्षांपूर्वी होती तितकीच आयटम दिसते. मग तिला हा आजोबा झालेला विरु आजही काधीतरी आमराईत नेऊन नेमबाजीचा सराव करतो! बाकी जय अमेरिकेत असतो. जय म्हणजे आमचा मुलगा. त्याच नाव आम्ही जय ठेवलंय. तुझ्यासारखाच दिलदार आहे पोरगा. त्यालाही मुलगा झालाय. त्याच नाव आम्ही जयवीर ठेवलंय!
मी गेल्याच आठवड्यात रामेशजींना पत्र लिहिले आहे. त्यांना सांगितलंय की तुमच्या शोले नंतर अनेक भ्रष्ट आवृत्त्या आल्या. पण तुमच्या शोलेच्या नखाचीही सर नाही. तेव्हा रमेशजी फॉर ओल्ड टाईम सेक, अजून एक शोले होऊन जाऊ द्या! फक्त शेवटी जय मारता कामा नये! आमची यारी जगली पाहिजे!
आणि हो मित्रा, आमच्या देव्हार्यात देव नाहीत. एकही मूर्ती किंवा तसबीर नाही. आम्ही रोज यथोचित मनापासून पूजा करतो ती त्या तुझ्या कॉईनची! मागे आरती सुरु असते, "जान पे भी खेलेंगे, तेरे लिए ले लेंगे सब से दुश्मनी! ये दोस्ती हम नहीं तोंडेंगे!"
तुझा जिगरी,
विरु
(मंदार जोग.)
[15/08, 21:00] Charudatta Kulkarni: शोले पाहीला नाही असा एकही चाळीशीपलिकडील व्यक्ति नसेल
तो केवऴ सिनेमा नव्हता तर एक सूवर्ण पर्व होते
तर मग आता ही रंजक माहीतीही वाचा
खूप मोठी नक्कीच आहे पण खाञीने तूम्हा सर्वाना आनंद देणारी आहे
सर्व श्रेयनामावली आहेच मी फक्त सर्व संकलित करून पाठवित आहे .....अविरत संघर्ष
नक्की वेऴ असेल तेव्हा पुर्ण वाचा
👇🏼
हिंदी चित्रपटसृष्टीतला एक चांगला दिग्दर्शक म्हणून विधू विनोद चोप्राचे नाव घेतले जाते. त्याची बायको अनुपमा चोप्रा.
ती एक चांगली लेखिका आहे. तिने लिहीलेले “शोले “ वरील पुस्तक मी अधूनमधून पुन्हा पुन्हा वाचत असतो.
अलिकडे वाचताना मला असे जाणवले की ह्यातील कांही अंश का असेना आपल्या लोकांना कळावेत. म्हणून मी आजपासून क्रमश: कांही मला आवडलेले उतारे पाठवायचे ठरवले आहे. त्यातील पहिलाच इपिसोड आज अमिताभ वर आहे.
अमिताभ
योग असा की या महान कलाकाराची पंचाहत्तरी आहे.
त्या नटोत्तमाला माझा मन:पूर्वक नमस्कार !
शोले : पडद्यामागील
जय.
ती १९७३ सालची जानेवारी महिन्यातली थंड हवेने भारलेली रात्र होती. अमिताभ बच्चनच्या अंगात १०२ डिग्री ताप होता. त्याचे डोके दुखत होते आणि घशाला कोरड होती. ह्या अवस्थेतही तो एका मोठ्या फिल्मी पार्टीला आवर्जून हजर होता. कारण त्याला जी. पी. सिप्पीच्या नावाजलेल्या प्राॅडक्शन हाऊसच्या पुढील चित्रपटात रोल हवा होता. नुकतेच एकापाठोपाठ त्याचे बरेच चित्रपट आपटल्याने त्याला हे काम अत्यंत गरजेचे होते.
जी. पी. सिप्पींचा मोठा मुलगा रमेश आपल्या “अंदाज “ आणि “ सीता और गीता “ नंतरची तिसरी फिल्म लाॅंच करत होता. त्यासाठीच सदरची पार्टी होती. नवीन चित्रपट असला तरी सिप्पींच्या गोटातून “सीता और गीता “ ची यशस्वी जोडी - धर्मेंद्र आणि हेमा मालिनी ही या नवीन फिल्मसाठी जवळ जवळ निश्चित झाली होती.
पण कथेत आणखी एक पुरूष नायक होता. अमिताभ ह्या रोलसाठी उत्सूक होता. पण सिप्पींच्या वितरकांना तो नको होता. उंच शरीर , लांबुडका चेहरा असलेला आणि कोणतेही बाह्य आकर्षण नसलेला तो हिरो आहे असे त्यांचे म्हणणे होते.
( तोपर्यंत “जंजीर “ प्रदर्शित झाला नव्हता)
मध्यरात्र उलटल्यावर पार्टीत त्यावेळचा हिट स्टार शत्रुघ्न सिन्हाने “ ग्रॅंड एंट्री “ केली. त्याचे “रामपूर का लक्ष्मण “ आणि “ भाई हो तो ऐसा “ हे चित्रपट नुकतेच बाॅक्स औफिस हिट झाले होते. अशा हिरोंचा हिंदी चित्रपटसृष्टीत नेहमीच उदो उदो होत असतो. त्याप्रमाणे त्याला मध्यभागी ठेऊन धर्मेंद्र - हेमा जोडीसह त्यांचे पटापट फोटो क्लिक होऊ लागले. साहाजिकच अमिताभ बाजूला सारला गेला होता.
एक वितरक वाकून रमेश सिप्पीच्या कानात कुजबूजला
“ ये है आपकी कास्टिंग.
उस लंबूजीका सोचना भी मत !”
रमेश फक्त हसला.
सलीम - जावेद जोडीकडे एक फक्त चार ओळींची कथा होती. ह्या कथेवर सिप्पी बापलेक फिदा होते. फक्त ती अडीच ते तीन तासांचा चित्रपट होण्याएवढी वाढवण्याची आवश्यकता होती. त्या चार ओळी अशा :
एका आर्मी औफिसरच्या संपूर्ण कुटुंबाची कत्तल केली गेलेय. त्याला ह्या गोष्टीचा बदला घ्यायचाय. त्याला सैन्यातून कोर्ट मार्शल करून हाकलून दिलेल्या दोन ज्युनियर औफिसर्सची आठवण येतेय बदलाकांड करण्यासाठी.
हे दोघे लबाड आणि बदमाश आहेत पण धीट आहेत.
बस्स. एवढीच रूपरेषा होती.
जी. पी. सिप्पी अनुभवी आणि मोठा निर्माता.
म्हणाला “ मला मोठी फिल्म बनवायची आहे. ह्या चार ओळींचा विस्तार करा. “
अडचण ही होती की आर्मी बैकड्रॅापवर फिल्म करायची म्हणजे बरेचसे अर्ज, परवानग्या, सरकारी औफिसकडे अनंत हेलपाटे !
मग जी. पी. सलीम जावेदना म्हणाले “ कुछ और कर दो ! “
मग निर्माता , दिग्दर्शक, लेखक यांच्यामधे विचारमंथनाच्या बैठका सुरू झाल्या. बर्याच बैठकांनंतर कथेला एक आकार येऊ लागला.
पांढर्या शुभ्र कपड्यातला ठाकूर तयार झाला.
सलीम खान इंदूरमध्ये डीआयजी असलेल्या वडिलांकडून गब्बरसिंग नावाच्या खर्याखुर्या डाकूच्या कथा ऐकून होता. त्यावरून डाकूचे पात्र तयार झाले.
दोन मित्र : एक छचोर, extrovert
तर दुसरा उपरोधिक, कुचेष्टेने बोलणारा introvert.
त्यांचेबरोबर एक छम्मकछल्लो आणि दुसरी विधवा “ silent lady “.
संजीवकुमार, धर्मेंद्र आणि हेमाचे रोल ठरले. दुसर्या नायकासाठी रमेश सिप्पीच्या डोक्यात शत्रुघ्न सिन्हा होता. वितरक पण शत्रूघ्नसाठी राजी होते.
पण सलीम - जावेदना अमिताभच हा रोल चांगला निभावेल असे त्याचा “ रास्ते का पत्थर “ हा चित्रपट बघून ठरवले होते. अमिताभमधला स्पार्क त्यांनी हेरला होता. म्हणून त्यांनी रमेशला अमिताभबद्दल पटवायला सुरूवात केली होती.
विचाराअंती रमेशला पण वाटले की शत्रुघ्न बडा स्टार आहे आणि तीन मेगास्टार एकत्र आले की इगोमुळे शूटिंगमध्ये बाधा येण्याचीच शक्यता जास्त.
त्यात अमिताभसाठी धर्मेंद्रने पण रमेशकडे शब्द टाकला.
आणि अखेर अमिताभने “जय “ चा रोल मिळवला.
गब्बरसिंग
डाकूच्या रोलसाठी रमेश सिप्पीला डॅनी डेन्झोग्पा हवा होता. जसजसा गब्बरचा रोल भरीव होत गेला तसे त्या रोलचे आकर्षण वाढू लागले. संजीवकुमार आणि अमिताभ या दोघानाही गब्बर आपण करावा असे वाटू लागले. पण ते शक्य नव्हते आणि रमेशला मान्य नव्हते. धर्मेंद्रला ठाकूरचा रोल आवडला. रमेशने त्याला सांगितले “ तू ठाकूर झालास तर शेवटी संजीवला हेमा मिळेल. “ धर्मेंद्रचा हेमाबरोबर रोमान्स नुकताच बहरू लागला होता. आणि पूर्वी संजीवने हेमाला एकदा प्रपोज केले होते. म्हणून धर्मेंद्र वीरूचाच रोल बरा म्हणून गप्प बसला.
डॅनीने फिरोजखानच्या “ धर्मात्मा “ साठी पूर्वीच होकार दिला होता. “धर्मात्मा “ चे शूटिंग अफगाणिस्तानात होणार होते. इकडे “ शोले “ चे शूटिंग बंगलोर - म्हैसूर रस्त्यावरच्या रामनगरम गावाजवळील टेकड्यांमध्ये ठरले होते. नेमके औक्टोबर महिन्यातच दोन्ही शूटिंगच्या तारखा ठरल्यामुळे डॅनीला “ शोले “ सोडावा लागला.
अमजद खान खलनायक जयंतचा मोठा मुलगा. त्याला जावेदने १९६३ साली दिल्लीत यूथ फेस्टिव्हलमध्ये “ ऐ मेरे वतनके लोगो “ या नाटकात सैन्य अधिकार्याचे काम करताना पाहिले होते. कांही वर्षांनंतर मुंबईत परत जावेदने अमजदला एका इंग्रजी नाटकात काम करताना पाहिले होते. सलीम जयंतला ओळखत असल्याने त्याने अमजदच्या घरी जाऊन गब्बरच्या रोलसाठी तू योग्य आहेस असे मला वाटते असे सांगितले. अशा पद्धतीने सलीम - जावेद जोडीने अमजदला रमेशकडे आणले. कारण त्यांना त्याच्या अभिनय सामर्थ्याची खात्री होती. एकदा ठाकूरच्या नोकर - रामलालचे काम करणार्या सत्येन कप्पूना सलीमने विचारले “ कप्पू साब, क्या अमजद आपसे अच्छा आर्टिस्ट है ? “ कप्पू लगेच म्हणाले “ हां, मुझसे अच्छा ॲक्टर है, यंग है, उसकी थिंकींग फ्रेश है.” हा प्रसंग सिप्पींच्या औफिसमध्येच घडल्यामुळे ४ दिवसांनंतर अमजदला स्क्रीन टेस्टसाठी बोलावण्यात आले. टेस्टला अमजद आला तो बारीक दाढी वाढवूनच. त्याने आपले दात काळे केले होते. त्याची भाषा आणि शब्दोच्चार रोलसाठी अगदी योग्य होते. अखेर त्याने बहुचर्चित महत्त्वपूर्ण असा गब्बरचा रोल खिशात टाकला आणि ह्या संधीचे सोने केले.
सूरमा भोपाली
सूरमा भोपालीचे पात्र रंगवणारा जगदीप खरे तर एकेकाळचा मोठा हिरो. बेबी नंदा बरोबर प्रमुख भूमिकेत काम केलेला. नंतर त्याचे एवढे हाल झाले की शिरीष कणेकरांच्या भाषेत बोलायचे झाले तर आचरट-ए- आझम बनून फुटकळ कामे करावी लागली. पण रमेश सिप्पीने त्याच्या अंगभूत अंगविक्षेपाचा योग्य वापर करीत त्याला well defined असा थापाड्या सूरमा बनवला. आणि तो चित्रपटात कुठेही आचरट वाटला नाही. हे कौशल्य निर्विवाद रमेश सिप्पीमधल्या विचारी दिग्दर्शकाचे !
जगदीशला एक दिवस अचानक बंगलोरला शूटिंगसाठी बोलावण्यात आले. त्याप्रमाणे तो आलाही. त्या दिवशी रमेश सिप्पी इतरांचे शाॅटस घेत बसल्यामुळे जगदीपला नुसतेच बसून कंटाळा आला. त्याला माहीत होते की बंगलोरमध्ये रेसकोर्स आहे. वेळ जाईंना म्हणून त्याला वाटले चला रेस तरी खेळायला जाऊ. म्हणून त्याने “शोले “ च्या प्राॅडक्शन मॅनेजरकडे १००० रू. मागितले. का कोण जाणे, त्याने पैसे देण्यास नकार दिला. जगदीपला राग आला. “सिप्पींसारखी मोठी कंपनी जर आमंत्रण देऊन असा अपमान करत असेल तर हा मी चाललो परत मुंबईला माझी बैग भरून. सूरमाचा रोल अन्य नटाला द्या.” असा त्याने पवित्रा घेतला. सिनेमॅटोग्राफर द्वारका दिवेचानी हे संभाषण ऐकल्यावर त्ताबडतोब त्या प्राॅडक्शन मॅनेजरला बोलवून त्यानी जगदीपला पैसे देण्यास सांगितले. शिवाय आपल्याकडील पण कांही पैसे जगदीपला देऊ केले. यामुळे जगदीप शांत झाला आणि त्याने मुंबईचा बेत रद्द केला. “शोले” तील प्रत्येक भूमिका अजरामर झाली. तशीच सूरमा भोपालीचीही झाली.
राधा : सायलेंट लेडी
पांढर्या शुभ्र साडीतली राधा एकेक दिवा विझवत येत असते आणि जय खाली पायरीवर बसून हार्मोनिका वाजवत तिच्याकडे एकटक पहात असतो.
विधवा सून आणि तरूण चोर यांच्यामधील अनोखे, अनामिक बंध आणि हळूहळू फुलणारे प्रेम दर्शवणारा हा सीन खुद्द चित्रपटात एखाद्या मिनिटाचाच असेल.
पण हा कॅन करायला रमेश सिप्पीने चक्क २० दिवस घेतले.
हा सीन सूर्यास्त आणि रात्र यामधील “गोल्डन अवर “ ला ( चित्रपटसृष्टीमध्ये या संधिकालासाठी वापरली जाणारी ही संज्ञा ) शूट करण्याचा रमेश आणि द्वारका दिवेचा या दोघांचा मानस होता.
संध्याकाळी ५ नंतर या शाॅटसाठी गडबड सुरू व्हायची. कधी हवी तशी प्रकाशयोजना मिळायची नाही तर कांही वेळा सूर्यास्त लवकर व्हायचा. कधी एखादा तंत्रज्ञ चूक करे तर कधी एखादी वस्तू सेटवरून काढायची राहिलेली असे. पुन्हा येरे माझ्या मागल्या ! सगळे तंत्रज्ञ कंटाळायचे.
एवढे की हा शाॅट म्हणजे सेटवर एक चेष्टेचा विषय झाला. त्यात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक दिवशी फक्त कांहीच मिनिटे हा विशिष्ट हवा असलेला संधीकाल मिळे. पण रमेश - दिवेचा जोडी कोणाला बधली नाही. आजूबाजूचे लोक कांही म्हणोत, २० दिवस एवढ्याशा एका शाॅटसाठी जावोत,
शेवटी तो शाॅट त्या दोघांनीही आपल्या मनाप्रमाणे घेतलाच !
अहमद
सचिन पिळगावकर त्यावेळी अगदीच पोरसवदा होता. त्याने इमामचाचाच्या मुलाचे म्हणजे अहमदचे पात्र रंगवले होते. ( वयाने लहान असला तरी संजीवकुमारचा तो जिगरी दोस्त होता. म्हणूनच कदाचित ह्या रोलसाठी संजीवने सचिनचे नाव सुचवले असावे.)
रमेश - दिवेचा दुक्कलीने अहमदच्या मरणाचा सीन शूट करताना १७ दिवस घेतले होते. ती दिग्दर्शक-सिनेमॅटोग्राफर जोडी होतीच sticklers for perfection ! लाकडांच्या ज्वालेत शिजणार्या मांसाची पार्श्वभूमी घेतली गेली होती. गब्बर त्यातली गरमागरम लालभडक सळी उचलतो आणि लांबून घोडीवरून येणार्या अहमदकडे दाखवत म्हणतो “ इसको तो बहुत तडपा तडपाके मारूंगा “. नंतर अहमदला ठार मारतानाचे पण शाॅट कॅन केले गेले. पण अखेर रिलीज झालेल्या चित्रपटात ही सगळी दृश्ये कापली गेली. गब्बर जमिनीवर पहुडलाय. कॅमेरा क्लोजअप घेऊन दाखवतो की गब्बर हातावरची एक मुंगी दुसर्या हाताच्या तळव्याने त्वेषाने मारतो आणि पुढील दृश्य : अहमदचे घोडीवर लटकणारे प्रेत - एवढाच सीन चित्रपटात राहिला !
घोडीवरील शाॅटसाठी रमेशने डुप्लिकेटची सोय केलेली असूनही सचिनने त्याला विनंती केली की सगळे शाॅटस मी देईन. डुप्लिकेट नको.
( आपले शूटिंग झाल्यावर सचिन रमेशच्या बाजूला बसून दिग्दर्शनाची विविध अंगे शिकत असे.) शाॅट असा होता की अहमदचे घोडीवरचे प्रेत जय आणि वीरू उचलून खाली जमिनीवर ठेवतात. शाॅटची जुळवाजुळव सुरू होती तोपर्यंत अमिताभने सचिनच्या कानात सांगितले की तू तुझे शरीर ताठर ठेव. म्हणजे आम्हाला उचलायला हलके जाईल. सचिनने मान डोलावली.
नंतर शाॅट घेतला गेल्यावर सचिनच्या शरीराची अचूक ताठरता आणि त्याच्या विलक्षण व्यावसायिकतेने भारून गेलेल्या अमिताभने नुकतेच मिसरूड फुटलेल्या सचिनला विचारले “ किती सिनेमात काम केलंयस आतापर्यंत ?”
सचिन म्हणाला “ अंदाजे साठ.”
अमिताभ गारच झाला.
त्याने परत विचारले “ केंव्हापासून चित्रपटात काम करतोयस ?”
उत्तर आले “१९६२”.
या संवादांनंतर अमिताभने सचिनला ज्येष्ठ मानून त्याच्याशी तसे वागण्यास सुरूवात केली.
गब्बर
तो अमजदचा शूटिंगचा पहिला दिवस होता. डायलाॅग होता “कितने आदमी थे ?”
अमजद आपला हिरवा, विरलेला आर्मी युनिफाॅर्म ( हा मुंबईच्या चोर बाजारातून विकत आणला होता.) पहनून आला होता. सततच्या तंबाखूमुळे काळे झालेले दात आणि हातात चंची असा सगळा जामानिमा तयार होता. हे सारे व्यवस्थित असतानाही खुद्द कॅमेरा सुरू झाल्यावर अमजद बिथरला. त्याला बोलता येईना.
वर्षानुवर्षे नाटकात कामे करून वाहवा मिळवलेला हा अभिनेता “गब्बर” रंगवताना नर्व्हस झाला. एवढे दिवस रिहर्सल्स करून अंगात भिनवलेला गब्बर कोण जाणे कुठे निसटून गेला !
४० अयशस्वी टेक्सनंतर रमेशने त्याला जवळ घेतले, समजावले “ तुझे शूटिंग आपण नंतर घेऊ. तू फक्त आहे त्या ड्रेपरीत सेटवर बसून गब्बर अंगीकृत बाणवण्याचा प्रयत्न कर. अपने आपको सीझन कर दे. “
त्या रात्री हाॅटेलच्या रूममध्ये अमजद ओक्साबोक्सी रडला. बाप जयंत मुंबईत कॅन्सरशी झुंजत होता. अमजदचा मुलगाही फक्त १ महिन्याचा होता. खान कुटुंबाला या चित्रपटाकडून खूप आशा होत्या.
पुढील शेड्यूलमध्ये अमजद बराच सुधारला. कांहीच टेक्समध्ये त्याचे शाॅटस ओके होऊ लागले. तरीही युनिटमधल्या कांही लोकांना त्याच्या कॅरेक्टरमध्ये अजून कांही कमी जाणवत होते. त्यात अमजद ह्या क्रूर चित्रपटसृष्टीला नवीन होता. कुजबूज सुरू झाली की रमेश सिप्पीने गब्बर निवडण्यात चूक केलीय. तो “मिसकास्ट “ आहे.
हा गोंधळ वाढला तसा आतापर्यंत अमजदच्या पाठीशी ठाम राहिलेले सलीम-जावेद पण रमेशला म्हणाले “ तू समाधानी नसशील तर अमजदला बदल.” त्यानंतर बरेच दिवस अमजदला डिच्चू मिळणार अशी इंडस्ट्रीत हवा होती.
पण रमेश खमक्या होता. म्हणाला “ गब्बर अमजदच करेल.”
सगळी कोल्हेकुई थांबली.
आणि अमजदने लहानपणी त्यांच्या धोब्याकडून वरचेवर ऐकलेला “अरी ओ शांती” हा डायलाॅग “अरे ओ सांभा” असा बदलून जग जिंकलं !
वीरू
“शोले” च्या शूटिंगदरम्यान धर्मेंद्र हेमा मालिनीच्या प्रेमात पडला होता. पण प्रत्येक प्रेमकथेतील अडथळ्यांप्रमाणे इथेही अडचणी होत्या.
त्याचे लग्न झाले होते आणि त्याला मुलेही होती.
शिवाय शुद्ध अय्यंगार ब्राम्हण असल्याचा अभिमान असलेल्या तिच्या आईला धर्मेंद्र आवडत नव्हता.
जेंव्हा जेंव्हा धर्मेंद्र आणि हेमा यांचे रोमॅंटिक सीन्सचे शूटिंग असे तेंव्हा तेंव्हा तो स्पाॅट बाॅईजना सतत चुका करण्यासाठी पैसे देत असे. ज्यायोगे त्याला तिच्या निकट रहाता येत होते. शिवाय एका विशिष्ट प्रसंगात मिठी पुन्हा पुन्हा मारता येत होती. धरमपा आणि स्पाॅट बाॅईज यांच्यामध्ये सांकेतिक खुणा पण ठरलेल्या होत्या. त्यानुसार ते कधी ट्राॅली ढकलताना चुकवायचे तर कधी रिफ्लेक्टर खाली पाडायचे. अशा रीतिने ती पोरं या प्रेमकथेच्या माध्यमातून दिवसाकाठी दोन दोन हजार कमवायचे !
अगदी भरवशाचा माणूस म्हणून हेमा रमेश सिप्पीची प्रत्येक गोष्ट मानत असे.
धर्मेंद्र रमेशच्या मागे “ तू प्लीज मध्यस्थी कर ना “ म्हणून मागे लागला होता.
शेवटी हळू हळू हेमा पण धर्मेंद्रमध्ये गुंतू लागली आणि त्याच्यासोबत उघड उघड फिरू लागली.
धर्मेंद्र हाॅटेलमधून सेटवर जाताना नारळ पाणी घेऊन जात असे. अर्थातच त्यात दारू मिसळलेली असे !
“जब तक है जान “ हे गाणं संपल्यावर वीरू आणि बसंतीला जय सोडवतो. वीरू अर्धवट शुद्धीत असलेल्या बसंतीला उचलून नेताना पायाने किक मारून बंदूकीच्या गोळ्याने भरलेली ट्रंक उघडतो आणि त्यातल्या गोळ्या बंदूकीत भरून पुढे निघतो.
ह्या प्रसंगाचे शूटिंग चालू होते. पण सकाळपासून “नारळ पाणी “ प्यालेल्या धर्मेंद्रला ती ट्रंक उघडण्यासाठी किक मारताच येईना.
शेवटी बरेच टेक्स वाया गेल्यावर एकदाची किक बरोबर बसली. गोळ्या घेऊन त्याने बंदूक लोड केली. आपल्याला जमलं का नाही ह्या विचाराने तो स्वत:वरच चिडला आणि त्याने बंदूकीचा एक बार हवेत काढला.
अमिताभ वरच्या बाजूला एका मोठ्या दगडावर उभा होता. त्याला चाटून गोळी गेली. (फाॅरेनच्या फाईटमास्टरने खर्याखुर्या गोळ्या वापराव्यात असा सल्ला दिल्यामुळे ट्रंकेतल्या सर्व गोळ्या खर्या होत्या.)
या प्रकाराने युनिट मेम्बर्स चिडले. फाईटमास्टर जिम आपली कॅप रागाने आपटून आपला निषेध नोंदवीत सेटवरून निघून गेला.
धर्मेंद्र खूप मनस्वी माणूस. सगळ्याच पंजाबी लोकांत हा गुण दिसतो. धरमपाजीने सर्व युनिटची मनापासून माफी मागितली. आणि पुढील कांही दिवस तरी शूटिंगदरम्यान नारळ पाण्याशिवाय राहिला. !!!
नफरती
“शोले” मधील बहुतांश नटांना मुंबईत जुहू बीचवर पहाटेच्या वेळी घोडेस्वारीचे प्रशिक्षण दिले गेले होते. कारण ती चित्रकथेची मागणी होती. लोकेशनवर घोड्यांना सांभाळणे हे कर्म महाकठीण होते.
अंदाजे २० घोडे मुंबईहून बंगलोरला ट्रकातून पाठवले गेले होते. मुंबईतील घोडे चित्रपटात वरचेवर काम करून सरावलेले होते. प्रखर लाईटस, सगळीकडे विखुरलेले कॅमेर्यासारखे तांत्रिक आणि अवजड साहित्य किंवा अगदी एखादा छोटा स्फोट या गोष्टींमुळे ते विचलित होत नसत. “ॲक्शन “ आणि “कट” या और्डर्सना पण ते व्यावसायिक नटाप्रमाणे प्रतिसाद देत असत.
पण खुद्द बंगलोरमधील म्हैसूर रेस क्लब व इतर कर्जाऊ आणलेले घोडे शूटिंगसाठी तसे नवखेच होते.
त्यात एक तपकिरी रंगाची इजिप्शियन घोडी होती. ती रेसमध्ये पळणारी घोडी होती आणि तिचे नाव होते Nefertiti !
अचानक उद्भवणारे आवाज, मोठ्या लाईटसचा प्रखर उजेड आणि मोठ्या मोठ्या मशिन्सनी ती बिथरत असे. त्यामुळे तिच्यावर स्वार होणार्या अनेकांना तिने खाली फेकून दिले होते. एवढे की शेवटी युनिटवाल्यांनी तिचे नाव “नफरती” ठेवले !
तिने कोणालाच सोडले नाही. ठाकूर-गब्बर पाठलागाचे शूटिंग करत असताना तिने अमजदला पाच वेळा फेकून दिले. एकदा तर त्याच्या पाठीवर पाय देऊन उभी राहिली. धर्मेंद्रला पण एकदा अचानक आलेल्या आवाजाच्या भीतिने तिने जमिनीवर लोळवले.
कालिया झालेल्या विजू खोटेने नफरतीवर बसून बरेच शूटिंग केले. पहिल्या आठवड्यातच तिने विजूला सहा वेळा पाडून त्याची हाडे खिळखिळी करायला सुरूवात केली. अडचण अशी होती की शूटिंगसाठी आणलेले बहुतेक घोडे पांढर्या आणि काळ्या रंगांचे होते. ही एकच तपकिरी रंगाची होती. डाकूंचा गावात शिरतानाचा जो पहिला शाॅट ओके झाला त्यात नफरतीवर स्वार कालिया होता. त्यामुळे गावातील उर्वरित सर्व शूटिंगला “कंटिन्यूटी” मुळे कालियाला नफरतीवर बसण्याशिवाय पर्यायच नव्हता.
कालियाने घेतलेल्या रायफलचा शरीराला थोडा जरी स्पर्श झाला तरी नफरती वेड्यासारखी सैरावैरा पळत सुटे.
विचाराअंती असे ठरले की विजू खोटेने रायफल आणि घोड्याचे अंग याच्यामध्ये आपला पाय सतत आडवा घालायचा म्हणजे नफरतीला रायफल स्पर्शू नये. चित्रपटात बारकाईने बघितल्यास कांही लाॅंग शाॅटसमध्ये विजूने पाय विचित्र ॲंगलमध्ये ठेऊन रायफल दूर केलेली दिसते.
गावाचे विहंगम दृश्य दाखवणार्या एका क्रेन शाॅटचे वेळी आपल्या मागे मोठे कांहीतरी फिरतेय असे जाणवल्याबरोबर घाबरलेल्या नफरतीने विजू खोटेला एका मोठ्या दगडावर फेकून दिले. आधीच वैतागलेला विजू म्हणाला “ बस्स झालं, आता मी या घोडीवर बसून शूटिंग अजिबात करणार नाही.”
रमेशसह सर्वांनी त्याला समजावयाचा प्रयत्न केला. पण तो ठाम राहिला. अखेर हिंदीतले जुनेजाणते फाईटमास्टर अझीमभाईनी त्याला जवळ घेतले आणि म्हणाले “ बाबा, अभी नही बैठोगे तो जिंदगीमे कभी नही बैठोगे.” त्यांनी हळुवारपणे विजूला घोडीवर बसवले आणि पाय नफरतीपासून लांब ठेवण्याचा सल्ला देऊन मग शाॅट घेतला गेला.
पुढील शेड्यूल सुरू होण्यापूर्वी विजू मुंबईला घरी जाऊन आला. पण बंगलोरला आल्यावर त्याला कळले की त्याला परत घोडीवर बसावेच लागणार नाही. कारण त्या शेड्यूलमध्ये गब्बरच्या डेनमध्ये कालिया मारला जातो एवढाच त्याचा सीन चित्रीत व्हायचा राहिला होता. त्यामुळे त्याचे नफरतीशी दुश्मनी नाते संपले होते
सांभा
चित्रपट पूर्ण झाला.
रिलीज डेट आली तरी दिग्दर्शक रमेश सिप्पीने पूर्ण चित्रपट पाहिला नव्हता. कोणत्याही चित्रपटाचा दिग्दर्शक सतत चित्रीकरणात व्यस्त असल्यामुळे कांही वेळा झालेल्या शूटिंगचे रशेस बघतो. तर कांही वेळा रशेस न बघता तो पुढील शाॅटमध्ये व्यग्र होतो. ह्या कारणाने रमेशने पूर्ण सिनेमा पाहिला नव्हता.
पण रमेशच्या वडिलांनी - जी.पी.सिप्पीनी संपूर्ण चित्रपट लंडनमध्ये प्रिंटस प्रोसेसिंगला गेल्या असताना पाहिला होता. त्यांना चित्रपट धंद्याची चांगली जाण होती. त्यांच्यातला मुरब्बी निर्माता आपल्या मुलावर अत्यंत खूष होता. जी.पीं. नी ओतलेल्या पै न पैचे रमेशने सोने केले होते.
जी.पी. त्यांच्या बंगलोरच्या वितरकाबरोबर डर्बीला जात असताना त्या वितरकाने विचारले
“ सिप्पी साब, कैसी लगी आपको पिक्चर ?”
सिप्पी म्हणाले
“ ये पिक्चर दस साल नही उतरेगी !”
( This film will run for ten years.)
मोहन मकिजनी उर्फ मॅकमोहन उत्तम क्रिकेट खेळत असे.
खरे तर क्रिकेटर होण्यासाठी तो मुंबईत आला होता. परंतु सुरूवातीला नाट्यक्षेत्रात कामे करून तो हिंदी चित्रपटसृष्टीतच स्थिरावला.
“शोले” मधील त्याचा सांभाचा मूळ रोल मोठा होता. पण एडिटिंगमध्ये तो बराच कापला गेला.
एका महाकाय दगडी शिळेवर बंदूक घेऊन बसून फक्त सभोवती पहात राहणे हे काय चित्रपटातले काम झाले काय अशी त्याची भावना झाली होती.
त्यामुळे मॅकमोहन खूप नाराज होता.
त्याने रमेशला हटकले
“ काय हे रमेशजी ?
मी तर फिल्ममध्ये एक्स्ट्राच दिसतोय.
माझा रोल पूर्णच कापून टाका.
मला नको तो.”
रमेश म्हणाला “ मॅक,
जितना मै काट सकता था, मैने काटा.
जितना सेंन्साॅर काट सकता था, सेंन्साॅरने काटा.
अब कुछ नही हो सकता.”
तो पुढे म्हणाला
“ पण मी एक सांगतो.
ही फिल्म जर चालली
तर प्रेक्षक कधीच सांभाला विसरू शकणार नाहीत.”
मॅकमोहनने रागाने “शोले” पाहिला नव्हता.
पण जेंव्हा लोक रस्त्यावर तो दिसला की थांबून “सांभा” म्हणून हाका मारू लागले तेंव्हा त्याला आश्चर्य वाटले.
हे कसे काय घडले ? म्हणून तो एके दिवशी मिनर्व्हाच्या संध्याकाळच्या ६ च्या शोला सहकुटुंब गेला. इंटर्व्हलमध्ये प्रेक्षकांनी त्याला घेराव घातला. “सांभा सांभा “ च्या आवाजाने थिएटरमध्ये गोंधळ सुरू झाला. तो नंतर नंतर एवढा वाढला की पोलिसांना बोलावले गेले. त्यांनी त्याला मागील दारातून गुपचूप बाहेर काढले आणि घरी जाण्याची त्याला विनंती केली.
रमेशने सांगितलेले शब्द खरेच ठरले.
प्रेक्षक आज ४० हून जास्त वर्षे झाली तरी “सांभा” ला विसरले नाहीयत !
आणखी एक महत्वाची गोष्ट !
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात कदाचित “सांभा “ हे एकमेव पात्र असे असेल की अख्ख्या चित्रपटात फक्त तीन शब्द बोलूनही अजरामर झाले.
आणि ते तीन शब्द होते
“पूरे पचास हजार !”
मूळ पुस्तक : शोले : द मेकिंग औफ अ क्लासिक
लेखिका : अनुपमा चोप्रा.
शोले पडद्यामागील.
उपसंहार १
शेवटी अंदाजे २ वर्षांनंतर आणि ४५० शिफ्टस करून “शोले” पूर्ण झाला.
अमजदचे संवाद दुसर्या एखाद्या डबिंग आर्टिस्टने डब करावेत असे सलीम-जावेद जोडीचे म्हणणे होते. कारण त्यांच्या मते त्याचा आवाज रफ आणि खलनायकाला न शोभणारा होता. खूप खोकला असलेल्या लहान मुलासारखा होता.
अर्थात हे सलीम-जावेद यांचे मत असले तरी दिग्दर्शक रमेश सिप्पीला अमजदचा नैसर्गिक आवाज योग्य वाटत होता. उलट नेहमीच्या इतर खलनायकांपेक्षा वेगळा असल्याने तो रमेशला भावला होता.
तरीही सलीम-जावेदना वाटत होते की पूर्ण चित्रपटभर अंग पसरलेल्या खलनायकाचा असला बारीक आवाज चित्रपटाला मारक ठरेल.
सलीम-जावेदचे मत सर्वत्र पसरले. आणि त्यांच्या म्हणण्याला दुजोरा मिळू लागला.
हाॅलिवूडचा फाईटमास्टर जिम आणि जया बच्चन मात्र अमजदच्या बाजूने ठाम उभे राहिले.
जिम रमेशला म्हणाला
“तुझी फिल्म आहे.
तू काहीही ठरवू शकतोस.
पण त्याचा आवाज बदललास तर तू मूर्ख ठरशील. “
रमेश दोन्ही बाजू ऐकून गंभीर होऊन गप्प बसला.
अमजदला समजेना की हे लेखकद्वय माझ्याबद्दल असे का वागताहेत ? मात्र एकंदरीत विरूद्ध वातावरणाने तो आतून मोडून गेला.
(नंतर त्याचे आणि लेखकद्वयाचे भांडण पण झाले.)
करो या मरो अशा स्थितीतली त्याची ही आयुष्यातली पहिली फिल्म होती. सर्व मोठ्या स्टार्समध्ये तो एकटाच नवखा होता. शूटिंगच्या सुरूवातीला आलेल्या नर्व्हसनेसमधून बाहेर पडण्यासाठी त्याने खूप कष्ट घेतले होते. मनोमनी त्याला वाटू लागले की आपले करियर संपावे म्हणून कांही यंत्रणा कार्यरत आहेत.
शेवटी निर्णय रमेशला घ्यायचा होता. रमेशचे त्याच्या युनिटमधल्या सर्वांशी अगदी घट्ट नाते असे. त्याचा सर्वात मोठा आणि महत्वाचा स्वभावगुण म्हणजे कधीही, कोणतीही घाई न करता धीराने, शांततेने समोर उभ्या असणार्या प्रश्नांची उकल करणे.तो कधीच घाबराघुबरा होत नसे. तसेच चिडत पण नसे. ह्या त्याच्या स्वभावामुळे शूटिंग असो वा सुट्टी, आपल्या कलाकारांकडून आपल्याला हवे ते मिळवत असे. फक्त कलाकारच नव्हे तर युनिटमधील प्रत्येकाशी तो असा वागत असे.
अमजदविषयी पसरलेली चांगली वाईट मते ऐकून रमेशने आपल्या “गट फीलिंग” ने ठरवले की कोणी कांही म्हणो, गब्बरचे डबिंग अमजदच करेल. हा निर्णय होऊनही चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत कांही शंकास्पद आवाज उठतच राहिले.
पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अमजदच्या “त्याच” बारीक आवाजातील लाखो रेकाॅर्डस खपू लागल्या तेंव्हा शंकेखोर गप्प झाले
आणि
नेहमीच खरा ठरणारा रमेश
पुन्हा एकदा खरा ठरला.
उपसंहार २
जेंव्हा शूटिंग पूर्ण होऊन फिल्म पोस्ट-प्राॅडक्शन स्टेजला येते, तेंव्हा बहुतांश निर्माते सगळ्याच बाजूनी थकलेले असतात.
बजेट संपलेले असते.
चित्रपट प्रदर्शनाची तारीख जवळ आलेली असते.
त्यामुळे “चला, आता आवरू या कसेतरी आणि गुंतवलेले पैसे परत मिळवू या” अशी धारणा बहुतेकांची असते.
पण सिप्पी ही वेगळी जमात होती.
न डगमगणारी,
हवा तेवढा पैसा ओतणारी,
शांत राहून कोणतीही तडजोड न करता चांगली फिल्म बनवणारी !
“शोले” चे बजेट ३ कोटी ओलांडून पुढे गेले होते.आताच्या हिशोबाप्रमाणे हे पैसे अगदीच कमी वाटत असले तरी त्या काळी एवढा पैसा ओतणे म्हणजे मूर्खपणाच होता चित्रपटसृष्टीच्या मते !
प्रत्येक टेरिटेरीला साडेबावीस लाख मिळणार असले तरी ३ कोटी परत मिळवणे अशक्यप्राय आहे असे इंडस्ट्रीचे मत होते. पण सिप्पी बधणारे नव्हते. ते पैसे सोडत गेले.
संगीताचे ट्रॅक्स तयार होत होते. रमेशला नावीन्यपूर्ण, एकमेकाद्वितीय असे बॅकग्राऊंड म्युझिक हवे होते.
उदाहरणार्थ,
गब्बरची क्रूरता
किंवा राधाची करूण शांतता न बोलता बॅकग्राऊंड संगीतातून प्रतीत व्हावी असे रमेशचे पंचमला सांगणे असे.
पंचम पण नावीन्याचा नेहमीच भोक्ता !
त्याने गब्बरच्या एंट्रीसाठी ट्रकच्या डिफरन्शियलमधून सळी फिरवून एक विशिष्ट आवाज रेकाॅर्ड केला ( ह्याचा विडीओ मध्यंतरी वाॅटसअप वर बराच व्हायरल झाला होता. ) व तो खरोखरच प्रेक्षकांच्या मनांत भीति उत्पन्न करणारा होता.
बसंतीच्या टांगा पाठलाग दृश्यासाठी पंडित सामता प्रसादनी वाजवलेल्या सिंगल तबल्याच्या आवाजाने प्रेक्षक थरारून गेले.
पाठलागाच्या नेहमी वापरल्या जाणार्या स्टाॅक संगीताप्रमाणे हे कांही नव्हते. कांहीतरी वेगळेच होते.
आकर्षक होते.
सर्व तांत्रिक अंगे पूर्ण करून अखेर “शोले” प्रदर्शित झाला. आणि सुरूवातीलाच अफवा पसरली (की पसरवली ?) की “शोले “ फ्लाॅप झाला.
प्रेक्षक गोंधळात पडले. समीक्षकांनी कठोर टीका केली. इंडस्ट्रीत नकारात्मक वारे वाहू लागले.
आयुष्यात कदाचित प्रथमच, रमेश हादरला !
मुंबईच्या लॅमिंग्टन रोडवरील “मिनर्व्हा” हे “शोले” चे प्रमुख थिएटर होते.
७० मिमी मावेल एवढा पडदा आणि १५०० प्रेक्षकांची आसनक्षमता असलेले ते एकमेव थिएटर होते.
चित्रपटाचा पहिला शो सुरू असताना प्रेक्षकांकडून कांहीच प्रतिसाद नव्हता. ना टाळ्या, ना हंशा, ना वाहवा, फक्त जीवघेणी शांतता !
प्रसिद्ध निर्माते दिग्दर्शक प्रकाश मेहरा त्या खेळाला आर. डी. बर्मनसोबत हजर होते.
ते मनातल्या मनात म्हणाले
“ ही चार ओळींची कथा मी का सोडली ?”
(सिप्पींनी फायनल करण्यापूर्वी मेहरांनी ही कथा नाकारली होती.)
चित्रपट संपल्यावर जसे प्रेक्षक थिएटरबाहेर येऊ लागले तसा पंचम (आर.डी. बर्मन) मेहरांना म्हणाला
“ लोग तो गालियाॅं दे रहे हैं”.
प्रेक्षकांची नस अचूक
ओळखणार्या मेहरांमधला दिग्दर्शक म्हणाला
“ घाबरू नकोस.
ही फिल्म हिट होणार.
कोणीही तिला थांबवू शकत नाही.”
उपसंहार ३
दिलीपकुमारला फिल्म आवडली.
राज कपूर म्हणाला” ठीक आहे पण अजून थोडा रोमान्स हवा होता.”
राजेंद्रकुमारला कांही फारसा आवडला नाही “शोले”.
इंडस्ट्रीत चेष्टा सुरू झाली.
हे “शोले” नसून “छोले” आहेत असा एक कुजकट रिमार्क आला. चित्रपट समीक्षकांनी चौफेर हल्ले केले. फिल्मफेअरमध्ये छापून आले “ ही फिल्म धड ना वेस्टर्न ना आपली आहे.”
आता सिप्पींची मदार जनता जनार्दन प्रेक्षकांवर होती.
१५ औगस्ट १९७५ या दिवशी फिल्म प्रदर्शित झाली. त्या दिवशी रमेश सिप्पी स्वत: मुंबईतल्या सर्व चित्रपटगृहात फेरी मारून आला. सगळीकडे मरणप्राय शांतता होती. आठवड्याच्या शेवटी सिप्पींकडे घबराहट सुरू झाली. तिकीटे खपत होती पण उत्साहवर्धक वातावरण दिसेना.
मग जी.पी.आणि रमेश सिप्पी अमिताभच्या घरी बसून ह्या परिस्थितीत काय तोडगा काढता येईल यावर विचार करायला बसले.
( ह्या वेळेपर्यंत अमिताभ बडा स्टार झाला होता. त्याला एक वजन प्राप्त झाले होते.)
चित्रपटाचा शेवट बदलावा असा एक विचार पुढे आला. ह्या बदलाला सलीम-जावेद राजी नव्हते. रमेशला पण चित्रपट आहे तसाच ठेवावा असे वाटत होते. कारण त्याचा स्वकर्तृत्वावर विश्वास होता. पुढच्या आठवड्यात बुकिंगसाठी रांगा दिसेनात. तेंव्हा रमेशचा धीर खचला. सारे संपले असे त्याला वाटू लागले.
बायकोला म्हणाला “ मला वाटतंय, मी नापास झालोय.” वडील जी.पी.सिप्पी ठाम होते. त्यांना अजूनही यशाची खात्री वाटत होती.
“कभी कभी” च्या शूटिंगसाठी अमिताभ शशी कपूरसोबत काश्मीरमध्ये होता. शशीने आपल्या कुटुंबासमवेत “शोले” पाहिला होता. त्या सर्वांना तो आवडला होता.
अमिताभ एका क्षणी भावनाशील झाला आणि शशीच्या खांद्यावर डोके टेकवीत म्हणाला “ नही यार, गयी पिक्चर, फ्लाॅप हो गयी.”
अमिताभचे इतर निर्माते म्हणू लागले “ रमेशने तुझे करियर बरबाद केले.”
( ही अर्थात इंडस्ट्रीची नेहमीचीच वागण्याची पद्धत ! )
अमजद खानच्या घरात स्मशानशांतता होती. शेजारीच शूटिंग करत असलेला असरानी एक दिवस त्याला भेटायला घरी आला.
अमजद म्हणाला “ मैंने दम लगा दिया, अब नही चली तो क्या कर सकते हैं ?”
असरानी उत्तरला “ लेकिन आपकी तारीफ तो बहुत हो रही है.”
निराश अमजद म्हणाला
“ क्या फायदा यार ?”
(शेवटचा भाग)
एके दिवशी वरळीच्या गीता टाॅकीजच्या मालकाचा रमेशला फोन आला.
म्हणाला “घाबरू नकोस.
पिक्चर हिट है.”
रमेश म्हणाला “कशावरून सांगतोयस ?”
तर तो म्हणाला “ माझ्या साॅफ्ट ड्रिंक्स आणि आईस्क्रीमच्या स्टाॅलची विक्री जवळ जवळ शून्यावर आलीय.
प्रेक्षक इंटर्व्हलला बाहेर येतच नाहीयेत. कारण ते चित्रपटाच्या जबरदस्त मानसिक धक्क्यातून सावरूच शकत नाहीत.”
मग चतुर रमेशच्या लक्षात आले की शांतता कशामुळे आहे सगळ्या थिएटर्समध्ये ते.
म्हणजे अजून फक्त थोडा वेळ जावा लागेल.
आणि तसेच झाले.
चित्र अचानक पालटू लागले.
माऊथ टू माऊथ पब्लिसिटीने
“शोले”च्या ज्वाळा सगळीकडे पसरल्या !
लोक पुन्हा पुन्हा चित्रपटाला येऊ लागले.
चित्रपटाच्या शेवटी वीरू जेंव्हा नाणेफेक करतो त्यावेळी स्टिरीओफोनिक साउंड सिस्टीममध्ये फिल्म पाहणारे प्रेक्षक आपल्या सीटखाली नाणे पडलेय की काय म्हणून वाकून पाहू लागले.
आणि अचंबित होऊ लागले.
“शोले” चे म्युझिकचे हक्क घेतलेल्या पाॅलिडाॅर कंपनीला लक्षात आले की स्पेशल डिस्काऊंट देऊनही गाण्याच्या रेकाॅर्डसना कोणी हात लावेना. म्हणून कंपनीने रिसर्चसाठी विविध थिएटर्सवर माणसे पाठवली.
त्यांना असे लक्षात आले की प्रेक्षक संवादावर फिदा आहेत. त्यामुळे गाणी नगण्य ठरताहेत. झाले, कंपनीने फक्त संवादाच्या रेकाॅर्डस काढल्या.
हा निर्णय अचूक ठरला.
प्रचंड वेगाने रेकाॅर्डस खपू लागल्या.
एवढ्या की कंपनीची दमछाक झाली. कांही तांत्रिक दोष असलेली रेकाॅर्डसची एक बॅच कंपनीने विक्री न करता रोखून धरली होती. ती बॅच पण हातोहात संपली. ह्या रेकाॅर्डस विक्रीचा चित्रपट अजून लोकप्रिय करायलाही उपयोग झाला.
सिप्पींचे नशिब पालटले.
मिनर्व्हासमोर तिकीटांसाठी मैलोनमैल रांगा लागू लागल्या. मिनर्व्हाचा मॅनेजर सकाळी ८ ते रात्री ८ पर्यंत थिएटरवर राबू लागला. शेवटी शेवटी घरी जाण्याएवढाही त्याच्याकडे वेळ उरेना म्हणून त्याने ने अथक थिएटरमधीलच एका फ्लॅटवर आपले कुटुंब हलवले.
थिएटरबारीवर एवढा गल्ला वाढू लागला की सिप्पींनी तिकडे लक्षच द्यायचे सोडून दिले.
आणि मग “शोले “ हिट झाल्यावर अथक परिश्रमाने थकलेला रमेश आपल्या अत्यंत आवश्यक असलेल्या सुटीसाठी लंडनला निघून गेला !
( समाप्त )
स्वैर अनुवाद : भाई देशपांडे , गारगोटी.
मूळ पुस्तक : शोले : द मेकिंग औफ ए क्लासिक.
लेखिका : अनुपमा चोप्रा.
आता हे वाचल्यानंतर जेव्हा शोले पाहू तेव्हा एक वेगळाच दृष्टिकोन असेल 😀
तुम्ही सर्वांनी हे आवडीनें वाचलं ,
कौतुक केलं ,
याबद्दल खरंतर रमेश सिप्पी,शोले टीम,अनुपमा चोप्रा आणि भाई देशपांडे गारगोटीवाले यांना धन्यवाद द्यायला हवे.
प्रत्येकाने त्याच्या त्याच्या ग्रुप्समध्ये हे fwd केलं
त्यामुळे त्या त्या व्यक्तीने भरपूर भाव खाल्ला 😆(माझ्यासकट)
या लेखांची लोक चातकासारखी वाट पहायचे,पुढचा भाग कधी ? अशी विचारणा व्हायची.
सगळयांनीच आपापला भूतकाळ जिवंत केला, रम्य केला.
पण यानिमित्ताने पडद्यामागच्या गमती आणि वाचनीय माहिती लोकांनी एकमेकांबरोबर वाटून घेतली. आनंद दिला, घेतला.
हे शोले सदैव धगधगते राहतील याची काळजी नियतीनेच घेतलीये.
कुणी नव्या पिढीच्या मुलाने विचारावं ...
अजून किती वर्षं शोलेचं गुणगान गात रहाल ?
आणि आपण म्हणावं ...
पुरे पचास हजार
No comments:
Post a Comment