Sunday, August 2, 2020

श्रावण । महेश मंडलिक

श्रावण सयी !

खरंतर श्रावणाची आणि माझी ओळख अगदी लहानपणापासून ची म्हणजे अगदी शाळे पासूनचीच म्हणा ना. माझं बालपण पुण्यातच गेलं असल्याकारणाने ज्या काही आठवणी आहेत त्या अगदी अर्बन म्हणजे पक्क्या शहरीच आहेत. गावाकडे जन्माला न आल्यामुळे (त्याला नशीब लागतं) तश्या मन चिंब भिजवून टाकणाऱ्या आठवणी नसल्या, तरी मनाच्या जाणिवेच्या कुठल्या तरी कोपऱ्यात लपून बसलेल्या काही आठवणी नक्कीच आहेत आणि त्याचा दरवळ प्रसंगोपात्त हमखास येतोच.

आपल्याला, आपल्या सांस्कृतिक परंपरांची ओळख करून देणारी पहिली आईच असते. आपलं सगळं बालपण तिच्या अवतीभवतीच गेलं असल्या मुळे तिच्या प्रत्येक कृतीचं अवलोकन आपण आपल्या कळत किंवा नकळत करत आलेलो असतो. आपल्या बालमनावर प्रभाव टाकणारी आई हीच आपलं आख्खं विश्व सामावून गेलेली असते त्यामुळेही असेल कदाचित, पण तिची प्रत्येक कृती ही मनःपटला वर कोरली गेलेली असते. त्यावेळेस बालसुलभ वृत्ती मुळे त्यातील कार्यकारणभाव जरी कळून येत नसला, तरी त्यातील वेगळेपण नक्कीच जाणवते. आई म्हणेल ते सर्व खरं, आई जे करेल ते सगळं बरोबरच हा विश्वास ठायी ठायी आपल्यामध्ये असल्यामुळे आताच्या पिढीपर्यंत तरी परंपरांची जपणूक झालीय. पुढे होईलही, पण किती इंटेनसिटी ने होईल ह्या बद्दल साशंकता आहे. असो.

तर सांगत काय होतो, शाळा सुरू होऊन जेमतेम महिना दीड महिना झालेला असायचा. नव्या कोऱ्या वह्या, पुस्तकांचा वास  अजूनही थोडा रेंगाळातच असायचा. अश्यातच एक दिवस शाळेचा शिपाई नोटीस घेऊन वर्गात यायचा, हो त्या वेळी अश्या नोटिसांच भारी अप्रूप असायचं. माझ्यालेखी कम्युनिकेशन चा तो एक अतिशय इफेक्टिव्ह मार्ग होता. त्यावेळी जे शिक्षक किंवा शिक्षिका तासावर असत ते नोटीस वाचून दाखवत असत. तर नोटीस साधारण अशी असायची की अमुक अमुक तारखे पासून किंवा पुढल्या आठवड्यापासून दर श्रावणी सोमवारी शाळा एक तास लवकर सुटेल. ही श्रावणाच्या आगमनाची सूचना असायची, त्यामुळे भारी आनंद व्हायचा. तो आनंद श्रावणाच्या आगमनाचा असायचा की एक तास शाळा लवकर सुटून घरी जायला मिळणार याचा असायचा हे नक्की नाही सांगता येणार. हा एव्हढं मात्र कळायचं की आता आनंदाचे (अर्थात सुट्टयांचे दिवस) येणार. कारण शाळा सुरू झाल्या नंतर पालखीची एक सुट्टी सोडली तर दुसरी कुठलीच सुट्टी मिळालेली नसायची !

श्रावणात येणारे सण हे प्रामुख्यानं महिलावर्गाचे. आई ची नोकरी शिक्षिकेची, त्यामुळं ती सण साजरे करायची, पण त्याचं फार काही अवडंबर माजवून तिनं कधी सण साजरा केला नाही. म्हणजे मला आठवतंय की एक चित्रा सारखा एक कागद (कॉमिक्स च्या पुस्तकात असतो तसा) ती देवघरातल्या कोनाड्यात चिकटवायची, ते असायचं जरा आणि जिवंतीकेच्या पुजे साठी. अशी पूजा असते हे मला फार उशिरा उमगलं आणि त्याच्या पाठीमागचा अर्थ जेव्हा कळला तेव्हा डोळे ओले झाल्याशिवाय राहिले नाहीत. अपत्यांच्या रक्षणासाठी, त्यांच्या दीर्घायुष्या साठी ही पुजा दर श्रावणी शुक्रवारी केली जाते. फुटाणे आणि दूध असा पूजेचा प्रसाद असतो. त्या दिवशी मूठभर फुटाणे खायला मिळायचे. आई आरती केव्हा करायची कळायचं नाही पण प्रसाद मात्र न चुकता मिळायचा.

दुसरा दिवस नागपंचमीचा. मला आठवतंय मी स्वतः चार पाच गारुड्यांकडचे नाग बघून, १० चाआकडा असलेल्या नागवाल्या गारुड्या ला बोलवायचो. तेव्हा त्या गारुड्याचं पुंगी वाजवणं नि नागाला फणा उभारण्या साठी डिवचणं खूप भारी वाटायचं. नागा पुढे दुधाची वाटी ठेवताना तेव्हा खूप थ्रिलिंग वाटलं तरी आता त्यातला फोल पणा किंवा त्यातलं क्रौर्य जाणवतं. आपल्या संस्कृतीत आपल्या पूर्वजांनी प्रत्येक सणाला धार्मिक अधिष्ठान दिलंय, त्यामागची त्यांची भूमिका ही, की मनुष्याने त्याच्या अनुषंगाने तरी जास्तीत जास्त निसर्गाशी सान्निध्य राखावे. ह्या बाबतीतली एक गोष्ट मला सांगावीशी वाटतेय. शेवटी साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी कोणाला आवडत नाही ?

साधारण ५००० वर्षांपूर्वी म्हणजे महाभारताच्या वेळी जेव्हा धृतराष्ट्राने पांडवांना अर्धे राज्य म्हणून जो प्रदेश दिला तो अतिशय निबिड, घनदाट अश्या खांडव वनाचा प्रदेश होता. तेव्हा तिथे अनेक प्रकारची हिंस्त्र जनावरे तसेच भयानक असे नाग जमातीचे लोक रहात होते. अतिशय कडवे, लढवय्ये अशी या जमातीतल्या लोकांची ओळख. हस्तिनापूरला ह्या लोकांचा खूप उपद्रव होत असे, पण खुद्द भीष्माला सुद्धा ह्यांचा पाडाव करता आला नव्हता. साप अथवा नाग हे ह्यांचं दैवत कारण बहुधा ही जमात पूर्णतः शेतीवर अवलंबून असावी. इंद्रप्रस्थ उभं करण्यासाठी कृष्णार्जुनांनी हे खांडव वन अक्षरशः जाळलं. खांडव वन जळत असताना अनेक पशु, पक्षी, सरपटणारे प्राणी आणि नाग लोकं होरपळून आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. वास्तविक हे नाग लोक मुळचे पाताळातले, वासुकी यांचा राजा. पण तेथून काही फुटून बाहेर पडले त्यातील काही खांडव वनात वसले. ह्यांचा राजा तक्षक. ज्यावेळेस तक्षकाच्या कुटुंबाला आगीने चहू बाजूने घेरले तेव्हा तक्षक अर्जुनास शरण आला आणि मला माझ्या बायको, मुला आणि नातवंडांसमावेत जाऊ दे अशी याचना करू लागला. पण कृष्णाने अर्जुनाला त्यांच्या त्रासाची आठवण करून देऊन त्याच्या सुटकेस नकार दिला. त्या धामधुमीत तक्षकाचं आख्खं कुटुंब आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं. ते पाहून तक्षक भयानक संतापला, घनघोर युद्ध करून कसाबसा सुटका करून घेऊन तो पळाला. जाताना त्यानं प्रतिज्ञा केली की, तो सुद्धा अर्जुनाच्या नातवंडांना ठार मारेल. पुढे महाभारत युद्ध संपलं नि पांडव काही वर्षं राज्य करून स्वर्गरोहणाला गेले. जाण्याच्या अगोदर त्यांनी पृथ्वीचं सगळं राज्य परीक्षितला दिलं. हा परीक्षित म्हणजे अभिमन्यू आणि उत्तरेचा मुलगा आणि अर्जुनाचा नातू. पुढे तक्षकाने मोठ्या कपटाने राजा परीक्षिताला कसे ठार मारले ते आपल्याला ठाऊक आहे. परीक्षिताच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जनमेजय गादीवर आला. आपल्या पित्याच्या मृत्यू चा बदला घेण्यासाठी त्याने सर्प यज्ञ आरंभला. अनेक सर्पयोनींचा त्यानं नाश करायला सुरुवात केली. ह्या वेगानं पृथ्वीवरची सर्व सर्प जमात नष्ट पावली असती. जनमेजय तर ऐकायलाच तयार नव्हता. त्याच्या त्या यज्ञाचे पुरोहित होते अस्तिक ऋषी.त्यांनीच जर राजाला आज्ञा दिली तर त्याला ती मान्य करावीच लागेल असा विचार करून समस्त देवगणांनी त्यांना विनंती केली. त्यामुळे अस्तिक ऋषींच्या आज्ञेनुसार जनमेजयाने सर्प यज्ञ किंवा सर्प हत्या थांबविली. तो दिवस होता श्रावण शुद्ध पंचमीचा जो नागपंचमी म्हणून ओळखला जातो. अशी एक कथा आहे. बहुतेक या कथेतून एकच अधोरेखित करायचे असेल की साप किंवा नाग हे शेतकऱ्याचे मित्रच आहेत आणि त्यांच्या हत्येमुळे संपुर्ण सृष्टीचा तोल बिघडू शकतो. हे पुढील पिढ्यांच्या लक्ष्यात यावे हा ही या कथेमागचा उद्देश असू शकेल. असो, हे नाग पुराण फार लांबलं. पण श्रावणात येणाऱ्या प्रत्येक सणाला काही न काही कथा अश्या जोडल्या गेल्या आहेत, ज्या खरंतर त्यातलं मर्म न समजताच पुराणातली वानगी म्हणून सोडून दिल्या जातात.

तर श्रावणात अश्या काही न काही निमित्तानं सण साजरा करायची संधी मिळत राहते. विशेषतः स्त्रियांना, मग त्या माहेरवाशिणी असोत किंवा सासुरवाशीणी. घरातल्या वृद्ध, थोरल्या स्त्रियांच्या देखरेखीत अशी अनेक व्रतं वैकल्य केली जायची आणि प्रसाद किंवा नैवेद्य म्हणून काहीतरी गोडधोड केलं जायचं. आमच्या घरी आई ठराविक गोष्टी करायचीच  उदा. नागपंचमीला पुरणाचं दिंड आवर्जून व्हायचं आणि मला ते फार आवडायचं. म्हणजे अजूनही आवडतं. आयताकृती दिंडात बोटाने भोक पाडून ते साजूक तुपाने भरून खाणे म्हणजे माझ्यासाठी पर्वणीच असायची. जरी घरी पुरण यंत्र होतं तरी चक्क दगडी पाटा वरवंट्यावर वाटलेलं अर्धबोबडं, पण पूर्ण शिजलेल्या पुरणाची दिंडं आठवून अजूनही माझ्या तोंडाला पाणी सुटतं. श्रावणात पुरणावरणाचा स्वयंपाक हा ठराविक दिवशी होतच असे. इस्पेशिअली, व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी, शुक्रवारी सवाष्ण बोलाविली असेल तेव्हा किंवा मग सत्यनारायण असेल तेव्हा तर हमखासचं. अशावेळी वातावरण अतिशय धार्मिक असे. त्यातून उदबत्तीच्या धुराचा, निरंजनातील जळालेल्या तुपाचा आणि पक्वानांचा मिश्र असा सुवास वातावरण अजून भारून जात असे. मी फार मिस करतोय हे सगळं. 

श्रावणातील मंगळवार म्हणजे माहेरवाशीणींसाठी पर्वणीच. पुण्या सारख्या शहरात वाडा सिस्टीम होती तोपर्यंत शेजारीपाजारी होणाऱ्या मंगळागौरीच्या पूजेत सहभागी होता येत नसलं, तरी रात्रीच्या जागरणात थोडीफार लुडबुड व्हायची पण ते तितपतच. मात्र आदल्या रात्री मेंदी काढायच्या कार्यक्रमापासूनचा माहौल अनुभवता यायचा. हल्ली सगळंच आऊटसोर्सिंग झाल्यामुळे त्यातला दिखाऊपणा बघून नको वाटतं. अर्थात हा ज्याच्या त्याच्या हौसेचा भाग आहे.

अश्यातच मग राखी पौर्णिमा यायची. आम्ही दोघेही भाऊच, त्यामुळे सख्खी बहीण नसल्याचं दुःख मला खूप जाणवायचं, पण माझ्या दोन सख्ख्या चुलत बहिणी ज्या माझ्याहून कितीतरी मोठ्या आहेत (म्हणजे त्यांची मुलं माझ्या वयाची असताना) आवर्जून घरी येऊन आम्हाला राख्या बांधत असत आणि अजूनही त्या दरवर्षी न चुकता राखी बांधायला येतात. पूर्वी लहान असताना इतरांच्या मोठ्या राख्या बघताना त्यांनी बांधलेली छोटी गोंड्या ची राखी बघून मन खट्टू व्हायचं, पण जसं मोठा होत गेलो, तसं त्या छोट्या गोंड्यामधली मोठी आत्मीयता समजू लागली. 

राखी पौर्णिमेची सुट्टी संपतेय तो, जन्माष्टमी यायची. गोकुळ अष्टमी म्हणून कोकणात ही दणक्यात साजरी करतात. अगदी लहान असताना आमच्या पेणला साजरी होणारी गोकुळ अष्टमी माझ्या मनावर कोरली गेलीय. अजूनही ती पेणला तशीच साजरी होते आणि माझा सख्खा, चुलत , आते भाऊ आवर्जून जातात. लहानपणी दही हंडी फोडल्यावर हंडीच्या खापराचा तुकडा मिळवण्याची घाई मला जास्त असे, कारण तो तुकडा आईला हवा असे. जरा मोठा झाल्यावर कळले की तो तुकडा आई दुभत्याच्या कपाटात ठेवत असे. हो, आमच्या दहा बाय दहा च्या दोन खोल्यांच्या घरात दुभत्याचं एक कपाट होतं नि त्याला जाळीचं दार होतं. फार दूर कशाला, माझ्या लग्नाच्या नंतरच्या काही काळात आमच्या सासूबाईंकडे सुद्धा दुभत्याचं लाकडी कपाट होतं नि त्यालाही जाळीचं दार होतं असं मला आठवतंय. दुभत्याच्या कपाटाची सर आताच्या कुठल्याही टॉप ग्रेड च्या फ्रीझला येईल असं मला वाटत नाही.अश्या कपाटातून विरजलेल्या दुधाच्या दह्यात भिजवलेले पोहे किंवा कालवलेला दही भात ह्यावरच हा पिंड पोसला गेलाय. मला आठवतंय माझ्या पुण्यातल्या एका काकू कडे चक्क शिंकाळे टांगलेले असायचे आणि त्यात दूध विरजलेले असायचे. शेवटी दहीहंडी साजरी करायची म्हणजे काय ? बालकृष्णाची आठवण जागवयाची आणि म्हणायचं की तुझ्या कृपेनं माझं घर असंच दुधदुभत्याने कायम भरलेलं असू दे. ह्या साठी आईला दहीहंडीच्या खापराचा तुकडा हवा असायचा. आता ना आई राहिली, ना ते दुभत्याचं कपाट राहिलं ना तो खापराचा तुकडा घ्यावा असा दहीहंडीचा उत्सव राहिला. हल्लीच्या दहीहंडीच्या उत्सवा च्या बाजारीकरणाबद्दल तर न बोललेलंच बरं.

हल्लीच्या दिवसात, श्रावणातील सात्विकता लोपलीय असं राहून राहून वाटतंय. प्रत्येक दिवसाचे महत्त्व किंवा तिथीचे महत्व धार्मिकतेशी जोडून निसर्गाच्या जवळ जाण्यासाठी सण साजरी करायची परंपरा शहारा शहारातून केव्हाच लोप पावत चाललीय. खेडेगावात किंवा थोड्या मोठया गावात ती अजूनही काही प्रमाणात चालू आहे, पण तिथेही आता त्याला उत्सवी रूप येऊ लागलंय. श्रावणातल्या दिवसांची वर्णनं आता फक्त कथा, कादंबऱ्यातुन वाचायची आणि समाधान मानायचं. बालकवींचा श्रावण तर हल्ली शहरात भेटतच नाही. मला आठवतंय, पाचवी किंवा सहावीत असताना श्रावण मासी हर्ष मानसी ही कविता शिकताना बाहेर सुद्धा अगदी तस्संच वातावरण अनुभवायला मिळायचं. बहुधा त्यामुळेच, ती कविता इतकी आपल्या मनावर अमिट ठसा उमटवून गेलीय. अक्षरशः क्षणांत पाऊस आणि क्षणांत ऊन असा सोहळा खूप वेळा पाहायला मिळायचा. पुण्यात त्यावेळी झाडीसुद्धा आतापेक्षा खुपच होती, त्यामुळे सगळीकडं हिरवंगार दिसायचं. त्यातून ऊन असतानाच कधी कधी पावसाची सर यायची, त्यावेळी इंद्रधनुष्य बघायला मिळेल या आशेने मी पटकन घराबाहेर पडून आकाशात बघत बसे. क्वचित प्रसंगी दाट इंद्रधनुष्य बघायला मिळे, पण बहुतांश वेळा त्याचे विरलेले रंगच आकाशात पाहायला मिळत. तरीसुद्धा हातात काहीतरी गवसले आहे असे वाटायचे, पण काय ते कळायचे नाही. आता लख्खपणे जाणवतं, तो एक निखळ आनंद असायचा, केवळ निसर्गाच्या किमये मुळे अनुभवायला मिळालेला. श्रावणातले धार्मिक आणि सात्विकतने भिजलेल्या दिवसांचा आठव मनात कायमच दाटून राहिलाय. गावाकडंच्या श्रावणातील दिवसांची सर जरी शहरी वातावरणात अनुभवलेल्या श्रावणाला नसली तरी सुद्धा तो मनभावन आहे, त्याच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात कायमच रुंजी घालत असतात. त्याचं रूप हर एक प्रसंगी मोहक आणि लोभस असतं. उगाच नाही बॉलीवूडकरांना त्याची भुरळ पडली. मंझील मधलं रिमझिम गिरे सावन हे अमिताभ आणि मौशुमी वर मुंबईच्या खऱ्याखुऱ्या पावसात शूट केलेलं सदाबहार गाणं काय किंवा श्रावणात घन निळा हे लतादीदीच्या आवाजातलं श्रीनिवास खळेंनी संगीत बद्ध केलेलं गाणं काय, दोन्ही कडे मनाची उन्मनी अवस्था च व्यक्त होते. आपल्या मनातही अशी स्थित्यंतरं येत असतात, आशा आणि निराशेचा खेळ चालू असतो. श्रावणातल्या ऊन पावसाचा खेळ मानवी मनाशी कुठंतरी रिलेट होतो आणि म्हणूनच बहुधा इतर कुठल्याही मासा पेक्षा श्रावणमास जवळचा वाटतो. शेवटी मनुष्य हा निसर्गाच्या चक्रातला महत्वाचा घटक आहे, त्यामुळे निसर्गाच्या आविष्काराचा त्याच्या मनावर पडणारा प्रभाव हा सहाजिकच आहे. आपल्यातल्या प्रत्येकाच्या मनाच्या कुपीत मग तो स्त्री असो वा पुरुष, श्रावणाशी निगडित आठवणी नाहीत असं होऊच शकत नाही.

त्यामुळं, सावन को आने दो असंच कायम वाटतं नाही का ?

महेश मंडलीक

No comments:

Post a Comment